सावंतवाडी: आंबोली घाटातील मुख्य रस्त्यावर चार नंबर धबधब्याजवळ मंगळवारी (७ जुलै) रात्री दोन ते तीन मोठे दगड थेट रस्त्यावर कोसळल्याची घटना घडली. नेहमीप्रमाणे या मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ सुरू होती, मात्र सुदैवाने दगड कोसळले त्यावेळेस तिथे कोणतेही वाहन नसल्याने मोठी जीवित व वित्तहानी टळली आहे.
घाटात पूर्वी ज्या ठिकाणी दरड कोसळली होती, त्या जागेपासून काही अंतरावरच ही घटना घडली. सध्या हे मोठे दगड रस्त्यावरच असल्यामुळे तिथून केवळ दुचाकी आणि छोट्या चारचाकी वाहनांची एकेरी (वन-वे) वाहतूक सुरू आहे.
पालकमंत्र्यांकडून तातडीने दखल:
सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी या घटनेची तातडीने दखल घेतली आहे. त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून रस्त्यावरील दगड तातडीने बाजूला करण्याचे आणि वाहतूक पूर्ववत करण्याचे निर्देश दिले.
यानंतर महामार्ग प्राधिकरणाचे अभियंते आणि पथक घटनास्थळी रवाना झाले असून, दगड हटवण्यासाठी जेसीबी पाचारण करण्यात आला आहे. लवकरच हे दगड बाजूला करून वाहतूक पूर्णपणे सुरळीत करण्यात येईल, अशी माहिती प्राधिकरणाच्या अभियंत्यांनी दिली आहे.


