Category Archives: मुंबई

मोठी बातमी:१० एक्सप्रेस गाड्यांची सेवा आता पनवेल, एलटीटी पर्यंतच; कोकणसह दक्षिणेकडील प्रवाशांचा त्रास वाढणार

   Follow us on        

मुंबई: मध्य रेल्वे (CR) ने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) आणि दादर येथून धावणाऱ्या 10 लांब पल्ल्याच्या गाड्या लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) आणि पनवेल येथे स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवला आहे. या निर्णयामुळे पीक अवर्समध्ये स्थानिक गाड्यांसाठी अधिक मार्गिका उपलब्ध होतील आणि विलंबात घट होईल, असा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे.

यातील ज्या गाड्या एलटीटी टर्मिनस येथे स्थलांतरित करण्यात येणार्‍या चार गाड्यांची नावे हाती आली असून ती खालील प्रमाणे आहेत.

एलटीटी टर्मिनस येथे स्थलांतरित करण्यात गाड्यांची नावे खालीलप्रमाणे 

  • 22629 दादर – तिरुनेलवेली एक्सप्रेस (कोकण रेल्वे मार्गे)
  • 16331 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस –तिरुवनंतपुरम (टीव्हीसी) एक्सप्रेस
  • 16351 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – नागरकोईल एक्सप्रेस
  • 16339 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – नागरकोईल एक्सप्रेस

या बदलामुळे सकाळी व संध्याकाळी होणाऱ्या गर्दीच्या वेळेत सुमारे 40 ते 50 हजार अतिरिक्त प्रवाशांना स्थानिक सेवांचा लाभ मिळू शकतो. सध्या CSMT आणि दादर येथे उशिरा येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांमुळे स्थानिक गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत होते, त्यामुळे दररोज अनेक लोकल गाड्या विलंबाने धावतात.

CR च्या योजनेनुसार काही लांब पल्ल्याच्या गाड्या CSMT आणि दादरऐवजी LTT किंवा पनवेल येथे सुरू–समाप्त केल्या जातील. यामुळे CSMT–कसारा/कर्जत मार्गावर सुमारे 15 अतिरिक्त उपनगरीय लोकल सेवा चालवणे शक्य होईल. तसेच काही गाड्यांचे वेळापत्रक 10 मिनिटांपर्यंत बदलण्याचाही विचार आहे.

रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, हा बदल केवळ टर्मिनस बदलण्यापुरता मर्यादित नसून, काही गाड्यांचे डबे वाढवून प्रवासी क्षमता वाढवण्याचाही प्रस्ताव आहे.

मात्र, प्रवासी संघटनांनी या निर्णयाबाबत चिंता व्यक्त केली आहे. LTT किंवा पनवेल येथे टर्मिनस बदलल्यास लांब पल्ल्याच्या प्रवाशांना अतिरिक्त अंतर व वाहतुकीचा त्रास सहन करावा लागू शकतो, असे त्यांचे म्हणणे आहे.

मोडी लिपी मोफत प्रशिक्षण शिबिराचा उत्साहात प्रारंभ

   Follow us on        

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : मराठी संस्कृतीचा अभिमान मानल्या जाणाऱ्या आणि ऐतिहासिक वारशाची साक्ष देणाऱ्या मोडी लिपीच्या संवर्धन व पुनरुज्जीवनासाठी “श्री शिवाजी ज्ञानपीठ इंटरनॅशनल” आणि “शिवस्वराज्य प्रबोधिनी प्रतिष्ठान” यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोडी लिपी – मोफत शिकवणी वर्गाचा १८ जानेवारी २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. मोडी लिपीचा प्रसार व्हावा आणि तिचे महत्त्व नव्या पिढीपर्यंत पोहोचावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

हे प्रशिक्षण शिबिर एकूण १० रविवार चालणार असून दर रविवारी संध्याकाळी ५ ते ७ या वेळेत वर्ग घेतले जाणार आहेत. शिबिराच्या पहिल्याच दिवशी विविध वयोगटांतील मोडी लिपीप्रेमी, इतिहास अभ्यासक तसेच नवशिक्या प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हे वर्ग डॉक्टर गायकवाड‘स इन्स्टिट्यूट, दादर, मुंबई येथे आयोजित करण्यात आले आहेत.

