Category Archives: मुंबई

३५ संघटना आणि २ आजी-माजी खासदारांच्या उपस्थितीत दादरमध्ये ‘महाराष्ट्र रेल्वे परिषद’ मोठ्या उत्साहात संपन्न

   Follow us on        

मुंबई: महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी आणि राज्यातील रेल्वेच्या विकासाला गती देण्यासाठी दादर येथील मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयात ‘महाराष्ट्र रेल्वे परिषद’ नुकतीच मोठ्या उत्साहात संपन्न झाली. ‘गतिमान महाराष्ट्र, समृद्ध कोकण’ हे महत्त्वपूर्ण ब्रीदवाक्य घेऊन आयोजित करण्यात आलेल्या या परिषदेत राज्यातील रेल्वे अभ्यासक, प्रवासी संघटनांचे प्रतिनिधी आणि मान्यवरांनी एकत्र येत प्रवाशांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर मंथन केले.

परिषदेतील प्रमुख घडामोडी आणि चर्चा:

चतुःसूत्रीवर आधारित थेट संवाद 

संपर्क, सुसंवाद, सतर्कता आणि समस्या निवारण या सूत्रांवर आधारित या परिषदेत प्रामुख्याने मुंबई-कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आदी भागातील रेल्वे प्रवासातील तांत्रिक अडचणी, गाड्यांची संख्या वाढवणे आणि पायाभूत सुविधांच्या विकासावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

 एकजुटीचा निर्धार

रेल्वे प्रवाशांना येणाऱ्या दैनंदिन अडचणींचे निवारण करण्यासाठी सर्व प्रवासी संघटनांनी एकत्र येऊन लढा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्धार यावेळी करण्यात आला.

परिषदेत प्रशासनासमोर मांडण्यात आलेल्या प्रमुख मागण्या:

बंद गाड्या तातडीने पूर्ववत करणे:

कोरोना काळात बंद करण्यात आलेल्या रत्नागिरी-दादर पॅसेंजर, कोल्हापूर-मुंबई सह्याद्री एक्सप्रेस, भुसावळ-मुंबई पॅसेंजर, मुंबई-विजापूर पॅसेंजर, पुणे-पनवेल पॅसेंजर यांसह इतर ३० गाड्या त्वरित पूर्ववत कराव्यात. नांदेड व हरंगुळ (लातूर) एक्सप्रेस पुणे स्थानकापर्यंत वाढवणे, आदी.

प्रलंबित प्रकल्प पूर्ण करणे:

कोकणासाठी प्रस्तावित सावंतवाडी येथील स्वतंत्र टर्मिनस सुविधा गेली १० वर्षे रखडले, ते प्राधान्याने मार्गी लावावे.

तातडीने कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करणे तसेच संपूर्ण कोकण रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण करणे.

नव्या मार्गांना प्राधान्य:

सावंतवाडी-बेळगाव, छत्रपती संभाजीनगर-बीड-धाराशिव, मानवत रोड – परळी आणि जालना-जळगाव यांसारख्या रेल्वे मार्गांची कामे प्राधान्याने पूर्ण करावीत.

प्रवासी सुरक्षा आणि सुविधा:

प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि सुलभ प्रवासासाठी विशेष उपाययोजना राबवण्यात याव्यात.

तांत्रिक मागण्यांचा पाठपुरावा 

रेल्वे प्रशासनाकडे प्रलंबित असलेल्या तांत्रिक मागण्यांचा त्वरित पाठपुरावा करून त्या मार्गी लावाव्यात.

मान्यवरांची उपस्थिती आणि फलश्रुती

या परिषदेसाठी राज्याच्या विविध भागांतून रेल्वे प्रेमी आणि अभ्यासक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दादर येथील सभागृहात पार पडलेल्या या बैठकीत रेल्वेच्या भविष्यातील वाटचालीवर अनेक महत्त्वपूर्ण ठराव एकमताने मंजूर करण्यात आले.

