सावंतवाडी: ‘शक्तीपीठ’ महामार्ग तीन महामार्गांना जोडला जाईल आणि याद्वारे पर्यटन विकास घडवला जाईल असे विधान सावंतवाडी येथील निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना आमदार दीपक केसरकर यांनी काल केले,. दोडामार्ग तालुक्यातील काही गावे ‘इको सेन्सिटिव्ह’ झोनमध्ये समाविष्ट झाल्यामुळे तेथे काही निर्बंध आले आहेत, ज्यांचे पालन करणे गरजेचे आहे. या भागातील वृक्षतोट रोखण्यासाठी आणि नागरिकांमध्ये सजगता निर्माण करण्यासाठी एनजीओच्या मदतीने प्रत्येक गावात जाऊन जनजागृती केली जाणार आहे.
मतदारसंघातील तिन्ही तालुक्यांच्या आमसभा गेल्या काही वर्षांपासून झालेल्या नव्हत्या, मात्र आता त्या होत असल्याची आनंदाची बाब त्यांनी व्यक्त केली. वेळापत्रकानुसार सावंतवाडी तालुक्याची आमसभा ६ ऑगस्टला तर दोडामार्ग तालुक्याची आमसभा ७ ऑगस्टला होणार असून, सावंतवाडी व दोडामार्गपाठोपाठ पुढील आठवड्यात वेंगुर्ला तालुक्याची आमसभा घेतली जाईल. या तिन्ही तालुक्यांचा सर्वांगीण विकास आणि पर्यटन विकासाला आपले प्राधान्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
याशिवाय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या सहकार्यामुळे सावंतवाडी रेल्वे स्थानकावर तीन नव्या गाड्यांना थांबा मिळाला आहे. भविष्यात या भागात अजून जास्त गाड्या उपलब्ध करून देण्याच्या आणि सावंतवाडी रेल्वे टर्मिनसला पाण्याची व्यवस्था पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे केसरकर यांनी शेवटी सांगितले.


