ठाणे: बदलापूर आणि वांगणी रेल्वे स्थानकांच्या दरम्यान ‘कासगाव’ (चामटोली) येथे नवीन रेल्वे स्थानक उभारण्याच्या हालचालींना वेग आला आहे. रेल्वे प्रशासनाने यासंदर्भात प्रस्ताव मागविला असून, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या नवीन स्थानकापासून नवी मुंबईतील कामोठेपर्यंत थेट रेल्वे मार्ग टाकण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास बदलापूर परिसरातील नागरिक थेट लोकलने नवी मुंबईला जो़डले जातील.
वाढत्या प्रवासी संख्येवर उपाय आणि टर्मिनसचा दर्जा
बदलापूर आणि आसपासच्या भागात नागरी वस्ती झपाट्याने वाढत असल्याने रेल्वे प्रवाशांची संख्या मोठी आहे, ज्यामुळे सध्याचा प्रवास जीवघेणा ठरत आहे. या पार्श्वभूमीवर, कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष राम पातकर यांनी रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन बदलापूर स्थानकाला ‘टर्मिनस’चा दर्जा देण्याची मागणी केली. या मागणीला रेल्वेमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून संबंधित अधिकाऱ्यांना त्याबाबतचा तांत्रिक अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.
कासगाव स्थानकाचे महत्त्व आणि प्रवाशांना दिलासा
बदलापूर शहराच्या वेशीवरील ग्रामपंचायतींमध्ये लोकसंख्या वाढत आहे, मात्र मुंबईकडे जाण्यासाठी या प्रवाशांना बदलापूर किंवा वांगणी स्थानकावर अवलंबून राहावे लागते. वांगणीतून लोकलची संख्या कमी असल्याने प्रवाशांचे हाल होतात. अशा वेळी बदलापूर आणि वांगणीच्या दरम्यान कासगाव येथे नवीन स्थानक झाल्यास स्थानिकांचा प्रवास सोपा होईल. तसेच, येथून कामोठेपर्यंत नवा मार्ग झाल्यास नवी मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांचा मोठा वेळ वाचणार आहे.
भविष्यातील सुविधा आणि वंदे भारत एक्सप्रेस
रेल्वेच्या तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचे काम पूर्ण झाल्यानंतर बदलापूर स्थानकात अतिरिक्त फलाट उपलब्ध होणार आहेत. यामुळे बदलापूर ते पुणे दरम्यान ‘वंदे भारत एक्सप्रेस’ सुरू करण्याबाबत अभ्यास करण्याच्या सूचनाही रेल्वेमंत्र्यांनी दिल्या आहेत. तसेच, फलाटांची लांबी वाढल्यामुळे भविष्यात अनेक लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्यांना बदलापूर स्थानकात थांबा मिळण्याची शक्यता निर्माण झाली असून, रेल्वे व्यवस्थापकांना या सर्व बाबींची प्रत्यक्ष पाहणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.









