संगमेश्वर:
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे (एनएच-६६) सध्या सुरू असलेले रुंदीकरणाचे काम या मार्गानजीक राहणाऱ्या स्थानिक रहिवाशांसाठी अत्यंत धोकादायक ठरत आहे. अनेक ठिकाणी महामार्गाचे काम अपूर्ण अवस्थेत असल्याने मोठ्या प्रमाणावर माती उघडी पडली असून, जमिनीचे उतार अस्थिर झाले आहेत. संगमेश्वर नजीक असलेल्या माभळे गावात या कमकुवत झालेल्या भागांची आता मोठ्या प्रमाणावर धूप होऊ लागली आहे. यामुळे या भागात केव्हाही मोठी दरड कोसळण्याची आणि स्थानिकांच्या घरांचे प्रचंड नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे.
या परिस्थितीमुळे येथील रहिवासी वसंत सोमा खापरे यांच्या घराला गंभीर धोका निर्माण झाला आहे. रस्त्याच्या कडेला करण्यात आलेल्या मोठ्या खोदकामामुळे त्यांच्या घराच्या खालचा बराचसा मातीचा भाग आधीच खचला आहे. घराचा पाया कमकुवत झाल्यामुळे हे घर आता पूर्णपणे असुरक्षित झाले आहे. विशेषतः सध्या सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे हे घर कोणत्याही क्षणी कोसळू शकते, अशी तीव्र भीती स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे. संभाव्य दुर्घटना आणि जमिनीची धूप रोखण्यासाठी स्थानिक नागरिकांनी आपल्या पातळीवर उघड्या पडलेल्या भागावर प्लास्टिकचा कागद टाकणे आणि दगड रचणे यासारखे तात्पुरते उपाय केले आहेत. मात्र, प्रशासनाने यावर तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.


