Category Archives: मुंबई

मुंबईकरांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेने विशेष ब्लॉकचा कालावधी वाढवला; अनेक एक्स्प्रेस गाड्या दादर, ठाण्यापर्यंतच धावणार

   Follow us on        

मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील मेन लाईनवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथील प्लॅटफॉर्म क्रमांक १६ आणि १७ वर सुरू असलेल्या पुनर्विकास कामांमुळे लागू करण्यात आलेल्या ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉकला रेल्वे प्रशासनाने आता १३ जून २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे या कालावधीत निवडक मेल/एक्स्प्रेस गाड्या सीएसएमटी ऐवजी दादर आणि ठाणे स्थानकांवरच ‘शॉर्ट टर्मिनेट’ (प्रवास आधीच संपवणे) केल्या जातील.

​ब्लॉक वाढवण्याचे कारण काय?

​रेल लँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी (RLDA) द्वारे सीएसएमटी स्थानकाचा पुनर्विकास केला जात आहे. या प्रकल्पाचा भाग म्हणून प्लॅटफॉर्म क्रमांक १६ आणि १७ वर पायाभूत सुविधांचा विकास, आधुनिकीकरण आणि इतर आवश्यक कामे केली जात आहेत.

​यापूर्वी हा ब्लॉक दिनांक ०१.०२.२०२६ ते २६.०४.२०२६ पर्यंत लागू करण्यात आला होता, त्यानंतर तो १९.०५.२०२६ पर्यंत वाढवला गेला आणि आता कामाची व्याप्ती पाहता ही मुदत १३ जून २०२६ पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

​या गाड्या धावणार फक्त दादर आणि ठाणे पर्यंतच

​दिनांक १३.०६.२०२६ रोजी प्रवास सुरू होणाऱ्या (JCO) खालील गाड्या सीएसएमटी पर्यंत न जाता आधीच थांबवल्या जातील:

​१. दादर येथे शॉर्ट टर्मिनेट होणाऱ्या गाड्या:

​गाडी क्र. १२११२: अमरावती – सीएसएमटी एक्स्प्रेस

​गाडी क्र. ११००२: बल्लारशाह – सीएसएमटी नंदीग्राम एक्स्प्रेस

​गाडी क्र. १२८१०: हावडा – सीएसएमटी एक्स्प्रेस

​गाडी क्र. ११M२०: भुवनेश्वर – सीएसएमटी कोणार्क एक्स्प्रेस

​गाडी क्र. २२१४४: बिदर – सीएसएमटी एक्स्प्रेस

​गाडी क्र. २२१०८: लातूर – सीएसएमटी एक्स्प्रेस

​गाडी क्र. २२१२०: मडगाव – सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस

​२. ठाणे येथे शॉर्ट टर्मिनेट होणारी गाडी:

​गाडी क्र. १२१३४: मंगळूर – सीएसएमटी एक्स्प्रेस

​रेल्वे प्रशासनाचे आवाहन

“पायाभूत सुविधांची देखभाल, सुरक्षा आणि आधुनिकीकरणासाठी हे ब्लॉक्स अत्यंत आवश्यक आहेत. यामुळे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर आहे,” असे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. प्रवाशांनी आपल्या प्रवासाचे नियोजन या बदलांचा विचार करून करावे.