या प्रशिक्षण शिबिरामध्ये मोडी लिपीची मूलभूत ओळख, अक्षररचना व लेखनपद्धती, प्राथमिक वाचन–लेखन प्रशिक्षण यावर विशेष भर देण्यात येत आहे. त्यासोबतच वैयक्तिक मार्गदर्शनाची व्यवस्था करण्यात आली असून संपूर्ण प्रशिक्षण पूर्णतः मोफत आहे. या वर्गांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन वनिता साळुंखे या करत असून त्यांच्या अनुभवसंपन्न मार्गदर्शनामुळे प्रशिक्षण अधिक सुलभ, शिस्तबद्ध आणि प्रभावी ठरत आहे.

या प्रशिक्षण शिबिराच्या प्रारंभप्रसंगी प्रवीण जाधव (शिव स्वराज्य प्रबोधिनी प्रतिष्ठान संस्था अध्यक्ष) आणि रुपेश पवार (मोडी लिपी आणि इतिहास अभ्यासक) यांची उपस्थिती लाभली. मोडी लिपी शिकणे म्हणजे आपल्या वैभवशाली इतिहासातील बखरी, राजपत्रे, दस्तऐवज व शिलालेखांशी थेट नाते जोडण्याची दुर्मिळ आणि अमूल्य संधी असल्याचे त्यांनी नमूद केले. मोडी लिपीचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

Mumbai Local: मुंबई लोकल वेळेवर धावणार; मध्य रेल्वेने घेतला मोठा निर्णय

   Follow us on        

मुंबई: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्थानकावरील प्रवाशांचा वाढता भार कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या नवीन नियोजनानुसार, काही एक्स्प्रेस गाड्या आता सीएसएमटीपर्यंत न येता केवळ लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) पर्यंतच चालवल्या जाणार आहेत.

​मुंबईचे मुख्य प्रवेशद्वार असलेल्या सीएसएमटी स्थानकावर दररोज लाखो प्रवाशांची ये-जा असते, ज्यामुळे प्लॅटफॉर्म आणि रेल्वे मार्गांवर मोठा ताण निर्माण होतो. हा ताण सुसह्य करण्यासाठी आणि गाड्यांच्या वेळापत्रकात अधिक सुसूत्रता आणण्यासाठी प्रशासनाने ठराविक लांब पल्ल्याच्या गाड्यांचे टर्मिनस बदलण्याचा निर्णय घेतला आहे. या बदलामुळे कुर्ला येथील लोकमान्य टिळक टर्मिनसचा वापर अधिक प्रभावीपणे होईल आणि मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील गर्दीचे विभाजन होण्यास मदत होईल.

​हा निर्णय विशेषतः उपनगरीय लोकल प्रवाशांसाठीही दिलासादायक ठरू शकतो, कारण एक्स्प्रेस गाड्यांची संख्या सीएसएमटीवर कमी झाल्यामुळे लोकल गाड्यांच्या संचालनात येणारे अडथळे कमी होण्याची शक्यता आहे. मात्र, ज्या प्रवाशांना थेट दक्षिण मुंबईत जायचे आहे, त्यांना आता कुर्ल्याला उतरून पुढील प्रवास करावा लागणार आहे.

