Category Archives: मुंबई

विरार-डहाणू मार्गावर पहिली १५ डब्यांची ईएमयू लोकल गाडी धावण्यासाठी सज्ज

   Follow us on        

मुंबई: मुंबईच्या पश्चिम रेल्वे उपनगरीय सेवेत एक अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक बदल होणार आहे. १ मे २०२६ पासून विरार-डहाणू मार्गावर प्रथमच १५ डब्यांची (१५ कार) ईएमयू लोकल सेवा सुरू होत आहे. आतापर्यंत या मार्गावर केवळ १२ डब्यांच्या गाड्या चालवण्यात येत होत्या, मात्र वाढती गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या नवीन बदलामुळे चर्चगेट ते डहाणू यादरम्यान एकूण १७ लोकल सेवांचे रूपांतर १२ डब्यांवरून १५ डब्यांमध्ये करण्यात आले आहे. यापैकी ८ सेवा विशेषतः विरार-डहाणू विभागात चालवल्या जातील, तर उर्वरित सेवा चर्चगेट ते विरार दरम्यान धावणार आहेत.

​डब्यांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे प्रत्येक गाडीची प्रवासी क्षमता सुमारे २५ टक्क्यांनी वाढणार आहे. याचा थेट फायदा वसई, पालघर, डहाणू आणि उत्तर मुंबईतील प्रवाशांना होणार असून, गर्दीच्या वेळी होणारी प्रवाशांची ओढाताण कमी होऊन प्रवास अधिक सुखकर होण्यास मदत होईल. विरार स्थानकावरील प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण आणि नवीन प्लॅटफॉर्मच्या उभारणीचे काम पूर्ण झाल्यामुळेच या १५ डब्यांच्या गाड्या चालवणे शक्य झाले आहे. दरम्यान, या गाड्यांच्या थांब्यांबाबत महत्त्वाची माहिती देण्यात आली असून, या लोकल ग्रँट रोड, चर्नी रोड आणि मरीन लाईन्स स्थानकांवर थांबणार नाहीत, मात्र दादर स्थानकावर या गाड्या दोनदा थांबतील. रेल्वेच्या या निर्णयामुळे उपनगरीय प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

कल्याण-बदलापूर रेल्वे मार्गावर वीकेंडलाच ब्लॉक; लोकल फेऱ्या रद्द, एक्सप्रेस गाड्यांच्या मार्गात बदल

   Follow us on        

कल्याण: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागांतर्गत येणाऱ्या कल्याण ते बदलापूर स्थानकांदरम्यान ३ऱ्या आणि ४थ्या रेल्वे लाईनवरील ओव्हरहेड इक्विपमेंट (OHE) दुरुस्ती आणि पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. १ मे आणि २ मे च्या मध्यरात्री हा ब्लॉक घेण्यात येणार असून, याचा मोठा फटका उपनगरीय लोकल सेवेसह लांब पल्ल्याच्या गाड्यांना बसणार आहे.

​ब्लॉकचे सविस्तर वेळापत्रक:

​मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, हा ब्लॉक दोन टप्प्यांत घेण्यात येईल:

​ब्लॉक ‘A’ (शुक्रवार/शनिवार मध्यरात्र): दि. २ मे २०२६ रोजी पहाटे ०१:४० ते ०३:४० वाजेपर्यंत कल्याण ते अंबरनाथ दरम्यान अप आणि डाऊन दक्षिण-पूर्व मार्गावर काम चालेल.

​ब्लॉक ‘B’ (शनिवार/रविवार मध्यरात्र): दि. ३ मे २०२६ रोजी पहाटे ०१:३० ते ०३:३० वाजेपर्यंत अंबरनाथ ते बदलापूर दरम्यान डाऊन दक्षिण-पूर्व मार्गावर दुरुस्ती केली जाईल.

​लोकल प्रवाशांची गैरसोय; या असतील शेवटच्या गाड्या:

​ब्लॉकच्या कालावधीत कल्याण ते बदलापूर दरम्यान लोकल सेवा पूर्णपणे बंद राहणार आहे. प्रवाशांनी गोंधळ टाळण्यासाठी शेवटच्या आणि पहिल्या लोकलच्या वेळा लक्षात घेणे आवश्यक आहे:

​१ मे (शुक्रवार): CSMT वरून सुटणारी शेवटची बदलापूर लोकल (BL61) रात्री २३:५१ वाजता सुटेल.

