Category Archives: मुंबई

ड्रायव्हरशिवाय बस चालू झाली; भांडुपमध्ये मोठी दुर्घटना टळली, CCTV फुटेज व्हायरल

   Follow us on        

मुंबई: १९ एप्रिल २०२६ रोजी भांडुप पश्चिम रेल्वे स्थानकाजवळ एक धक्कादायक घटना घडली. पार्क केलेली BEST इलेक्ट्रिक बस (क्रमांक MH-01 CV 8736) ड्रायव्हरशिवाय मागे घसरली आणि जवळच्या खाद्य स्टॉलला धडकली. या घटनेत एक महिला कसाबसा बचावली, तिला शेवटच्या क्षणी ओढून सुरक्षित ठिकाणी नेले गेले.

प्रत्यक्षदर्शींच्या मते, ही बस पूर्णपणे स्थिर अवस्थेत होती, तरीही अचानक रिव्हर्स गिअरमध्ये घसरली. बसने स्टॉलला जोरदार धडक दिल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला. सुदैवाने यात मोठी जीवितहानी टळली, फक्त स्टॉलचे नुकसान झाले.

ही घटना तीन महिन्यांपूर्वी (डिसेंबर २०२५) याच भागात घडलेल्या भीषण अपघाताची आठवण करून देते, ज्यात reversing बसने पादचाऱ्यांना चिरडले होते आणि चार जणांचा मृत्यू झाला होता.

पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून, BEST प्रशासनाकडून बसची तपासणी सुरू करण्यात आली आहे. हँडब्रेक किंवा यांत्रिक दोष यामागे असल्याची शक्यता तपासली जात आहे. नागरिकांनी बस पार्किंग आणि देखभालीबाबत काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबई उपनगरीय लोकल गाड्या जमिनीखालून धावणार! भुयारी मार्गांची चाचपणी सुरू

   Follow us on        

मुंबई: मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या उपनगरीय रेल्वे नेटवर्कमध्ये आता क्रांतिकारी बदल होण्याची शक्यता आहे. पश्चिम रेल्वे (WR) आणि मध्य रेल्वेने (CR) शहरातील सर्वात व्यस्त अशा चर्चगेट-विरार आणि सीएसएमटी-कल्याण या दोन मार्गांवर भुयारी रेल्वे कॉरिडॉर उभारण्यासाठी व्यवहार्यता अभ्यास (Feasibility Study) करण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम रेल्वेने यासाठी रेल्वे बोर्डाची परवानगी मागितली असून, मध्य रेल्वेदेखील लवकरच या प्रक्रियेत सामील होणार आहे.

जमिनीवरील विस्ताराच्या मर्यादा

रेल्वे प्रशासनानुसार, सध्याच्या रेल्वे मार्गांच्या बाजूला जमिनीवर नवीन मार्गिका (Tracks) तयार करणे आता जवळपास अशक्य झाले आहे. प्रचंड वाढलेले भूसंपादन खर्च, दाट नागरी वस्ती आणि कायदेशीर वाद यामुळे जमिनीवरील विस्ताराला मर्यादा आल्या आहेत. या अडचणींवर मात करण्यासाठी आणि रेल्वेची क्षमता वाढवण्यासाठी ‘अंडरग्राउंड’ मार्ग हाच एकमेव शाश्वत पर्याय असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

गर्दीतून सुटका आणि वेगवान प्रवास

मुंबईतील स्थानिक गाड्यांमध्ये सध्या ‘सुपर डेन्स क्रश लोड’ची स्थिती आहे, जिथे एका चौरस मीटरमध्ये सुमारे १६ प्रवासी प्रवास करतात. प्रस्तावित भुयारी मार्गांमुळे उपनगरीय रेल्वेची स्वतंत्र यंत्रणा निर्माण होईल, ज्यामुळे गाड्यांची वारंवारता वाढेल. हे मार्ग पूर्णपणे वातानुकूलित असतील आणि यामुळे तांत्रिक बिघाड किंवा रुळांवरील अतिक्रमणांमुळे होणारा विलंब टाळता येईल, परिणामी प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर आणि वक्तशीर होईल.