लॉंग वीकेंडलाच मध्य रेल्वेचा ब्लॉक; कोकणकन्या, तुतारी एक्सप्रेससह अन्य गाड्या रखडणार

   Follow us on        

मुंबई: डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन (DFCC) प्रकल्पाच्या पायाभूत कामासाठी मध्य रेल्वेने पनवेल आणि कळंबोली स्थानकांदरम्यान विशेष ट्रॅफिक ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा ब्लॉक रविवार, २५ जानेवारी रोजी रात्री घेण्यात येणार असून, यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता आहे. या ब्लॉक मुळे शनिवार – रविवार आणि लागून आलेल्या प्रजासत्ताक दिनाच्या सुट्टीत गावी जाणार्‍या प्रवाशांची गैरसोय होणार आहे.

​ब्लॉकचे मुख्य कारण

​कळंबोली येथे ११० मीटर लांबीच्या (१५०० मेट्रिक टन वजन) ‘ओपन वेब गर्डर’ उभारणीचे काम केले जाणार आहे. यासाठी पनवेल-कळंबोली दरम्यान अप आणि डाऊन अशा दोन्ही मार्गांवर मध्यरात्री १:२० ते पहाटे ५:२० वाजेपर्यंत असा एकूण चार तासांचा ब्लॉक असेल.

​गाड्यांच्या मार्गात आणि वेळेत झालेले बदल:

​या कामामुळे अनेक महत्त्वाच्या गाड्यांवर परिणाम होणार आहे. त्याचे तपशील खालीलप्रमाणे आहेत:

​१. मार्गात बदल (Diverted Train):

​गाडी क्र. २२१९३ (दौंड – ग्वाल्हेर एक्सप्रेस): ही गाडी कर्जत – कल्याण – वसई रोड या पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.

२. स्थानकांवर थांबवून ठेवण्यात येणाऱ्या गाड्या (Regulated Trains):

​गाडी क्र. १२१३४ (मंगळुरू – सीएसएमटी एक्सप्रेस): ही गाडी सोमाटणे स्थानकादरम्यान रात्री २:५८ ते पहाटे ५:२० पर्यंत थांबवून ठेवली जाईल.

​गाडी क्र. २०११२ (मडगाव – सीएसएमटी कोकण कन्या एक्सप्रेस): ही गाडी पनवेल येथे पहाटे ४:०२ ते ५:२० पर्यंत थांबवली जाईल.

​गाडी क्र. ११००४ (सावंतवाडी रोड – दादर तुतारी एक्सप्रेस): ही गाडी आपटा स्थानकात पहाटे ४:२५ ते ५:१५ पर्यंत थांबवण्यात येईल.

​गाडी क्र. १२६२० (मंगळुरू – एलटीटी मत्स्यगंधा एक्सप्रेस): ही गाडी जिते स्थानकात पहाटे ४:४१ ते ५:१० पर्यंत थांबवली जाईल.

३. वेळेत बदल आणि उशीर:

​गाडी क्र. १०१०३ (सीएसएमटी – मडगाव मांडवी एक्सप्रेस): या गाडीच्या सुटण्याच्या वेळेत बदल करण्यात आला असून, ही गाडी सीएसएमटी येथून सकाळी ८:२० वाजता सुटेल.

​गाडी क्र. १७३१७ (हुबळी – दादर एक्सप्रेस): ही गाडी १५ ते २० मिनिटे उशिराने धावेल.

​प्रवाशांना आवाहन

​या मेगाब्लॉकमुळे कोकण रेल्वेच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम होणार असून, तुतारी, मांडवी आणि कोकण कन्या यांसारख्या महत्त्वाच्या गाड्या विलंबाने धावतील. प्रवाशांनी प्रवासाला निघण्यापूर्वी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा चौकशी खिडकीवर गाड्यांची सद्यस्थिती तपासून घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Mumbai Local: मुंबई उपनगरीय मार्गावरील १२ लोकल्स ‘एसी लोकल्स’ मध्ये रुपांतरीत होणार

   Follow us on        

मुंबई: मुंबईतील प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने (WR) प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे. येत्या २६ जानेवारी २०२६ पासून मुंबई उपनगरीय मार्गावर १२ नवीन एसी (AC) लोकल फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

