गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या भाविकांचा प्रवास सुरक्षित व सुखकर व्हावा म्हणून रत्नागिरी जिल्हा प्रशासन आणि वाहतूक विभागाने रिक्षा तसेच बस वाहतूकदारांना कडक नियमांचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.
प्रवाशांकडून अतिरिक्त भाडे उकळणे, प्रमाणापेक्षा जास्त प्रवासी वाहणे किंवा मद्यप्राशन करून वाहन चालवल्यास चालक आणि मालक दोघांवरही थेट फौजदारी कारवाई करण्यात येईल.
Follow us onआगामी गणेशोत्सवाच्या काळात कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचा आणि भाविकांचा प्रवास अत्यंत सुखकर व निर्धोक व्हावा, यादृष्टीने रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये पोलीस विभाग, परिवहन विभाग तसेच स्थानिक रिक्षा आणि बस वाहतूकदार संघटनांच्या प्रतिनिधींची एक संयुक्त बैठक संपन्न झाली. या बैठकीत सणासुदीच्या काळात प्रवाशांची होणारी संभाव्य पिळवणूक रोखण्यावर विशेष भर देण्यात आला. प्रवाशांकडून अनाधिकृतपणे अवाजवी भाडे वसूल करणे, वाहनात अतिरिक्त प्रवासी भरणे किंवा गैरवर्तन करणे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे.
या पार्श्वभूमीवर प्रशासनाने वाहतूकदारांसाठी काही महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. भाडे नियंत्रणात राहावे यासाठी जिल्ह्यातील प्रमुख रेल्वे स्थानके आणि महत्त्वाच्या रिक्षा स्टँडवर परिवहन विभागाने अधिकृतपणे निश्चित केलेल्या भाडेदरांचे फलक दर्शनी भागात लावण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना योग्य भाड्याची कल्पना येईल आणि कोणाचीही फसवणूक होणार नाही. याशिवाय रिक्षा स्टँडवर सर्व वाहने अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने उभी करावीत, जेणेकरून रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण होणार नाही, असा स्पष्ट निर्देशही देण्यात आला आहे.
सुरक्षित प्रवासाच्या दृष्टीने बसचालक व बसमालकांनाही विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. प्रवासादरम्यान वाहनातील आपत्कालीन दरवाजा (Emergency Exit), अग्निशामक यंत्र आणि प्रथमोपचार पेटी (First Aid Kit) सुस्थितीत असणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच रस्त्यांवर अनावश्यक कोंडी टाळण्यासाठी बस सुटण्याच्या वेळांचे काटेकोरपणे नियोजन करण्याचे आदेश बस मालकांना दिले आहेत. प्रवाशांशी संवाद साधताना सौजन्याची आणि नम्रतेची भाषा वापरणे सर्व चालकांसाठी बंधनकारक करण्यात आले आहे.
प्रवाशांच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड न करण्याचा इशारा देताना प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, मद्यप्राशन करून किंवा अत्यंत धोकादायक पद्धतीने वाहन चालवणाऱ्यांवर तीव्र कारवाई केली जाईल. अशा प्रकरणात केवळ चालकावरच नव्हे, तर संबंधित बस मालकावरही थेट फौजदारी गुन्हे दाखल केले जातील. तसेच प्रवासादरम्यान कोणतीही तक्रार असल्यास किंवा अतिरिक्त भाड्याची मागणी झाल्यास नागरिकांनी वाहनाचा क्रमांक व तपशिलासह [email protected] या अधिकृत ई-मेल आयडीवर तात्काळ तक्रार नोंदवावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
या महत्त्वपूर्ण बैठकीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यामध्ये अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे, मोटार वाहन निरीक्षक अरविंद फुलारी, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण रणदिवे, महामार्ग पोलीस निरीक्षक दीपाली जाधव, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वनाथ खेडकर आणि वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संजय कांबळे यांसह विविध रिक्षा आणि बस वाहतूकदार संघटनांचे पदाधिकारी व प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


