Category Archives: मुंबई

५९ मिनिटांत मुंबई! मेट्रो मार्ग ५ आणि मार्ग ५-अ प्रकल्पाला अधिकृतरीत्या मंजुरी

   Follow us on        

मुंबई: ठाणे, भिवंडी आणि कल्याण या पट्ट्यातील प्रवाशांचा प्रवास सुखकर करण्यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारने मुंबई मेट्रो मार्ग ५ (टप्पा १ आणि २) आणि मार्ग ५-अ ला अधिकृत मंजुरी दिली आहे. सुमारे ३४.२ किमी लांबीचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प १८,१३१ कोटी रुपये खर्चून उभारला जाणार असून, यामुळे ठाणे, भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगर ही शहरे मेट्रो जाळ्याने जोडली जाणार आहेत.

​उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘मुंबई ५९ मिनिटांत’ या संकल्पनेला बळकटी देण्यासाठी हा प्रकल्प आखण्यात आला आहे. मुंबई महानगर प्रदेशातील (MMR) वाहतूक कोंडी फोडणे आणि उपनगरातील प्रवाशांचा प्रवास वेगवान करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. मेट्रो मार्ग ५ मध्ये एकूण १९ स्थानकांचा समावेश असून, संपूर्ण मार्ग ३८ किमीपेक्षा जास्त विस्तारित असेल. यामुळे ठाणे-कल्याण पट्ट्यातील लाखो नोकरदार आणि रहिवाशांना मोठा दिलासा मिळणार असून, त्यांचा दैनंदिन प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होणार आहे.

​प्रकल्पाच्या नियोजित आराखड्यानुसार, विविध टप्प्यांमध्ये याचे काम पूर्ण केले जाईल. यासाठी लागणारा निधी आणि तांत्रिक बाबींना सरकारने हिरवा कंदील दिला असून, या प्रकल्पामुळे परिसरातील पायाभूत सुविधांचा विकास होऊन आर्थिक हालचालींनाही वेग मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. वाढत्या शहरीकरणामुळे या भागातील रस्त्यांवर येणारा ताण कमी करण्यासाठी ही मेट्रो सेवा अत्यंत कळीची ठरणार आहे.

राज्यांतर्गत गाड्या बंद करून मध्य रेल्वेचा राज्याबाहेर जाणार्‍या गाड्यांना नियमित करण्याचा सपाटा

   Follow us on        

मुंबई: मध्य रेल्वेने उत्तर भारतातील विशेष रेल्वे गाड्या नियमित करण्याचा सपाटा लावला असून, याच मालिकेत आता ‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते रिवा’ या साप्ताहिक एक्स्प्रेसचा समावेश झाला आहे. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक २०१५३/२०१५४ रिवा-सीएसएमटी-रिवा ही गाडी आता नियमित स्वरूपात धावणार आहे. ही गाडी दर गुरुवारी रिवा येथून दुपारी १५:५० वाजता सुटेल, तर दर शुक्रवारी सीएसएमटी येथून दुपारी १३:३० वाजता सुटेल. या निर्णयामुळे उत्तर भारतीयांना दिलासा मिळाला असला तरी, महाराष्ट्रातील प्रवाशांमध्ये मात्र तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

मध्य रेल्वेच्या दुटप्पी धोरणामुळे महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. उपनगरीय लोकल गाड्यांच्या वाहतुकीत अडथळा नको, असे तांत्रिक कारण पुढे करून दादर-रत्नागिरी सारख्या महत्त्वाच्या राज्यातील गाड्या बंद पाडणाऱ्या रेल्वे प्रशासनाने, आता परराज्यात जाणाऱ्या गाड्यांना मात्र मुंबईतील मुख्य टर्मिनसवरून सोडण्याचा सपाटा लावला आहे. यावरून मध्य रेल्वेचा महाराष्ट्रातील प्रवाशांप्रती असलेला दुजाभाव स्पष्टपणे समोर येत आहे.