​२ मे (शनिवार): CSMT वरून सुटणारी शेवटची कर्जत लोकल (S41) रात्री २३:३० वाजता सुटेल.

​ब्लॉकनंतरची पहिली गाडी: दोन्ही दिवशी कर्जतवरून पहाटे ०३:३५ वाजता सुटणारी (S4) कर्जत-CSMT लोकल ही पहिली गाडी असेल.

​एक्सप्रेस गाड्यांच्या मार्गात बदल:

​ब्लॉकमुळे खालील तीन महत्त्वाच्या एक्सप्रेस गाड्या कर्जत-पनवेल मार्गे वळवण्यात आल्या आहेत:

१. ११०२० भुवनेश्वर – CSMT कोणार्क एक्सप्रेस

२. १८५१९ विशाखापट्टणम – LTT एक्सप्रेस

३. १२७०२ हैदराबाद – CSMT हुसेनसागर एक्सप्रेस

​विशेष सोय: ज्या गाड्यांचा कल्याण स्थानकावर थांबा होता, त्या आता प्रवाशांच्या सोयीसाठी ठाणे आणि पनवेल स्थानकांवर थांबतील.

​रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना होणाऱ्या या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली असून, प्रवाशांनी बदललेले वेळापत्रक तपासूनच बाहेर पडण्याचे आवाहन केले आहे.

सीएसएमटी-खोपोली लोकलमध्ये रेल्वे प्रवाशावर चाकू हल्ला करणारा चोरटा जेरबंद

   Follow us on        

अंबरनाथ: मुंबई-खोपोली लोकल ट्रेनमध्ये एका प्रवाशावर चाकूने हल्ला करणाऱ्या चोरट्याला रेल्वे पोलिसांनी अवघ्या दोन दिवसांत बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना २३ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास घडली होती. जेव्हा ट्रेन विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकात आली, तेव्हा एका चोरट्याने सामानाच्या डब्यात चढून नितीशकुमार नावाच्या व्यावसायिकाचा मोबाईल चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र, चोरीचा हा प्रयत्न अश्लील ठरल्याने संतप्त झालेल्या चोरट्याने नितीशकुमार यांच्यावर चाकूने हल्ला केला आणि झटापटीनंतर उल्हासनगर स्थानकात उतरून पळ काढला.

​या घटनेची तक्रार प्राप्त होताच आरपीएफ उपनिरीक्षक सोनाली नंदेश्वर यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. रेल्वे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि जीआरपीच्या मदतीने तांत्रिक तपास करून अवघ्या दोन दिवसांत आरोपीला उल्हासनगर रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेतले. जोगिंदर अवतार सिंग लबाना (वय ३०) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. जखमी प्रवाशाला रेल्वे पोलिसांनी तत्काळ प्राथमिक उपचार देऊन त्यांची रीतसर तक्रार नोंदवून घेतली होती. पोलिसांनी केलेल्या या जलद कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मुंबईत एकाच कुटुंबातील चौघांचा संशयास्पद मृत्यू; बिर्याणीनंतर खाल्लेले कलिंगड ठरले जीवघेणे?

   Follow us on        

मुंबई: दक्षिण मुंबईतील पायधुनी परिसरात एकाच कुटुंबातील चार सदस्यांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. संशयित अन्न विषबाधेमुळे (फूड पॉयझनिंग) ही हृदयद्रावक घटना घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. अब्दुल्ला डोकाडिया (४०), त्यांची पत्नी नसरीन डोकाडिया (३५) आणि त्यांच्या दोन मुली आयशा (१६) व जैनब (१३) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

​मिळालेल्या माहितीनुसार, २५ एप्रिल रोजी रात्री डोकाडिया कुटुंबाने रात्रीच्या जेवणात बिर्याणी खाल्ली होती. त्यानंतर एका नातेवाईकाने आणलेले तरबूजही त्यांनी खाल्ले. जेवणानंतर काही वेळातच कुटुंबातील या चौघांनाही उलट्या आणि जुलाबाचा त्रास होऊ लागला. विशेष म्हणजे, ज्या सदस्यांनी फक्त बिर्याणी खाल्ली होती, त्यांना कोणताही त्रास झाला नाही. मात्र, ज्यांनी बिर्याणी आणि त्यानंतर तरबूज खाल्ले होते, त्यांची प्रकृती बिघडली. यामुळे पोलिसांचा संशय आता तरबूजावर अधिक बळावला आहे.

