आंबोली: उपचार मिळण्यास झालेला उशीर आणि विष भिनल्यामुळे आंबोली येथे पर्यटनास आलेल्या पर्यटकाचा वाटेत रुग्णालयात पोहोचण्यापूर्वी दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काल रविवारी घडली.कर्नाटक राज्यातील हंपी येथून गंगाधर मरपा हे आपल्या कुटुंबियांसोबत आंबोली येथील प्रसिद्ध धबधबा परिसरात वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आले होते. मुख्य धबधब्या शेजारी असलेल्या एका निर्जन भागात फिरत असताना त्यांना विषारी सापाने दंश केला. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे त्यांच्या कुटुंबियांमध्ये एकच तारांबळ उडाली आणि त्यांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली.
कुटुंबियांनी व स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना तातडीने उपचारासाठी आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. परंतु, तिथे प्राथमिक उपचारापलीकडे पुरेशा आणि विशेष वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्यामुळे येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला.
सध्या श्रावण महिन्यापूर्वीच्या शेवटच्या शनिवार-रविवारची सुट्टी असल्याने आंबोलीत पर्यटकांची प्रचंड गर्दी उसळली होती. परिणामी, मुख्य रस्त्यांवर आणि धबधबा परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. रुग्णाला घेऊन निघालेली रुग्णवाहिका या भीषण कोंडीत तब्बल अडीच तास अडकून पडली, ज्यामुळे वेळेवर वैद्यकीय मदत मिळू शकली नाही.
उपचार मिळण्यास झालेला उशीर आणि विष भिनल्यामुळे गंगाधर मरपा यांचा उपचारापूर्वीच वाटेत किंवा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वी दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे पर्यटनाच्या मोसमात प्रशासनाकडून केली जाणारी वाहतूक नियमांची अंमलबजावणी आणि आपत्कालीन व्यवस्थेचा फोलपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
पर्यटकांच्या प्रचंड गर्दीचा अंदाज असतानाही प्रशासनाकडून आपत्कालीन रुग्णवाहिकांसाठी कोणताही स्वतंत्र ‘इमर्जन्सी कॉरिडॉर’ किंवा पर्यायी मार्ग तयार ठेवण्यात आला नव्हता. त्यामुळे संतप्त नागरिक व पर्यटकांकडून प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला जात असून, भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.


