Category Archives: मुंबई

मुंबई महानगर क्षेत्रात बनणार देशातील दुसरे १ लाख प्रेक्षक क्षमता असलेले भव्य क्रिकेट स्टेडियम

   Follow us on        

मुंबई: मुंबई महानगर प्रदेशात (MMR) देशातील दुसरे १ लाख प्रेक्षक क्षमता असलेले भव्य क्रिकेट स्टेडियम उभारण्याची योजना आखण्यात आली आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमनंतर असे मोठे स्टेडियम उभारण्याचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, महाराष्ट्राच्या क्रीडा पायाभूत सुविधांना जागतिक स्तरावर नेण्याचा यामागील उद्देश आहे.

या प्रकल्पासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पुढाकार घेतला जात असून, सिडको (CIDCO) आणि मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. या संदर्भात एमसीएचे अध्यक्ष अजिंक्य नाईक आणि सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्या उपस्थितीत सविस्तर चर्चा करण्यात आली आहे.

या नव्या स्टेडियममुळे राज्यातील क्रीडा पायाभूत सुविधा अधिक मजबूत होण्यास मदत होईल. तसेच, मोठ्या आंतरराष्ट्रीय सामन्यांचे आयोजन करण्यासाठी महाराष्ट्र एक महत्त्वाचे केंद्र म्हणून उदयास येईल. यामुळे देश-विदेशातील क्रिकेटप्रेमींना आकर्षित करून पर्यटनालाही मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

एकूणच, हा प्रकल्प केवळ क्रिकेटसाठीच नव्हे तर राज्याच्या आर्थिक आणि पर्यटन विकासासाठीही महत्त्वाचा ठरणार असून, महाराष्ट्राला जागतिक क्रीडा नकाशावर अधिक ठळकपणे स्थान मिळवून देण्याची क्षमता यात आहे.

Railway Megablock : मध्यरेल्वेचा दोन दिवसांचा ‘ब्लॉक’, कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांवर परिणाम

   Follow us on        

मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात परळ आणि करी रोड दरम्यान असलेला जुना रेल्वे ओव्हर ब्रिज (ROB) पाडण्यासाठी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक ४ एप्रिलच्या रात्री २३:१५ पासून ५ एप्रिलच्या पहाटे ०५:४५ पर्यंत असेल. या कामामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी तारखेनुसार वेळापत्रकात खालील बदल करण्यात आले आहेत:

​३ एप्रिल २०२६ (शुक्रवार)

​या दिवशी सुटणाऱ्या खालील गाड्या मुंबई सीएसएमटीला न जाता ठाणे स्थानकावर शॉर्ट टर्मिनेट होतील (प्रवास ठाण्यातच संपेल):

​१२८७० हावडा – मुंबई सीएसएमटी सुपरफास्ट एक्स्प्रेस

​११०५८ अमृतसर – मुंबई सीएसएमटी एक्स्प्रेस

​११०२० भुवनेश्वर – मुंबई सीएसएमटी कोणार्क एक्स्प्रेस

​१२८१० हावडा – मुंबई सीएसएमटी मेल

​०१०८० गोरखपूर – मुंबई सीएसएमटी विशेष

​४ एप्रिल २०२६ (शनिवार)

​अ) ठाणे आणि पनवेल येथे प्रवास संपणाऱ्या गाड्या:

​१२१३४ मंगळुरू जंक्शन – मुंबई सीएसएमटी सुपरफास्ट एक्स्प्रेस (ठाणे येथे संपेल)

​१२७०२ हैदराबाद – मुंबई सीएसएमटी हुसेन सागर एक्स्प्रेस (ठाणे येथे संपेल)

​१११४० होसपेटे जंक्शन – मुंबई सीएसएमटी एक्स्प्रेस (ठाणे येथे संपेल)

​१२०NT/१२०५२ मडगाव – मुंबई सीएसएमटी जनशताब्दी एक्स्प्रेस (पनवेल येथे संपेल)

​१०१०४ मडगाव – मुंबई सीएसएमटी मांडवी एक्स्प्रेस (पनवेल येथे संपेल)

​२२१२० मडगाव – मुंबई सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस (पनवेल येथे संपेल)

​ब) बदललेल्या स्थानकावरून सुटणाऱ्या गाड्या (Short Originate):

​२०१११ कोकण कन्या एक्स्प्रेस: ही गाडी सीएसएमटीऐवजी पनवेल स्थानकावरून रात्री ००:३२ वाजता सुटेल.

