मुंबई: मुंबई शहरात दररोज राज्याच्या विविध जिल्ह्यांतून आणि देशभरातून हजारो खाजगी ट्रॅव्हल्स व पॅसेंजर गाड्या येत असतात. या वाहनांमुळे शहरात होणारी प्रचंड वाहतूककोंडी फोडण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने (BMC) एक मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता देशभरातून येणाऱ्या या खाजगी प्रवासी गाड्यांना मुंबईच्या वेशीवर म्हणजेच दहिसर आणि मानखुर्द जकात नाक्यांवरच थांबवले (रेड सिग्नल दिला) जाईल. या गाड्या या ठिकाणी थांबून प्रवाशांना सोडतील आणि तिथूनच पुन्हा माघारी परततील. यामुळे मुंबई शहरातील मुख्य रस्त्यांवरील अंतर्गत वाहतूककोंडी आणि खाजगी बसच्या पार्किंगचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर सुटणार आहे.
या नवीन व्यवस्थेमुळे बाहेरून येणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी त्यांना मुंबईच्या विविध भागात जाण्यासाठी जकात नाक्यांवरूनच मेट्रो, बेस्ट (BEST) बसेस आणि टॅक्सी/कॅबची उत्तम कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच, प्रवाशांच्या सोयीसाठी दहिसर आणि मानखुर्द या दोन्ही ठिकाणी आधुनिक सोयी-सुविधांनी युक्त असे मल्टिप्लेक्स, थ्री-स्टार व फाईव्ह-स्टार हॉटेल्स, भव्य शॉपिंग सेंटर्स, पार्किंग हब आणि फूड प्लाझा उभारण्यात येणार आहेत. याशिवाय, वाहनांसाठी सीएनजी, पेट्रोल पंप आणि इलेक्ट्रिक वाहनांसाठी (EV) चार्जिंग स्टेशन्स यांसारख्या आवश्यक इंधनाच्या सुविधाही या ठिकाणी उपलब्ध असतील.
सन २०१७ मध्ये जकात (Octroi) बंद झाल्यापासून दहिसर आणि मानखुर्द येथील हे जकात नाके ओस पडले होते. सध्या दहिसर येथे १८,८६९ चौरस मीटर आणि मानखुर्द येथे २९,७७४ चौरस मीटर अशी मोक्याची जागा उपलब्ध असून पालिकेला त्याचा कोणताही उपयोग होत नव्हता. या जागेचा पुनर्विकास करण्यासाठी पालिका एकूण १२३२ कोटी रुपयांचा खर्च करणार आहे; ज्यामध्ये दहिसर जकात नाक्यासाठी ९९२ कोटी रुपये आणि मानखुर्द जकात नाक्यासाठी २४० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या भव्य प्रकल्पामुळे मुंबईतील वाहतूककोंडी तर फुटणार आहेच, शिवाय या सुविधांमुळे पालिकेच्या महसुलातही मोठी वाढ होणार असल्याची माहिती पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिली आहे.