Mumbai Local: हार्बर मार्गावर जलद लोकलसाठी स्वतंत्र मार्गिकेची चाचपणी

   Follow us on        

मुंबई:मुंबईतील उपनगरीय रेल्वे प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर, सुरक्षित आणि वेगवान करण्यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) कंबर कसली आहे. यामध्ये कित्येक वर्षांपासून उपेक्षित राहिलेल्या हार्बर रेल्वे मार्गाच्या विकासासाठी ठोस पावले उचलली जात आहेत. मुंबई, नवी मुंबई आणि ‘तिसऱ्या मुंबई’ला जलद गतीने जोडण्यासाठी हार्बर मार्गावर जलद लोकल गाड्या धावण्यासाठी स्वतंत्र मार्गिकेची चाचपणी केली जाणार आहे. सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते पनवेल दरम्यान केवळ धिम्या लोकल धावत असल्याने आणि वाढत्या लोकसंख्येमुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. यावर तोडगा म्हणून ‘एमयुटीपी-४’ (MUTP-4) प्रकल्पांतर्गत एका सल्लागाराची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही जलद मार्गिका कितपत व्यवहार्य ठरेल आणि कोणत्या भागातून करता येईल, याचा अभ्यास हा सल्लागार करेल. यासोबतच ठाणे-बोरीवली आणि वांद्रे-कुर्ला या भागांत रेल्वे कनेक्टिव्हिटी शक्य आहे का, याचाही अभ्यास केला जाणार असल्याची माहिती एमआरव्हीसीचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक विलास वाडेकर यांनी दिली.

​दुसऱ्या बाजूला, पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गावरील लोकल ट्रेनची प्रवासी क्षमता वाढवण्यासाठी १५ डब्यांच्या लोकल फेऱ्यांची संख्या वाढवली जाणार आहे. त्यासाठी अत्यंत प्रगत समजली जाणारी ‘ट्रेन कंट्रोल अँड मॉनिटरिंग सिस्टम’ (TCMS) लागू करण्यात येत असून, विविध स्थानकांवर प्लॅटफॉर्मच्या विस्तारीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. यामुळे प्रवाशांना गर्दीतून मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. तसेच प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायी करण्यासाठी रेल्वेकडून लवकरच २३८ नवीन डिझाईनच्या एसी लोकल दाखल केल्या जाणार आहेत. यासाठीच्या निविदा जून महिन्यापर्यंत अंतिम केल्या जातील आणि टप्प्याटप्प्याने सध्याच्या नॉन-एसी लोकलचे एसी लोकलमध्ये रूपांतर केले जाईल.

​प्रवाशांच्या सोयी-सुविधांसोबतच त्यांच्या सुरक्षिततेलाही सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे. उपनगरीय रेल्वे मार्गावरील अपघाती मृत्यूंचे सत्र थांबवण्यासाठी ‘मिशन झीरो डेथ’ अंतर्गत रेल्वे स्थानकांचा कायापालट केला जात आहे. पहिल्या टप्प्यात निवडलेल्या १७ स्थानकांपैकी ५ स्थानकांचे काम पूर्ण झाले असून, उर्वरित स्थानकांच्या कामाला गती दिली जात आहे. यामध्ये दादर, घाटकोपर, वसई आणि भांडुप यांसारख्या प्रमुख आणि गर्दीच्या स्थानकांचा समावेश आहे. एकूणच, येत्या काळात मुंबईकरांना अधिक आधुनिक, वेगवान आणि सुरक्षित रेल्वे सेवा अनुभवता येणार आहे.

मुंबईतील ४ लाख पगडी भाडेकरूंची चिंता वाढली

   Follow us on        

मुंबई:मुंबईतील तब्बल ९३५ जुन्या आणि मोडकळीस आलेल्या पगडी पद्धतीमधील इमारतींचा पुनर्विकास पुन्हा एकदा कायदेशीर कचाट्यात सापडला आहे. म्हाडाच्या (MHADA) कार्यकारी अभियंत्यांना ‘कलम ७९-अ’ अंतर्गत नोटिसा बजावण्याचा अधिकार आहे की नाही, यावरून सुरू असलेला वाद आता सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) पोहोचला आहे. या प्रदीर्घ न्यायालयीन लढ्यामुळे मुंबईतील सुमारे ४ लाख पगडी रहिवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून त्यांच्यात तीव्र चिंतेचे वातावरण पसरले आहे.

काय आहे मुख्य वाद?

​धोकादायक किंवा उपकरप्राप्त (Cessed) इमारतींमधील रहिवाशांना घरे रिकामी करण्यास सांगणे आणि पुनर्विकास प्रक्रिया सुरू करण्यासाठी ‘कलम ७९-अ’ अंतर्गत नोटीस बजावणे अत्यंत महत्त्वाचे असते. म्हाडाच्या कार्यकारी अभियंत्यांना ही नोटीस बजावण्याचा अधिकार आहे का, यावरून घरमालक आणि म्हाडा यांच्यात वाद सुरू आहे.

