राजापूरजवळ मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; दुभाजक तोडून दोन कारची जोरदार धडक

   Follow us on        

​राजापूरजवळ मुंबई-गोवा महामार्गावर उन्हाळे येथील गंगा तिठा परिसरात मंगळवारी दुपारी एक दुर्दैवी अपघात घडला. मुंबईहून गोव्याच्या दिशेने प्रवास करणाऱ्या एका टाटा टियागो कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कारने थेट रस्ता दुभाजक तोडला आणि ती दुसऱ्या बाजूने येणाऱ्या अर्टिगा कारला जोरदार धडकली. या भीषण अपघातामुळे दोन्ही वाहनांमधील मिळून एकूण आठ प्रवासी जखमी झाले आहेत.

​ही घटना मंगळवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली. मुंबईच्या दिशेने गोव्याकडे चाललेली टियागो कार अचानक लेन बदलून समोरून येणाऱ्या अर्टिगा कारवर जाऊन आदळली. धडक इतकी वेगवान आणि भयंकर होती की दोन्ही गाड्यांचा चक्काचूर झाला असून वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

​टियागो गाडीमध्ये प्रवास करत असलेले चारही नागरिक अपघातात गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. अपघाताच्या वेळी अर्टिगा गाडीत दोन पुरुष आणि दोन महिला असे चार जण प्रवास करत होते. त्या चारही जणांना दुखापत झाली असून त्यातील एकाची स्थिती गंभीर असल्याचे समजते, तर उर्वरित तिघांना तातडीने पुढील उपचारासाठी कणकवली येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

​घटनेची माहिती मिळताच राजापूर पोलीस ठाण्याचे पथक त्वरित घटनास्थळी दाखल झाले. तेथील स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने सर्व जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती.

​कारचा ताबा नेमका कशामुळे सुटला आणि अपघाताचे मूळ कारण काय होते, याचा अचूक अंदाज अद्याप आलेला नाही. राजापूर पोलीस या अपघाताचा सखोल तपास करत आहेत.

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search