विशेष प्रतिनिधी, मुंबई:
पावसाळ्यात किंवा बदलत्या हवामानामध्ये हवामान विभागाकडून अनेकदा विविध रंगांचे अलर्ट जारी केले जातात. मात्र, या अलर्टचा नक्की अर्थ काय आणि कोणत्या अलर्टला किती पाऊस पडतो, याबाबत नागरिकांमध्ये बऱ्याचदा संभ्रम असतो. हाच संभ्रम दूर करण्यासाठी हवामान विभागाच्या या चार प्रमुख अलर्टची माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे.
हवामानाचा पहिला टप्पा म्हणजे ‘ग्रीन अलर्ट’ होय. जेव्हा एखाद्या भागात ६५ मिमी पेक्षा कमी पाऊस असतो, तेव्हा हवामान विभागाकडून हा अलर्ट दिला जातो. याचा साधा अर्थ असा की, संबंधित ठिकाणी कुठलाही धोका नाही आणि सर्व काही ठीक आहे.
यानंतरचा टप्पा म्हणजे ‘येलो अलर्ट’ असून हा ६५ ते ११५ मिमी पावसासाठी जारी केला जातो. पुढील काही दिवसांमध्ये हवामानाच्या बदलामुळे संकट ओढवू शकते, त्यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगावी यासाठी हा इशारा दिला जातो.
परिस्थिती अधिक गंभीर झाल्यास ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला जातो, जो ११५ ते २०४ मिमी इतक्या मुसळधार पावसासाठी असतो. नैसर्गिक आपत्तीमुळे येणाऱ्या संकटाचा सामना करण्यासाठी नागरिकांनी आणि प्रशासनाने तयार राहावे, म्हणून हा अलर्ट दिला जातो.
सर्वात शेवटचा आणि अत्यंत धोकादायक टप्पा म्हणजे ‘रेड अलर्ट’ होय. २०४ मिमी पेक्षा जास्त अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असताना हा अलर्ट जारी होतो. नैसर्गिक आपत्ती ओढवल्यानंतर नागरिकांनी अत्यंत सतर्क राहण्यासाठी आणि स्वतःसह इतरांना सुरक्षित ठेवण्यासाठी हा इशारा दिला जातो. त्यामुळे हवामान खात्याच्या या इशाऱ्यांकडे लक्ष ठेवून नागरिकांनी सुरक्षितता बाळगणे गरजेचे आहे.