​डिसेंबर २०२४: अनेक घरमालकांनी या अधिकाराला आव्हान देत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

​जुलै २०२५: मुंबई उच्च न्यायालयाने या नोटिसांच्या वैधतेची आणि अधिकाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी करण्यासाठी एक विशेष समिती स्थापन केली.

​समितीचा निष्कर्ष: समितीने सादर केलेल्या अहवालानुसार, म्हाडाच्या २००१ मधील ठरावानुसार आणि ऑक्टोबर २०२३ च्या शासकीय मार्गदर्शक तत्त्वांनुसार, कार्यकारी अभियंत्यांनाच सक्षम प्राधिकरण मानले गेले आहे. त्यांना किमान ५१ टक्के भाडेकरूंच्या संमतीने पुनर्विकासाचा प्रस्ताव सादर करण्यासाठी घरमालकांना नोटीस देण्याचा अधिकार आहे.

​समितीच्या अहवासानंतर या समस्येवर तोडगा निघेल अशी आशा असतानाच, घरमालकांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्याने हा पेच अधिकच वाढला आहे.

​”आम्हाला मरायला सोडले आहे का?” — रहिवाशांची आर्त हाक

​पावसाळा तोंडावर आलेला असताना पुनर्विकास रखडल्याने आणि कायदेशीर लढाईमुळे इमारतींची दुरुस्तीही करता येत नसल्याने रहिवाशांनी तीव्र संताप व भीती व्यक्त केली आहे:

​निनद शिवणेकर (परळ रहिवासी): “आमचे घर खूप छोटे असल्याने मी, माझी पत्नी आणि ५ वर्षांची मुलगी गच्चीवर झोपतो. वृद्ध पालकांना बाहेरचे शौचालय वापरणे कठीण जाते. छप्पर कधीही कोसळू शकते, म्हणून मी छपराला आधार देण्यासाठी लाकडे आणि होर्डिंग्ज शोधत आहे. या शहरात घरमालकांसारखी अमानुष माणसेही राहतात, हे मुंबईचे कडू सत्य आहे.”

​दिनेश लोके (दादर रहिवासी): “मुंबईत लवकरच मुसळधार पाऊस सुरू होईल. इमारत न्यायालयात अडकल्याने दुरुस्ती किंवा पुनर्विकास काहीच होत नाहीये. म्हाडाच्या अधिकारांवरच प्रश्नचिन्ह असल्याने यंदा पावसाळापूर्व स्ट्रक्चरल ऑडिटही होणार नाही. प्रशासन आम्ही मरण्याची वाट पाहत आहे का?”

​सुमेधा तावडे (गिरगाव रहिवासी): “आधी घरमालकांनी भाडे घेणे बंद केले, मग दुरुस्ती नाकारली आणि नंतर भाडे दिले नाही म्हणून घर खाली करण्याची धमकी दिली. आता पुनर्विकास लांबणीवर टाकण्यासाठी ते न्यायव्यवस्थेचा वापर करत आहेत. आजच्या महागाईत आम्ही दुसरीकडे घर घेऊ शकत नाही. आता सर्वोच्च न्यायालयात मॅटर गेल्यामुळे आमची प्रतीक्षा आणखी वाढली आहे.”

कायद्यात बदलाची गरज

​या परिस्थितीवर बोलताना सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी सांगितले की, समितीच्या अहवालानंतर आता ‘महाराष्ट्र भाडे नियंत्रण कायदा’ आणि ‘म्हाडा कायद्यात’ त्वरित सुधारणा करण्याची गरज आहे. तरच लाखो पगडी रहिवाशांना खरा न्याय मिळू शकेल.

