मालवण: एसटी महामंडळाच्या मालवण आगारामार्फत मालवण ते अक्कलकोट ही थेट बससेवा सुरू करण्यात आली आहे. स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी ही सेवा अत्यंत दिलासादायक ठरणार असून कोकणातील प्रवाशांना आता बस बदल न करता थेट अक्कलकोटपर्यंत प्रवास करता येणार आहे.
ही बस मालवण येथून दररोज दुपारी ३.४५ वाजता सुटणार आहे, तर अक्कलकोट येथून सायंकाळी ७.३० वाजता परतीचा प्रवास सुरू होईल. या प्रवासादरम्यान आचारा, कणकवली, तळेरे, वैभववाडी, गगनबावडा, कोल्हापूर, सांगोला, पंढरपूर आणि सोलापूर ही प्रमुख ठिकाणे येणार आहेत.
प्रवाशांच्या सोयीसाठी या बसचे ऑनलाईन आरक्षण उपलब्ध करण्यात आले आहे. तसेच शासनाच्या विविध सवलत योजनांनुसार महिलांना ५० टक्के सवलत आणि ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के सवलत लागू आहे. त्यामुळे अधिकाधिक प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मालवण आगारामार्फत करण्यात आले असून, अधिक माहितीसाठी ०२३६५-२५२०३४ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.


