सिंधुदुर्ग, १७ ऑगस्ट २०२६: माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांचे “सिंधुदुर्गात उद्योग आणि स्थानिकांना रोजगार” हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याच्या दिशेने कोकणात एक ऐतिहासिक पाऊल पडले आहे. सावंतवाडी तालुक्यातील तळवणे येथे मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. नितेश राणे यांच्या हस्ते ‘झोया मरीन सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड’ या भव्य जहाज बांधणी प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा नुकताच १५ ऑगस्ट २०२६ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे कोकणातील औद्योगिक विकासाला एक नवी गती मिळणार असून, याबद्दल मानवता विकास परिषदेच्या वतीने मंत्री नितेश राणे यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले आहे.
या प्रकल्पाची व्याप्ती आणि वैशिष्ट्ये अत्यंत महत्त्वपूर्ण असून, महाराष्ट्राच्या दरियाई आणि औद्योगिक इतिहासात ही एक क्रांतिकारी घडामोड मानली जात आहे. या प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रात पहिल्यांदाच तब्बल २०० फूट लांबीची बोट तयार केली जाणार आहे. यासाठी अत्याधुनिक ‘चायना टेक्नॉलॉजी’चा वापर केला जाणार असल्याने येथील स्थानिक तरुण-युवतींना जागतिक दर्जाचे कौशल्य शिकण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून थेट २०० स्थानिक युवक-युवतींना रोजगार मिळणार असून, याशिवाय रेडी बंदर आणि आरोदा जेटी सुरू करण्यासाठी पालकमंत्र्यांनी सुरू केलेले प्रयत्न कोकणाच्या सागरी अर्थव्यवस्थेला नवी ऊर्जे देणारे ठरत आहेत.
हा प्रकल्प केवळ रोजगारापुरता मर्यादित न राहता कोकणाच्या सर्वांगीण विकासाचा पाया ठरावा, यासाठी मानवता विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत विठ्ठल सावंत यांनी काही महत्त्वपूर्ण मागण्या व सूचना केल्या आहेत. प्रकल्पातील नोकऱ्यांमध्ये “भूमिपुत्र प्राधान्य धोरण” राबवून किमान ८०% जागांवर रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक तरुणांना संधी मिळावी तसेच प्रशिक्षणासाठी आयटीआय (ITI) आणि पॉलिटेक्निक संस्थांशी करार करावा, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे. तसेच, जहाज बांधणीभोवती वेल्डिंग, इलेक्ट्रिकल, पेंटिंग आणि लॉजिस्टिकसारखे सहायक लघु उद्योग उभे राहिल्यास प्रत्यक्ष २०० नोकऱ्यांच्या ऐवजी थेट २००० जणांना रोजगार मिळू शकेल. “गाव तिथे उद्योजक” या संकल्पनेतून मानवता विकास परिषदेतर्फे ५००० युवकांना कौशल्य प्रशिक्षण देऊन या प्रकल्पासाठी आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ पुरवण्याची तयारीही दर्शवण्यात आली आहे.
“विकासाची सवय लावून घेऊ” या पालकमंत्र्यांच्या विचारांना साजेसे असे हे पाऊल असून, कोकणाला खऱ्या अर्थाने उद्योगांनी समृद्ध करण्यासाठी अशा प्रकल्पांची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. या प्रकल्पाच्या माध्यमातून कोकणातील तरुणांचे पलायन थांबून त्यांना आपल्याच मातीत रोजगाराच्या भक्कम संधी उपलब्ध होणार असल्याचा विश्वास यानिमित्ताने व्यक्त होत आहे.