या परिषदेमुळे रेल्वे प्रवाशांच्या प्रश्नांना आता एक प्रबळ व्यासपीठ मिळाले असून, आगामी काळात रेल्वे प्रशासनाकडून या रास्त मागण्यांवर सकारात्मक निर्णयांची अपेक्षा सर्वच स्तरांतून व्यक्त केली जात आहे.

सदर परिषदेला माजी खासदार विनायक राऊत व खासदार अरविंद सावंत यांची विशेष उपस्थिती लाभली. दोघांनीही वरील सर्व मागण्यांना पाठिंबा दर्शवला असून रेल्वे मंत्री व मुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करण्याचे मान्य केले आहे. तसेच. श्री. अरविंद सावंत यांनी दादर रत्नागिरी, मुंबई सावंतवाडी, मुंबई पंढरपूर, नांदेड पुणे या गाड्यांसाठी मध्य रेल्वेला १० दिवसांची मुदत दिली असून ३ मे नंतर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिल्याचा पुनरुच्चार केला.

सदर परिषदेला कोंकण विकास समिती, कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी, अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती महाराष्ट्र, कोल्हापूर जिल्हा रहिवासी सामाजिक प्रवासी संघ, मराठा ऑर्गनायझेशन, कोकण कृती समूह, जल फाउंडेशन, मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघ, गणेशभक्त कोकणवासीय प्रवासी संघ मुंबई, रेल्वे प्रवासी सामाजिक संस्था कल्याण सावंतवाडी, वैभववाडी तालुका विकास मंच, रेल्वे प्रवासी संघटना बदलापूर, गडगडी धरण कृती समिती, मुंबई गोवा महामार्ग जन आक्रोश समिती, रत्नागिरी सुवर्णदुर्ग विकास परिषद, राजापूर तालुका शेतकरी, मराठवाडा रेल्वे संघर्ष समिती परभणी, रेल्वे प्रवासी मित्रमंडळ बदलापूर, सिंधुदुर्ग रहिवाशी हितवर्धक संघ पनवेल, आधार इंडिया, मराठी अभ्यास केंद्र, निसर्गरम्य चिपळूण संगमेश्वर, महाराष्ट्र राज्य प्रवासी प्रकोष्ठ, रेल्वे विकास समिती, गौरी गणपती उत्सव ठाणे, सिंधुदुर्ग मराठा विकास मंडळ ठाणे, नाना शंकरशेठ संघर्ष समिती, रेल्वे प्रवासी सेल बार्शी, कोल्हापूर जिल्हा प्रवासी संघ, शहीद अशोक कामटे बहुद्देशीय संस्था सांगोला, हिंद मजदूर किसान पंचायत, सिंधुदुर्ग जिल्हा सेवा समिती, कोकण रेल्वे प्रवासी संघटना वैभववाडी, कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ ठाणे, पश्चिम महाराष्ट्र रेल्वे, श्री समर्थ शक्ती प्रतिष्ठान या संघटनांचे पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.

मुंबई-पुणे महामार्गावरील ‘द मिसिंग लिंक’ वर ‘भार क्षमता चाचणी’ सुरू; १ मे रोजी उद्घाटनाचा मुहूर्त?

   Follow us on        

मुंबई: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील प्रवाशांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या १३.३ किलोमीटर लांबीच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून, सध्या या मार्गावरील पुलांच्या मजबुतीसाठी ‘लोड टेस्टिंग’ची प्रक्रिया सुरू आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (MSRDC) देखरेखीखाली सुरू असलेल्या या प्रकल्पाचे ९९ टक्के काम पूर्ण झाले असून, केवळ अंतिम डांबरीकरण आणि सुरक्षा तपासणीचे काम शिल्लक आहे. हे काम ३० एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, १ मे २०२६ रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या मार्गाचे लोकार्पण होण्याची दाट शक्यता आहे.

