पुणे: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील प्रवासाचा वेळ वाचवण्यासाठी सुरू करण्यात आलेला ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प सध्या पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. मात्र, या प्रकल्पाच्या सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी अनेक प्रवासी आपले वाहन महामार्गावर थांबवून सेल्फी आणि फोटो काढत असल्याचे निदर्शनास आले आहे. प्रवाशांचा हा सेल्फीचा मोह आता त्यांच्या जीवावर बेतू शकतो, ही बाब लक्षात घेऊन महामार्ग पोलिसांनी अशा बेशिस्त प्रवाशांविरुद्ध कठोर कारवाई सुरू केली आहे.
महाराष्ट्र दिनी (१ मे) उद्घाटन झालेल्या या नवीन मार्गामुळे मुंबई-पुणे प्रवासातील वेळ साधारण ३० मिनिटांनी कमी झाला असून वाहतूक कोंडीतून मोठी सुटका झाली आहे. मात्र, हा मार्ग अतिवेगवान असून येथे वाहने १०० ते १२० किलोमीटर प्रतितास वेगाने धावत असतात. अशा परिस्थितीत केवळ फोटो काढण्यासाठी वाहन थांबवणे हे भीषण अपघातांना निमंत्रण देणारे ठरू शकते.
महामार्ग पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, अशा प्रकारे वाहन थांबवून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्यांवर केवळ दंडात्मक कारवाईच नाही, तर प्रसंगी गुन्हेही दाखल केले जातील. प्रवाशांनी स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षेसाठी महामार्गावर कोठेही थांबू नये आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. ‘मिसिंग लिंक’मुळे प्रवास सुखकर आणि सुरक्षित झाला असला तरी, प्रवाशांच्या अशा बेजबाबदार वागण्यामुळे अपघातांचा धोका वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.


