Category Archives: मुंबई

मुंबई-विजयदुर्ग रो-रो सेवेच्या १२ फेर्‍यांमध्ये कोट्यावधींचा तोटा; ‘अव्यवहार्य प्रकल्प’ म्हणुन टीकेचे झोड

   Follow us on        

मुंबई: कोकणच्या विकासासाठी आणि वाहतुकीत मोठी क्रांती घडवण्याचा गाजावाजा करून सुरू करण्यात आलेली मुंबई-विजयदुर्ग रो-रो सेवा अवघ्या काही दिवसांतच बंद पडली आहे. अव्यवहार्य प्रकल्प आणि अल्प प्रवासी संख्या असतानाही केवळ काही मंत्र्यांच्या प्रतिष्ठेसाठी हा ‘पांढरा हत्ती’ पोसण्याचा प्रयत्न सरकारवरच उलटल्याचे चित्र दिसत आहे. अखेर तांत्रिक बिघाडाचे कारण पुढे करत ही सेवा अनिश्चित काळासाठी बंद करण्याची नामुष्की सरकारवर ओढवली असून, राजकीय वर्तुळात यावरून खमंग चर्चा रंगू लागली आहे.

​उद्घाटनानंतर प्रतिसादात सातत्याने घसरण

​या सेवेच्या पहिल्याच उद्घाटनाच्या फेरीत ४१३ प्रवासी दाखवून हा प्रकल्प मोठा यशस्वी ठरल्याचा दावा प्रशासनाने केला होता. मात्र, त्यानंतर या सेवेला मिळणारा प्रतिसाद कमालीचा घसरत गेला.

​५ मार्च रोजी झालेल्या विजयदुर्ग-मुंबई फेरीत तर एकही प्रवासी नव्हता.

​१९ मार्च च्या फेरीत संपूर्ण जहाजात केवळ एकच प्रवासी होता.

​इतर अनेक फेऱ्यांमध्ये अवघे ३० ते ४० प्रवासी प्रवास करत होते. ६२० प्रवासी क्षमता असणाऱ्या अवाढव्य जहाजासाठी ही संख्या अत्यंत नगण्य मानली जाते.

​तोट्याचे गणित आणि आकडेवारी

​या संपूर्ण प्रकल्पाचा खर्च आणि मिळालेले उत्पन्न यात जमीन-अस्मानाचा फरक असून सरकारला मोठा आर्थिक फटका बसला आहे.

तपशील आकडेवारी / खर्च

एकूण फेऱ्या – १२

एकूण प्रवासी – ८९४

एकूण वाहने- १५४

एका फेरीसाठी लागणारे इंधन – १८ ते २० हजार लिटर

प्रकल्पाचा एकूण खर्च – दीड ते पावणेदोन कोटी रुपये

अंदाजित उत्पन्न – ३५ ते ३६ लाख रुपये

अंदाजित थेट नुकसान – १.१५ ते १.४० कोटी रुपये

(टीप: या नुकसानीमध्ये केवळ इंधन आणि मूलभूत बाबींचा फरक असून इतर प्रशासकीय खर्च जोडलेला नाही.)

प्रवाशांनी पाठ का फिरवली? 

​या रो-रो सेवेच्या ‘इकॉनॉमी’ क्लासचे तिकीट दर ३ हजार रुपयांपासून सुरू होत होते. सर्व प्रवाशांनी किमान तिकीट दर भरला आणि वाहनांचे सरासरी भाडे मिळाले, असे गृहीत धरले तरी एकूण उत्पन्न ३५ ते ३६ लाखांच्या आसपासच मर्यादित राहिले. त्या तुलनेत रेल्वे किंवा खाजगी बसचे पर्याय सर्वसामान्यांना अधिक स्वस्त आणि सोयीचे वाटल्यामुळे प्रवाशांनी या महागड्या रो-रो सेवेकडे पाठ फिरवली.

​काही मंत्र्यांच्या हट्टामुळेच हा अव्यवहार्य प्रकल्प जनतेच्या पैशांवर लादला गेल्याची जोरदार टीका आता केली जात आहे.