​काही काळापूर्वी दादर-रत्नागिरी पॅसेंजरसारख्या गाड्या केवळ मुंबई उपनगरीय लोकल गाड्यांना अडथळा हे कारण देऊन बंद करण्यात आल्या. मात्र, दुसरीकडे दादर-गोरखपूर, मुंबई-बेंगळुरू वंदे भारत आणि आता नव्याने नियमित करण्यात आलेली ‘रिवा एक्स्प्रेस’ यांसारख्या लांब पल्ल्याच्या गाड्यांना दादर आणि सीएसएमटीसारख्या गजबजलेल्या स्थानकांवरून हिरवा कंदील दाखवला जात आहे. “राज्यातील प्रवाशांना वाऱ्यावर सोडून परराज्यातील गाड्यांना झुकते माप देणे हे नेमके कोणते रेल्वे प्रशासन?” असा संतप्त सवाल आता प्रवासी संघटना विचारत आहेत.

रेल्वे मंत्र्यांच्या आदेशालाही केराची टोपली?

विशेष म्हणजे, दादर-रत्नागिरी गाडी पुन्हा दादरपर्यंत सुरू करण्याच्या व्यवहार्यतेची (Feasibility) तपासणी करण्याचे आदेश खुद्द केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी दिले होते. परंतु, अनेक दिवस उलटूनही मध्य रेल्वेने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती किंवा निर्णय जाहीर केलेला नाही. रेल्वे मंत्र्यांच्या सूचनेनंतरही टाळाटाळ करणाऱ्या प्रशासनाचा हा ‘मुजोरपणा’ असल्याचे बोलले जात आहे.

​कोकण आणि राज्यातील इतर भागांतील प्रवाशांची मोठी गैरसोय होत असताना, रेल्वेचे अधिकारी मात्र सोयीस्करपणे तांत्रिक अडचणींचे कारण पुढे करत आहेत. एका बाजूला राज्यातील रेल्वेगाड्यांच्या वेळेचा बोजवारा उडाला असताना, दुसऱ्या राज्यांसाठी मुंबईची मुख्य स्थानके रिकामी कशी होतात, असा सवाल उपस्थित करत आता रेल्वे प्रवासी आक्रमक झाले आहेत. या मुजोर प्रशासनाविरोधात आता दादर येथे होणाऱ्या रेल्वे परिषदेत मोठे आंदोलन पुकारण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दादर-रत्नागिरी गाडी पूर्ववत करण्यासाठी शिवसेनेचा मध्य रेल्वेला १० दिवसांचा ‘अल्टीमेटम’

   Follow us on        

मुंबई:कोविड काळात बंद करण्यात आलेली दादर-रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन येत्या दहा दिवसांत पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. जर रेल्वे प्रशासनाने यावर तातडीने निर्णय घेतला नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा निर्वाणीचा इशारा शिवसेना नेते आणि खासदार अरविंद सावंत यांनी दिला आहे. मंगळवारी त्यांनी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राजीव श्रीवास्तव यांची भेट घेऊन या संदर्भात सविस्तर चर्चा केली. यावेळी मध्य रेल्वेने कोकणच्या प्रवाशांच्या संयमाचा अंत पाहू नये, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

​राज्यांतर्गत रेल्वे गाड्यांकडे लक्ष देण्याची मागणी:

या भेटीदरम्यान खासदार सावंत यांनी केवळ कोकणच नव्हे, तर राज्यातील इतरही बंद असलेल्या गाड्यांचा प्रश्न मांडला. त्यांनी सांगितले की, मुंबई-सावंतवाडी ट्रेन आठवड्यातून फक्त एकदाच चालवली जाते, ती दररोज सुरू करणे आवश्यक आहे तसेच, मराठवाड्यातून सुटणारी नांदेड-पुणे गाडी पुण्याऐवजी हडपसरला थांबवली जाते, ज्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होते. ही गाडी हडपसर ऐवजी थेट पुणे स्टेशनपर्यंत सुरू करावी, अशी आग्रही मागणी त्यांनी यावेळी केली.