​प्रकृती खालावल्याने या चौघांनाही तातडीने जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असताना २६ एप्रिल रोजी दुर्दैवाने या चौघांचाही मृत्यू झाला. या प्रकरणी जे. जे. मार्ग पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. “अन्न विषबाधा नेमकी कशामुळे झाली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले असून, फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल,” अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. एकाच घरातील हसत्याखेळत्या कुटुंबाचा असा अंत झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

३५ संघटना आणि २ आजी-माजी खासदारांच्या उपस्थितीत दादरमध्ये ‘महाराष्ट्र रेल्वे परिषद’ मोठ्या उत्साहात संपन्न

   Follow us on        

मुंबई: महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी आणि राज्यातील रेल्वेच्या विकासाला गती देण्यासाठी दादर येथील मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयात ‘महाराष्ट्र रेल्वे परिषद’ नुकतीच मोठ्या उत्साहात संपन्न झाली. ‘गतिमान महाराष्ट्र, समृद्ध कोकण’ हे महत्त्वपूर्ण ब्रीदवाक्य घेऊन आयोजित करण्यात आलेल्या या परिषदेत राज्यातील रेल्वे अभ्यासक, प्रवासी संघटनांचे प्रतिनिधी आणि मान्यवरांनी एकत्र येत प्रवाशांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर मंथन केले.

परिषदेतील प्रमुख घडामोडी आणि चर्चा:

चतुःसूत्रीवर आधारित थेट संवाद 

संपर्क, सुसंवाद, सतर्कता आणि समस्या निवारण या सूत्रांवर आधारित या परिषदेत प्रामुख्याने मुंबई-कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आदी भागातील रेल्वे प्रवासातील तांत्रिक अडचणी, गाड्यांची संख्या वाढवणे आणि पायाभूत सुविधांच्या विकासावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

 एकजुटीचा निर्धार

रेल्वे प्रवाशांना येणाऱ्या दैनंदिन अडचणींचे निवारण करण्यासाठी सर्व प्रवासी संघटनांनी एकत्र येऊन लढा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्धार यावेळी करण्यात आला.

परिषदेत प्रशासनासमोर मांडण्यात आलेल्या प्रमुख मागण्या:

बंद गाड्या तातडीने पूर्ववत करणे:

कोरोना काळात बंद करण्यात आलेल्या रत्नागिरी-दादर पॅसेंजर, कोल्हापूर-मुंबई सह्याद्री एक्सप्रेस, भुसावळ-मुंबई पॅसेंजर, मुंबई-विजापूर पॅसेंजर, पुणे-पनवेल पॅसेंजर यांसह इतर ३० गाड्या त्वरित पूर्ववत कराव्यात. नांदेड व हरंगुळ (लातूर) एक्सप्रेस पुणे स्थानकापर्यंत वाढवणे, आदी.

प्रलंबित प्रकल्प पूर्ण करणे:

कोकणासाठी प्रस्तावित सावंतवाडी येथील स्वतंत्र टर्मिनस सुविधा गेली १० वर्षे रखडले, ते प्राधान्याने मार्गी लावावे.

तातडीने कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करणे तसेच संपूर्ण कोकण रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण करणे.

नव्या मार्गांना प्राधान्य:

सावंतवाडी-बेळगाव, छत्रपती संभाजीनगर-बीड-धाराशिव, मानवत रोड – परळी आणि जालना-जळगाव यांसारख्या रेल्वे मार्गांची कामे प्राधान्याने पूर्ण करावीत.

प्रवासी सुरक्षा आणि सुविधा:

प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि सुलभ प्रवासासाठी विशेष उपाययोजना राबवण्यात याव्यात.

तांत्रिक मागण्यांचा पाठपुरावा 

रेल्वे प्रशासनाकडे प्रलंबित असलेल्या तांत्रिक मागण्यांचा त्वरित पाठपुरावा करून त्या मार्गी लावाव्यात.

