Category Archives: सिंधुदुर्ग

‘मुंबई वॉटर मेट्रो’ साठी लागणार्‍या बोटी सिंधुदुर्ग जिल्हय़ात बनणार

   Follow us on        

सिंधुदुर्ग: जिल्ह्यासाठी एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्गवासियांना १५० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची ‘गुड न्यूज’ दिली आहे. मंत्रालयामध्ये ‘जोया मरीन कंपनी’ आणि ‘महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड बंदर मंत्रालय’ यांच्यात एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (MoU) स्वाक्षरित करण्यात आला आहे. या करारानुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या ‘मुंबई वॉटर मेट्रो’साठी लागणाऱ्या ५० आणि १०० पॅसेंजरच्या बोटी या प्रकल्पांतर्गत बनवल्या जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात अशा जवळपास १०० बोटी बनवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

​हा भव्य बोट निर्मितीचा कारखाना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील तळवणे गावात उभा राहणार आहे. बोट क्राफ्ट, येल्लो फ्लीट यांसारख्या कंपन्यांनी एकत्र येऊन हा प्रकल्प जिल्ह्यात आणला आहे. या प्रकल्पामुळे कोकणातील तरुणांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार आहे. नोकरी-धंद्यासाठी मुंबई किंवा इतर ठिकाणी गेलेल्या कोकणातील तरुणांना पुन्हा आपल्या मातृभूमीत परत आणणे (रिव्हर्स मायग्रेशन), हाच यामागचा मुख्य उद्देश असल्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले.

​या पर्यावरणपूरक प्रकल्पामुळे स्थानिक अर्थकारणाला मोठी गती मिळणार आहे. या कारखान्यात विविध प्रकारच्या नोकऱ्या आणि कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध होणार असल्याने, पालकमंत्र्यांनी स्थानिक तरुण-तरुणींना या क्षेत्रातील आवश्यक कौशल्ये (Skills) आत्मसात करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, येत्या ५ वर्षांत जहाज बांधणी, मत्स व्यवसाय आणि पर्यटन क्षेत्रात असे अनेक मोठे प्रकल्प सिंधुदुर्गात आणून रोजगार निर्मितीला प्राधान्य दिले जाईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

खुशखबर! मुंबई – मंगुळुरु एक्सप्रेससह सावंतवाडी स्थानकावर तीन महत्त्वाच्या एक्स्प्रेस गाड्यांना थांबा मंजूर

कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या प्रयत्नांना अखेर यश!

   Follow us on        

सिंधुदुर्ग:

कोकणातील रेल्वे कनेक्टिव्हिटी अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर आता ३ प्रमुख एक्स्प्रेस गाड्यांना नवीन थांबा (Stoppage) मंजूर करण्यात आला आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या संदर्भातील मंजुरी दिली असून, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियाद्वारे ही माहिती देत केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.

‘या’ ३ गाड्यांना मिळाला थांबा:

सावंतवाडी रोड स्थानकावर आता खालील गाड्या थांबतील:

१. गाडी संख्या १२१३३/१२१३४: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) – मंगळुरू एक्स्प्रेस

२. गाडी संख्या १२४३१/१२४३२: तिरुवनंतपुरम सेंट्रल – हजरत निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस

३. गाडी संख्या १२२०१/१२२०२: लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) – तिरुवनंतपुरम उत्तर (कोचुवेली) गरीब रथ एक्स्प्रेस

देवेंद्र फडणवीस यांच्या पाठपुराव्याला यश

जनसामान्यांच्या सुविधेसाठी सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर विविध गाड्यांना थांबा मिळवा, यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी २५ मार्च २०२६ रोजी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे पत्राद्वारे विनंती केली होती. त्यांच्या या मागणीची दखल घेत रेल्वे मंत्रालयाने ७ जुलै २०२६ रोजी अधिकृत पत्र जारी करून या तिन्ही गाड्यांच्या थांब्याला मंजुरी दिली आहे.

संघटनेच्या विविध माध्यमांतील प्रयत्नांना अखेर यश!

सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सुविधेसाठी प्रमुख गाड्या थांबवण्यात याव्यात, यासाठी कोकण रेल्वे प्रवासी संघटना (सावंतवाडी) ने विविध माध्यमातून मोठा पाठपुरावा केला होता. संघटनेच्या वतीने वेळोवेळी आंदोलने करण्यात आली, विविध स्तरांवर प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले, तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींना मागण्यांची निवेदनेही देण्यात आली होती. यासोबतच, या मागणीला जनआंदोलनाचे रूप देण्यासाठी समितीने सोशल मीडियाचाही पुरेपूर वापर करून प्रवाशांचा आवाज शासनापर्यंत पोहोचवला. संघटनेच्या याच चौफेर प्रयत्नांची आणि जनभावनेची दखल अखेर प्रशासनाला घ्यावी लागली आहे.

कोकण रेल्वेच्या प्रवाशांच्या हितासाठी मिळालेल्या अभूतपूर्व यशाबद्दल कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडीच्या वतीने परिसरातील सर्व सन्माननीय खासदार, आमदार आणि पालकमंत्री यांचे जाहीर आभार मानण्यात आले आहेत. लोकप्रतिनिधींच्या खंबीर पाठपुराव्यामुळेच प्रवाशांच्या मागण्यांना यश आले असल्याचे संघटनेने म्हटले आहे.

​या यशाबद्दल खासदार श्री. नारायण राणे साहेब, श्री. श्रीकांत शिंदे, श्री. नरेश म्हस्के, आणि श्रीमती मेधाताई कुलकर्णी, पालकमंत्री श्री. नितेश राणे, आमदार श्री. दीपक केसरकर, आमदार श्री. रवींद्र चव्हाण, आमदार श्रीमती सुलभा गायकवाड ताई, आमदार श्री. कुमार आयलानी, आणि आमदार श्री. बाळा नर आदींचे संघटनेच्या वतीने लोकप्रतिनिधींचे विशेष आभार मानण्यात आले आहेत.

​”आमच्या सर्व लोकप्रतिनिधींनी रेल्वे प्रवाशांच्या प्रश्नांवर नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे यश मिळाले आहे. भविष्यातही प्रवासी बांधवांच्या हितासाठी आणि हक्कासाठी आपले असेच मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभत राहील, हा विश्वास आहे.”

— कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी

​या यशस्वी प्रयत्नांमुळे कोकण रेल्वेच्या प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण असून, सर्व स्तरांतून या लोकप्रतिनिधींचे कौतुक होत आहे.

 

Landslide in Amboli Ghat: आंबोली घाटात मोठे दगड रस्त्यावर; मोठी दुर्घटना टळली

   Follow us on        

सावंतवाडी: आंबोली घाटातील मुख्य रस्त्यावर चार नंबर धबधब्याजवळ मंगळवारी (७ जुलै) रात्री दोन ते तीन मोठे दगड थेट रस्त्यावर कोसळल्याची घटना घडली. नेहमीप्रमाणे या मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ सुरू होती, मात्र सुदैवाने दगड कोसळले त्यावेळेस तिथे कोणतेही वाहन नसल्याने मोठी जीवित व वित्तहानी टळली आहे.

घाटात पूर्वी ज्या ठिकाणी दरड कोसळली होती, त्या जागेपासून काही अंतरावरच ही घटना घडली. सध्या हे मोठे दगड रस्त्यावरच असल्यामुळे तिथून केवळ दुचाकी आणि छोट्या चारचाकी वाहनांची एकेरी (वन-वे) वाहतूक सुरू आहे.

पालकमंत्र्यांकडून तातडीने दखल:

सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी या घटनेची तातडीने दखल घेतली आहे. त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून रस्त्यावरील दगड तातडीने बाजूला करण्याचे आणि वाहतूक पूर्ववत करण्याचे निर्देश दिले.

यानंतर महामार्ग प्राधिकरणाचे अभियंते आणि पथक घटनास्थळी रवाना झाले असून, दगड हटवण्यासाठी जेसीबी पाचारण करण्यात आला आहे. लवकरच हे दगड बाजूला करून वाहतूक पूर्णपणे सुरळीत करण्यात येईल, अशी माहिती प्राधिकरणाच्या अभियंत्यांनी दिली आहे.