मुंबई उपनगरीय प्रवाशांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून, येत्या सोमवार, २६ जानेवारी २०२६ पासून १२ नवीन एसी लोकल फेऱ्या सुरू होणार आहेत. विशेष म्हणजे, या नवीन एसी फेऱ्या सध्या धावत असलेल्या १२ साध्या (Non-AC) फेऱ्यांच्या जागी चालवल्या जाणार आहेत. रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, या बदलामुळे मुंबई उपनगरीय मार्गावरील लोकल गाड्यांच्या एकूण फेऱ्यांमध्ये कोणताही बदल होणार नाही. एकूण सेवांची संख्या १४०६ इतकीच कायम राहणार असून, त्यामध्ये आता एसी लोकलच्या एकूण फेऱ्यांची संख्या १०९ वरून १२१ वर पोहोचेल.

​फेऱ्यांचा तपशील (Annexure-I नुसार):

​या १२ सेवांपैकी ६ फेऱ्या ‘अप’ मार्गावर (चर्चगेटकडे) आणि ६ फेऱ्या ‘डाऊन’ मार्गावर (विरार/बोरिवलीकडे) असतील.

​१. अप मार्ग (चर्चगेटच्या दिशेने):

​गोरेगाव ते चर्चगेट: सकाळी ०५:१४ (स्लो) आणि संध्याकाळी १९:०६ (स्लो).

​बोरिवली ते चर्चगेट: सकाळी ०७:२५ (फास्ट).

​विरार ते चर्चगेट: सकाळी १०:०८ (फास्ट) आणि दुपारी १५:४५ (स्लो).

​भाईंदर ते चर्चगेट: दुपारी १२:४४ (फास्ट).

​२. डाऊन मार्ग (चर्चगेटवरून सुटणाऱ्या):

​चर्चगेट ते बोरिवली: सकाळी ०६:१४ (स्लो).

​चर्चगेट ते विरार: सकाळी ०८:२७ (फास्ट) आणि दुपारी १३:५२ (स्लो).

​चर्चगेट ते भाईंदर: सकाळी ११:३० (फास्ट).

​चर्चगेट ते गोरेगाव: संध्याकाळी १७:५७ (स्लो) आणि रात्री २०:०७ (स्लो).

​पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी श्री विनीत अभिषेक यांनी दिलेल्या माहितीनुसार, एसी लोकलच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे आणि प्रवाशांची प्रवासाची सोय सुधारण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

 

शब्द–संवेदनांचा उत्सव : मराठी साहित्य व कला सेवेतर्फे तेवीसावे कविसंमेलन दादरमध्ये उत्साहात संपन्न

   Follow us on        

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : शब्दांना भावार्थ देणाऱ्या संवेदना, अनुभवांना दिशा देणारे विचार आणि संस्कृतीच्या मुळांशी जोडणारी अभिव्यक्ती यांचा सुरेल संगम साधणारे मराठी साहित्य व कला सेवा आयोजित तेवीसावे कविसंमेलन रविवार, दिनांक ११ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी दादर (पूर्व) येथील इंडियन एज्युकेशन सोसायटी, राजा शिवाजी विद्यालय, हिंदू कॉलनी येथे अत्यंत शिस्तबद्ध, रसिक आणि साहित्यनिष्ठ वातावरणात यशस्वीरीत्या पार पडले. नववर्षाच्या प्रारंभी आयोजित या साहित्यिक सोहळ्याने कवी आणि रसिकांच्या मनात सर्जनशील ऊर्जेचे नवे अंकुर रुजवले.

