मुंबईतील लोकल प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुंबई रेल विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) २३८ एसी लोकल रेकांसाठी काढलेला तब्बल १९,२९३ कोटी रुपयांचा टेंडर रद्द करण्यात आला आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून, या कंत्राटातील तांत्रिक अडचणी आणि विलंबामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. या टेंडर प्रक्रियेनुसार पहिला रेक २०३० पर्यंत आणि संपूर्ण ताफा २०३४ पर्यंत मिळण्याची शक्यता होती, जी मुंबईकरांसाठी अत्यंत धीमी होती.
हा प्रकल्प वेगवान करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने आता उत्पादन थेट भारतीय रेल्वेच्या तीन प्रमुख कारखान्यांकडे सोपवले आहे. त्यानुसार, चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरी (आयसीएफ), कपूरथळ्यातील रेल कोच फॅक्टरी (आरसीएफ) आणि रायबरेलीतील मॉडर्न कोच फॅक्टरी (एमसीएफ) येथे एकाच वेळी समांतर उत्पादन सुरू केले जाईल. या निर्णयामुळे देशांतर्गत क्षमतेचा पुरेपूर वापर होईल आणि परदेशी तंत्रज्ञान भागीदारावर अवलंबून राहावे लागणार नाही.
एमआरव्हीसीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विलास वडेकर यांच्या मते, या नव्या रणनीतीमुळे उत्पादनाला मोठी गती मिळेल. आता पहिला प्रोटोटाइप २०२७ पर्यंत उपलब्ध होण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, सर्व २,८५६ कोच म्हणजेच २३८ रेक २०२३० पर्यंत पूर्णपणे धावण्यास तयार होणार आहेत. मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या या निर्णयामुळे मुंबईच्या जीवनरेखेला अधिक आधुनिक, आरामदायी आणि वेगवान स्वरूप मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.


