हत्तींपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी ‘हत्ती अधिवास’ आणि ‘हत्तीग्राम’ चा पर्याय

   Follow us on        

मुंबई: वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत तिलारी परिसरात हत्ती अधिवास विकसित करण्यासाठी १२ कोटी रुपये, तर आजरा घाटघर येथे हत्ती ग्राम उभारण्यासाठी १० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे.

​सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वन विभागाच्या विविध समस्यांबाबत मंत्रालयात एका महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला माजी मंत्री दीपक केसरकर आणि आमदार निलेश राणे यांच्यासह वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील हत्तींच्या वाढत्या त्रासावर आणि वन्यजीव व्यवस्थापनावर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

​बैठकीत तिलारी राखीव वन क्षेत्रात हत्तींसाठी आवश्यक अन्न उपलब्ध करून देणे आणि संपूर्ण परिसरात फेन्सिंग (कुंपण) करून त्यांचा कायमस्वरूपी अधिवास तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासाठी १२ कोटी रुपयांची तरतूद मंजूर करण्यात आली आहे. या उपाययोजनांमुळे हत्तींच्या हालचालींवर नियंत्रण राहून मानवी वस्त्यांवरील हल्ले कमी होण्यास मदत होईल.

​यासोबतच आजरा घाटघर येथे हत्ती ग्राम उभारण्यासाठी १० कोटी रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली. तसेच, शेतकऱ्यांच्या पिकांचे होणारे नुकसान लक्षात घेऊन नुकसान भरपाईच्या धोरणात सुधारणा करण्याचे ठरले. यापूर्वी मिळणारी नुकसान भरपाई अपुरी असल्यामुळे ती वाढवण्याबाबत आणि बांबू तसेच फणस, काजूच्या बोंडांच्या नुकसानीचा प्रस्ताव सादर करण्याबाबतही अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.

​वन्यजीवांच्या हल्ल्यात होणाऱ्या जीवितहानीबाबतही बैठकीत संवेदनशील निर्णय घेण्यात आला. आता वनक्षेत्रात सर्पदंशाने किंवा अन्य कारणाने जीवितहानी झाल्यास, हत्तीच्या हल्ल्याप्रमाणेच २५ लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. या बैठकीला स्थानिक लोकप्रतिनिधी आणि संबंधित वन अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search