मेट्रोच्या यशातून प्रेरणा

मुंबईत ‘अ‍ॅक्वा लाईन’ सारख्या मेट्रो प्रकल्पांच्या यशस्वी भुयारी कामाने रेल्वे प्रशासनाचा आत्मविश्वास वाढवला आहे. दाट वस्ती असलेल्या भागातही प्रगत इंजिनीअरिंगच्या सहाय्याने बोगदे तयार करणे शक्य असल्याचे सिद्ध झाले आहे. लंडन आणि टोकियो यांसारख्या शहरांच्या धर्तीवर मुंबईतही बहुस्तरीय रेल्वे जाळे उभारण्याचे स्वप्न आता या अभ्यासातून साकार होण्याची चिन्हे आहेत.

भविष्यातील आव्हाने आणि गुंतवणूक

भुयारी रेल्वे प्रकल्प हे अत्यंत खर्चिक असतात. मुंबईत जमिनीखालील मेट्रो मार्गिकेचा खर्च साधारण १,१०० कोटी रुपये प्रति किलोमीटर आहे, जो जमिनीवरील मार्गापेक्षा ३-४ पटीने अधिक आहे. एमआरव्हीसी (MRVC) सध्या चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यानच्या ५ किमीच्या भुयारी मार्गाचा अभ्यास करत आहे. या सर्व अभ्यासांचे निष्कर्ष आल्यानंतरच रेल्वे मंत्रालय आणि राज्य सरकार या प्रकल्पांच्या आर्थिक आणि तांत्रिक व्यवहार्यतेवर अंतिम शिक्कामोर्तब करतील.

मध्य रेल्वेच्या ‘उत्तर भारत केंद्रित’ धोरणाविरोधात खासदार अरविंद सावंत आक्रमक

   Follow us on        

​नवी दिल्ली:उन्हाळी सुट्ट्यांच्या काळात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या वाट्याला मध्य रेल्वेकडून येत असलेल्या सापत्न वागणुकीविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार अरविंद सावंत यांनी दिल्लीत आवाज उठवला आहे. मध्य रेल्वेचे धोरण ‘उत्तर भारत केंद्रित’ असल्याचा आरोप करत सावंत यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची प्रत्यक्ष भेट घेतली. यावेळी त्यांनी रेल्वेमंत्र्यांना एक सविस्तर पत्र सादर करून कोकणवासीयांच्या भावना आणि आकडेवारीनिशी रेल्वेचा दुजाभाव त्यांच्या निदर्शनास आणून दिला.

​खासदार सावंत यांनी पत्रात नमूद केले आहे की, मध्य रेल्वेने १९ मार्गांवर एकूण १,५०० ‘समर स्पेशल’ गाड्यांचे नियोजन केले असताना, त्यातील तब्बल ४५० गाड्या बिहारसाठी आणि ३३२ गाड्या उत्तर प्रदेशसाठी सोडल्या आहेत. याउलट, मुंबईतून लाखो प्रवासी ज्या कोकण मार्गावर अवलंबून असतात, तिथे केवळ ३६ गाड्या देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, उत्तर भारतासाठी धावणाऱ्या गाड्या दररोज उपलब्ध आहेत, तर मुंबई-मडगाव विशेष गाडी १६ एप्रिल ते ११ जून दरम्यान आठवड्यातून केवळ एकदाच सोडली जाणार आहे. हा विरोधाभास संतापजनक असून कोकणी प्रवाशांची क्रूर थट्टा असल्याची टीका सावंत यांनी केली आहे.

