सिंधुदुर्गनगरी :
जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रांमध्ये लहान मुलांना पुरविण्यात येणाऱ्या पोषण आहाराचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचा गंभीर मुद्दा जिल्हा परिषद महिला व बाल विकास समितीच्या सभेत पुढे आला आहे. या निकृष्ट दर्जावर सभेत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
सभेत सदस्यांनी केलेल्या आरोपानुसार, अंगणवाडय़ात पुरविण्यात येणाऱ्या पांढऱ्या वाटाण्यात अळ्या आढळत असून, हा वाटाणा नीट शिजतही नाही. त्यामुळे लहान मुलांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याचे चित्र समोर आले आहे. या गंभीर समस्येवर चर्चा करताना, मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने पोषण आहारात साखरेऐवजी गुळाचा समावेश करण्यात यावा आणि वाटाण्याऐवजी पौष्टिक पर्याय म्हणून मूग व मटकीची देण्यात यावी, असा महत्त्वाचा ठरावही सभेत संमत करण्यात आला.
ही सभा जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सोमवारी पार पडली. महिला व बाल विकास समितीच्या सभापती अनुराधा नारकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठkiला प्रभारी सचिव तथा बाल विकास प्रकल्प अधिकारी वैशाली काकडे, तसेच समितीचे सदस्य मिलिंद नाईक, हर्पदा वाळके, अवनी तेली, सुप्रिया मेस्त्री, आरती पाटील, क्षमा हडकर, शोभा गावडे आणि विविध तालुक्यांचे बाल विकास प्रकल्प अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