प्रवाशांनो लक्ष द्या! CSMT येथे प्लॅटफॉर्म विस्तारीकरणासाठी रेल्वेचा १० दिवसांचा ब्लॉक; अनेक गाड्या दादर आणि ठाण्यापर्यंत मर्यादित

   Follow us on        

मुंबई:छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथील प्लॅटफॉर्म क्रमांक १६ आणि १७ च्या विस्तारीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी वाहतूक आणि वीजपुरवठा खंडित करण्यात येणार असल्याने, अनेक मेल-एक्सप्रेस गाड्या आगामी १० दिवसांसाठी दादर आणि ठाणे स्थानकापर्यंतच चालवण्यात येतील. या ब्लॉक कालावधीत प्लॅटफॉर्म क्रमांक १६ आणि १७ वर पायाभूत तसेच इतर आवश्यक कामे पूर्ण केली जाणार आहेत. त्यानुसार, २९ मे २०२६ पासून सुरू होणाऱ्या १० दिवसांच्या कालावधीसाठी काही अप मेल/एक्सप्रेस गाड्या शॉर्ट टर्म (दादर/ठाणे पर्यंतच) चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.

या ब्लॉकमुळे अनेक महत्त्वाच्या एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात आणि थांब्यांमध्ये बदल करण्यात आला आहे, ज्याची यादी खालीलप्रमाणे आहे:

​दादर पर्यंत मर्यादित केलेल्या गाड्या:

गाडी क्र. १२११२ अमरावती – सीएसएमटी एक्सप्रेस, गाडी क्र. ११००२ बल्लारशाह – सीएसएमटी नंदीग्राम एक्सप्रेस, गाडी क्र. १२८१० हावडा – सीएसएमटी एक्सप्रेस, गाडी क्र. ११०२० भुवनेश्वर – सीएसएमटी कोणार्क एक्सप्रेस, गाडी क्र. २२१४४ बिदर – सीएसएमटी एक्सप्रेस, गाडी क्र. २२१०८ लातूर – सीएसएमटी एक्सप्रेस आणि गाडी क्र. २२१२० मडगाव – सीएसएमटी तेजस एक्सप्रेस या सर्व गाड्या सीएसएमटी ऐवजी दादर येथे थांबवण्यात येतील.

ठाणे स्थानकापर्यंत मर्यादित केलेल्या गाड्या 

गाडी क्र. १२१३४ मंगळूर – सीएसएमटी एक्सप्रेस ही गाडी सीएसएमटीपर्यंत न जाता ठाणे स्थानकातच थांबवण्यात येईल.

​या रेल्वे ब्लॉकमुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून मध्य रेल्वेने प्रवाशांना आधीच सूचित केले असून, सर्वांनी आपल्या प्रवासाचे नियोजन या बदललेल्या वेळापत्रकानुसार करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

मुंबई-विजयदुर्ग रो-रो सेवेच्या १२ फेर्‍यांमध्ये कोट्यावधींचा तोटा; ‘अव्यवहार्य प्रकल्प’ म्हणुन टीकेचे झोड

   Follow us on        

मुंबई: कोकणच्या विकासासाठी आणि वाहतुकीत मोठी क्रांती घडवण्याचा गाजावाजा करून सुरू करण्यात आलेली मुंबई-विजयदुर्ग रो-रो सेवा अवघ्या काही दिवसांतच बंद पडली आहे. अव्यवहार्य प्रकल्प आणि अल्प प्रवासी संख्या असतानाही केवळ काही मंत्र्यांच्या प्रतिष्ठेसाठी हा ‘पांढरा हत्ती’ पोसण्याचा प्रयत्न सरकारवरच उलटल्याचे चित्र दिसत आहे. अखेर तांत्रिक बिघाडाचे कारण पुढे करत ही सेवा अनिश्चित काळासाठी बंद करण्याची नामुष्की सरकारवर ओढवली असून, राजकीय वर्तुळात यावरून खमंग चर्चा रंगू लागली आहे.