​नियमित गाड्यांची स्थितीही बिकट असून मांडवी, कोकण कन्या, जनशताब्दी आणि तेजस एक्स्प्रेस सारख्या गाड्यांच्या स्लीपर क्लासची वेटिंग लिस्ट १०० च्या पुढे गेली आहे. सध्या कोकणातील रस्त्यांची दुरवस्था आणि घाटातील वाहतूक कोंडी पाहता रेल्वे प्रवास हाच एकमेव सुरक्षित पर्याय आहे, मात्र रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर, दादर-रत्नागिरी ट्रेन पुन्हा सुरू करावी, विशेष गाड्यांच्या फेऱ्या ‘दररोज’ कराव्यात आणि अतिरिक्त रेक्स (डबे) उपलब्ध करून द्यावेत, अशा प्रमुख मागण्या त्यांनी रेल्वेमंत्र्यांकडे केल्या आहेत. हा अन्याय त्वरित दूर न झाल्यास कोकणच्या जनतेचा उद्रेक होईल आणि तीव्र जनआंदोलन छेडले जाईल, असा इशाराही अरविंद सावंत यांनी यावेळी दिला.

मराठी भाषेला दुय्यम स्थान; मध्य रेल्वेला शिवसेनेचा इशारा

   Follow us on        

मुंबई: मध्य रेल्वेच्या विविध स्थानकांवरील सूचनाफलकांवरून मराठी भाषा गायब झाल्याच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने रेल्वे प्रशासनाला धारेवर धरले आहे. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी असूनही रेल्वे स्थानकांवर केवळ हिंदी आणि इंग्रजी भाषेचा वापर करून स्थानिक मराठी भाषेला डावलले जात असल्याचे समोर आले आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेत, दक्षिण मुंबईचे विभागप्रमुख संतोष शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज मध्य रेल्वे प्रशासनाची भेट घेऊन त्यांना लेखी निवेदन सादर केले व या प्रकाराचा जाब विचारला.

​सादर केलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, रेल्वे ही लाखो प्रवाशांच्या दैनंदिन जीवनाचा भाग आहे, तिथे स्थानिक भाषेला प्राधान्य देणे घटनात्मक आणि शासकीय धोरणानुसार आवश्यक आहे. असे असतानाही मराठीला डावलणे हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान आहे. जर रेल्वे प्रशासनाने तातडीने सर्व सूचनाफलकांवर मराठी भाषेचा समावेश केला नाही, तर शिवसेना आपल्या ‘परंपरागत’ पद्धतीने तीव्र आंदोलन छेडेल, असा इशाराही संतोष शिंदे यांनी यावेळी दिला.

​या प्रसंगी विभाग संघटक युगंधरा साळेकर, युवासेना विस्तारक अजिंक्य धात्रक यांच्यासह पक्षाचे विविध पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशासनाने या विषयावर सकारात्मक कार्यवाही न केल्यास उद्भवणाऱ्या परिस्थितीला रेल्वे प्रशासनच सर्वस्वी जबाबदार असेल, असेही पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

ॲप आधारित कंपन्यांच्या मनमानी कारभाराविरोधात टॅक्सी चालकांचा पुण्याहून मुंबईपर्यंत पायी प्रवास

   Follow us on        

मुंबई: अॅप-आधारित टॅक्सी कंपन्यांकडून होणारी पिळवणूक आणि अन्यायाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी पुण्यातील तीन कॅब चालकांनी सुमारे १५० किलोमीटरचा पायी प्रवास करून मुंबई गाठली आहे. परमेश्वर घोंगे, संतोष दुर्गे आणि वैभव भेगडे या ‘महाराष्ट्र कामगार सभे’शी संबंधित चालकांनी १० एप्रिल रोजी पुण्याहून या ‘न्याय पदयात्रे’ला सुरुवात केली होती. तळपत्या उन्हात, पायाला फोड येऊनही केवळ निर्धाराच्या जोरावर लोणावळा, खालापूर, पनवेल आणि वाशीमार्गे त्यांनी बुधवारी मुंबईत प्रवेश केला. हे चालक १५ एप्रिल रोजी आझाद मैदानावर पोहोचून परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना आणि मुख्यमंत्र्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर करणार आहेत.