खाजगी ट्रॅव्हल्स बसेसना मुंबईत ‘नो एंट्री’! पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांचा मोठा निर्णय

   Follow us on        

मुंबई: मुंबई शहरात दररोज राज्याच्या विविध जिल्ह्यांतून आणि देशभरातून हजारो खाजगी ट्रॅव्हल्स व पॅसेंजर गाड्या येत असतात. या वाहनांमुळे शहरात होणारी प्रचंड वाहतूककोंडी फोडण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने (BMC) एक मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता देशभरातून येणाऱ्या या खाजगी प्रवासी गाड्यांना मुंबईच्या वेशीवर म्हणजेच दहिसर आणि मानखुर्द जकात नाक्यांवरच थांबवले (रेड सिग्नल दिला) जाईल. या गाड्या या ठिकाणी थांबून प्रवाशांना सोडतील आणि तिथूनच पुन्हा माघारी परततील. यामुळे मुंबई शहरातील मुख्य रस्त्यांवरील अंतर्गत वाहतूककोंडी आणि खाजगी बसच्या पार्किंगचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर सुटणार आहे.

​या नवीन व्यवस्थेमुळे बाहेरून येणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी त्यांना मुंबईच्या विविध भागात जाण्यासाठी जकात नाक्यांवरूनच मेट्रो, बेस्ट (BEST) बसेस आणि टॅक्सी/कॅबची उत्तम कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच, प्रवाशांच्या सोयीसाठी दहिसर आणि मानखुर्द या दोन्ही ठिकाणी आधुनिक सोयी-सुविधांनी युक्त असे मल्टिप्लेक्स, थ्री-स्टार व फाईव्ह-स्टार हॉटेल्स, भव्य शॉपिंग सेंटर्स, पार्किंग हब आणि फूड प्लाझा उभारण्यात येणार आहेत. याशिवाय, वाहनांसाठी सीएनजी, पेट्रोल पंप आणि इलेक्ट्रिक वाहनांसाठी (EV) चार्जिंग स्टेशन्स यांसारख्या आवश्यक इंधनाच्या सुविधाही या ठिकाणी उपलब्ध असतील.

​सन २०१७ मध्ये जकात (Octroi) बंद झाल्यापासून दहिसर आणि मानखुर्द येथील हे जकात नाके ओस पडले होते. सध्या दहिसर येथे १८,८६९ चौरस मीटर आणि मानखुर्द येथे २९,७७४ चौरस मीटर अशी मोक्याची जागा उपलब्ध असून पालिकेला त्याचा कोणताही उपयोग होत नव्हता. या जागेचा पुनर्विकास करण्यासाठी पालिका एकूण १२३२ कोटी रुपयांचा खर्च करणार आहे; ज्यामध्ये दहिसर जकात नाक्यासाठी ९९२ कोटी रुपये आणि मानखुर्द जकात नाक्यासाठी २४० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या भव्य प्रकल्पामुळे मुंबईतील वाहतूककोंडी तर फुटणार आहेच, शिवाय या सुविधांमुळे पालिकेच्या महसुलातही मोठी वाढ होणार असल्याची माहिती पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिली आहे.

Video: आता तर कहरच झाला! मुंबईमध्ये नालेसफाई करताना पूर्ण रिक्षाच सापडली

   Follow us on        

मुंबई: मानसूनपूर्व नाला सफाई अभियानात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) कामगारांना साकी नाका परिसरातील मुख्य नाल्यातून पूर्ण ऑटो रिक्षाचा सांगाडा बाहेर काढावा लागला. १८ मे रोजी साकी नाक्यातील सांगाडा लोखंडी कचरापेटी परिसरात क्रेन आणि यंत्रांच्या सहाय्याने हा प्रचंड अवजड कचरा बाहेर काढण्यात आला.नाल्याच्या आत पूर्णपणे बुडालेला आणि चिखल, प्लास्टिक व इतर कचऱ्याने झाकलेला हा ऑटो रिक्षा बाहेर काढताना बीएमसीच्या कर्मचाऱ्यांना बराच वेळ आणि मेहनत घ्यावी लागली.