​या प्रकल्पामुळे मुंबई आणि पुणे दरम्यानचे अंतर सुमारे ६ किलोमीटरने कमी होणार असून, प्रवाशांचा किमान ३० मिनिटांचा वेळ वाचणार आहे. या मार्गात दोन भव्य केबल-स्टे ब्रिज आणि दोन मोठ्या बोगद्यांचा समावेश आहे. लोणावळ्याजवळील भोर घाटातील वळणदार आणि धोकादायक प्रवासाला हा मार्ग एक सक्षम पर्याय ठरेल. सध्या सुरू असलेल्या लोड टेस्टिंगमध्ये अनेक अवजड ट्रक पुलावरून एकत्रितपणे नेऊन रस्त्याची स्थिरता आणि भार सहन करण्याची क्षमता तपासली जात आहे. तांत्रिक सुरक्षा सुनिश्चित केल्यानंतरच हा मार्ग वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे.

​प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार, उद्घाटन झाल्यानंतर सुरुवातीच्या सहा महिन्यांच्या कालावधीत या नवीन मार्गावरून केवळ कार, एसयूव्ही आणि बस यांसारख्या वाहनांनाच प्रवेश दिला जाईल. जड आणि अवजड वाहनांना सुरक्षिततेच्या कारणास्तव जुन्या घाट रस्त्यावरूनच प्रवास करावा लागणार आहे. या प्रकल्पाच्या पूर्णत्वामुळे पावसाळ्यात घाटात होणारी वाहतूक कोंडी आणि दरडी कोसळण्याच्या धोक्यापासून प्रवाशांची कायमची सुटका होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. मुंबई-पुणे प्रवासाचा हा ‘स्मार्ट बायपास’ राज्याच्या दळणवळण क्षेत्रात मैलाचा दगड ठरणार आहे.

५९ मिनिटांत मुंबई! मेट्रो मार्ग ५ आणि मार्ग ५-अ प्रकल्पाला अधिकृतरीत्या मंजुरी

   Follow us on        

मुंबई: ठाणे, भिवंडी आणि कल्याण या पट्ट्यातील प्रवाशांचा प्रवास सुखकर करण्यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारने मुंबई मेट्रो मार्ग ५ (टप्पा १ आणि २) आणि मार्ग ५-अ ला अधिकृत मंजुरी दिली आहे. सुमारे ३४.२ किमी लांबीचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प १८,१३१ कोटी रुपये खर्चून उभारला जाणार असून, यामुळे ठाणे, भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगर ही शहरे मेट्रो जाळ्याने जोडली जाणार आहेत.

​उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘मुंबई ५९ मिनिटांत’ या संकल्पनेला बळकटी देण्यासाठी हा प्रकल्प आखण्यात आला आहे. मुंबई महानगर प्रदेशातील (MMR) वाहतूक कोंडी फोडणे आणि उपनगरातील प्रवाशांचा प्रवास वेगवान करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. मेट्रो मार्ग ५ मध्ये एकूण १९ स्थानकांचा समावेश असून, संपूर्ण मार्ग ३८ किमीपेक्षा जास्त विस्तारित असेल. यामुळे ठाणे-कल्याण पट्ट्यातील लाखो नोकरदार आणि रहिवाशांना मोठा दिलासा मिळणार असून, त्यांचा दैनंदिन प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होणार आहे.

​प्रकल्पाच्या नियोजित आराखड्यानुसार, विविध टप्प्यांमध्ये याचे काम पूर्ण केले जाईल. यासाठी लागणारा निधी आणि तांत्रिक बाबींना सरकारने हिरवा कंदील दिला असून, या प्रकल्पामुळे परिसरातील पायाभूत सुविधांचा विकास होऊन आर्थिक हालचालींनाही वेग मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. वाढत्या शहरीकरणामुळे या भागातील रस्त्यांवर येणारा ताण कमी करण्यासाठी ही मेट्रो सेवा अत्यंत कळीची ठरणार आहे.