​या आंदोलनाचा मुख्य उद्देश कंपन्यांच्या बेकायदेशीर कारभाराचा निषेध करणे हा आहे. आंदोलक चालकांच्या म्हणण्यानुसार, ओला, उबेर आणि रॅपिडो सारख्या कंपन्या सरकारनं ठरवून दिलेल्या भाडेदरांचे पालन करत नाहीत. याशिवाय, ‘पॅनिक बटण’च्या नावाखाली चालकांकडून वारंवार केली जाणारी कपात, कमिशनमधील पारदर्शकतेचा अभाव आणि मुंबई-नागपूर सारख्या शहरांत विनापरवाना सुरू असलेल्या ‘बाईक टॅक्सी’मुळे होणारे नुकसान यावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र कामगार सभेचे अध्यक्ष डॉ. केशव नाना क्षीरसागर यांनी सांगितले की, हा लढा चालकांच्या हक्कासाठी असून जोपर्यंत शासन यावर ठोस पाऊल उचलत नाही, तोपर्यंत आमचा पाठपुरावा सुरू राहील. दरम्यान, परिवहन विभागाने या कंपन्यांना नियमांचे पालन करण्याचे आदेश वारंवार दिले असल्याचे सांगत, कंपन्या एकमेकांवर बोट ठेवून जबाबदारी टाळत असल्याचा दावा केला आहे.

मुंबई लोकलमध्ये गर्भवती महिलांसाठी स्वतंत्र डब्याची मागणी

   Follow us on        

मुंबई: मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या उपनगरीय रेल्वे गाड्यांमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. मात्र, या प्रवासादरम्यान गर्भवती महिलांना होणारा त्रास आणि त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. भाजप नेते प्रभाकर शिंदे यांनी रेल्वे प्रशासनाकडे एक महत्त्वपूर्ण मागणी केली असून, गर्भवती महिलांसाठी लोकलमध्ये स्वतंत्र राखीव डब्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी आग्रही विनंती त्यांनी पत्राद्वारे केली आहे.

​सध्या मुंबई लोकलमध्ये महिलांसाठी विशेष डबे, ज्येष्ठ नागरिकांसाठी जागा आणि दिव्यांगांसाठी स्वतंत्र कक्ष उपलब्ध आहेत. रेल्वेच्या नियमांनुसार, गर्भवती महिलांना दिव्यांग डब्यातून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र, प्रभाकर शिंदे यांनी निदर्शनास आणून दिले आहे की, दिव्यांग डबा हा केवळ गर्भवती महिलांसाठी राखीव नसल्याने तेथेही प्रचंड गर्दी असते. या गर्दीमुळे गर्भवती महिलांना धक्काबुक्की सहन करावी लागते, ज्याचा त्यांच्या आणि बाळाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.

​मुंबईतील गर्दीच्या वेळी (पीक अवर्स) लोकलमध्ये चढणे आणि उतरणे हे कोणत्याही सामान्य प्रवाशासाठी मोठे आव्हान असते. अशा परिस्थितीत गर्भवती महिलांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. “गर्भवती महिलांना सध्याच्या व्यवस्थेत सन्मानाने आणि सुरक्षितपणे प्रवास करता येत नाही. त्यांना मिळणारी दिव्यांग डब्यातील मुभा पुरेशी नाही, कारण तिथेही प्रवाशांची संख्या मोठी असते,” असे शिंदे यांनी आपल्या मागणीत नमूद केले आहे.