​उद्घाटनानंतर प्रतिसादात सातत्याने घसरण

​या सेवेच्या पहिल्याच उद्घाटनाच्या फेरीत ४१३ प्रवासी दाखवून हा प्रकल्प मोठा यशस्वी ठरल्याचा दावा प्रशासनाने केला होता. मात्र, त्यानंतर या सेवेला मिळणारा प्रतिसाद कमालीचा घसरत गेला.

​५ मार्च रोजी झालेल्या विजयदुर्ग-मुंबई फेरीत तर एकही प्रवासी नव्हता.

​१९ मार्च च्या फेरीत संपूर्ण जहाजात केवळ एकच प्रवासी होता.

​इतर अनेक फेऱ्यांमध्ये अवघे ३० ते ४० प्रवासी प्रवास करत होते. ६२० प्रवासी क्षमता असणाऱ्या अवाढव्य जहाजासाठी ही संख्या अत्यंत नगण्य मानली जाते.

​तोट्याचे गणित आणि आकडेवारी

​या संपूर्ण प्रकल्पाचा खर्च आणि मिळालेले उत्पन्न यात जमीन-अस्मानाचा फरक असून सरकारला मोठा आर्थिक फटका बसला आहे.

तपशील आकडेवारी / खर्च

एकूण फेऱ्या – १२

एकूण प्रवासी – ८९४

एकूण वाहने- १५४

एका फेरीसाठी लागणारे इंधन – १८ ते २० हजार लिटर

प्रकल्पाचा एकूण खर्च – दीड ते पावणेदोन कोटी रुपये

अंदाजित उत्पन्न – ३५ ते ३६ लाख रुपये

अंदाजित थेट नुकसान – १.१५ ते १.४० कोटी रुपये

(टीप: या नुकसानीमध्ये केवळ इंधन आणि मूलभूत बाबींचा फरक असून इतर प्रशासकीय खर्च जोडलेला नाही.)

प्रवाशांनी पाठ का फिरवली? 

​या रो-रो सेवेच्या ‘इकॉनॉमी’ क्लासचे तिकीट दर ३ हजार रुपयांपासून सुरू होत होते. सर्व प्रवाशांनी किमान तिकीट दर भरला आणि वाहनांचे सरासरी भाडे मिळाले, असे गृहीत धरले तरी एकूण उत्पन्न ३५ ते ३६ लाखांच्या आसपासच मर्यादित राहिले. त्या तुलनेत रेल्वे किंवा खाजगी बसचे पर्याय सर्वसामान्यांना अधिक स्वस्त आणि सोयीचे वाटल्यामुळे प्रवाशांनी या महागड्या रो-रो सेवेकडे पाठ फिरवली.

​काही मंत्र्यांच्या हट्टामुळेच हा अव्यवहार्य प्रकल्प जनतेच्या पैशांवर लादला गेल्याची जोरदार टीका आता केली जात आहे.

खाजगी ट्रॅव्हल्स बसेसना मुंबईत ‘नो एंट्री’! पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांचा मोठा निर्णय

   Follow us on        

मुंबई: मुंबई शहरात दररोज राज्याच्या विविध जिल्ह्यांतून आणि देशभरातून हजारो खाजगी ट्रॅव्हल्स व पॅसेंजर गाड्या येत असतात. या वाहनांमुळे शहरात होणारी प्रचंड वाहतूककोंडी फोडण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने (BMC) एक मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता देशभरातून येणाऱ्या या खाजगी प्रवासी गाड्यांना मुंबईच्या वेशीवर म्हणजेच दहिसर आणि मानखुर्द जकात नाक्यांवरच थांबवले (रेड सिग्नल दिला) जाईल. या गाड्या या ठिकाणी थांबून प्रवाशांना सोडतील आणि तिथूनच पुन्हा माघारी परततील. यामुळे मुंबई शहरातील मुख्य रस्त्यांवरील अंतर्गत वाहतूककोंडी आणि खाजगी बसच्या पार्किंगचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर सुटणार आहे.