​११०५७ मुंबई – अमृतसर एक्स्प्रेस: ही गाडी सीएसएमटीऐवजी दादर स्थानकावरून रात्री २३:४६ वाजता सुटेल.

​५ एप्रिल २०२६ (रविवार)

​अ) नवीन वेळेनुसार सुटणाऱ्या गाड्या (Rescheduled):

ब्लॉकमुळे सकाळी सुटणाऱ्या या गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे:

​११००३ दादर – सावंतवाडी रोड राज्यराणी एक्स्प्रेस: सकाळी ०६:३० वा.

​२२२२९ मुंबई सीएसएमटी – मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस: सकाळी ०५:४० वा.

​२२१७७ मुंबई सीएसएमटी – वाराणसी महानगरी एक्स्प्रेस: सकाळी ०५:५० वा.

​१७६१७ मुंबई सीएसएमटी – नांदेड तपोवन एक्स्प्रेस: सकाळी ०६:३० वा.

​२२१०५ मुंबई सीएसएमटी – पुणे जंक्शन इंद्रायणी एक्स्प्रेस: सकाळी ०६:५० वा.

​०११२९ मुंबई सीएसएमटी – मडगाव विशेष: सकाळी ०७:१० वा.

​१०१०३ मुंबई सीएसएमटी – मडगाव मांडवी एक्स्प्रेस: सकाळी ०७:५० वा.

​२२१५९ मुंबई सीएसएमटी – चेन्नई सेंट्रल सुपरफास्ट एक्स्प्रेस: दुपारी ०२:३० वा.

​ब) पनवेलवरून सुटणाऱ्या गाड्या:

​१२०५१ मुंबई – मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस: सकाळी ०६:४५ वाजता पनवेलवरून सुटेल.

​२२११९ मुंबई – मडगाव तेजस एक्स्प्रेस: सकाळी ०७:०७ वाजता पनवेलवरून सुटेल.

या बदलांमुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून रेल्वे प्रशासनाने प्रवासापूर्वी सुधारित वेळापत्रक तपासण्याचे आणि लोकल गाड्यांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेला QR कोड वापरण्याचे आवाहन केले आहे. पायाभूत सुविधांच्या या महत्त्वाच्या कामासाठी प्रवाशांनी सहकार्य करावे, अशी विनंती रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आली आहे.

कल्याण – नाशिक लोकल सेवा अशक्य! रेल्वे प्रशासनाने दिले ‘हे’ कारण

   Follow us on        

नाशिक: नाशिक ते कल्याण दरम्यान लोकल रेल्वे सेवा सुरू करण्याच्या दीर्घकालीन मागणीवर केंद्र सरकारने पुन्हा एकदा तांत्रिक कारणांचे बोट दाखवत ही सेवा सध्यातरी शक्य नसल्याचे स्पष्ट केले आहे.

खासदार राजाभाऊ वाजे यांनी लोकसभेत यासंदर्भात रेल्वे मंत्रालयाला जाब विचारला असता, मंत्रालयाने दिलेल्या उत्तरामुळे नाशिककरांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. कसारा ते इगतपुरी या घाट विभागातील बोगद्यांची रुंदी कमी असून, मुंबई उपनगरीय लोकल गाड्यांची रुंदी जास्त असल्यामुळे या मार्गावर लोकल चालवणे सध्या कठीण असल्याचे रेल्वेने म्हटले आहे. या तांत्रिक अडचणींमुळे नाशिक-कल्याण लोकलचे स्वप्न पुन्हा एकदा अधांतरी राहिले असून, खासदार वाजे यांनी केंद्र सरकार नाशिककरांना ‘एप्रिल फूल’ बनवत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

​या मार्गावर सध्या ३६ उपनगरीय गाड्या धावत असल्या तरी, नवीन सेवा सुरू करणे हे मार्गाची क्षमता, उपलब्ध पाथ, रोलिंग स्टॉक आणि पायाभूत सुविधांवर अवलंबून असल्याचे रेल्वे मंत्रालयाचे म्हणणे आहे. मात्र, नाशिक ते कल्याण या प्रवासासाठी हजारो विद्यार्थी, शेतकरी, लघु व्यापारी आणि रोजंदारी करणारे कामगार दररोज प्रवास करतात, त्यांच्यासाठी ही केवळ सुविधा नसून एक अत्यंत आवश्यक गरज आहे. एक्स्प्रेस गाड्या सर्व स्थानकांवर थांबत नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.

