चिपळूण:
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील साडेपाच किलोमीटर अंतराच्या परशुराम घाटात प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील लोणावळा आणि खंडाळा घाटाच्या धर्तीवर आता परशुराम घाटातही आधुनिक ‘व्हाया डक्ट’ (उड्डाणपूल) उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. घाटातील गॅबियन वॉलचा भराव खचल्याची घटना घडल्यानंतर प्रशासनाने हा निर्णय घेतला असून, यासाठी ‘थॉट कन्सल्टन्सी’ या नामांकित एजन्सीची नियुक्ती करण्यात आली आहे. ही एजन्सी पुलाचा सविस्तर आराखडा तयार करणार असून, मंजुरीसाठी तो प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला जाईल, अशी माहिती महामार्ग विभागाकडून देण्यात आली आहे.
पावसामुळे गॅबियन वॉल ठरतेय डोकेदुखी
परशुराम घाटातील सुरक्षिततेसाठी उभारण्यात आलेली गॅबियन वॉल गेल्या काही काळापासून प्रशासनासाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. गतवर्षी मे महिन्याच्या मध्यातच पावसाने हजेरी लावल्यामुळे येथील कामाचे नियोजन कोलमडले होते आणि अर्धवट अवस्थेत असलेली गॅबियन वॉल ठिकठिकाणी कोसळली होती. त्यानंतर सुरक्षेचा उपाय म्हणून वाहतूक एकेरी करण्यात आली होती. यंदा या भिंतीच्या रचनेत काही किरकोळ बदल करून अत्यंत घाईघाईने काम पूर्ण करण्यात आले, परंतु पहिल्याच पावसाने या कामाची पोलखोल केली. गॅबियन वॉलच्या पायथ्याशी असलेला मातीचा भराव वाहून गेला असून, नव्याने केलेले काँक्रिटीकरणही खचले आहे. सद्यस्थितीत तातडीची उपाययोजना म्हणून कोसळलेल्या संरक्षक भिंतीच्या ठिकाणी प्लास्टिकचे आच्छादन घालण्यात येत आहे.
मूळ बांधकामाला धोका नाही: महामार्ग विभाग
घाटातील या धोकादायक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग विभाग, पेणचे अधिकारी पंकज गोसावी यांनी नागरिकांना धीर दिला आहे. त्यांनी स्पष्ट केले की, गॅबियन वॉलच्या मूळ बांधकामाला कोणताही धक्का लागलेला नाही आणि ती पूर्णपणे मजबूत आहे. केवळ वरचा मातीचा भराव वाहून गेला असून घाटातील चौपदरीकरणाच्या कामाला यामुळे कोणताही धोका निर्माण झालेला नाही. खबरदारीचा उपाय म्हणून आणि प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी सध्या घाटातील दुहेरी वाहतूक पूर्ववत सुरू ठेवण्यात आली आहे. येत्या काही महिन्यांत ‘व्हाया डक्ट’ पुलाचा अंतिम आराखडा उपलब्ध झाल्यानंतर या मार्गावरील प्रवासाचा चेहरामोहरा बदलण्याची शक्यता आहे.