व्हिडिओत स्पष्ट दिसते की, रिक्षाचा संपूर्ण फ्रेम, चाके आणि इतर भाग एकत्रितपणे नाल्यात अडकले होते. यासोबत मोठ्या प्रमाणात प्लास्टिक, टायर आणि इतर घनकचराही काढण्यात आला.बीएमसीने यानिमित्त मुंबईकर नागरिकांना नद्या, नाले आणि जलप्रवाहात घनकचरा, तरंगता कचरा किंवा अवजड साहित्य टाकू नये, असे नम्र आवाहन केले आहे.

मात्र, नागरिकांच्या प्रतिक्रियांमध्ये अनेकजण म्हणत आहेत की, “केवळ आवाहन पुरेसे नाही, कचरा टाकणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई व्हायला हवी.”या प्रकारच्या घटनांमुळे मुंबईतील नाल्यांच्या सफाईचा खर्च आणि मेहनत वाढत असल्याचे चित्र समोर येत आहे.

 

 

विनातिकीट प्रवाशांना चाप: मुंबईत आता रात्रीही फिरणार ‘बॅटमॅन’ पथक

   Follow us on        

मुंबई: मुंबईतील लोकल गाड्यांमधून रात्रीच्या वेळी विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे आता धाबे दणाणले आहेत. पश्चिम रेल्वे प्रशासनाने अशा प्रवाशांविरुद्ध एक विशेष मोहीम उघडली असून, आता रात्रीच्या वेळीही ‘टीएसी’ (Ticket Checking) कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. रात्रीच्या वेळी विनातिकीट प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे निदर्शनास आल्याने प्रशासनाने हा कठोर पाऊल उचलले आहे.

​या विशेष मोहिमेअंतर्गत रात्री ९ वाजेपासून ते सकाळी ६ वाजेपर्यंत चर्चगेट ते विरार दरम्यान लोकल गाड्यांमध्ये तिकीट तपासणी केली जाणार आहे. यासाठी ‘बॅटमॅन’ (Be Aware TTE Manning At Night) नावाची विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. ही पथके रात्रीच्या शेवटच्या लोकलपासून ते सकाळच्या पहिल्या लोकलपर्यंत डब्यांमध्ये गस्त घालतील. एप्रिल महिन्यात पश्चिम रेल्वेने विक्रमी कारवाई करत ३ लाख ६० हजारांहून अधिक विनातिकीट प्रवाशांना पकडले होते. या पार्श्वभूमीवर, तिकीट तपासणीची ही प्रक्रिया आता चोवीस तास सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

​मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक प्रवासी रात्रीच्या वेळी तिकीट तपासणी होत नसल्याचा फायदा घेऊन विशेषतः एसी लोकलमध्येही विनातिकीट प्रवास करत असल्याचे समोर आले आहे. दिवसा होणारी गर्दी पाहता तिकीट तपासणीत येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी रात्रीची स्वतंत्र पथके अधिक प्रभावी ठरतील. पश्चिम रेल्वेवर दररोज १४१४ फेऱ्यांमधून सुमारे ३० लाख प्रवासी प्रवास करतात; या प्रवासादरम्यान शिस्त पाळली जावी आणि रेल्वेचा महसूल बुडू नये, यासाठी ही ‘बॅटमॅन’ टीम आता रात्रीच्या अंधारातही सक्रिय राहणार आहे.

प्रस्तावित मुंबई-पुणे-हैद्राबाद बुलेट ट्रेनच्या मार्गाची प्राथमिक आखणी निश्चित

   Follow us on        

नवी दिल्ली: रेल्वे मंत्रालयाने मुंबई-पुणे-हैद्राबाद या प्रस्तावित हायस्पीड रेल्वेची (बुलेट ट्रेन) प्राथमिक आखणी निश्चित केली असून, हा मार्ग पुणे शहराच्या मुख्य भागातून न जाता शहराच्या बाहेरून पुढे नेण्याचे प्रस्तावित केले आहे. या नवीन आराखड्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील प्रवाशांसाठी शहराच्या बाह्य भागात स्थानके उभारली जाणार आहेत, ज्यामुळे शहरी भागातील गर्दी टाळून वेगवान प्रवासाचे उद्दिष्ट साध्य करणे शक्य होईल.