मान्यवरांची उपस्थिती आणि फलश्रुती

या परिषदेसाठी राज्याच्या विविध भागांतून रेल्वे प्रेमी आणि अभ्यासक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दादर येथील सभागृहात पार पडलेल्या या बैठकीत रेल्वेच्या भविष्यातील वाटचालीवर अनेक महत्त्वपूर्ण ठराव एकमताने मंजूर करण्यात आले.

या परिषदेमुळे रेल्वे प्रवाशांच्या प्रश्नांना आता एक प्रबळ व्यासपीठ मिळाले असून, आगामी काळात रेल्वे प्रशासनाकडून या रास्त मागण्यांवर सकारात्मक निर्णयांची अपेक्षा सर्वच स्तरांतून व्यक्त केली जात आहे.

सदर परिषदेला माजी खासदार विनायक राऊत व खासदार अरविंद सावंत यांची विशेष उपस्थिती लाभली. दोघांनीही वरील सर्व मागण्यांना पाठिंबा दर्शवला असून रेल्वे मंत्री व मुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करण्याचे मान्य केले आहे. तसेच. श्री. अरविंद सावंत यांनी दादर रत्नागिरी, मुंबई सावंतवाडी, मुंबई पंढरपूर, नांदेड पुणे या गाड्यांसाठी मध्य रेल्वेला १० दिवसांची मुदत दिली असून ३ मे नंतर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिल्याचा पुनरुच्चार केला.

सदर परिषदेला कोंकण विकास समिती, कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी, अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती महाराष्ट्र, कोल्हापूर जिल्हा रहिवासी सामाजिक प्रवासी संघ, मराठा ऑर्गनायझेशन, कोकण कृती समूह, जल फाउंडेशन, मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघ, गणेशभक्त कोकणवासीय प्रवासी संघ मुंबई, रेल्वे प्रवासी सामाजिक संस्था कल्याण सावंतवाडी, वैभववाडी तालुका विकास मंच, रेल्वे प्रवासी संघटना बदलापूर, गडगडी धरण कृती समिती, मुंबई गोवा महामार्ग जन आक्रोश समिती, रत्नागिरी सुवर्णदुर्ग विकास परिषद, राजापूर तालुका शेतकरी, मराठवाडा रेल्वे संघर्ष समिती परभणी, रेल्वे प्रवासी मित्रमंडळ बदलापूर, सिंधुदुर्ग रहिवाशी हितवर्धक संघ पनवेल, आधार इंडिया, मराठी अभ्यास केंद्र, निसर्गरम्य चिपळूण संगमेश्वर, महाराष्ट्र राज्य प्रवासी प्रकोष्ठ, रेल्वे विकास समिती, गौरी गणपती उत्सव ठाणे, सिंधुदुर्ग मराठा विकास मंडळ ठाणे, नाना शंकरशेठ संघर्ष समिती, रेल्वे प्रवासी सेल बार्शी, कोल्हापूर जिल्हा प्रवासी संघ, शहीद अशोक कामटे बहुद्देशीय संस्था सांगोला, हिंद मजदूर किसान पंचायत, सिंधुदुर्ग जिल्हा सेवा समिती, कोकण रेल्वे प्रवासी संघटना वैभववाडी, कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ ठाणे, पश्चिम महाराष्ट्र रेल्वे, श्री समर्थ शक्ती प्रतिष्ठान या संघटनांचे पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.

मुंबई-पुणे महामार्गावरील ‘द मिसिंग लिंक’ वर ‘भार क्षमता चाचणी’ सुरू; १ मे रोजी उद्घाटनाचा मुहूर्त?

   Follow us on        

मुंबई: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील प्रवाशांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या १३.३ किलोमीटर लांबीच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून, सध्या या मार्गावरील पुलांच्या मजबुतीसाठी ‘लोड टेस्टिंग’ची प्रक्रिया सुरू आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (MSRDC) देखरेखीखाली सुरू असलेल्या या प्रकल्पाचे ९९ टक्के काम पूर्ण झाले असून, केवळ अंतिम डांबरीकरण आणि सुरक्षा तपासणीचे काम शिल्लक आहे. हे काम ३० एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, १ मे २०२६ रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या मार्गाचे लोकार्पण होण्याची दाट शक्यता आहे.