राज्यांतर्गत गाड्या बंद करून मध्य रेल्वेचा राज्याबाहेर जाणार्‍या गाड्यांना नियमित करण्याचा सपाटा

   Follow us on        

मुंबई: मध्य रेल्वेने उत्तर भारतातील विशेष रेल्वे गाड्या नियमित करण्याचा सपाटा लावला असून, याच मालिकेत आता ‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते रिवा’ या साप्ताहिक एक्स्प्रेसचा समावेश झाला आहे. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक २०१५३/२०१५४ रिवा-सीएसएमटी-रिवा ही गाडी आता नियमित स्वरूपात धावणार आहे. ही गाडी दर गुरुवारी रिवा येथून दुपारी १५:५० वाजता सुटेल, तर दर शुक्रवारी सीएसएमटी येथून दुपारी १३:३० वाजता सुटेल. या निर्णयामुळे उत्तर भारतीयांना दिलासा मिळाला असला तरी, महाराष्ट्रातील प्रवाशांमध्ये मात्र तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

मध्य रेल्वेच्या दुटप्पी धोरणामुळे महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. उपनगरीय लोकल गाड्यांच्या वाहतुकीत अडथळा नको, असे तांत्रिक कारण पुढे करून दादर-रत्नागिरी सारख्या महत्त्वाच्या राज्यातील गाड्या बंद पाडणाऱ्या रेल्वे प्रशासनाने, आता परराज्यात जाणाऱ्या गाड्यांना मात्र मुंबईतील मुख्य टर्मिनसवरून सोडण्याचा सपाटा लावला आहे. यावरून मध्य रेल्वेचा महाराष्ट्रातील प्रवाशांप्रती असलेला दुजाभाव स्पष्टपणे समोर येत आहे.

​काही काळापूर्वी दादर-रत्नागिरी पॅसेंजरसारख्या गाड्या केवळ मुंबई उपनगरीय लोकल गाड्यांना अडथळा हे कारण देऊन बंद करण्यात आल्या. मात्र, दुसरीकडे दादर-गोरखपूर, मुंबई-बेंगळुरू वंदे भारत आणि आता नव्याने नियमित करण्यात आलेली ‘रिवा एक्स्प्रेस’ यांसारख्या लांब पल्ल्याच्या गाड्यांना दादर आणि सीएसएमटीसारख्या गजबजलेल्या स्थानकांवरून हिरवा कंदील दाखवला जात आहे. “राज्यातील प्रवाशांना वाऱ्यावर सोडून परराज्यातील गाड्यांना झुकते माप देणे हे नेमके कोणते रेल्वे प्रशासन?” असा संतप्त सवाल आता प्रवासी संघटना विचारत आहेत.

रेल्वे मंत्र्यांच्या आदेशालाही केराची टोपली?

विशेष म्हणजे, दादर-रत्नागिरी गाडी पुन्हा दादरपर्यंत सुरू करण्याच्या व्यवहार्यतेची (Feasibility) तपासणी करण्याचे आदेश खुद्द केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी दिले होते. परंतु, अनेक दिवस उलटूनही मध्य रेल्वेने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती किंवा निर्णय जाहीर केलेला नाही. रेल्वे मंत्र्यांच्या सूचनेनंतरही टाळाटाळ करणाऱ्या प्रशासनाचा हा ‘मुजोरपणा’ असल्याचे बोलले जात आहे.

​कोकण आणि राज्यातील इतर भागांतील प्रवाशांची मोठी गैरसोय होत असताना, रेल्वेचे अधिकारी मात्र सोयीस्करपणे तांत्रिक अडचणींचे कारण पुढे करत आहेत. एका बाजूला राज्यातील रेल्वेगाड्यांच्या वेळेचा बोजवारा उडाला असताना, दुसऱ्या राज्यांसाठी मुंबईची मुख्य स्थानके रिकामी कशी होतात, असा सवाल उपस्थित करत आता रेल्वे प्रवासी आक्रमक झाले आहेत. या मुजोर प्रशासनाविरोधात आता दादर येथे होणाऱ्या रेल्वे परिषदेत मोठे आंदोलन पुकारण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दादर-रत्नागिरी गाडी पूर्ववत करण्यासाठी शिवसेनेचा मध्य रेल्वेला १० दिवसांचा ‘अल्टीमेटम’