​रेल्वे स्थानकांवर किंवा चालत्या गाडीत वैद्यकीय आणीबाणीच्या घटनांमध्ये अलीकडच्या काळात वाढ झाली आहे. अनेकदा गर्दीमुळे गुदमरल्यासारखे होणे किंवा धक्काबुक्कीमुळे दुखापत होण्याचे प्रकार घडतात. या पार्श्वभूमीवर, गर्भवती महिलांसाठी जर स्वतंत्र डबा राखीव ठेवला, तर त्यांना सुरक्षित बसण्याची जागा मिळेल आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत त्यांना तातडीने मदत मिळणे सोपे होईल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

​प्रभाकर शिंदे यांनी रेल्वे प्रशासनाला या विषयाचे गांभीर्य ओळखून तातडीने सकारात्मक पावले उचलण्याचे आवाहन केले आहे. “मुंबई लोकलचा प्रवास हा सर्वसमावेशक आणि सुरक्षित असायला हवा. माता आणि बालकांच्या आरोग्याचा विचार करून स्वतंत्र डब्याचा निर्णय घेतल्यास, हा लाखो महिलांसाठी मोठा दिलासा ठरेल,” असे त्यांनी स्पष्ट केले.

अवघ्या चार महिन्यांतच ​नवी मुंबई विमानतळ बनले देशातील ९ वे सर्वात व्यस्त विमानतळ

   Follow us on        

मुंबई: २५ डिसेंबर २०२५ रोजी व्यावसायिकरीत्या सुरू झाल्यापासून अवघ्या चार महिन्यांच्या आत, अदानी समूहाद्वारे संचालित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने (NMIAL) भारतीय विमान वाहतूक क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. ‘ओएजी’ (OAG) या जागतिक ट्रॅव्हल डेटा संस्थेच्या आकडेवारीनुसार, एप्रिल २०२६ मध्ये ३,९३,८१९ प्रवासी क्षमतेसह हे विमानतळ देशातील ९वे सर्वात व्यस्त देशांतर्गत विमानतळ ठरले आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील (CSMIA) वाढता ताण कमी करण्याच्या उद्देशाने या विमानतळाची निर्मिती करण्यात आली असून, अल्पावधीतच याने प्रवाशांची पसंती मिळवली आहे.

​१९,६५० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून उभारण्यात आलेला या विमानतळाचा पहिला टप्पा सध्या कार्यरत असून, त्यात एक धावपट्टी आणि एका टर्मिनलचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यात वर्षाला २ कोटी प्रवाशा हाताळण्याची याची क्षमता आहे. विस्तारीकरणाच्या योजनेनुसार, २०३२ पर्यंत हे विमानतळ पूर्ण क्षमतेने सुरू होईल, तेव्हा त्याची क्षमता वर्षाला ९ कोटी प्रवाशांपर्यंत पोहोचेल आणि तिथे एकूण चार टर्मिनल्स असतील. विमान कंपन्यांच्या वाढत्या विस्तार योजनांमुळे हे विमानतळ आगामी काळात अधिक वेगाने प्रगती करेल, अशी अपेक्षा वर्तवण्यात येत आहे.

शिरोडा – बोरिवली एसटी बस सेवा सुरू

   Follow us on        

शिरोडा: कोकणातील प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. शिरोडा बस स्थानकातून बोरिवली (मुंबई) साठी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची (MSRTC) एसटी बस सेवा पुन्हा एकदा कार्यान्वित करण्यात आली आहे. गेल्या काही काळापासून बंद असलेली ही सेवा पुन्हा सुरू झाल्यामुळे शिरोडा आणि परिसरातील चाकरमानी तसेच नियमित प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून, त्यांचा प्रवास आता अधिक सोयीस्कर आणि सुरक्षित होणार आहे.

​बसचा मार्ग आणि थांबे

​ही बस शिरोडा येथून सुटल्यानंतर विविध महत्त्वाच्या शहरांमधून प्रवास करणार आहे. या बसचा मार्ग खालीलप्रमाणे असेल:

​शिरोडा

वेंगुर्ला

कुडाळ

कणकवली

राजापूर

लांजा

संगमेश्वर

चिपळूण

महाड

पनवेल

शीव (सायन)

अधेरी

बोरिवली.

वेळापत्रक

​प्रवाशांच्या सोयीसाठी या बसचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे:

​शिरोडा स्थानक: संध्याकाळी ०४:३० वाजता सुटणार.