​या प्रकल्पामुळे मुंबई आणि पुणे दरम्यानचे अंतर सुमारे ६ किलोमीटरने कमी होणार असून, प्रवाशांचा किमान ३० मिनिटांचा वेळ वाचणार आहे. या मार्गात दोन भव्य केबल-स्टे ब्रिज आणि दोन मोठ्या बोगद्यांचा समावेश आहे. लोणावळ्याजवळील भोर घाटातील वळणदार आणि धोकादायक प्रवासाला हा मार्ग एक सक्षम पर्याय ठरेल. सध्या सुरू असलेल्या लोड टेस्टिंगमध्ये अनेक अवजड ट्रक पुलावरून एकत्रितपणे नेऊन रस्त्याची स्थिरता आणि भार सहन करण्याची क्षमता तपासली जात आहे. तांत्रिक सुरक्षा सुनिश्चित केल्यानंतरच हा मार्ग वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे.

​प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार, उद्घाटन झाल्यानंतर सुरुवातीच्या सहा महिन्यांच्या कालावधीत या नवीन मार्गावरून केवळ कार, एसयूव्ही आणि बस यांसारख्या वाहनांनाच प्रवेश दिला जाईल. जड आणि अवजड वाहनांना सुरक्षिततेच्या कारणास्तव जुन्या घाट रस्त्यावरूनच प्रवास करावा लागणार आहे. या प्रकल्पाच्या पूर्णत्वामुळे पावसाळ्यात घाटात होणारी वाहतूक कोंडी आणि दरडी कोसळण्याच्या धोक्यापासून प्रवाशांची कायमची सुटका होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. मुंबई-पुणे प्रवासाचा हा ‘स्मार्ट बायपास’ राज्याच्या दळणवळण क्षेत्रात मैलाचा दगड ठरणार आहे.

५९ मिनिटांत मुंबई! मेट्रो मार्ग ५ आणि मार्ग ५-अ प्रकल्पाला अधिकृतरीत्या मंजुरी

   Follow us on        

मुंबई: ठाणे, भिवंडी आणि कल्याण या पट्ट्यातील प्रवाशांचा प्रवास सुखकर करण्यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारने मुंबई मेट्रो मार्ग ५ (टप्पा १ आणि २) आणि मार्ग ५-अ ला अधिकृत मंजुरी दिली आहे. सुमारे ३४.२ किमी लांबीचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प १८,१३१ कोटी रुपये खर्चून उभारला जाणार असून, यामुळे ठाणे, भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगर ही शहरे मेट्रो जाळ्याने जोडली जाणार आहेत.

​उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘मुंबई ५९ मिनिटांत’ या संकल्पनेला बळकटी देण्यासाठी हा प्रकल्प आखण्यात आला आहे. मुंबई महानगर प्रदेशातील (MMR) वाहतूक कोंडी फोडणे आणि उपनगरातील प्रवाशांचा प्रवास वेगवान करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. मेट्रो मार्ग ५ मध्ये एकूण १९ स्थानकांचा समावेश असून, संपूर्ण मार्ग ३८ किमीपेक्षा जास्त विस्तारित असेल. यामुळे ठाणे-कल्याण पट्ट्यातील लाखो नोकरदार आणि रहिवाशांना मोठा दिलासा मिळणार असून, त्यांचा दैनंदिन प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होणार आहे.

​प्रकल्पाच्या नियोजित आराखड्यानुसार, विविध टप्प्यांमध्ये याचे काम पूर्ण केले जाईल. यासाठी लागणारा निधी आणि तांत्रिक बाबींना सरकारने हिरवा कंदील दिला असून, या प्रकल्पामुळे परिसरातील पायाभूत सुविधांचा विकास होऊन आर्थिक हालचालींनाही वेग मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. वाढत्या शहरीकरणामुळे या भागातील रस्त्यांवर येणारा ताण कमी करण्यासाठी ही मेट्रो सेवा अत्यंत कळीची ठरणार आहे.