एलसीबीची मुंबई गोवा महामार्गावर मोठी कारवाई; दीड कोटींच्या गोवा बनावटीच्या दारूसह ट्रक जप्त

   Follow us on        

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी):

सिंधुदुर्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) शनिवारी पहाटे सुमारे १.४५ वाजण्याच्या सुमारास ओरोस येथे एक मोठी धडक कारवाई केली. गोव्याहून मुंबईकडे अवैध रित्या गोवा बनावटीच्या विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या एका ‘टाटा सिग्मा’ दहा चाकी ट्रकवर पोलिसांनी छापा टाकला. या ट्रकमधून तब्बल १ कोटी १५ लाख २० हजार रुपये किमतीची गोवा बनावटीची विदेशी दारू जप्त करण्यात आली. या कारवाईत दारूसह ३५ लाख रुपये किमतीचा ट्रक आणि १० हजार रुपयांचा मोबाईल असा एकूण १ कोटी ५० लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

​या धडक कारवाई दरम्यान पोलिसांनी ट्रकचालक विरेंद्र गोविंद पटेल (वय ४९, रा. लोलावत का मोहल्ला, धर्कदा, उदयपूर, राजस्थान) याला अटक केली आहे. या आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम तसेच भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​सदर यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मोहन दहिकर व अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक हनुमंत भोसले, पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड, पोलीस हेड कॉन्स्टेबल बस्त्याव डिसोझा, आशिष जामदार, विल्सन डिसोझा तसेच पोलीस कॉन्स्टेबल माहेश्वर समजिसकर आणि ऋषिकेश टोपले यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

अपघाताला आमंत्रण! आंबोली घाटात दरड कोसळून तीन दिवस उलटले तरी ढिगारा तसाच

   Follow us on        

आंबोली: निसर्गसौंदर्याने नटलेल्या आंबोली घाटातील सनसेट पॉईंट परिसरामध्ये तीन दिवसांपूर्वी निसर्गाचा कोप पाहायला मिळाला. डोंगरकड्यावरून अचानक एक अजस्र कडा आणि सोबतीला मातीचा ढिगारा थेट मुख्य रस्त्यावर येऊन कोसळला. हा दगड अगदी रस्त्या कडेला असलेल्या चहाच्या टपरीच्या शेजारी पडल्याने सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. परंतु, या  घटनेला तीन दिवस उलटून गेले, तरीही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि स्थानिक प्रशासनाला ही दरड हटवण्यास वेळ मिळालेला नाही. प्रशासनाला पूर्वकल्पना देऊनही याकडे साफ दुर्लक्ष केले जात असल्याने स्थानिक ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

​सध्या हा भलामोठा दगड रस्त्याच्या कडेलाच असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. पावसाचा जोर आणि धुक्याचं साम्राज्य यामुळे रात्रीच्या वेळी समोरचा रस्ता स्पष्ट दिसत नाही, अशा वेळी एखादे वाहन या ढिगाऱ्यावर आदळून भीषण अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. पावसाळ्यात आंबोली घाटात दरडी कोसळण्याच्या घटना नव्या नाहीत, पण अशा संवेदनशील आणि धोकादायक ब्लॅक स्पॉटची वेळेत दखल न घेण्याच्या प्रशासकीय अनास्थेमुळे पर्यटक आणि वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

​सध्या पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो पर्यटक दररोज आंबोलीत हजेरी लावत आहेत. जर मुख्य रस्त्यावरील हा अडथळा तातडीने दूर केला नाही, तर पर्यटकांच्या उत्साहावर विरजण पडू शकते आणि आंबोलीच्या पर्यटन व्यवसायाला मोठा फटका बसू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे संबंधित विभागाने आता तरी सुस्तपणा झटकून हा रस्ता तातडीने मोकळा करावा आणि संपूर्ण घाटाची पाहणी करून प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी आग्रही मागणी आता जोर धरू लागली आहे.

​’लालपरी’ झाली जलपरी! चालत्या बसमध्ये छत्री उघडून बसण्याची प्रवाशांवर नामुष्की!