गेल्या नऊ वर्षांपासून सातत्याने काव्य, कला आणि विचारांच्या संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या मराठी साहित्य व कला सेवा या संस्थेने या संमेलनातून नवोदित व अनुभवी कवींना समान व्यासपीठ उपलब्ध करून दिले. एकाच कार्यक्रमात प्रत्येक कवीला तीन कविता सादर करण्याची संधी देणारी ही संस्था अखंड भारतवर्षातील एकमेव संस्था असल्याचे वैशिष्ट्य या संमेलनात अधोरेखित झाले. “कविता का लिहावी?” या पहिल्या सत्रात आत्मशोध, समाजाशी साधलेला प्रामाणिक संवाद आणि न बोलता येणाऱ्या भावनांचा काव्यमय वेध घेण्यात आला, तर दुसऱ्या व तिसऱ्या सत्रात मुक्त विषयांवरील स्वच्छंद, प्रामाणिक आणि भावपूर्ण अभिव्यक्तीने रसिकांना मंत्रमुग्ध केले.

या कविसंमेलनात अशोक सहदेव सुकाळे, आदित्य भालचंद्र कुलकर्णी, एकनाथ शेडगे, कल्पना दिलीप मापूसकर, चंद्रकांत दढेकर (अभिवाचन), जयश्री हेमचंद्र चुरी, नमिता नितीन आफळे (अभिवाचन), प्रतिक्षा पांडुरंग सरमळकर, महेश रामनाथ वैजापूरकर, डॉ. मानसी पाटील, मोहित जनार्दन तांडेल, योगिता दशरथ कदम, विक्रांत मारुती लाळे, विलास मारुती अडसुळे (अभिवाचन), विवेक वसंत जोशी आणि गुरुदत्त दिनकर वाकदेकर यांनी आपल्या सादरीकरणातून विविध भावविश्वे उलगडली. स्वामी विवेकानंद या विषयांवरील अभिवाचनाने विचार, प्रेरणा आणि सकारात्मकतेचा सशक्त संदेश दिला.

कार्यक्रमाचे आस्वादक म्हणून डॉ. अनुज केसरकर आणि राहुल मुदाळकर यांनी सूक्ष्म निरीक्षणांसह रचनांचा रसग्रहणात्मक आढावा घेतला. सूत्रसंचालनाची जबाबदारी डॉ. मानसी पाटील यांनी अत्यंत ओघवत्या आणि संवेदनशील शैलीत पार पाडली. अल्पोपहाराची शानदार व्यवस्था डॉ. मानसी पाटील आणि डॉ. अनुज केसरकर यांनी केली. कार्यक्रमाचे छायाचित्रण विक्रांत लाळे यांनी व्यावसायिक खुबीने केले. संपूर्ण कार्यक्रमात साहित्यिक शिस्त, वेळेचे काटेकोर पालन आणि रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हे विशेष लक्षवेधी ठरले.

शब्दसंपदा, वैचारिक समृद्धी आणि सांस्कृतिक जाणीव यांचा सुरेल संगम साधणारे हे तेवीसावे कविसंमेलन उपस्थित प्रत्येकाच्या मनात दीर्घकाळ रेंगाळणारा अनुभव ठरले. कार्यक्रमाच्या यशस्वी समारोपप्रसंगी आयोजकांनी पुढील उपक्रमाची घोषणा करत चोवीसावे कविसंमेलन रविवार, दिनांक ८ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती दिली. साहित्यसंवादाचा हा सन्माननीय मंच भविष्यातही मराठी साहित्यविश्वाला नवी दिशा देत राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

​‘फुकटची’ बस नको, हक्काची ट्रेन द्या! मत हवे असेल तर ‘टर्मिनस’ द्या!

मत’ हवे असेल तर ‘टर्मिनस’ द्या!

   Follow us on        

​मुंबई/सावंतवाडी:

“निवडणुका आल्या की आमची आठवण येते, सणासुदीला मोफत बसचे गाजर दाखवले जाते. पण आम्हाला ही तात्पुरती मलमपट्टी नको आहे. आम्हाला सन्मानाचा आणि हक्काचा रेल्वे प्रवास हवा आहे. जर मते हवी असतील, तर आधी सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचा प्रश्न मार्गी लावा,” अशा शब्दांत मुंबईतील कोकणी चाकरमान्यांनी आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधींना धारेवर धरले आहे.