​वेंगुर्ला आगार: संध्याकाळी ०५:०० वाजता.

​बोरिवली स्थानक: सकाळी ०७:०० वाजता (दुसऱ्या दिवशी आगमन/प्रस्थान संदर्भात).

​प्रवाशांना या बससाठी ऑनलाइन आरक्षण (Online Booking) करण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. एसटी प्रशासनाने सर्व प्रवाशांना या बस सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. या बसमुळे मुंबई-कोकण प्रवासासाठी आता एक खात्रीशीर पर्याय उपलब्ध झाला आहे.

मराठी शिका नाहीतर आपले परवाने गमवा! रिक्षा-टॅक्सी चालकांना आता मराठी भाषेचे ज्ञान असणे बंधनकारक

   Follow us on        

मुंबई: महाराष्ट्रातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी आता मराठी भाषेचे ज्ञान असणे अनिवार्य करण्यात आले असून, येत्या १ मे पासून या नियमाची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यासंदर्भात महत्त्वाची घोषणा केली असून, ज्या चालकांना मराठी लिहिता किंवा वाचता येत नाही, त्यांचे परवाने रद्द करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

​राज्यात अनेक परवानाधारक चालकांना प्रवाशांशी मराठीत संवाद साधता येत नाही, तसेच काही चालक मुद्दाम मराठी बोलण्यास टाळाटाळ करत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात प्राप्त झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाने हा कठोर निर्णय घेतला आहे. मोटार परिवहन विभागाच्या ५९ प्रादेशिक व उपप्रादेशिक कार्यालयांमार्फत संपूर्ण राज्यात विशेष परवाना तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत चालकांच्या मराठी भाषेच्या ज्ञानाची प्रत्यक्ष पडताळणी केली जाईल.

​मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले की, वास्तव्याच्या ठिकाणची भाषा व्यवसायासाठी शिकणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगतानाच, दुसऱ्या राज्यात व्यवसाय करताना तेथील भाषेचा आदर करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. केवळ चालकांवरच नव्हे, तर नियमांकडे दुर्लक्ष करून चुकीच्या पद्धतीने परवाने देणाऱ्या परिवहन अधिकाऱ्यांवरही शासन कठोर कारवाई करणार आहे. या निर्णयामुळे आता राज्यातील सार्वजनिक वाहतूक सेवेत मराठी भाषेचा वापर वाढण्यास मदत होणार आहे.

मुंबईत धावणार विना-वातानुकूलित ‘डोअर-क्लोजिंग’ लोकल; सुरक्षितता वाढली तरी अनेक आव्हाने समोर

   Follow us on        

मुंबई: मुंबईकरांच्या प्रवासात सुरक्षितता आणण्याच्या उद्देशाने देशातील पहिली विना-वातानुकूलित (Non-AC) पण स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल ट्रेन मुंबईत दाखल झाली आहे. कुर्ला कारशेडमध्ये पोहोचलेल्या या नव्या ट्रेनमध्ये अनेक आधुनिक बदल करण्यात आले आहेत. प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन यात स्वयंचलित दरवाजे बसवण्यात आले आहेत, मात्र हेच दरवाजे उन्हाळ्यात ‘ओव्हन’सारखी परिस्थिती निर्माण करतील का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावर उपाय म्हणून रेल्वेने खिडक्यांचा आकार दुपटीने वाढवला असून, ताशी १०,००० क्युबिक मीटर हवा खेळती ठेवणारे शक्तिशाली ब्लोअर्स प्रत्येक डब्यात बसवले आहेत.

