आंबे पिकवण्यासाठी घातक केमिकलची फवारणी? APMC मधील व्यापाऱ्यांवर एफडीएची मोठी कारवाई

   Follow us on        

नवी मुंबई: नवी मुंबईतील वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (APMC) फळ मार्केटमध्ये आंबे पिकवण्यासाठी घातक रसायनांचा वापर होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. एका जागरूक ग्राहकाने व्यापाऱ्यांना आंब्यांवर उघडपणे रसायनांची फवारणी करताना पाहिल्यानंतर ही बाब उघडकीस आली. या प्रकाराची गंभीर दखल घेत अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि APMC प्रशासनाने संयुक्तपणे फळ मार्केटमध्ये अचानक धाड टाकली. या कारवाईदरम्यान संशयास्पद व्यापाऱ्यांच्या गाळ्यांची झडती घेण्यात आली असून आंब्यांचे नमुने जप्त करण्यात आले आहेत.

​प्रशासनाने जप्त केलेले हे नमुने सध्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत. या तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषी आढळणाऱ्या व्यापाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे. उन्हाळ्याच्या हंगामात मोठ्या प्रमाणात आंब्यांची आवक होत असताना, अशा प्रकारे रसायनांचा वापर करून आंबे पिकवले जात असल्याने ग्राहकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रासायनिक पद्धतीने पिकवलेले आंबे आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकतात, ज्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

​या पार्श्वभूमीवर, तज्ज्ञांनी नैसर्गिक आणि रासायनिक पद्धतीने पिकवलेल्या आंब्यांमधील फरक ओळखण्याचे आवाहन ग्राहकांना केले आहे. नैसर्गिकरित्या पिकलेला आंबा रंगाने एकसारखा नसतो आणि त्याला एक गोड सुगंध असतो, तसेच तो सर्व बाजूंनी मऊ लागतो. याउलट, रासायनिक पद्धतीने पिकवलेला आंबा पूर्णपणे गडद पिवळा दिसतो, त्याला नैसर्गिक वास नसतो किंवा कधीकधी औषधासारखा वास येतो. असे आंबे बाहेरून मऊ वाटले तरी आतून कडक असण्याची शक्यता असते. फळ तज्ज्ञांनी नागरिकांना आंबे खरेदी करताना विशेष काळजी घेण्याचे आणि लहान मुले व वृद्धांना देताना सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

Photo Credit – AI

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search