   Follow us on        

सावंतवाडी:

“बहुजन हिताय, बहुजन सुखाय” हे ब्रीदवाक्य मिरवणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा (एसटी) कारभार चौकुळ-कुंभवडे मार्गावर मात्र प्रवाशांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. या मार्गावर धावणारी एकमेव एसटी बस पूर्णपणे गळकी झाली असून, प्रत्येक पावसाळ्यात प्रवाशांना चक्क बसमध्ये बसूनही छत्र्या उघडाव्या लागत आहेत. या गंभीर समस्येमुळे हैराण झालेल्या उल्हास पनवेलकर, स्वरांगी गावडे, समिक्षा गावडे, कमलेशकुमार गावडे, सुनिता गावडे, कृष्णा गावडे, प्रकाश जाधव, राहुल चव्हाण, ऋतुराज गावडे, सुरेश गावडे आदी नागरिकांनी एसटी महामंडळाच्या विभाग नियंत्रकांकडे लेखी निवेदन देऊन ही बस तातडीने बदलण्याची मागणी केली आहे.

​या मार्गावरील एसटीवर विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी आणि नोकरदार वर्ग रोजच्या प्रवासासाठी पूर्णपणे अवलंबून आहेत. मात्र, बसच्या छतातून पाणी गळत असल्याने प्रवाशांचे कपडे, विद्यार्थ्यांचे शालेय साहित्य आणि नोकरदारांची महत्त्वाची कागदपत्रे भिजून नुकसान होत आहे. त्यामुळे हा प्रवास अत्यंत त्रासदायक आणि असुरक्षित बनला आहे. प्रवाशांनी लेखी निवेदन देऊनही प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही, ज्यामुळे स्थानिक प्रवाशांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे.

​”महामंडळाकडे नवीन बसेस उपलब्ध आहेत, मग चौकुळ-कुंभवडे मार्गावरील प्रवाशांच्या नशिबीच ही गळकी बस का? ग्रामीण भागातील नागरिक एसटी प्रशासनासाठी दुय्यम आहेत का?” असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत. महामंडळाने केवळ घोषणाबाजी न करता प्रत्यक्षात सुरक्षित, स्वच्छ आणि सुस्थितीतील बस उपलब्ध करून देणे ही त्यांची जबाबदारी आहे, अन्यथा “बहुजन हिताय, बहुजन सुखाय” हे ब्रीदवाक्य केवळ फलकापुरतेच उरेल, अशी टीकाही केली जात आहे. प्रशासन आता तरी खडबडून जागे होऊन चौकुळ-कुंभवडे मार्गावरील गळकी एसटी तातडीने बदलणार की प्रवाशांच्या सहनशीलतेचा अंत पाहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सावंतवाडी टर्मिनस इमारत कामाची निविदा जारी; ईमेल मोहीम व कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या लढ्याला यश

   Follow us on        

सिंधुदुर्ग: सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या भूमिपूजन सोहळ्याला तब्बल ११ वर्षे पूर्ण झाली, तरीही टर्मिनसची कामे रखडलेलीच होती. या अन्यायाविरुद्ध ‘कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी’ यांच्या वतीने नुकतीच एक व्यापक ईमेल मोहीम हाती घेण्यात आली होती. या मोहिमेला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे आणि निर्माण झालेल्या दबावामुळे अवघ्या ५ दिवसांत रेल्वे प्रशासनाला जाग आली असून, सावंतवाडी टर्मिनस टप्पा-२ अंतर्गत रखडलेल्या मुख्य टर्मिनस इमारतीच्या कामाची अधिकृत निविदा (Tender) अखेर जारी करण्यात आली आहे.

१००० पेक्षा जास्त ईमेल आणि डिजिटल मीडियाचा खंबीर पाठिंबा

या मोहिमेदरम्यान कोकण रेल्वे महामंडळ, रेल्वे बोर्ड आणि राज्य शासनाला रखडलेल्या कामांच्या तपशिलासह तब्बल १००० पेक्षा जास्त ईमेल पाठवण्यात आले होते. या जनआंदोलनाला ‘दैनिक पुढारी’सह विविध वृत्तपत्रे आणि डिजिटल मीडियाने खंबीर साथ दिल्यामुळे शासन व प्रशासनावर मोठा दबाव निर्माण झाला आणि अखेर ही निविदा काढण्यात आली. टर्मिनस प्रेमींनी हा आपल्या सर्वांच्या एकजुटीचा आणि लढ्याचा विजय असल्याचे म्हटले आहे.