या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी सरकार कोणते ठोस पाऊल उचलणार किंवा नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणार का, याबाबत मंत्रालयाने कोणतीही स्पष्ट भूमिका मांडलेली नाही. त्यामुळे ही रेल्वे सेवा नेमकी कधी सुरू होणार, हा प्रश्न अद्यापही अनुत्तरितच राहिला आहे.

उपनगरीय लोकल सेवेचा वक्तशीरपणा सुधारण्याच्या नावाखाली कोकणरेल्वे मार्गावरील सर्वच गाड्यांना ‘बाहेरचा मार्ग’?

   Follow us on        

मुंबई: कोकणात जाणाऱ्या सामान्य चाकरमान्यांच्या हक्काची आणि जिव्हाळ्याची असलेली ‘रत्नागिरी-दादर पॅसेंजर’ रेल्वे आता कायमची इतिहासजमा होणार असल्याचे चिन्ह दिसत आहे. कोरोना काळात बंद करण्यात आलेली ही गाडी पुन्हा दादरपर्यंत सुरू करावी, ही कोकणवासीयांची अत्यंत रास्त मागणी रेल्वे प्रशासनाने अत्यंत उद्धटपणे फेटाळून लावली आहे.

​शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांनी नुकतीच दिल्लीत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. मात्र, रेल्वे अधिकाऱ्यांनी दादर किंवा सीएसटीएम येथून रत्नागिरीसाठी गाडी सुरू करणे ‘शक्यच नाही’ असे स्पष्टपणे सांगून कोकणच्या जनतेच्या तोंडाला पाने पुसली आहेत.

विशेष म्हणजे, आता ही गाडी दिवा स्थानकावरून वसईमार्गे वळवण्यात येणार आहे. म्हणजेच, मुंबईत राहणाऱ्या चाकरमान्याला ही गाडी पकडण्यासाठी थेट दिवा किंवा वसई गाठावी लागणार आहे.

उपनगरीय लोकल सेवेचा वक्तशीरपणासाठी कोकणकरांच्या सोयीचा बळी. 

रेल्वे अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार उपनगरीय लोकल सेवेचा वक्तशीरपणा वाढविण्यासाठी काही ठोस पावले उचलत आहे. त्यात कोकण रेल्वे मार्गे जाणार्‍या गाड्या कायमस्वरूपी पनवेल, बोरिवली येथील प्रस्तावित टर्मिनसवर शिफ्ट करण्याचा विचार असल्याची माहिती समोर येत आहे.

एका आघाडीच्या मराठी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार भविष्यात कोकणात जाणाऱ्या सर्व एक्स्प्रेस गाड्या आता पश्चिम रेल्वेच्या बोरीवली स्थानकातून सुटतील. या गाड्या पुढील दीड ते दोन वर्षात पूर्ण होणार्‍या नव्या रेल्वे मार्गाने म्हणजेच जुचंद्र, कमान रोड, खारबाव, भिवंडी रोड, नवी डोंबिवली, कोपर, नांदवली, तळोजे आणि कळंबोलीमार्गे पनवेलला जातील.

एकदंरीत मध्यरेल्वे कोकणरेल्वेशी असलेली लिंक संपूर्णपणे तोडणार असून या गाड्या पाश्चिम रेल्वेच्या समन्वयाने चालविण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.

प्रवासी वर्गात नाराजी. 

आधीच दादर रत्नागिरी एक्सप्रेस गाडी बंद केल्याने नाराज झालेला कोकणातील प्रवासी वर्ग या बातमीने सुन्न झाला आहे. कोकणातील जनतेचा कोणी नसल्याची भावना त्यांच्याकडून व्यक्त होत आहे.

तुकाराम मुंडे, अश्विनी भिडेसह राज्यातील १० सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या…

   Follow us on        

मुंबई: महाराष्ट्र सरकारने आज, ३१ मार्च २०२६ रोजी राज्यातील दहा वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. या प्रशासकीय फेरबदलात सर्वात चर्चिले जाणारे नाव आहे अश्विनी भिडे यांचे. १९९५ च्या बॅचच्या आयएएस अधिकारी अश्विनी भिडे यांची बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भूषण गगराणी यांच्या सेवानिवृत्तीनंतर त्या मुंबई महापालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त म्हणून पदभार स्वीकारतील. मुंबई मेट्रोसारख्या मोठ्या प्रकल्पांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेल्या भिडे यांना ‘नो-नॉन्सेन्स’ प्रशासक म्हणून ओळखले जाते.

