हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांच्या अंदाजानुसार, १३ ते १७ सप्टेंबर या कालावधीत राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
बीड, धाराशिव, लातूर, सोलापूर आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये हा पाऊस पिकांसाठी वरदान ठरेल.
Follow us onराज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतली आहे. श्रावण महिना संपत आला तरीही म्हणावा तसा पाऊस न बरसल्याने संपूर्ण महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट निर्माण होण्याची भीती पसरली होती. अनेक भागांत पावसाची तूट राहिल्यामुळे येत्या काळात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याचा धोका आहे, तसेच शेतीसाठी पुरेशा पावसाअभावी बळीराजा कमालीचा चिंतेत सापडला होता.
अशा गंभीर परिस्थितीत हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी एक दिलासादायक आणि नवीन आशा देणारा अंदाज वर्तवला आहे. त्यांच्या भविष्यवाणीनुसार, गणेशोत्सवाच्या सुरुवातीलाच राज्यात जोरदार पावसाचे आगमन होणार आहे. त्यामुळे श्रींच्या आगमनासोबतच राज्यातील पावसाची प्रतीक्षा अखेर संपणार असल्याचे चिन्हे दिसत आहेत.
पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ ते १७ सप्टेंबर या कालावधीमध्ये संपूर्ण राज्यात धुवांधार पावसाची शक्यता आहे. आतापर्यंत बीड जिल्ह्यातील ज्या कोरड्या भागात पाऊस झाला नव्हता, तिथे आणि धाराशिव, लातूर, सोलापूर यांसारख्या पर्जन्यछायेच्या जिल्ह्यांमध्ये जिथे अपेक्षित पाऊस झाला नव्हता, तिथे आता चांगला पाऊस हजेरी लावेल.
याशिवाय, विदर्भातील जिल्ह्यांमध्ये ६ आणि ७ सप्टेंबर दरम्यान पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. हा पाऊस कोमेजणाऱ्या पिकांना नवसंजीवनी देणारा ठरेल. त्यामुळे विदर्भातील सर्व ११ जिल्ह्यांतील शेतकरी आणि नागरिकांसाठी ही अत्यंत आनंदाची व दिलासा देणारी बातमी आहे, असे पंजाबराव डख यांनी स्पष्ट केले आहे.
एकंदरीत, दीर्घ प्रतीक्षेनंतर पडणारा हा पाऊस केवळ शेती पिकांना जीवनदान देणार नाही, तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी देखील अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर होणाऱ्या या वृष्टीमुळे राज्यातील शेतकरी व सर्वसामान्यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरण्याची शक्यता आहे.