​पुणे जिल्ह्यातील स्थानकांचा विचार करता, मुंबईहून पुण्याकडे येताना पहिले स्थानक लोणावळ्याजवळील मळवली आणि कामशेत दरम्यान असेल. त्यानंतरचे स्थानक पिंपरी-चिंचवडसाठी कुरुळी येथे नियोजित असून, पुण्याचे मुख्य स्थानक लोणी काळभोर आणि मांजरी बुद्रुक यांच्या दरम्यान प्रस्तावित करण्यात आले आहे. ही सर्व स्थानके मुख्य शहरापासून दूर असली, तरी तेथून शहरात ये-जा करण्यासाठी स्वतंत्र कनेक्टिव्हिटीची व्यवस्था करावी लागणार आहे.

​या हायस्पीड रेल्वेमुळे प्रवासाच्या वेळेत मोठी क्रांती होणार असून मुंबई ते पुणे हा प्रवास अवघ्या ४८ मिनिटांत पूर्ण होईल, असा दावा रेल्वे मंत्रालयाने केला आहे. तसेच पुणे ते हैदराबाद हे मोठे अंतर पार करण्यासाठी केवळ १ तास ५५ मिनिटे लागणार आहेत. वेगाच्या या मर्यादेमुळे रस्ते मार्गावरील ताण कमी होऊन आंतरराज्य प्रवासाला मोठी गती मिळणार आहे.

​पुणे स्थानकानंतर हा मार्ग शिंदवणेमार्गे बारामतीकडे वळणार असून बारामती शहराबाहेर त्याचे स्थानक असेल. पुढे हा मार्ग पंढरपूर आणि सोलापूर या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणार आहे. जरी ही स्थानके शहराच्या मूळ ठिकाणापासून काही किलोमीटर दूर असली, तरी या प्रकल्पामुळे सोलापूर आणि पंढरपूर सारख्या शहरांच्या परिसराचा झपाट्याने विकास होण्यास मदत होणार आहे.

​सध्या अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनचे काम सुरू असतानाच केंद्र सरकारने सात नवीन हायस्पीड मार्ग जाहीर केले असून त्यात महाराष्ट्रातील या दोन मार्गांचा समावेश आहे. रेल्वे मंत्रालयाने प्रथमच या मार्गांची आखणी ‘रेल्वे ॲटलास’मध्ये दर्शविली आहे. या संपूर्ण मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार झाल्यावरच स्थानकांची निश्चिती आणि जमिनीचे आरक्षण यांसारख्या तांत्रिक बाबी अधिक स्पष्ट होणार आहेत.

ठाणे आणि मुलुंड स्थानकावरील गर्दी कमी होणार; प्रस्तावित रेल्वे स्थानकाला मंजुरी

   Follow us on        

ठाणे: मुंबईकरांच्या आणि विशेषतः ठाणेकरांच्या प्रवासातील कोंडी फोडण्यासाठी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ठाणे आणि मुलुंड दरम्यान नवीन उपनगरीय रेल्वे स्टेशन उभारण्यास ‘इन-प्रिन्सिपल’ (तत्वतः) मंजुरी दिली आहे. २०१९ मध्ये संकल्पित करण्यात आलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे स्थान ठाणे मानसिक रुग्णालयाजवळील कोपरी बाजूच्या परिसरात प्रस्तावित आहे. या नवीन स्टेशनमुळे मध्य रेल्वेवरील सर्वाधिक गर्दीच्या ठाणे स्टेशनवरील प्रवासी भार ३१ टक्क्यांनी, तर मुलुंड स्टेशनवरील भार २४ टक्क्यांनी कमी होण्याची दाट शक्यता आहे. केवळ गर्दीचे विभाजनच नाही, तर या प्रकल्पामुळे उपनगरीय आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या मार्गांचे विलगीकरण करणे अधिक सुलभ होणार असून, संपूर्ण मुंबई रेल्वे वाहतुकीच्या कार्यक्षमतेत सुधारणा होणार आहे.

