सावंतवाडी:सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील, कोकणाचे मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिरशिंगे गावात सामूहिक जमिनी हडप करण्याचा बाहेरच्या धनदांडग्यांचा कुटील डाव ग्रामस्थांनी एकजुटीने हाणून पाडला आहे. गावातील श्रीदेवी पाहुणाई रवळनाथ मंदिरामध्ये गावातील सर्व मानकरी, ग्रामस्थ आणि सरपंच एकत्र आले होते. या ठिकाणी महसूल आणि भूमी अभिलेख कार्यालयाच्या वतीने मंगेश तारकर आरोसकर यांच्या जागेसंदर्भात लावण्यात आलेली जमिनीची मोजणी सर्व गावकऱ्यांनी तीव्र विरोध करत आणि प्रशासनाला जाब विचारत पूर्णपणे उधळून लावली. ‘जीव गेला तरी चालेल, पण आपली वडिलोपार्जित जमीन कोणत्याही परप्रांतीय किंवा बाहेरच्या व्यक्तीला कवडीमोल भावाने विकणार नाही’, असा पक्का निर्धार या सभेमध्ये सर्व शिरशिंगेवासीयांनी एकमुखाने केला.
गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरशिंगे गावातील ३२ एकर हे सामायिक (सामूहिक) क्षेत्र असून त्यावर संपूर्ण गावाचा समहक्क आहे. अशा परिस्थितीत कोणत्याही एका व्यक्तीला संमतीशिवाय किंवा धडेवाटप न करता जमिनीचा तुकडा देता येणार नाही. गावातील काही एजंट आणि महसूल विभागातील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संगनमताने पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या या जमिनी काही हजारांत बळकावण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यामुळे गावात एकीचा नवा इतिहास रचत भूमी अभिलेखच्या अधिकाऱ्यांना जागेवरच मोजणी स्थगितीचा पंचनामा करण्यास भाग पाडण्यात आले.
याप्रसंगी शिरशिंगे गावाचे सरपंच दीपक शांताराम राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, आमच्या पूर्वजांनी जशी सामायिक जमीन एकत्र ठेवली, तशीच ती पुढेही कायम राखण्यासाठी संपूर्ण गावाने एकत्र येऊन या मोजणीला आणि जमीन विक्रीला पूर्ण विरोध केला आहे. जमीन राहिली तरच गाव आणि गावाचे अस्तित्व टिकून राहील, त्यामुळे गावकऱ्यांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये. तसेच चुकीच्या पद्धतीने मोजणीचे घाट घालू नका, असा इशारा त्यांनी प्रशासनालाही दिला आहे. गावाच्या या एकजुटीमुळे धनदांडग्यांचे मनसुबे धुळीस मिळाले असून हा शिरशिंगेवासीयांच्या एकीचा मोठा विजय मानला जात आहे.


