बाबा धबधबा बंद! पर्यटकांच्या मुजोरी आणि हुल्लडबाजीमुळे निर्णय

   Follow us on        

आंबोली: सावंतवाडी तालुक्यातील चौकुळ येथील बाबा धबधब्यावर येणाऱ्या पर्यटकांच्या अनियंत्रित गर्दीमुळे निर्माण झालेले सुरक्षिततेचे प्रश्न आणि स्थानिकांवर होणारे हल्ले यामुळे ग्रामस्थांनी धबधबा बंद ठेवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी स्थानिक युवकांच्या पुढाकाराने आणि संयमाने चर्चेच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

​चौकुळ परिसरातील बाबा धबधब्याकडे येणाऱ्या पर्यटकांच्या गर्दीमुळे स्थानिक नागरिक अनेक दिवसांपासून त्रस्त होते. वाहतूक कोंडी, सुरक्षिततेचा अभाव आणि सोयीसुविधांचा अभाव अशा अनेक समस्यांनी या भागाला ग्रासले होते. या पर्यटनातून स्थानिकांना कोणताही आर्थिक लाभ मिळत नसतानाही त्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याने लोकांमध्ये कमालीची नाराजी होती.

​वातावरण अधिक गंभीर तेव्हा झाले जेव्हा काल वाहतूक सुरळीत करण्यासाठी गेलेल्या केगदवाडीच्या पोलीस पाटलांवरच काही पर्यटकांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या धक्कादायक घटनेनंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आज स्वतःहून ग्रामपंचायत बंद ठेवून आपला निषेध नोंदवला. या घटनेने स्थानिक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणला असून, परिसरातील नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

​या आणीबाणीच्या परिस्थितीत स्थानिक तरुणांनी अत्यंत जबाबदारीने पुढाकार घेतला. युवकांनी एकजूट होऊन धबधब्याच्या मालकांशी थेट संवाद साधला आणि स्थानिकांच्या सुरक्षेचा मुद्दा ठामपणे मांडला. पर्यटनापेक्षा स्थानिकांची सुरक्षा आणि स्वाभिमान महत्त्वाचा असल्याचे स्पष्ट करत, युवकांनी धबधबा बंद ठेवण्याची आग्रही मागणी केली.

​युवकांच्या या ठाम भूमिकेमुळे आणि निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीचे गांभीर्य ओळखून धबधबा मालकांनी धबधबा बंद ठेवण्यास सहमती दर्शवली आहे. ही घटना पर्यटनाच्या नावाखाली स्थानिकांना होणाऱ्या त्रासाबाबत प्रशासनाला विचार करायला लावणारी आहे. आजच्या या घटनेने ‘स्थानिकांची सुरक्षितता प्रथम’ हा संदेश स्पष्टपणे दिला आहे.

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search