या बदल्यांमध्ये तुकाराम मुंढे यांची आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भ्रष्टाचाराविरोधात कडक भूमिका घेणारे मुंढे यांची ही २१ वर्षांच्या कारकिर्दीत २४वी बदली असल्याचे सांगितले जाते. प्रेरणा देशभ्रतार यांना मत्स्यव्यवसाय आयुक्तपद, पृथ्वीराज बी. पी. यांना वसई-विरार महानगरपालिका आयुक्तपद, तर विनिता वेद सिंघल यांना मृद व जलसंधारण विभागाचे प्रधान सचिवपद देण्यात आले आहे.

याशिवाय माणिक गुरसळ यांची दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे सचिव, विकास चंद्र रस्तोगी यांची वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव, परिमल सिंह यांची कृषी विभागाचे सचिव, लहू माळी यांची शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक आणि लोकेश चंद्र यांची मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव म्हणून नियुक्ती झाली आहे. या फेरबदलांमुळे वित्त, कृषी, आपत्ती व्यवस्थापन आणि शहरी प्रशासनासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांत नवीन गती येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने प्रशासनाला अधिक कार्यक्षम आणि सुधारित करण्याच्या दिशेने हे पाऊल उचलल्याचे मानले जाते.

 

 

 

 

अटल सेतूचा विस्तार अलिबागपर्यंत होणार; मुंबई – अलिबाग अंतर दीड तासांवर येणार

   Follow us on        

​नवी मुंबई: मुंबई आणि नवी मुंबईला जवळ आणणाऱ्या ‘अटल सेतू’चा विस्तार आता थेट अलिबागपर्यंत करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सिडकोने हाती घेतला आहे. या प्रकल्पामुळे सध्या रस्ते मार्गाने मुंबई ते अलिबाग जाण्यासाठी लागणारा ४ ते ५ तासांचा वेळ कमी होऊन अवघ्या दीड तासात हे अंतर पार करता येणार आहे. या कनेक्टिव्हिटीमुळे जेएनपीटी (JNPT) आणि नियोजित नवी मुंबई विमानतळ थेट अलिबागशी जोडले जाणार असून, प्रवाशांना आणि लॉजिस्टिक क्षेत्राला याचा मोठा फायदा होणार आहे.

​सध्या उलवे भागात ७ किमी लांबीचा सहा पदरी (सिक्स लेन) कोस्टल रोड तयार करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. या मार्गाचा पुढील टप्पा द्रोणागिरीमार्गे रेवस-करंजा खाडी पुलाशी जोडण्याचा प्रस्ताव आहे. हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर एक अखंड कोस्टल कॉरिडॉर तयार होईल, ज्यामुळे नवी मुंबई विमानतळापर्यंत पोहोचण्यासाठी अत्यंत जलद कनेक्टिव्हिटी मिळेल. या प्रकल्पासाठी अंदाजे १६०० कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित असून, विस्तारासाठी २५०० ते ४००० कोटी रुपयांपर्यंत खर्च अपेक्षित आहे.

​पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी या प्रकल्पात विशेष काळजी घेण्यात आली आहे. खारफुटीच्या (मॅंग्रोव्हज) जंगलांचे नुकसान टाळण्यासाठी काही भागांत ‘एलिव्हेटेड’ रस्ता उभारण्यात येणार आहे. स्टिल्ट्सवर हा रस्ता बांधल्यामुळे जमिनीवरील पर्यावरणाची हानी टाळता येईल. या मार्गामुळे पाम बीच रोडसह इतर मुख्य रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी होईल आणि अटल सेतूपासून द्रोणागिरीपर्यंतचा प्रवास ‘सिग्नलमुक्त’ झाल्याने प्रवाशांचे २० ते ३० मिनिटे वाचणार आहेत.

​या प्रकल्पामुळे केवळ वेळच वाचणार नाही, तर रेवस-करंजा पुलामुळे कोकण भाग थेट रस्त्याने जोडला जाईल. परिणामी, सध्याच्या फेरीबोटींवरील ताण कमी होईल आणि अलिबागसह संपूर्ण कोकण पट्ट्यातील पर्यटनाला मोठी चालना मिळेल.

