गणेशोत्सवासाठी मुंबई-सावंतवाडी दरम्यान १५०८७ क्रमांकाची नवीन नियमित रेल्वेसेवा कोकणवासीयांच्या स्वागतात सुरू करण्यात आली.
उद्घाटनासाठी चकचकीत नवीन ट्रेन दाखवून प्रत्यक्ष नियमित सेवेसाठी जुनी आणि अस्वच्छ गाडी वापरल्याने प्रवाशांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
Follow us onगणेशोत्सवाच्या सणाचे औचित्य साधून मुंबई ते सावंतवाडी दरम्यान १५०८७ क्रमांकाची नवी नियमित रेल्वेगाडी सुरू करण्यात आली असून, कोकणवासीयांनी या सेवेचे अत्यंत उत्साहात स्वागत केले होते. मात्र, सेवेच्या पहिल्याच फेरीत प्रवाशांच्या आनंदावर विरजण पडले आहे. उद्घाटनाच्या विशेष फेरीदरम्यान रेल्वे प्रशासनाकडून अगदी नवी कोरी गाडी चालवण्यात आली होती. परंतु, जेव्हापासून नियमित सेवा सुरू झाली, तेव्हा प्रवाशांच्या पदरी जुनी आणि अत्यंत अस्वच्छ गाडी देण्यात आली, ज्यामुळे सर्वसामान्यांमधून तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे.
उद्घाटनाच्या दिवशी चकचकीत गाडी दाखवून कोकणी जनतेला आकर्षित करण्याचे काम रेल्वे प्रशासनाने केले. मात्र, प्रत्यक्ष सेवा सुरू होताच अस्वच्छ आणि दुरावस्था झालेली ट्रेन प्रवाशांच्या माथी मारल्यामुळे रेल्वेच्या या दुहेरी भूमिकेवर आता गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. चांगल्या प्रवासाच्या आशेने आलेल्या प्रवाशांना पहिल्याच प्रवासात अस्वच्छतेचा सामना करावा लागल्याने प्रशासनाच्या या कारभाराबद्दल प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातून मुंबईत दाखल होणारी १२५३३ क्रमांकाची ‘पुष्पक एक्सप्रेस’ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे पोहोचल्यानंतर, तीच गाडी पुढील प्रवासासाठी १५०८७ क्रमांकाने सावंतवाडीसाठी रवाना केली जात आहे. या गाडीतील अस्वच्छतेचे चित्रीकरण करून प्रवाशांनी ते व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर प्रसारित केले आहेत. विशेषतः डब्यांमधील आणि बाथरूममधील अत्यंत दयनीय आणि घाणेरड्या स्थितीबाबत प्रवाशांनी तीव्र शब्दांत नापसंती व्यक्त केली आहे.
उद्घाटनाच्या वेळी नवी कोरी गाडी दाखवून कौतुक मिळवायचे आणि नियमित फेरीसाठी जुनी, घाणेरडी गाडी सोडून कोकणी जनतेची एकप्रकारे चेष्टा करायची, अशी संतप्त प्रतिक्रिया यावेळी प्रवाशांनी दिली. प्रशासनाच्या या मनमानी कारभारामुळे सणाच्या काळात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांमध्ये मोठा असंतोष पाहायला मिळत आहे. दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे, असाच प्रकार रेल्वे प्रशासनाकडून घडल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
गणेशोत्सवाच्या कालावधीत मोठ्या संख्येने नागरिक मुंबईतून कोकणात प्रवास करतात. अशा महत्त्वाच्या वेळी नव्याने सुरू झालेल्या रेल्वेसेवेत स्वच्छता, मुबलक पाणी आणि इतर प्राथमिक सुविधांचा दर्जा उत्तम असणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे प्रवाशांना सोसाव्या लागणाऱ्या या त्रासाची दखल घेऊन, रेल्वे प्रशासनाने तातडीने या तक्रारींचे निवारण करावे आणि गाडीच्या स्वच्छतेची तसेच देखभालीची योग्य व्यवस्था सुधारावी, अशी जोरदार मागणी आता जोर धरत आहे.
कोकणवासीयांच्या पदरी ‘डर्टी एक्सप्रेस’ – Kokanai https://t.co/4Bk3lfs4Qf pic.twitter.com/A1C98XOYlX
— Kokanai Digital News Channel (@kokanai21) September 11, 2026