   Follow us on        

मुंबई:कोविड काळात बंद करण्यात आलेली दादर-रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन येत्या दहा दिवसांत पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. जर रेल्वे प्रशासनाने यावर तातडीने निर्णय घेतला नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा निर्वाणीचा इशारा शिवसेना नेते आणि खासदार अरविंद सावंत यांनी दिला आहे. मंगळवारी त्यांनी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राजीव श्रीवास्तव यांची भेट घेऊन या संदर्भात सविस्तर चर्चा केली. यावेळी मध्य रेल्वेने कोकणच्या प्रवाशांच्या संयमाचा अंत पाहू नये, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

​राज्यांतर्गत रेल्वे गाड्यांकडे लक्ष देण्याची मागणी:

या भेटीदरम्यान खासदार सावंत यांनी केवळ कोकणच नव्हे, तर राज्यातील इतरही बंद असलेल्या गाड्यांचा प्रश्न मांडला. त्यांनी सांगितले की, मुंबई-सावंतवाडी ट्रेन आठवड्यातून फक्त एकदाच चालवली जाते, ती दररोज सुरू करणे आवश्यक आहे तसेच, मराठवाड्यातून सुटणारी नांदेड-पुणे गाडी पुण्याऐवजी हडपसरला थांबवली जाते, ज्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होते. ही गाडी हडपसर ऐवजी थेट पुणे स्टेशनपर्यंत सुरू करावी, अशी आग्रही मागणी त्यांनी यावेळी केली.

​रेल्वेच्या ‘मराठीद्वेषा’वर संताप:

खासदार सावंत यांनी रेल्वे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढत ‘मराठीद्वेष’ थांबवण्याचे आवाहन केले. ‘डेक्कन क्वीन’च्या वाढदिवसाच्या वेळी केवळ हिंदी आणि इंग्रजी भाषेचा वापर करणे आणि ‘रेल वन ॲप’मध्ये मराठी भाषेचा समावेश न करणे, याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. याशिवाय रेल्वेच्या जमिनीवरील झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन आणि शिवडीतील एंड-टू-एंड पुलाचे रखडलेले काम या प्रश्नांकडेही त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. या बैठकीला रेल्वेचे अधिकारी आणि भारतीय कामगार सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

एकाच ट्रॅकवर समोरासमोर आल्या दोन लोकल; मुंबईत मोठा अपघात थोडक्यात टळला

   Follow us on        

मुंबई: मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या रेल्वेच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी एक धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे घडली. तांत्रिक चुकीमुळे एकाच ट्रॅकवर दोन लोकल गाड्या समोरासमोर आल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र, मोटरमनच्या सतर्कतेमुळे सुमारे १३० मीटर अंतरावर गाडी थांबली आणि मोठा अनर्थ टळला.

​मिळालेल्या माहितीनुसार, बदलापूरकडून सीएसएमटीच्या दिशेने येणारी लोकल प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर येणे अपेक्षित होते. मात्र, सिग्नलिंग यंत्रणेतील त्रुटी किंवा मानवी चुकीमुळे ही गाडी चुकीच्या पद्धतीने प्लॅटफॉर्म क्रमांक ५ वर वळवण्यात आली. विशेष म्हणजे, याच प्लॅटफॉर्मवर आधीच दुसरी एक लोकल उभी होती. जेव्हा बदलापूर लोकल प्लॅटफॉर्म ५ च्या ट्रॅकवर शिरली, तेव्हा मोटरमनच्या लक्षात आले की होम सिग्नल लाल आहे आणि समोर दुसरी गाडी उभी आहे. त्याने त्वरित आपत्कालीन ब्रेक लावून गाडी थांबवली, ज्यामुळे दोन्ही गाड्यांमध्ये सुरक्षित अंतर राहिले.