धक्कादायक! बदलापूर लोकल ट्रेनवर दगडफेक; एक महिला प्रवासी जखमी

   Follow us on        

मुंबई, २८ मार्च २०२६: मुंबईतील लोकल ट्रेन प्रवास पुन्हा एकदा असुरक्षित ठरला आहे. शुक्रवार, २७ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ७:१४ च्या बदलापूर लोकल ट्रेनवर दादर रेल्वे स्थानकाच्या अगदी आधी मोठा दगड फेकण्यात आला. या घटनेत महिलांच्या डब्यात बसलेल्या एका महिलेला डोळ्याला गंभीर जखम झाली.

ही गाडी दादर स्टेशनजवळ जस्ट थांबत असताना डाव्या बाजूने (लेफ्ट साइड) जोरदार दगड आला आणि थेट महिलांच्या डब्यात घुसला. तो दगड एका महिलेच्या डोळ्याखाली लागला आणि मोठ्या प्रमाणात रक्त वाहू लागले. सहप्रवासी महिलांनी  तिची मदत केली. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाकडे तक्रार केली आहे.

मुंबई सेंट्रल रेल्वेचे डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर (DRM) यांनी घटनेची दखल घेतली आणि रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (RPF) ला तातडीने चौकशीचे निर्देश दिले आहेत. मुंबईतील लोकल ट्रेनवर दगडफेकीच्या घटना गेल्या काही दिवसांत वारंवार घडत आहेत. यापूर्वी वंदे भारत एक्सप्रेससह इतर ट्रेनांवरही अशा घटना घडल्या होत्या. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे प्रशासनाने कडक उपाययोजना करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. अज्ञात दगडफेक करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यात येत आहे.

 

मुंबई–सुरत लोकल ट्रेन लवकरच सुरू होणार

   Follow us on        

मुंबई: मुंबई–सुरत दरम्यान उपनगरी (सबर्बन) रेल्वे सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण हालचाली सुरू झाल्या असून, गुजरात राज्यातील प्रवाशांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी ठरण्याची शक्यता आहे. पश्चिम रेल्वे (WR) प्रशासन या मार्गावर आधुनिक नमो भारत रॅपिड ट्रान्झिट ट्रेन तसेच सुधारित मेनलाइन इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट (MEMU) गाड्या चालवण्याचा विचार करत आहे.

सध्या विरार ते सुरत दरम्यान MEMU गाड्या धावतात; मात्र या गाड्या सुमारे ३० थांबे घेत असल्याने प्रवासाला ५ तासांहून अधिक वेळ लागतो. तसेच दिवसातून मर्यादित फेऱ्या असल्याने प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर गैरसोय सहन करावी लागते. यामुळे मुंबई–सुरत दरम्यान अधिक वेगवान, आरामदायी आणि वारंवार धावणारी सेवा सुरू करण्याची गरज व्यक्त केली जात होती.

याच पार्श्वभूमीवर नमो भारतसारख्या आधुनिक गाड्यांचा पर्याय समोर आला आहे. या गाड्यांमध्ये एसी आणि नॉन-एसी डबे, शौचालय सुविधा, आरामदायी आसन व्यवस्था आणि जास्त वेग अशा सुविधा उपलब्ध आहेत. सध्याच्या लोकल (EMU) गाड्यांमध्ये शौचालय नसल्यामुळे ३ तासांपेक्षा जास्त प्रवास करणे अवघड होते. त्यामुळे लांब पल्ल्याच्या उपनगरी सेवेसाठी अशा आधुनिक गाड्या अधिक उपयुक्त ठरू शकतात.

या योजनेअंतर्गत सुरत रेल्वे स्थानकावर उपनगरी गाड्यांसाठी स्वतंत्र प्लॅटफॉर्म उभारण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. सुरत स्टेशनचा सुमारे ₹१,५०० कोटींचा पुनर्विकास प्रकल्प सुरू असून, तो डिसेंबर २०२७ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. या नव्या स्टेशनला मेट्रो, बुलेट ट्रेन आणि विमानतळाशीही जोडले जाणार आहे, ज्यामुळे एकात्मिक वाहतूक व्यवस्था तयार होईल.