​या नवीन व्यवस्थेमुळे बाहेरून येणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी त्यांना मुंबईच्या विविध भागात जाण्यासाठी जकात नाक्यांवरूनच मेट्रो, बेस्ट (BEST) बसेस आणि टॅक्सी/कॅबची उत्तम कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच, प्रवाशांच्या सोयीसाठी दहिसर आणि मानखुर्द या दोन्ही ठिकाणी आधुनिक सोयी-सुविधांनी युक्त असे मल्टिप्लेक्स, थ्री-स्टार व फाईव्ह-स्टार हॉटेल्स, भव्य शॉपिंग सेंटर्स, पार्किंग हब आणि फूड प्लाझा उभारण्यात येणार आहेत. याशिवाय, वाहनांसाठी सीएनजी, पेट्रोल पंप आणि इलेक्ट्रिक वाहनांसाठी (EV) चार्जिंग स्टेशन्स यांसारख्या आवश्यक इंधनाच्या सुविधाही या ठिकाणी उपलब्ध असतील.

​सन २०१७ मध्ये जकात (Octroi) बंद झाल्यापासून दहिसर आणि मानखुर्द येथील हे जकात नाके ओस पडले होते. सध्या दहिसर येथे १८,८६९ चौरस मीटर आणि मानखुर्द येथे २९,७७४ चौरस मीटर अशी मोक्याची जागा उपलब्ध असून पालिकेला त्याचा कोणताही उपयोग होत नव्हता. या जागेचा पुनर्विकास करण्यासाठी पालिका एकूण १२३२ कोटी रुपयांचा खर्च करणार आहे; ज्यामध्ये दहिसर जकात नाक्यासाठी ९९२ कोटी रुपये आणि मानखुर्द जकात नाक्यासाठी २४० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या भव्य प्रकल्पामुळे मुंबईतील वाहतूककोंडी तर फुटणार आहेच, शिवाय या सुविधांमुळे पालिकेच्या महसुलातही मोठी वाढ होणार असल्याची माहिती पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिली आहे.

Video: आता तर कहरच झाला! मुंबईमध्ये नालेसफाई करताना पूर्ण रिक्षाच सापडली

   Follow us on        

मुंबई: मानसूनपूर्व नाला सफाई अभियानात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) कामगारांना साकी नाका परिसरातील मुख्य नाल्यातून पूर्ण ऑटो रिक्षाचा सांगाडा बाहेर काढावा लागला. १८ मे रोजी साकी नाक्यातील सांगाडा लोखंडी कचरापेटी परिसरात क्रेन आणि यंत्रांच्या सहाय्याने हा प्रचंड अवजड कचरा बाहेर काढण्यात आला.नाल्याच्या आत पूर्णपणे बुडालेला आणि चिखल, प्लास्टिक व इतर कचऱ्याने झाकलेला हा ऑटो रिक्षा बाहेर काढताना बीएमसीच्या कर्मचाऱ्यांना बराच वेळ आणि मेहनत घ्यावी लागली.

व्हिडिओत स्पष्ट दिसते की, रिक्षाचा संपूर्ण फ्रेम, चाके आणि इतर भाग एकत्रितपणे नाल्यात अडकले होते. यासोबत मोठ्या प्रमाणात प्लास्टिक, टायर आणि इतर घनकचराही काढण्यात आला.बीएमसीने यानिमित्त मुंबईकर नागरिकांना नद्या, नाले आणि जलप्रवाहात घनकचरा, तरंगता कचरा किंवा अवजड साहित्य टाकू नये, असे नम्र आवाहन केले आहे.

मात्र, नागरिकांच्या प्रतिक्रियांमध्ये अनेकजण म्हणत आहेत की, “केवळ आवाहन पुरेसे नाही, कचरा टाकणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई व्हायला हवी.”या प्रकारच्या घटनांमुळे मुंबईतील नाल्यांच्या सफाईचा खर्च आणि मेहनत वाढत असल्याचे चित्र समोर येत आहे.