​रेल्वेच्या ‘मराठीद्वेषा’वर संताप:

खासदार सावंत यांनी रेल्वे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढत ‘मराठीद्वेष’ थांबवण्याचे आवाहन केले. ‘डेक्कन क्वीन’च्या वाढदिवसाच्या वेळी केवळ हिंदी आणि इंग्रजी भाषेचा वापर करणे आणि ‘रेल वन ॲप’मध्ये मराठी भाषेचा समावेश न करणे, याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. याशिवाय रेल्वेच्या जमिनीवरील झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन आणि शिवडीतील एंड-टू-एंड पुलाचे रखडलेले काम या प्रश्नांकडेही त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. या बैठकीला रेल्वेचे अधिकारी आणि भारतीय कामगार सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

एकाच ट्रॅकवर समोरासमोर आल्या दोन लोकल; मुंबईत मोठा अपघात थोडक्यात टळला

   Follow us on        

मुंबई: मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या रेल्वेच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी एक धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे घडली. तांत्रिक चुकीमुळे एकाच ट्रॅकवर दोन लोकल गाड्या समोरासमोर आल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र, मोटरमनच्या सतर्कतेमुळे सुमारे १३० मीटर अंतरावर गाडी थांबली आणि मोठा अनर्थ टळला.

​मिळालेल्या माहितीनुसार, बदलापूरकडून सीएसएमटीच्या दिशेने येणारी लोकल प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर येणे अपेक्षित होते. मात्र, सिग्नलिंग यंत्रणेतील त्रुटी किंवा मानवी चुकीमुळे ही गाडी चुकीच्या पद्धतीने प्लॅटफॉर्म क्रमांक ५ वर वळवण्यात आली. विशेष म्हणजे, याच प्लॅटफॉर्मवर आधीच दुसरी एक लोकल उभी होती. जेव्हा बदलापूर लोकल प्लॅटफॉर्म ५ च्या ट्रॅकवर शिरली, तेव्हा मोटरमनच्या लक्षात आले की होम सिग्नल लाल आहे आणि समोर दुसरी गाडी उभी आहे. त्याने त्वरित आपत्कालीन ब्रेक लावून गाडी थांबवली, ज्यामुळे दोन्ही गाड्यांमध्ये सुरक्षित अंतर राहिले.

​या घटनेनंतर रेल्वे प्रशासनात एकच खळबळ उडाली. खबरदारीचा उपाय म्हणून प्लॅटफॉर्म ५ ते ८ पर्यंतची वाहतूक तात्काळ थांबवण्यात आली आणि दोन्ही गाड्या सुरक्षितरीत्या मागे घेण्यात आल्या. या गोंधळामुळे मध्य रेल्वेची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती, परंतु सध्या सेवा पूर्ववत करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, सीएसएमटी परिसरातच एक दिवसापूर्वी डिरेलमेंटची (रुळावरून डबा उतरणे) घटना घडली होती, त्यापाठोपाठ हा प्रकार घडल्याने रेल्वेच्या सिग्नलिंग यंत्रणेवर टीका होत आहे. रेल्वे प्रशासनाने या ‘रॉग रुटिंग’ प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून या घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.

 

View this post on Instagram

 

डोंबिवली लोकल अपघात: रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे अपघात झाल्याचा आरोप

   Follow us on        

डोंबिवली: डोंबिवली स्थानकाजवळ सोमवारी सकाळी रिकाम्या लोकल ट्रेनचा एक डबा रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. विशेष म्हणजे, रविवारीच या भागात ‘मेगा ब्लॉक’ घेऊन देखभालीची कामे करण्यात आली होती आणि त्यानंतर काही तासांतच हा अपघात झाल्याने रेल्वेच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. ही घटना सकाळी ८:०९ वाजता घडली जेव्हा ही ट्रेन कळवा कारशेडमधून कल्याणच्या दिशेने जात होती. ट्रेन रिकामी असल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.