राज्यांतर्गत गाड्या बंद करून मध्य रेल्वेचा राज्याबाहेर जाणार्‍या गाड्यांना नियमित करण्याचा सपाटा

   Follow us on        

मुंबई: मध्य रेल्वेने उत्तर भारतातील विशेष रेल्वे गाड्या नियमित करण्याचा सपाटा लावला असून, याच मालिकेत आता ‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते रिवा’ या साप्ताहिक एक्स्प्रेसचा समावेश झाला आहे. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक २०१५३/२०१५४ रिवा-सीएसएमटी-रिवा ही गाडी आता नियमित स्वरूपात धावणार आहे. ही गाडी दर गुरुवारी रिवा येथून दुपारी १५:५० वाजता सुटेल, तर दर शुक्रवारी सीएसएमटी येथून दुपारी १३:३० वाजता सुटेल. या निर्णयामुळे उत्तर भारतीयांना दिलासा मिळाला असला तरी, महाराष्ट्रातील प्रवाशांमध्ये मात्र तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

मध्य रेल्वेच्या दुटप्पी धोरणामुळे महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. उपनगरीय लोकल गाड्यांच्या वाहतुकीत अडथळा नको, असे तांत्रिक कारण पुढे करून दादर-रत्नागिरी सारख्या महत्त्वाच्या राज्यातील गाड्या बंद पाडणाऱ्या रेल्वे प्रशासनाने, आता परराज्यात जाणाऱ्या गाड्यांना मात्र मुंबईतील मुख्य टर्मिनसवरून सोडण्याचा सपाटा लावला आहे. यावरून मध्य रेल्वेचा महाराष्ट्रातील प्रवाशांप्रती असलेला दुजाभाव स्पष्टपणे समोर येत आहे.

​काही काळापूर्वी दादर-रत्नागिरी पॅसेंजरसारख्या गाड्या केवळ मुंबई उपनगरीय लोकल गाड्यांना अडथळा हे कारण देऊन बंद करण्यात आल्या. मात्र, दुसरीकडे दादर-गोरखपूर, मुंबई-बेंगळुरू वंदे भारत आणि आता नव्याने नियमित करण्यात आलेली ‘रिवा एक्स्प्रेस’ यांसारख्या लांब पल्ल्याच्या गाड्यांना दादर आणि सीएसएमटीसारख्या गजबजलेल्या स्थानकांवरून हिरवा कंदील दाखवला जात आहे. “राज्यातील प्रवाशांना वाऱ्यावर सोडून परराज्यातील गाड्यांना झुकते माप देणे हे नेमके कोणते रेल्वे प्रशासन?” असा संतप्त सवाल आता प्रवासी संघटना विचारत आहेत.

रेल्वे मंत्र्यांच्या आदेशालाही केराची टोपली?

विशेष म्हणजे, दादर-रत्नागिरी गाडी पुन्हा दादरपर्यंत सुरू करण्याच्या व्यवहार्यतेची (Feasibility) तपासणी करण्याचे आदेश खुद्द केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी दिले होते. परंतु, अनेक दिवस उलटूनही मध्य रेल्वेने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती किंवा निर्णय जाहीर केलेला नाही. रेल्वे मंत्र्यांच्या सूचनेनंतरही टाळाटाळ करणाऱ्या प्रशासनाचा हा ‘मुजोरपणा’ असल्याचे बोलले जात आहे.

​कोकण आणि राज्यातील इतर भागांतील प्रवाशांची मोठी गैरसोय होत असताना, रेल्वेचे अधिकारी मात्र सोयीस्करपणे तांत्रिक अडचणींचे कारण पुढे करत आहेत. एका बाजूला राज्यातील रेल्वेगाड्यांच्या वेळेचा बोजवारा उडाला असताना, दुसऱ्या राज्यांसाठी मुंबईची मुख्य स्थानके रिकामी कशी होतात, असा सवाल उपस्थित करत आता रेल्वे प्रवासी आक्रमक झाले आहेत. या मुजोर प्रशासनाविरोधात आता दादर येथे होणाऱ्या रेल्वे परिषदेत मोठे आंदोलन पुकारण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दादर-रत्नागिरी गाडी पूर्ववत करण्यासाठी शिवसेनेचा मध्य रेल्वेला १० दिवसांचा ‘अल्टीमेटम’

   Follow us on        

मुंबई:कोविड काळात बंद करण्यात आलेली दादर-रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन येत्या दहा दिवसांत पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. जर रेल्वे प्रशासनाने यावर तातडीने निर्णय घेतला नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा निर्वाणीचा इशारा शिवसेना नेते आणि खासदार अरविंद सावंत यांनी दिला आहे. मंगळवारी त्यांनी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राजीव श्रीवास्तव यांची भेट घेऊन या संदर्भात सविस्तर चर्चा केली. यावेळी मध्य रेल्वेने कोकणच्या प्रवाशांच्या संयमाचा अंत पाहू नये, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