 

 

विनातिकीट प्रवाशांना चाप: मुंबईत आता रात्रीही फिरणार ‘बॅटमॅन’ पथक

   Follow us on        

मुंबई: मुंबईतील लोकल गाड्यांमधून रात्रीच्या वेळी विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे आता धाबे दणाणले आहेत. पश्चिम रेल्वे प्रशासनाने अशा प्रवाशांविरुद्ध एक विशेष मोहीम उघडली असून, आता रात्रीच्या वेळीही ‘टीएसी’ (Ticket Checking) कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. रात्रीच्या वेळी विनातिकीट प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे निदर्शनास आल्याने प्रशासनाने हा कठोर पाऊल उचलले आहे.

​या विशेष मोहिमेअंतर्गत रात्री ९ वाजेपासून ते सकाळी ६ वाजेपर्यंत चर्चगेट ते विरार दरम्यान लोकल गाड्यांमध्ये तिकीट तपासणी केली जाणार आहे. यासाठी ‘बॅटमॅन’ (Be Aware TTE Manning At Night) नावाची विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. ही पथके रात्रीच्या शेवटच्या लोकलपासून ते सकाळच्या पहिल्या लोकलपर्यंत डब्यांमध्ये गस्त घालतील. एप्रिल महिन्यात पश्चिम रेल्वेने विक्रमी कारवाई करत ३ लाख ६० हजारांहून अधिक विनातिकीट प्रवाशांना पकडले होते. या पार्श्वभूमीवर, तिकीट तपासणीची ही प्रक्रिया आता चोवीस तास सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

​मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक प्रवासी रात्रीच्या वेळी तिकीट तपासणी होत नसल्याचा फायदा घेऊन विशेषतः एसी लोकलमध्येही विनातिकीट प्रवास करत असल्याचे समोर आले आहे. दिवसा होणारी गर्दी पाहता तिकीट तपासणीत येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी रात्रीची स्वतंत्र पथके अधिक प्रभावी ठरतील. पश्चिम रेल्वेवर दररोज १४१४ फेऱ्यांमधून सुमारे ३० लाख प्रवासी प्रवास करतात; या प्रवासादरम्यान शिस्त पाळली जावी आणि रेल्वेचा महसूल बुडू नये, यासाठी ही ‘बॅटमॅन’ टीम आता रात्रीच्या अंधारातही सक्रिय राहणार आहे.

प्रस्तावित मुंबई-पुणे-हैद्राबाद बुलेट ट्रेनच्या मार्गाची प्राथमिक आखणी निश्चित

   Follow us on        

नवी दिल्ली: रेल्वे मंत्रालयाने मुंबई-पुणे-हैद्राबाद या प्रस्तावित हायस्पीड रेल्वेची (बुलेट ट्रेन) प्राथमिक आखणी निश्चित केली असून, हा मार्ग पुणे शहराच्या मुख्य भागातून न जाता शहराच्या बाहेरून पुढे नेण्याचे प्रस्तावित केले आहे. या नवीन आराखड्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील प्रवाशांसाठी शहराच्या बाह्य भागात स्थानके उभारली जाणार आहेत, ज्यामुळे शहरी भागातील गर्दी टाळून वेगवान प्रवासाचे उद्दिष्ट साध्य करणे शक्य होईल.

​पुणे जिल्ह्यातील स्थानकांचा विचार करता, मुंबईहून पुण्याकडे येताना पहिले स्थानक लोणावळ्याजवळील मळवली आणि कामशेत दरम्यान असेल. त्यानंतरचे स्थानक पिंपरी-चिंचवडसाठी कुरुळी येथे नियोजित असून, पुण्याचे मुख्य स्थानक लोणी काळभोर आणि मांजरी बुद्रुक यांच्या दरम्यान प्रस्तावित करण्यात आले आहे. ही सर्व स्थानके मुख्य शहरापासून दूर असली, तरी तेथून शहरात ये-जा करण्यासाठी स्वतंत्र कनेक्टिव्हिटीची व्यवस्था करावी लागणार आहे.