​या घटनेनंतर रेल्वे प्रवासी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. ‘मुंबई रेल प्रवासी संघ’चे उपाध्यक्ष सिद्धेश देसाई यांनी सांगितले की, रविवारी मुलुंड, ठाणे, दिवा आणि डोंबिवली दरम्यान फलाट विस्तार आणि रुळांशी संबंधित महत्त्वाची कामे करण्यात आली होती. मेगा ब्लॉक संपल्यानंतर लगेचच अशा प्रकारे ट्रेन रुळावरून घसरणे हे देखभालीच्या कामातील निष्काळजीपणा आणि निकृष्ट दर्जा दर्शवते. तसेच, कडक उन्हात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा आणि कामाच्या नियोजनाचा अभावही यातून दिसून येत असल्याची टीका त्यांनी केली.

​रेल्वे प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. सकाळी १०:१० वाजेपर्यंत रेल्वे डबा पुन्हा रुळावर चढवण्याचे काम पूर्ण झाले आणि १०:४५ वाजता वाहतूक पूर्ववत करण्यात आली. मात्र, या प्रक्रियेत १२ गाड्या वळवण्यात आल्या आणि ९ गाड्या रद्द कराव्या लागल्या. प्रवाशांनी आणि तज्ज्ञांनी मागणी केली आहे की, या अपघाताची सखोल चौकशी व्हावी आणि ज्या ट्रॅकवर काम सुरू असते, तिथे लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वाहतुकीवर निर्बंध लादण्यात यावेत जेणेकरून कामाचा दर्जा राखला जाईल.

मुंबई आणि लगतच्या जिल्ह्यात आज पावसाचा इशारा

   Follow us on        

मुंबई: मंत्रालयाकडून प्राप्त झालेल्या ताज्या माहितीनुसार, मुंबईसह लगतच्या जिल्ह्यांमध्ये पुढील ३ तासांत हवामानात लक्षणीय बदल होण्याची शक्यता आहे. मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर आणि रायगड या पाच जिल्ह्यांमधील काही भागांत हलक्या पावसाच्या सरी कोसळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अचानक उद्भवलेल्या या बदलामुळे नागरिकांनी आपल्या प्रवासाचे आणि कामाचे नियोजन काळजीपूर्वक करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

​पावसाच्या सरींसोबतच या भागात सोसाट्याचा वारा वाहण्याची दाट शक्यता आहे. तसेच, काही ठिकाणी जोरदार मेघगर्जना आणि विजांचा कडकडाटही होईल, असे हवामान अंदाजात नमूद करण्यात आले आहे. विशेषतः किनारपट्टीलगतच्या आणि ग्रामीण भागांत वाऱ्याचा वेग अधिक राहण्याची शक्यता असल्याने घराबाहेर पडताना सतर्क राहणे आवश्यक आहे.

​प्रशासनाने नागरिकांना खबरदारीचा उपाय म्हणून विजा चमकत असताना झाडाखाली किंवा मोकळ्या मैदानात उभे न राहण्याचा सल्ला दिला आहे. पालघर आणि रायगड जिल्ह्यांतील दुर्गम भागांत पावसाचा आणि विजांचा जोर अधिक राहू शकतो. बदलत्या हवामानामुळे तापमानात थोडी घट होण्याची शक्यता असली, तरी नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व आवश्यक खबरदारी घ्यावी, असे मंत्रालयाद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे.

पनवेल रेल्वे स्थानकावर प्रवासी लिफ्ट कोसळली

   Follow us on        

नवी मुंबई: पनवेल रेल्वे स्थानकावर सोमवारी सकाळी एक मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक ७ वरील एका लिफ्टमध्ये तांत्रिक बिघाड होऊन ती अचानक खाली कोसळली. या घटनेमुळे स्थानक परिसरात एकच खळबळ उडाली होती. ज्यावेळी ही लिफ्ट कोसळली, तेव्हा त्यामध्ये चार प्रवासी अडकले होते. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते, मात्र सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

​घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन, पोलीस आणि आपत्कालीन पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बचाव पथकाने अत्यंत शिताफीने कारवाई करत लिफ्टमध्ये अडकलेल्या चारही प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. सुरक्षित बाहेर पडल्यानंतर प्रवाशांनी सुटकेचा निश्वास टाकला. या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही, ही दिलासादायक बाब ठरली.

​मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. हा अपघात तांत्रिक बिघाडामुळे झाला की देखभालीतील निष्काळजीपणामुळे, याचा तपास केला जाणार आहे. पनवेल रेल्वे स्थानक हे हार्बर आणि मध्य रेल्वेवरील एक महत्त्वाचे जंक्शन असून, आगामी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशी ते जोडले जाणार आहे. अशा गजबजलेल्या स्थानकावर झालेल्या या अपघातामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, रेल्वे प्रशासनाने लिफ्ट आणि इतर सुविधांची कडक तपासणी करावी, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

डोंबिवली स्थानकावर लोकल रूळांवरून घसरली

   Follow us on        

मुंबई, २० एप्रिल २०२६: आज सकाळी ८.०९ वाजता डोंबिवली स्थानकावर एका रिकाम्या लोकल रेकचा एक डबा रुळांवरून घसरल्याची घटना घडली. कळवा कार शेडवरून कल्याणकडे जाणाऱ्या या रिकाम्या रेकमध्ये कोणतेही प्रवासी नव्हते, त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.या अपघातामुळे मध्य रेल्वेच्या अप दिशेने जाणाऱ्या  लोकल गाड्या थांबल्या.

अपघात  तात्काळ हाताळण्यासाठी तंत्रज्ञांची पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत. मध्य रेल्वेने दिवा ते कल्याणदरम्यान डाउन स्लो लाईनवरील सेवांना फास्ट लाईनवरून वळवल्या आहेत. परिणामी, या मार्गावर प्रवासी सेवांवर परिणाम झाला असून, काही गाड्या उशिराने धावत आहेत. सद्यस्थितीत रुळांवरून घसरलेला डबा उचलण्याचे काम सुरू असून, लवकरच सामान्य वाहतूक पूर्ववत होण्याची अपेक्षा रेल्वे प्रशासनाने व्यक्त केली आहे.

 

 

 

View this post on Instagram

 

ड्रायव्हरशिवाय बस चालू झाली; भांडुपमध्ये मोठी दुर्घटना टळली, CCTV फुटेज व्हायरल

   Follow us on        

मुंबई: १९ एप्रिल २०२६ रोजी भांडुप पश्चिम रेल्वे स्थानकाजवळ एक धक्कादायक घटना घडली. पार्क केलेली BEST इलेक्ट्रिक बस (क्रमांक MH-01 CV 8736) ड्रायव्हरशिवाय मागे घसरली आणि जवळच्या खाद्य स्टॉलला धडकली. या घटनेत एक महिला कसाबसा बचावली, तिला शेवटच्या क्षणी ओढून सुरक्षित ठिकाणी नेले गेले.

प्रत्यक्षदर्शींच्या मते, ही बस पूर्णपणे स्थिर अवस्थेत होती, तरीही अचानक रिव्हर्स गिअरमध्ये घसरली. बसने स्टॉलला जोरदार धडक दिल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला. सुदैवाने यात मोठी जीवितहानी टळली, फक्त स्टॉलचे नुकसान झाले.

ही घटना तीन महिन्यांपूर्वी (डिसेंबर २०२५) याच भागात घडलेल्या भीषण अपघाताची आठवण करून देते, ज्यात reversing बसने पादचाऱ्यांना चिरडले होते आणि चार जणांचा मृत्यू झाला होता.

पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून, BEST प्रशासनाकडून बसची तपासणी सुरू करण्यात आली आहे. हँडब्रेक किंवा यांत्रिक दोष यामागे असल्याची शक्यता तपासली जात आहे. नागरिकांनी बस पार्किंग आणि देखभालीबाबत काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबई उपनगरीय लोकल गाड्या जमिनीखालून धावणार! भुयारी मार्गांची चाचपणी सुरू

   Follow us on        

मुंबई: मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या उपनगरीय रेल्वे नेटवर्कमध्ये आता क्रांतिकारी बदल होण्याची शक्यता आहे. पश्चिम रेल्वे (WR) आणि मध्य रेल्वेने (CR) शहरातील सर्वात व्यस्त अशा चर्चगेट-विरार आणि सीएसएमटी-कल्याण या दोन मार्गांवर भुयारी रेल्वे कॉरिडॉर उभारण्यासाठी व्यवहार्यता अभ्यास (Feasibility Study) करण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम रेल्वेने यासाठी रेल्वे बोर्डाची परवानगी मागितली असून, मध्य रेल्वेदेखील लवकरच या प्रक्रियेत सामील होणार आहे.

जमिनीवरील विस्ताराच्या मर्यादा

रेल्वे प्रशासनानुसार, सध्याच्या रेल्वे मार्गांच्या बाजूला जमिनीवर नवीन मार्गिका (Tracks) तयार करणे आता जवळपास अशक्य झाले आहे. प्रचंड वाढलेले भूसंपादन खर्च, दाट नागरी वस्ती आणि कायदेशीर वाद यामुळे जमिनीवरील विस्ताराला मर्यादा आल्या आहेत. या अडचणींवर मात करण्यासाठी आणि रेल्वेची क्षमता वाढवण्यासाठी ‘अंडरग्राउंड’ मार्ग हाच एकमेव शाश्वत पर्याय असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

गर्दीतून सुटका आणि वेगवान प्रवास

मुंबईतील स्थानिक गाड्यांमध्ये सध्या ‘सुपर डेन्स क्रश लोड’ची स्थिती आहे, जिथे एका चौरस मीटरमध्ये सुमारे १६ प्रवासी प्रवास करतात. प्रस्तावित भुयारी मार्गांमुळे उपनगरीय रेल्वेची स्वतंत्र यंत्रणा निर्माण होईल, ज्यामुळे गाड्यांची वारंवारता वाढेल. हे मार्ग पूर्णपणे वातानुकूलित असतील आणि यामुळे तांत्रिक बिघाड किंवा रुळांवरील अतिक्रमणांमुळे होणारा विलंब टाळता येईल, परिणामी प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर आणि वक्तशीर होईल.

मेट्रोच्या यशातून प्रेरणा

मुंबईत ‘अ‍ॅक्वा लाईन’ सारख्या मेट्रो प्रकल्पांच्या यशस्वी भुयारी कामाने रेल्वे प्रशासनाचा आत्मविश्वास वाढवला आहे. दाट वस्ती असलेल्या भागातही प्रगत इंजिनीअरिंगच्या सहाय्याने बोगदे तयार करणे शक्य असल्याचे सिद्ध झाले आहे. लंडन आणि टोकियो यांसारख्या शहरांच्या धर्तीवर मुंबईतही बहुस्तरीय रेल्वे जाळे उभारण्याचे स्वप्न आता या अभ्यासातून साकार होण्याची चिन्हे आहेत.

भविष्यातील आव्हाने आणि गुंतवणूक

भुयारी रेल्वे प्रकल्प हे अत्यंत खर्चिक असतात. मुंबईत जमिनीखालील मेट्रो मार्गिकेचा खर्च साधारण १,१०० कोटी रुपये प्रति किलोमीटर आहे, जो जमिनीवरील मार्गापेक्षा ३-४ पटीने अधिक आहे. एमआरव्हीसी (MRVC) सध्या चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यानच्या ५ किमीच्या भुयारी मार्गाचा अभ्यास करत आहे. या सर्व अभ्यासांचे निष्कर्ष आल्यानंतरच रेल्वे मंत्रालय आणि राज्य सरकार या प्रकल्पांच्या आर्थिक आणि तांत्रिक व्यवहार्यतेवर अंतिम शिक्कामोर्तब करतील.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search