​या घटनेनंतर रेल्वे प्रशासनात एकच खळबळ उडाली. खबरदारीचा उपाय म्हणून प्लॅटफॉर्म ५ ते ८ पर्यंतची वाहतूक तात्काळ थांबवण्यात आली आणि दोन्ही गाड्या सुरक्षितरीत्या मागे घेण्यात आल्या. या गोंधळामुळे मध्य रेल्वेची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती, परंतु सध्या सेवा पूर्ववत करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, सीएसएमटी परिसरातच एक दिवसापूर्वी डिरेलमेंटची (रुळावरून डबा उतरणे) घटना घडली होती, त्यापाठोपाठ हा प्रकार घडल्याने रेल्वेच्या सिग्नलिंग यंत्रणेवर टीका होत आहे. रेल्वे प्रशासनाने या ‘रॉग रुटिंग’ प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून या घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.

 

View this post on Instagram

 

डोंबिवली लोकल अपघात: रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे अपघात झाल्याचा आरोप

   Follow us on        

डोंबिवली: डोंबिवली स्थानकाजवळ सोमवारी सकाळी रिकाम्या लोकल ट्रेनचा एक डबा रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. विशेष म्हणजे, रविवारीच या भागात ‘मेगा ब्लॉक’ घेऊन देखभालीची कामे करण्यात आली होती आणि त्यानंतर काही तासांतच हा अपघात झाल्याने रेल्वेच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. ही घटना सकाळी ८:०९ वाजता घडली जेव्हा ही ट्रेन कळवा कारशेडमधून कल्याणच्या दिशेने जात होती. ट्रेन रिकामी असल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.

​या घटनेनंतर रेल्वे प्रवासी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. ‘मुंबई रेल प्रवासी संघ’चे उपाध्यक्ष सिद्धेश देसाई यांनी सांगितले की, रविवारी मुलुंड, ठाणे, दिवा आणि डोंबिवली दरम्यान फलाट विस्तार आणि रुळांशी संबंधित महत्त्वाची कामे करण्यात आली होती. मेगा ब्लॉक संपल्यानंतर लगेचच अशा प्रकारे ट्रेन रुळावरून घसरणे हे देखभालीच्या कामातील निष्काळजीपणा आणि निकृष्ट दर्जा दर्शवते. तसेच, कडक उन्हात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा आणि कामाच्या नियोजनाचा अभावही यातून दिसून येत असल्याची टीका त्यांनी केली.

​रेल्वे प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. सकाळी १०:१० वाजेपर्यंत रेल्वे डबा पुन्हा रुळावर चढवण्याचे काम पूर्ण झाले आणि १०:४५ वाजता वाहतूक पूर्ववत करण्यात आली. मात्र, या प्रक्रियेत १२ गाड्या वळवण्यात आल्या आणि ९ गाड्या रद्द कराव्या लागल्या. प्रवाशांनी आणि तज्ज्ञांनी मागणी केली आहे की, या अपघाताची सखोल चौकशी व्हावी आणि ज्या ट्रॅकवर काम सुरू असते, तिथे लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वाहतुकीवर निर्बंध लादण्यात यावेत जेणेकरून कामाचा दर्जा राखला जाईल.

मुंबई आणि लगतच्या जिल्ह्यात आज पावसाचा इशारा

   Follow us on        

मुंबई: मंत्रालयाकडून प्राप्त झालेल्या ताज्या माहितीनुसार, मुंबईसह लगतच्या जिल्ह्यांमध्ये पुढील ३ तासांत हवामानात लक्षणीय बदल होण्याची शक्यता आहे. मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर आणि रायगड या पाच जिल्ह्यांमधील काही भागांत हलक्या पावसाच्या सरी कोसळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अचानक उद्भवलेल्या या बदलामुळे नागरिकांनी आपल्या प्रवासाचे आणि कामाचे नियोजन काळजीपूर्वक करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

​पावसाच्या सरींसोबतच या भागात सोसाट्याचा वारा वाहण्याची दाट शक्यता आहे. तसेच, काही ठिकाणी जोरदार मेघगर्जना आणि विजांचा कडकडाटही होईल, असे हवामान अंदाजात नमूद करण्यात आले आहे. विशेषतः किनारपट्टीलगतच्या आणि ग्रामीण भागांत वाऱ्याचा वेग अधिक राहण्याची शक्यता असल्याने घराबाहेर पडताना सतर्क राहणे आवश्यक आहे.