​या हायस्पीड रेल्वेमुळे प्रवासाच्या वेळेत मोठी क्रांती होणार असून मुंबई ते पुणे हा प्रवास अवघ्या ४८ मिनिटांत पूर्ण होईल, असा दावा रेल्वे मंत्रालयाने केला आहे. तसेच पुणे ते हैदराबाद हे मोठे अंतर पार करण्यासाठी केवळ १ तास ५५ मिनिटे लागणार आहेत. वेगाच्या या मर्यादेमुळे रस्ते मार्गावरील ताण कमी होऊन आंतरराज्य प्रवासाला मोठी गती मिळणार आहे.

​पुणे स्थानकानंतर हा मार्ग शिंदवणेमार्गे बारामतीकडे वळणार असून बारामती शहराबाहेर त्याचे स्थानक असेल. पुढे हा मार्ग पंढरपूर आणि सोलापूर या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणार आहे. जरी ही स्थानके शहराच्या मूळ ठिकाणापासून काही किलोमीटर दूर असली, तरी या प्रकल्पामुळे सोलापूर आणि पंढरपूर सारख्या शहरांच्या परिसराचा झपाट्याने विकास होण्यास मदत होणार आहे.

​सध्या अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनचे काम सुरू असतानाच केंद्र सरकारने सात नवीन हायस्पीड मार्ग जाहीर केले असून त्यात महाराष्ट्रातील या दोन मार्गांचा समावेश आहे. रेल्वे मंत्रालयाने प्रथमच या मार्गांची आखणी ‘रेल्वे ॲटलास’मध्ये दर्शविली आहे. या संपूर्ण मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार झाल्यावरच स्थानकांची निश्चिती आणि जमिनीचे आरक्षण यांसारख्या तांत्रिक बाबी अधिक स्पष्ट होणार आहेत.

ठाणे आणि मुलुंड स्थानकावरील गर्दी कमी होणार; प्रस्तावित रेल्वे स्थानकाला मंजुरी

   Follow us on        

ठाणे: मुंबईकरांच्या आणि विशेषतः ठाणेकरांच्या प्रवासातील कोंडी फोडण्यासाठी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ठाणे आणि मुलुंड दरम्यान नवीन उपनगरीय रेल्वे स्टेशन उभारण्यास ‘इन-प्रिन्सिपल’ (तत्वतः) मंजुरी दिली आहे. २०१९ मध्ये संकल्पित करण्यात आलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे स्थान ठाणे मानसिक रुग्णालयाजवळील कोपरी बाजूच्या परिसरात प्रस्तावित आहे. या नवीन स्टेशनमुळे मध्य रेल्वेवरील सर्वाधिक गर्दीच्या ठाणे स्टेशनवरील प्रवासी भार ३१ टक्क्यांनी, तर मुलुंड स्टेशनवरील भार २४ टक्क्यांनी कमी होण्याची दाट शक्यता आहे. केवळ गर्दीचे विभाजनच नाही, तर या प्रकल्पामुळे उपनगरीय आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या मार्गांचे विलगीकरण करणे अधिक सुलभ होणार असून, संपूर्ण मुंबई रेल्वे वाहतुकीच्या कार्यक्षमतेत सुधारणा होणार आहे.

​या प्रकल्पाच्या आर्थिक नियोजनासाठी ठाणे स्मार्ट सिटी आणि ठाणे महानगरपालिका (टीएमसी) यांच्याकडून निधी उपलब्ध करून दिला जाणार असून, प्रत्यक्ष अंमलबजावणीची जबाबदारी भारतीय रेल्वे पार पाडणार आहे. दरम्यान, या निर्णयावर स्थानिक प्रवाशांकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. एका बाजूला मोठ्या वर्गाकडून गर्दी कमी होण्याच्या शक्यतेमुळे या निर्णयाचे स्वागत होत असताना, दुसऱ्या बाजूला दोन स्टेशनमधील अंतर कमी असल्याने लोकल ट्रेनच्या वेळापत्रकावर आणि वेगावर विपरीत परिणाम होईल का, अशी भीती काही प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे. तरीही, वाढती लोकसंख्या लक्षात घेता हे स्टेशन भविष्यात मध्य रेल्वेचा कणा ठरेल अशी अपेक्षा वर्तवली जात आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search