​या प्रकल्पाच्या आर्थिक नियोजनासाठी ठाणे स्मार्ट सिटी आणि ठाणे महानगरपालिका (टीएमसी) यांच्याकडून निधी उपलब्ध करून दिला जाणार असून, प्रत्यक्ष अंमलबजावणीची जबाबदारी भारतीय रेल्वे पार पाडणार आहे. दरम्यान, या निर्णयावर स्थानिक प्रवाशांकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. एका बाजूला मोठ्या वर्गाकडून गर्दी कमी होण्याच्या शक्यतेमुळे या निर्णयाचे स्वागत होत असताना, दुसऱ्या बाजूला दोन स्टेशनमधील अंतर कमी असल्याने लोकल ट्रेनच्या वेळापत्रकावर आणि वेगावर विपरीत परिणाम होईल का, अशी भीती काही प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे. तरीही, वाढती लोकसंख्या लक्षात घेता हे स्टेशन भविष्यात मध्य रेल्वेचा कणा ठरेल अशी अपेक्षा वर्तवली जात आहे.

बेस्टच्या ताफ्यात दाखल होणार १० नवीन ओपन-डेक बसेस

   Follow us on        

मुंबई: मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीचा कणा असलेल्या बेस्ट (BEST) उपक्रमाने शहराच्या पर्यटन क्षेत्राला नवसंजीवनी देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. पर्यटकांना मुंबईची ऐतिहासिक वास्तू आणि विलोभनीय समुद्रकिनाऱ्यांचा आनंद खुल्या आकाशाखाली घेता यावा, यासाठी बेस्ट लवकरच १० नवीन ओपन-डेक (खुल्या छताच्या) बसेस आपल्या ताफ्यात दाखल करणार आहे. या बसेस प्रामुख्याने शहरातील पर्यटन स्थळांच्या सफारीसाठी वापरल्या जाणार असून, यामुळे स्थानिक नागरिक आणि पर्यटकांना मुंबईची सुंदरता जवळून अनुभवता येईल.

​सध्या मुंबईत सुरू असलेल्या ‘हेरिटेज बस’ आणि ‘ओपन-टॉप बस’ सेवेला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. हेच यशस्वी मॉडेल डोळ्यासमोर ठेवून बेस्ट प्रशासनाने या नवीन १० बसेस खरेदी करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू केली आहे. या बसेस दक्षिण मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया, मरीन ड्राईव्ह आणि इतर प्रमुख वारसा स्थळांच्या मार्गावर चालवल्या जाण्याची शक्यता आहे. नियमित बस मार्गांच्या तुलनेत या पर्यटन बसेसमधून बेस्टला अधिक चांगला महसूल मिळत असल्याचे दिसून आले आहे.

​आर्थिक आव्हानांचा सामना करणाऱ्या बेस्ट उपक्रमासाठी ही नवी सेवा उत्पन्नाचा एक मोठा स्रोत ठरू शकते. नियमित प्रवाशांच्या सोयीसोबतच पर्यटनावर लक्ष केंद्रित केल्यामुळे बेस्टच्या तिजोरीत भर पडण्यास मदत होईल. या उपक्रमामुळे केवळ पर्यटकांची सोय होणार नाही, तर मुंबईच्या जागतिक पर्यटन आकर्षणात भर पडून स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल, अशी अपेक्षा बेस्ट अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. लवकरच या रंगीबेरंगी आणि आधुनिक सोयीसुविधांनी सज्ज बसेस मुंबईच्या रस्त्यावर धावताना दिसतील.

देशातील पहिल्या विना-एसी ‘स्वयंचलित दरवाजा’ लोकलची चाचणी मुंबईत न होता उत्तर प्रदेशात होणार; कारण काय?

   Follow us on        

मुंबई: मध्य रेल्वेच्या ताफ्यात दाखल होणाऱ्या पहिल्या विना-एसी (Non-AC) पण स्वयंचलित दरवाजे असलेल्या लोकल ट्रेनची चाचणी मुंबईत न होता थेट उत्तर प्रदेशात घेण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरील प्रचंड गर्दी आणि गाड्यांची सततची वर्दळ यामुळे चाचणीसाठी पुरेसा वेळ आणि मार्ग उपलब्ध होत नसल्याने हा बदल करण्यात आला आहे. उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या सीमेवरील झाशी विभागांतर्गत येणाऱ्या खजुराहो-महोबा या ६३.२७ किलोमीटरच्या मार्गावर या अत्याधुनिक लोकलची सखोल तांत्रिक चाचणी सध्या सुरू आहे.