कोकणातील आमदारांना साकडे

सध्या राज्य शासनाचे पावसाळी अधिवेशन सुरू असल्याने, मुंबई आणि कोकणातील सर्व विधानसभा व विधानपरिषद आमदारांना संघटनेने भावनिक साकडे घातले आहे. राज्य शासनाच्या अधीन असलेल्या ‘तिलारी आंतरराज्य धरणातून पाणी पुरवठा योजना’ आणि ‘रत्नसिंधू समृद्धी योजनेतून’ होणाऱ्या सावंतवाडी टर्मिनसच्या कामांना या अधिवेशनात तातडीने मंजुरी मिळवून द्यावी, अशी विनंती करण्यात आली आहे.

गणेशोत्सव अवघ्या काही महिन्यांवर आला असून दरवर्षी मुंबईहून गावी येणाऱ्या चाकरमान्यांना प्रवासात मोठा त्रास सहन करावा लागतो. हा त्रास कमी करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी आताच ठोस पावले उचलावीत, असे आवाहन कोकण रेल्वे प्रवासी संघटना आणि समस्त कोकणवासीयांनी केले आहे.

लढा अद्याप संपलेला नाही; प्रमुख मागण्या कायम

रेल्वेने केवळ इमारतीच्या कामाची निविदा काढली असली, तरी प्रवाशांच्या खऱ्या सोयीसाठी पुढील मागण्यांवर कोकण रेल्वे महामंडळाने त्वरित विचार करून निधीची तरतूद करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे:

प्लॅटफॉर्मवर संपूर्ण शेड: पावसाळी व उन्हाळी संरक्षणासाठी प्लॅटफॉर्मवर ‘संपूर्ण शेड’ उभारणे.

नवा प्लॅटफॉर्म: गाड्यांची संख्या वाढवण्यासाठी ‘अजून एक नवीन प्लॅटफॉर्म’ तयार करणे.

अतिरिक्त रेल्वे रुळ: अतिरिक्त रेल्वे रुळांची (ट्रॅक) निर्मिती करणे.

या सर्व प्रमुख मागण्या आणि कामे मार्गी लावण्याचा लढा यापुढेही कायम राहील, असा निर्धार कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने व्यक्त केला आहे.

सिंधुदुर्गातील ६,७१० शेतकऱ्यांना कर्जमाफीचा दिलासा; ५३.८३ कोटींची कर्जमाफी मंजूर

   Follow us on        

​सिंधुदुर्ग नगरी:

शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तब्बल ६ हजार ७१० शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत. या सर्व पात्र शेतकऱ्यांना एकूण ५३ कोटी ८३ लाख २० हजार ४९१ रुपयांच्या कर्जमाफीचा मोठा लाभ मिळणार आहे. पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांची माहिती शासनाच्या विशेष पोर्टलवर अपलोड करण्याचे काम सध्या अंतिम टप्प्यात आले असून, ही प्रक्रिया पूर्ण होताच पात्र लाभार्थ्यांची अधिकृत यादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

​या कर्जमाफी योजनेमध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ४,००८ शेतकऱ्यांचा समावेश असून, त्यांची २० कोटी ६९ लाख ५४ हजार रुपयांची कर्जमाफी होणार आहे. तर जिल्ह्यातील विविध राष्ट्रीयीकृत, व्यापारी व ग्रामीण बँकांमधील २,७०२ शेतकऱ्यांना एकूण ३३ कोटी १३ लाख ६३ हजार ४९१ रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे. याशिवाय, जे शेतकरी आपल्या कर्जाची नियमित परतफेड करतात, अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पुढील टप्प्यात ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार असून त्यासाठी स्वतंत्र पात्र यादी तयार केली जाणार आहे.

​दुसरीकडे, शासनाने निश्चित केलेल्या कालावधीपूर्वीची कर्जे असणे, तसेच काही कर्जदार विविध शासकीय किंवा इतर पदांवर कार्यरत असणे अशा विविध कारणांमुळे जिल्ह्यातील काही शेतकरी या योजनेसाठी अपात्र ठरले असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठी विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील थकीत कर्जखात्यांची माहिती शासकीय लेखापरीक्षकांकडून तपासण्यात आली आहे. सर्व माहिती पोर्टलवर अपलोड झाल्यानंतर शासनाकडून संगणकीय पडताळणी केली जाईल आणि त्यानंतर ‘आधार प्रमाणीकरणासाठी’ पात्र शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध केली जाईल. ही यादी निबंधक कार्यालय, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था आणि स्थानिक स्तरावर उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे यादी प्रसिद्ध झाल्यानंतर शेतकऱ्यांनी सेवा सुविधा केंद्रांमार्फत आपले आधार प्रमाणीकरण वेळेत पूर्ण करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