जर मुंबई–सुरत उपनगरी रेल्वे सेवा प्रत्यक्षात आली, तर हजारो रोजंदारी कामगार, व्यावसायिक आणि छोट्या उद्योगांशी संबंधित प्रवाशांना मोठा फायदा होईल. प्रवासाचा वेळ कमी होईल, रेल्वेवरील ताण कमी होईल आणि रस्ते वाहतुकीवरील दबावही घटण्यास मदत होईल.

एकूणच, मुंबई–सुरत दरम्यान उपनगरी रेल्वे सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव हा भविष्यातील दळणवळणासाठी गेमचेंजर ठरू शकतो. आता या योजनेची अंमलबजावणी किती लवकर होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मनसेचा दुसरा ‘प्रहार’! बंद केलेली गाडी सुरू करण्यासाठी कोकण रेल्वे मुख्यालयावर धडक

   Follow us on        

नवी मुंबई: कोकण रेल्वेच्या प्रवाशांना सातत्याने भेडसावणाऱ्या अडचणींविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज बेलापूर येथील कोकण रेल्वे मुख्यालयावर धडक देत जोरदार निषेध नोंदवला. कोकणातील चाकरमान्यांची जीवनवाहिनी असलेल्या रेल्वे सेवेत होणारी गैरसोय, तसेच ‘दादर–रत्नागिरी पॅसेंजर’सारख्या महत्त्वाच्या गाड्या रद्द करण्याच्या निर्णयामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर मनसेच्या शिष्टमंडळाने रेल्वे प्रशासनाला निवेदन सादर करून तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली.

मनसेने स्पष्ट इशारा देताना सांगितले की, प्रवाशांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास आणि रद्द केलेल्या गाड्या त्वरित पूर्ववत न केल्यास पक्ष आपल्या आक्रमक शैलीत आंदोलन उभे करेल.

या वेळी लहू थळे, स्वप्निल पंडित, प्रथमेश म्हात्रे, अक्षय वानखेडे, सविनय म्हात्रे, विलास घोणे, सचिन कदम यांच्यासह बेलापूर विभागातील प्रकाश कोकाटे, प्रशांत कोळी, शशी कोळी, सिद्धेश गायकवाड, ऋषिकेश पवार आणि चंद्रकांत कोळी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यापूर्वी मनसेच्या शिष्टमंडळाने मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील मध्य रेल्वेच्या मुख्यालयात धडाक देऊन दादर रत्नागिरी गाडी दादर येथून सोडण्याची मागणी केली आणि तसे न केल्यास मनसे स्टाइलने आंदोलन करू अशा इशारा दिला होता.

कोकणवासीयांना न्याय मिळेपर्यंत आणि त्यांच्या प्रवासातील अडचणी दूर होईपर्यंत हा लढा सुरूच राहणार असल्याचे मनसेकडून सांगण्यात आले.

दादर – रत्नागिरी गाडी बंद होऊ देणार नाही; प्रताप सरनाईक यांची ग्वाही

   Follow us on        

मुंबई: महाराष्ट्रातील परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दादर-रत्नागिरी प्रवासी गाडी बंद होणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही दिली आहे. केंद्रीय रेल्वेने या गाडीचा दादर स्टेशनवरील प्रस्थान स्लॉट रद्द करून तो दादर-गोरखपूर एक्सप्रेसला कायमस्वरूपी देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे गाडी आता दिवा स्टेशनवरून सुरू होणार असल्याने कोकणातील दररोजच्या प्रवाशांना, विशेषतः कमी उत्पन्न असलेल्या कामगार आणि विद्यार्थ्यांना मोठी गैरसोय होणार होती.

या निर्णयाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (एमएनएस) आज, २४ मार्च २०२६ रोजी जोरदार विरोध प्रदर्शन केले. कोकणी माणसांच्या हक्काचे रक्षण करण्यासाठी १५ दिवसांत गाडी पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली. या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रवाशांच्या सोयीसाठी गाडी बंद होऊ देणार नाही, असे सांगितले.

कोकण रेल्वे मार्गावरील ही प्रवासी गाडी स्थानिक लोकांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांना प्राधान्य देण्याच्या रेल्वेच्या धोरणामुळे स्थानिक सेवांवर परिणाम होत असल्याबाबत सातत्याने वाद उफाळून येत आहेत. या मुद्द्यावरून महाराष्ट्रात राजकीय खळबळ माजली असून, जर लवकर तोडगा न निघाल्यास आंदोलने तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

 

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search