​मुंबईतील कुर्ला कारशेडमध्ये या लोकलचा पहिला रेक प्राथमिक तपासणीसाठी आधीच दाखल झाला आहे. मात्र, दुसऱ्या रेकची सविस्तर चाचणी करण्यासाठी रेल्वेने उत्तर भारतातील कमी रहदारीच्या मार्गाची निवड केली. मुंबईत दिवसा लोकल आणि मेल-एक्स्प्रेसमुळे चाचणी घेणे अशक्य असते, तर रात्रीच्या वेळी उपलब्ध होणारा मर्यादित वेळ तांत्रिक निरीक्षणांसाठी अपुरा पडतो. याउलट, खजुराहो-महोबा मार्ग तांत्रिक चाचण्यांसाठी अधिक अनुकूल असून तिथे सलग आणि निर्बाधपणे रेल्वेच्या सर्व प्रणाली तपासणे सोपे जात आहे.

​या चाचणी दरम्यान प्रामुख्याने स्वयंचलित स्लायडिंग दरवाजांची अचूकता, इंटरलॉकिंग सुरक्षा प्रणाली (ज्यामुळे दरवाजे बंद झाल्याशिवाय गाडी सुरू होणार नाही) आणि दरवाजे उघडण्या-बंद होण्याचा वेळ यांचे बारकाईने परीक्षण केले जात आहे. विना-एसी डब्यांमध्ये दरवाजे बंद असताना हवा खेळती राहण्यासाठी छतावरील ब्लोअर्स आणि ‘फोर्स्ड व्हेंटिलेशन’ प्रणाली किती प्रभावी ठरते, यावरही विशेष लक्ष दिले जात आहे. तसेच पावसाळ्यात पाणी डब्यात शिरू नये यासाठी ‘अँटी-वॉटर इन्ग्रेस’ प्रणालीचीही चाचणी घेतली जाणार आहे. या सर्व चाचण्या यशस्वी झाल्यानंतर हा रेक पुन्हा मुंबईत आणला जाईल आणि त्यानंतरच प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल.

मुंबई लोकलच्या ‘लेडीज स्पेशल’ला ३४ वर्षे पूर्ण

   Follow us on        

मुंबई:भारतीय रेल्वेच्या इतिहासात महिला-केंद्रित उपनगरीय प्रवासाचा एक महत्त्वाचा टप्पा आज गाठला गेला आहे. जगातील पहिल्या ‘लेडीज स्पेशल’ ट्रेन सेवेने आपल्या यशस्वी संचालनाची ३४ वर्षे पूर्ण केली आहेत. ५ मे १९९२ रोजी सुरू झालेली ही सेवा मुंबईतील नोकरीपेशा महिलांच्या सुरक्षित, विश्वासार्ह आणि आरामदायी प्रवासाच्या वाढत्या गरजेला दिलेले उत्तर होते. सुरुवातीला ही सेवा केवळ चर्चगेट ते बोरीवली दरम्यान होती, परंतु महिलांच्या प्रतिसादानंतर १९९३ मध्ये तिचा विस्तार विरारपर्यंत करण्यात आला.

​१९९० च्या दशकात दक्षिण मुंबईत झालेली औद्योगिक वाढ आणि नोकरीसाठी घराबाहेर पडणाऱ्या महिलांच्या वाढत्या संख्येमुळे ‘लेडीज स्पेशल’ची संकल्पना उदयास आली. या गाड्यांमुळे महिलांना गर्दीच्या वेळी नियमित लोकलच्या डब्यात चढण्यासाठी करावा लागणारा संघर्ष कमी झाला. कालांतराने, या गाड्या केवळ प्रवासाचे साधन न राहता महिलांच्या सामाजिकीकरणाचे केंद्र बनल्या. या प्रवासात विविध वयोगटातील आणि समाजातील महिलांमध्ये मैत्रीचे नाते निर्माण झाले असून, अनेक प्रवाशांसाठी हा वेळ दैनंदिन अनुभव शेअर करण्याची हक्काची जागा बनली आहे.