आंबोलीत विजेच्या तारेचा धक्का लागून गाभण म्हशीसह रेडकाचा मृत्यू

   Follow us on        

आंबोली:

येथील मुळवंदवाडी भागात जमिनीवर पडलेल्या जिवंत विद्युत वाहिनीच्या (वीज तारेच्या) संपर्कात आल्याने एका गाभण म्हशीसह रेडकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मुळवंदवाडी येथील शेतकरी भिसाजी महादेव सरमळकर यांची गुरे शेतात चरण्यासाठी गेली असता हा अपघात झाला. या घटनेत शेतकरी सरमळकर यांचे सुमारे दीड लाख रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे. सुदैवाने, परिसरातील नागरिक गणपत गावडे यांनी प्रसंगावधान राखत इतर जनावरांना पुढे जाण्यापासून रोखल्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला.

​घटनेची माहिती मिळताच महावितरण आणि संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी बुधवारी सायंकाळी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. प्रशासनाच्या वतीने मृत गुरांचा रीतसर पंचनामा करण्यात आला असून, बाधित शेतकरी सरमळकर यांना नियमानुसार योग्य ती नुकसानभरपाई मिळवून देण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहे. पंचनामा पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्याने गुरांचे मृतदेह ताब्यात घेतले. दरम्यान, आंबोलीतील नांगरतास भागात नव्याने बसविण्यात आलेले विद्युत पोल धोकादायक स्थितीत असल्याकडे स्थानिक नागरिकांनी लक्ष वेधले असून, पावसाळ्याचे दिवस असल्याने महावितरणने तातडीने उपाययोजना करून वीज वाहिन्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

कुडाळमध्ये बिबट्याच्या अवयवांची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश

   Follow us on        

कुडाळ:

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ बाजारपेठेत वन्यजीवांच्या अवयवांची बेकायदेशीर खरेदी-विक्री आणि तस्करी करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा वन विभागाने यशस्वी पर्दाफाश केला आहे. येथील प्रसिद्ध ‘मसुरकर जेम्स’ या दुकानावर वन विभागाच्या संयुक्त पथकाने अचानक छापा टाकून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ३० जून २०२६ रोजी सावंतवाडीच्या वनक्षेत्रपालांना या बेकायदेशीर काळ्याबाजाराविषयी गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे सावंतवाडी व कुडाळ वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दोन पंचांसमक्ष या दुकानाची अचानक झडती घेतली. या कारवाईदरम्यान दुकानातून अत्यंत धक्कादायक आणि गंभीर बाबी उघडकीस आल्या.

​दुकानाच्या झडतीमध्ये वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या अनुसूची १ अन्वये अत्यंत संरक्षित असलेल्या बिबट्याची शिकार करून तयार केलेले अनेक अवयव हस्तगत करण्यात आले. यामध्ये बिबट्याची ६ अस्सल नखे, वन्यप्राण्यांच्या शिंगांपासून तयार केलेली ६ बनावट नखे, बिबट्यांच्या नखांचे इतर २० अवयव आणि बिबट्याचे २ सुळे (दात) यांचा समावेश आहे. शिकार करून हे अवयव केवळ विक्रीच्या उद्देशाने दुकानात बेकायदेशीरपणे बाळगण्यात आले होते. वनविभागाने हा सर्व मुद्देमाल जागीच जप्त केला आहे.

​या खळबळजनक प्रकरणातील मुख्य संशयित आणि दुकानाचा मालक अजित वसंत मसुरकर याला वन विभागाने तात्काळ अटक केली आहे. आरोपीने बिबट्याची नखे आणि अवयव विक्रीसाठी बाळगल्याचा गुन्हा मान्य केला आहे. त्याला कुडाळच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्याला २ दिवसांची वनकोठडी (Forest Custody) सुनावली आहे. ही धडक कारवाई सावंतवाडीचे उपवनसंरक्षक मिलीश शर्मा आणि कोल्हापूर दक्षता विभागाचे विभागीय वनाधिकारी संजय वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली, अशी माहिती कुडाळचे वनक्षेत्रपाल चेतन पाटील यांनी दिली.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search