​या नव्या ट्रेनमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी लेग-रूम वाढवण्यात आला असून सामानाचा कप्पाही सध्याच्या गाड्यांपेक्षा दुप्पट मोठा करण्यात आला आहे. तांत्रिकदृष्ट्या ही ट्रेन सहा-सहा डब्यांच्या दोन युनिट्समध्ये विभागलेली असून ती ‘वेस्टिब्युल’ (एका डब्यातून दुसऱ्या डब्यात जाता येणारी) पद्धतीची आहे. मात्र, महिला, अपंग आणि प्रथम श्रेणीच्या प्रवाशांची सुरक्षितता जपण्यासाठी डब्यांमध्ये अंतर्गत विभाजने (Partitions) कायम ठेवण्यात आली आहेत. प्रवाशांना पुरेशी हवा मिळावी यासाठी बंद दरवाजांना झरोके (Louvres) देण्यात आले आहेत.

​सुविधा असल्या तरी या ट्रेनबाबत काही आव्हानेही उभी ठाकली आहेत. स्वयंचलित दरवाजे उघडण्यास आणि बंद होण्यास लागणाऱ्या वेळेमुळे लोकलच्या वेळापत्रकावर परिणाम होऊन गाड्यांना उशीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच, या गाडीच्या डब्यांची रचना सध्याच्या गाड्यांपेक्षा वेगळी असल्यामुळे प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची धावपळ होऊ शकते. प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्यापूर्वी या ट्रेनची काही महिने तांत्रिक चाचणी घेतली जाणार आहे, त्यानंतरच ही ‘हाय-टेक’ लोकल मुंबईकरांच्या सेवेत रुजू होईल.मुंबईकरांच्या प्रवासात सुरक्षितता आणण्याच्या उद्देशाने देशातील पहिली विना-वातानुकूलित (Non-AC) पण स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल ट्रेन मुंबईत दाखल झाली आहे. कुर्ला कारशेडमध्ये पोहोचलेल्या या नव्या ट्रेनमध्ये अनेक आधुनिक बदल करण्यात आले आहेत. प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन यात स्वयंचलित दरवाजे बसवण्यात आले आहेत, मात्र हेच दरवाजे उन्हाळ्यात ‘ओव्हन’सारखी परिस्थिती निर्माण करतील का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावर उपाय म्हणून रेल्वेने खिडक्यांचा आकार दुपटीने वाढवला असून, ताशी १०,००० क्युबिक मीटर हवा खेळती ठेवणारे शक्तिशाली ब्लोअर्स प्रत्येक डब्यात बसवले आहेत.

​या नव्या ट्रेनमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी लेग-रूम वाढवण्यात आला असून सामानाचा कप्पाही सध्याच्या गाड्यांपेक्षा दुप्पट मोठा करण्यात आला आहे. तांत्रिकदृष्ट्या ही ट्रेन सहा-सहा डब्यांच्या दोन युनिट्समध्ये विभागलेली असून ती ‘वेस्टिब्युल’ (एका डब्यातून दुसऱ्या डब्यात जाता येणारी) पद्धतीची आहे. मात्र, महिला, अपंग आणि प्रथम श्रेणीच्या प्रवाशांची सुरक्षितता जपण्यासाठी डब्यांमध्ये अंतर्गत विभाजने (Partitions) कायम ठेवण्यात आली आहेत. प्रवाशांना पुरेशी हवा मिळावी यासाठी बंद दरवाजांना झरोके (Louvres) देण्यात आले आहेत.

​सुविधा असल्या तरी या ट्रेनबाबत काही आव्हानेही उभी ठाकली आहेत. स्वयंचलित दरवाजे उघडण्यास आणि बंद होण्यास लागणाऱ्या वेळेमुळे लोकलच्या वेळापत्रकावर परिणाम होऊन गाड्यांना उशीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच, या गाडीच्या डब्यांची रचना सध्याच्या गाड्यांपेक्षा वेगळी असल्यामुळे प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची धावपळ होऊ शकते. प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्यापूर्वी या ट्रेनची काही महिने तांत्रिक चाचणी घेतली जाणार आहे, त्यानंतरच ही ‘हाय-टेक’ लोकल मुंबईकरांच्या सेवेत रुजू होईल.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search