​सध्या पश्चिम रेल्वेद्वारे दररोज १० ‘लेडीज स्पेशल’ सेवा चालवल्या जातात. या सेवा सकाळ आणि संध्याकाळच्या ऐन गर्दीच्या वेळी (Peak Hours) दोन्ही दिशांना उपलब्ध आहेत. सकाळी विरार, बोरीवली, भाईंदर आणि वसई रोड येथून चर्चगेटसाठी ६ सेवा धावतात, तर संध्याकाळी चर्चगेटवरून बोरीवली आणि विरारसाठी ४ परतीच्या सेवा उपलब्ध आहेत. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला आणि लहान मुलांसह प्रवास करणाऱ्या महिलांसाठी ही सेवा वरदान ठरली आहे.

​गेल्या तीन दशकांत या सेवेचा टप्प्याटप्प्याने विस्तार करण्यात आला आहे. २००६ मध्ये वांद्रे यार्ड ते चर्चगेट अशी सेवा सुरू झाली होती, जिचे पुढे २०१८ मध्ये विरार-चर्चगेट सेवेत रूपांतर करण्यात आले. तसेच २०१३ मध्ये सुरू झालेल्या वांद्रे उपनगरीय सेवांचाही विस्तार २०१६ आणि २०१८ मध्ये विरारपर्यंत करण्यात आला. मुंबईच्या उपनगरीय रेल्वे जाळ्यातील हा एक महत्त्वाचा घटक असून, तो महिलांच्या कार्यक्षेत्रातील वाढत्या सहभागाचे प्रतीक मानला जातो.

Mumbai Local: “एसी लोकल भाडे परवडत नाही!” विरारमध्ये लोकल सेवेच्या ‘एसी’ आधुनिकीकरणाविरोधात प्रवासी रुळांवर

   Follow us on        

विरार: मुंबईच्या पश्चिम रेल्वे मार्गावरील विरार स्थानकात आज प्रवाशांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येत जोरदार निदर्शने केली. रेल्वे प्रशासनाने सकाळी ८:२८ ची विरार-चर्चगेट ही नियमित लोकल रद्द करून त्याऐवजी वातानुकूलित (AC) लोकल चालवण्याचा निर्णय घेतल्याने प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. गर्दीच्या वेळी अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे प्रवाशांना केवळ वाढीव भाड्याचा भुर्दंड सोसावा लागणार नाही, तर सर्वसामान्यांसाठी परवडणाऱ्या नॉन-एसी गाड्यांचा पर्यायही कमी झाला आहे. यामुळे संतापलेल्या प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाच्या या धोरणाविरोधात घोषणाबाजी करत आपला विरोध दर्शवला.

​मुंबईच्या उपनगरीय रेल्वे जाळ्यातील हा संघर्ष आता तीव्र होताना दिसत आहे. विरारसारख्या दूरच्या उपनगरांतून दररोज प्रवास करणारा मोठा वर्ग हा कमी तिकीट दरांवर अवलंबून आहे. रेल्वे प्रशासन आधुनिकीकरण, प्रवाशांचा सुखद प्रवास आणि देखभालीतील सुलभता यासाठी एसी लोकलवर भर देत असले, तरी सामान्य नोकरदारांच्या खिशाला हे परवडणारे नाही. पर्यायी साध्या गाड्यांची संख्या न वाढवता थेट चालू गाड्यांचे एसीमध्ये रूपांतर केल्याने प्रवाशांच्या दैनंदिन नियोजित प्रवासात मोठा अडथळा निर्माण झाला आहे, असे मत आंदोलकांनी व्यक्त केले.

​या घटनेनंतर सोशल मीडिया आणि सार्वजनिक वर्तुळात दोन स्पष्ट गट पाहायला मिळत आहेत. काही नागरिकांच्या मते मुंबईच्या रेल्वेचे आधुनिकीकरण होणे ही काळाची गरज असून एसी गाड्या आवश्यक आहेत. मात्र, दुसऱ्या बाजूला बहुतांश प्रवाशांनी प्रशासनावर टीका केली आहे. कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय आणि प्रवाशांच्या आर्थिक स्थितीचा विचार न करता घेतलेला हा निर्णय अन्यायकारक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. रेल्वेने आधुनिकीकरण करताना सर्वसामान्यांचे स्वस्त प्रवासाचे पर्याय हिरावून घेऊ नयेत, अशी मागणी आता जोर धरत आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search