​सोशल मीडियावर सध्या एका व्यथित चाकरमान्याचे पत्र तुफान व्हायरल होत असून, ‘तात्पुरती बस नको, हक्काची ट्रेन हवी’ ही मागणी आता एका जनआंदोलनाचे रूप धारण करत आहे.

​बसेसच्या राजकारणापेक्षा कायमस्वरूपी उपाय हवा

​दरवर्षी गणेशोत्सव आणि शिमग्याला राजकीय पक्षांकडून ‘मोफत बस’ सोडण्याची चढाओढ लागते. मात्र, तासनतास होणारी वाहतूक कोंडी आणि बसचा प्रवास हा त्रासदायक ठरत असल्याची भावना चाकरमान्यांमध्ये आहे. “आम्ही भिकारी नाही, आम्ही कष्टाळू आहोत. आम्हाला फुकटचा प्रवास नको, तर सुरक्षित रेल्वे प्रवास हवा आहे,” असा सणसणीत टोला या पत्राद्वारे राजकीय नेत्यांना लगावण्यात आला आहे.

​‘मत’ हवे असेल तर ‘टर्मिनस’ द्या!

​”जो आमच्या हक्कासाठी लढेल, त्याच्याच पाठीशी कोकणी समाज खंबीरपणे उभा राहील,” असा इशाराही चाकरमान्यांनी दिला आहे. भावी नगरसेवकांनी केवळ वॉर्डापुरते मर्यादित न राहता, सभागृहात आणि प्रशासनासमोर सावंतवाडी टर्मिनसचा आवाज उठवावा, अशी मागणी जोर धरत आहे.

​”कोकणी बाणा हा आहे की, आम्ही कष्टाचे खातो. आम्हाला निवडणुकीपुरती मलमपट्टी नको, तर रेल्वेच्या रुळावर धावणारी कायमस्वरूपी प्रगती हवी आहे.”

— एक व्यथित कोकणी चाकरमानी

अरे बापरे! मुंबईतून हरवलेले तब्बल दोन कोटी रुपयांचे १६५० मोबाईल उत्तर प्रदेशात सापडले

   Follow us on        

मुंबई: मुंबई पोलिसांनी हरवलेल्या आणि चोरीला गेलेल्या मोबाईल फोनचा शोध घेण्यासाठी राबवलेल्या एका विशेष मोहिमेअंतर्गत मोठे यश संपादन केले आहे. मुंबईतून गायब झालेले तब्बल १,६५० मोबाईल फोन पोलिसांनी उत्तर प्रदेशातील विविध भागांतून शोधून काढले आहेत. या जप्त करण्यात आलेल्या फोनची बाजारपेठीय किंमत अंदाजे २ कोटी रुपये इतकी आहे. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी या फोनचा माग काढला आणि विशेष पथकाद्वारे हे फोन पुन्हा मुंबईत आणले.

​या मोहिमेमुळे आपले महागडे फोन परत मिळतील ही आशा सोडून दिलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या विशेष मोहिमेअंतर्गत आतापर्यंत एकूण ३३,५१४ मोबाईल फोन त्यांच्या मूळ मालकांना सुरक्षितपणे परत करण्यात आले आहेत. चोरीच्या मोबाइल टोळ्यांवर वचक बसवण्यासाठी आणि नागरिकांचा कष्टाचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठी ही मोहीम यापुढेही सुरू राहणार असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

 

Mumbai Local : मुंबईमध्ये लोकल ट्रेनला भीषण आग

   Follow us on        

मुंबई: मध्य रेल्वेच्या कुर्ला आणि विद्याविहार रेल्वे स्थानकांदरम्यान गुरुवारी रात्री कचरा उचलणाऱ्या ‘मक स्पेशल’ लोकलला भीषण आग लागल्याची घटना घडली. ऐन गर्दीच्या वेळी ही दुर्घटना घडल्याने मध्य रेल्वेची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती, ज्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले.

