मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागांतर्गत येणाऱ्या अतिशय मोक्याच्या आणि आव्हानात्मक मानल्या जाणाऱ्या कसारा-इगतपुरी (थाळ घाट) विभागात एक मोठी दुर्घटना टळली आहे. या भागात नियमित गस्त आणि सुरक्षा तपासणी करणाऱ्या ‘इगतपुरी हिल गँग’च्या सतर्कतेमुळे मोठा रेल्वे अपघात टळला असून, प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.
धोकादायक खडकाचा शोध आणि तत्परता
थाळ घाट विभागातील टीजीआर २ ते टीजीआर १ दरम्यानच्या डोंगराळ भागात नियमित तपासणी सुरू असताना हिल गँगच्या कर्मचाऱ्यांना एक मोठा धोका निदर्शनास आला. मुख्य खडकापासून अंदाजे ३.९ मीटर लांब, १.८ मीटर रुंद आणि १.६ मीटर उंच आकाराचा एक प्रचंड खडकाचा ढीग सुटा होऊन वेगळा झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. हा महाकाय खडक रेल्वे ट्रॅकच्या थेट १५ मीटर उंचीवर कटिंगच्या कडेवर अत्यंत धोकादायक स्थितीत लटकलेला होता.
नियोजित ट्रॅफिक ब्लॉक आणि सुरक्षित कारवाई
डोंगराच्या कडेवर असलेला हा भलामोठा खडक कधीही खाली कोसळून मोठी जीवित वा वित्तहानी घडवू शकला असता. याची गांभीर्याने दखल घेत इगतपुरी हिल गँगच्या टीमने कोणत्याही विलंब न करता तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. त्यानंतर सुरक्षिततेची सर्व उपाययोजना करून एका नियोजित ट्रॅफिक ब्लॉकदरम्यान अत्यंत कौशल्याने व काळजीपूर्वक हा मोठा खडक ट्रॅकवर सुरक्षितपणे खाली सोडण्यात आला.
पोकलेन ब्रेकरच्या साहाय्याने ट्रॅक मोकळा
खडक खाली पाडल्यानंतर तो रेल्वे मार्गावर अडथळा ठरत होता. हा महाकाय खडक तातडीने बाजूला सारण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून विशेष पावले उचलण्यात आली. ‘बाऊलडर स्पेशल ट्रेन’वरील आधुनिक पोकलेन ब्रेकरच्या साहाय्याने या भल्यामोठ्या खडकाचे तुकडे करण्यात आले आणि संपूर्ण ट्रॅक तातडीने साफ करून पूर्ववत मोकळा करण्यात आला.
हिल गँगच्या कार्याचे कौतुक
इगतपुरी हिल गँगच्या या अत्यंत साहसी, समयसूचक आणि कौतुकास्पद कार्यामुळे रेल्वे प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित झाला आहे. कर्मचाऱ्यांच्या या तत्परतेची आणि उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत केंद्रीय रेल्वेच्या मुंबई विभागाच्या मंडल रेल्वे व्यवस्थापकांनी (DRM) संपूर्ण हिल गँग टीमची उघडपणे प्रशंसा केली असून त्यांच्या पाठीवर कौतुुकी थाप दिली आहे.