​राज्यांतर्गत रेल्वे गाड्यांकडे लक्ष देण्याची मागणी:

या भेटीदरम्यान खासदार सावंत यांनी केवळ कोकणच नव्हे, तर राज्यातील इतरही बंद असलेल्या गाड्यांचा प्रश्न मांडला. त्यांनी सांगितले की, मुंबई-सावंतवाडी ट्रेन आठवड्यातून फक्त एकदाच चालवली जाते, ती दररोज सुरू करणे आवश्यक आहे तसेच, मराठवाड्यातून सुटणारी नांदेड-पुणे गाडी पुण्याऐवजी हडपसरला थांबवली जाते, ज्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होते. ही गाडी हडपसर ऐवजी थेट पुणे स्टेशनपर्यंत सुरू करावी, अशी आग्रही मागणी त्यांनी यावेळी केली.

​रेल्वेच्या ‘मराठीद्वेषा’वर संताप:

खासदार सावंत यांनी रेल्वे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढत ‘मराठीद्वेष’ थांबवण्याचे आवाहन केले. ‘डेक्कन क्वीन’च्या वाढदिवसाच्या वेळी केवळ हिंदी आणि इंग्रजी भाषेचा वापर करणे आणि ‘रेल वन ॲप’मध्ये मराठी भाषेचा समावेश न करणे, याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. याशिवाय रेल्वेच्या जमिनीवरील झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन आणि शिवडीतील एंड-टू-एंड पुलाचे रखडलेले काम या प्रश्नांकडेही त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. या बैठकीला रेल्वेचे अधिकारी आणि भारतीय कामगार सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

एकाच ट्रॅकवर समोरासमोर आल्या दोन लोकल; मुंबईत मोठा अपघात थोडक्यात टळला

   Follow us on        

मुंबई: मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या रेल्वेच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी एक धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे घडली. तांत्रिक चुकीमुळे एकाच ट्रॅकवर दोन लोकल गाड्या समोरासमोर आल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र, मोटरमनच्या सतर्कतेमुळे सुमारे १३० मीटर अंतरावर गाडी थांबली आणि मोठा अनर्थ टळला.

​मिळालेल्या माहितीनुसार, बदलापूरकडून सीएसएमटीच्या दिशेने येणारी लोकल प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर येणे अपेक्षित होते. मात्र, सिग्नलिंग यंत्रणेतील त्रुटी किंवा मानवी चुकीमुळे ही गाडी चुकीच्या पद्धतीने प्लॅटफॉर्म क्रमांक ५ वर वळवण्यात आली. विशेष म्हणजे, याच प्लॅटफॉर्मवर आधीच दुसरी एक लोकल उभी होती. जेव्हा बदलापूर लोकल प्लॅटफॉर्म ५ च्या ट्रॅकवर शिरली, तेव्हा मोटरमनच्या लक्षात आले की होम सिग्नल लाल आहे आणि समोर दुसरी गाडी उभी आहे. त्याने त्वरित आपत्कालीन ब्रेक लावून गाडी थांबवली, ज्यामुळे दोन्ही गाड्यांमध्ये सुरक्षित अंतर राहिले.

​या घटनेनंतर रेल्वे प्रशासनात एकच खळबळ उडाली. खबरदारीचा उपाय म्हणून प्लॅटफॉर्म ५ ते ८ पर्यंतची वाहतूक तात्काळ थांबवण्यात आली आणि दोन्ही गाड्या सुरक्षितरीत्या मागे घेण्यात आल्या. या गोंधळामुळे मध्य रेल्वेची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती, परंतु सध्या सेवा पूर्ववत करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, सीएसएमटी परिसरातच एक दिवसापूर्वी डिरेलमेंटची (रुळावरून डबा उतरणे) घटना घडली होती, त्यापाठोपाठ हा प्रकार घडल्याने रेल्वेच्या सिग्नलिंग यंत्रणेवर टीका होत आहे. रेल्वे प्रशासनाने या ‘रॉग रुटिंग’ प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून या घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.

 

View this post on Instagram

 

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search