​नेमकी घटना काय?

​मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री ८:३० च्या सुमारास ही आग लागली. ही आग कचरा उचलणाऱ्या मक स्पेशल लोकलच्या पहिल्या डब्याला लागली होती. या डब्यामध्ये रेल्वे रुळांवरून गोळा केलेला कचरा आणि गाळ भरलेला होता. आग लागली तेव्हा हा डबा कुर्ल्यातील ईएमयू सायडिंगवर उभा होता.

​आग विझवण्यासाठी रेल्वे प्रशासनाला तातडीने ओव्हरहेड केबलचा वीज पुरवठा खंडित करावा लागला.विद्याविहार आणि सायन दरम्यान रात्री ८:३८ ते ८:५५ या वेळेत वीज पुरवठा बंद ठेवण्यात आला होता.वीज पुरवठा खंडित केल्यामुळे ‘अप’ धीम्या मार्गावरील लोकल सेवा पूर्णपणे थांबली होती, ज्यामुळे कामावरून घरी परतणाऱ्या चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागला.

​सुदैवाने, रेल्वे कर्मचाऱ्यांनी तातडीने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. कचऱ्याला आग लागल्याने धुराचे लोट परिसरात पसरले होते, मात्र यात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

Mumbai Local: मुंबईत लवकरच १८ डब्यांच्या लोकल्स धावण्याची शक्यता

   Follow us on        

मुंबई : मुंबई उपनगरीय रेल्वेच्या प्रवासी क्षमतेत मोठी वाढ करण्याच्या दृष्टीने पश्चिम रेल्वेने एक क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. वाढत्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि प्रवाशांचा प्रवास सुखकर करण्यासाठी विरार-डहाणू रोड विभागावर १८ डब्यांच्या लोकल ट्रेनची विशेष चाचणी घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. ही चाचणी १४ आणि १५ जानेवारी २०२६ रोजी पार पडणार असून, याद्वारे मुंबईच्या रेल्वे प्रवासाचा चेहरामोहरा बदलण्याच्या हालचालींना वेग आला आहे. या चाचणीमध्ये प्रामुख्याने ‘इमर्जन्सी ब्रेकिंग डिस्टन्स’ (EBD) आणि ‘कपलर फोर्स’ म्हणजेच डब्यांमधील जोडणीवर येणारा ताण यांची तांत्रिक तपासणी केली जाईल. आपत्कालीन परिस्थितीत वेगाने धावणारी १८ डब्यांची गाडी किती अंतरावर सुरक्षितपणे थांबू शकते, हे पाहणे या चाचणीचा मुख्य उद्देश आहे.

या प्रक्रियेत बॉम्बार्डियर (Bombardier) आणि मेधा (Medha) या दोन वेगवेगळ्या बनावटीच्या १८ डब्यांच्या गाड्यांची ताकद अजमावली जाणार आहे. बॉम्बार्डियर क्लासची चाचणी ११० किमी प्रतितास, तर मेधा इलेक्ट्रिकलची चाचणी १०५ किमी प्रतितास या वेगाने घेतली जाईल. विरार-डहाणू पट्टा हा विनाअडथळा वेगवान धावण्यासाठी योग्य असल्याने या भागाची निवड करण्यात आली आहे. सध्या मुंबईत १२ आणि १५ डब्यांच्या लोकल धावत असल्या तरी १८ डब्यांची सेवा सुरू झाल्यास एकाच वेळी हजारो जादा प्रवाशांना प्रवास करता येईल. या चाचण्यांचे निकाल सकारात्मक आल्यास, मुंबईच्या रेल्वे इतिहासात हा एक ऐतिहासिक बदल ठरेल आणि भविष्यात गर्दीच्या समस्येवर हा एक प्रभावी उपाय ठरणार आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search