​प्रशासनाने नागरिकांना खबरदारीचा उपाय म्हणून विजा चमकत असताना झाडाखाली किंवा मोकळ्या मैदानात उभे न राहण्याचा सल्ला दिला आहे. पालघर आणि रायगड जिल्ह्यांतील दुर्गम भागांत पावसाचा आणि विजांचा जोर अधिक राहू शकतो. बदलत्या हवामानामुळे तापमानात थोडी घट होण्याची शक्यता असली, तरी नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व आवश्यक खबरदारी घ्यावी, असे मंत्रालयाद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे.

पनवेल रेल्वे स्थानकावर प्रवासी लिफ्ट कोसळली

   Follow us on        

नवी मुंबई: पनवेल रेल्वे स्थानकावर सोमवारी सकाळी एक मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक ७ वरील एका लिफ्टमध्ये तांत्रिक बिघाड होऊन ती अचानक खाली कोसळली. या घटनेमुळे स्थानक परिसरात एकच खळबळ उडाली होती. ज्यावेळी ही लिफ्ट कोसळली, तेव्हा त्यामध्ये चार प्रवासी अडकले होते. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते, मात्र सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

​घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन, पोलीस आणि आपत्कालीन पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बचाव पथकाने अत्यंत शिताफीने कारवाई करत लिफ्टमध्ये अडकलेल्या चारही प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. सुरक्षित बाहेर पडल्यानंतर प्रवाशांनी सुटकेचा निश्वास टाकला. या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही, ही दिलासादायक बाब ठरली.

​मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. हा अपघात तांत्रिक बिघाडामुळे झाला की देखभालीतील निष्काळजीपणामुळे, याचा तपास केला जाणार आहे. पनवेल रेल्वे स्थानक हे हार्बर आणि मध्य रेल्वेवरील एक महत्त्वाचे जंक्शन असून, आगामी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशी ते जोडले जाणार आहे. अशा गजबजलेल्या स्थानकावर झालेल्या या अपघातामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, रेल्वे प्रशासनाने लिफ्ट आणि इतर सुविधांची कडक तपासणी करावी, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

डोंबिवली स्थानकावर लोकल रूळांवरून घसरली

   Follow us on        

मुंबई, २० एप्रिल २०२६: आज सकाळी ८.०९ वाजता डोंबिवली स्थानकावर एका रिकाम्या लोकल रेकचा एक डबा रुळांवरून घसरल्याची घटना घडली. कळवा कार शेडवरून कल्याणकडे जाणाऱ्या या रिकाम्या रेकमध्ये कोणतेही प्रवासी नव्हते, त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.या अपघातामुळे मध्य रेल्वेच्या अप दिशेने जाणाऱ्या  लोकल गाड्या थांबल्या.

अपघात  तात्काळ हाताळण्यासाठी तंत्रज्ञांची पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत. मध्य रेल्वेने दिवा ते कल्याणदरम्यान डाउन स्लो लाईनवरील सेवांना फास्ट लाईनवरून वळवल्या आहेत. परिणामी, या मार्गावर प्रवासी सेवांवर परिणाम झाला असून, काही गाड्या उशिराने धावत आहेत. सद्यस्थितीत रुळांवरून घसरलेला डबा उचलण्याचे काम सुरू असून, लवकरच सामान्य वाहतूक पूर्ववत होण्याची अपेक्षा रेल्वे प्रशासनाने व्यक्त केली आहे.

 

 

 

View this post on Instagram

 

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search