मुंबई:मुंबईतील उपनगरीय रेल्वे प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर, सुरक्षित आणि वेगवान करण्यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) कंबर कसली आहे. यामध्ये कित्येक वर्षांपासून उपेक्षित राहिलेल्या हार्बर रेल्वे मार्गाच्या विकासासाठी ठोस पावले उचलली जात आहेत. मुंबई, नवी मुंबई आणि ‘तिसऱ्या मुंबई’ला जलद गतीने जोडण्यासाठी हार्बर मार्गावर जलद लोकल गाड्या धावण्यासाठी स्वतंत्र मार्गिकेची चाचपणी केली जाणार आहे. सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते पनवेल दरम्यान केवळ धिम्या लोकल धावत असल्याने आणि वाढत्या लोकसंख्येमुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. यावर तोडगा म्हणून ‘एमयुटीपी-४’ (MUTP-4) प्रकल्पांतर्गत एका सल्लागाराची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही जलद मार्गिका कितपत व्यवहार्य ठरेल आणि कोणत्या भागातून करता येईल, याचा अभ्यास हा सल्लागार करेल. यासोबतच ठाणे-बोरीवली आणि वांद्रे-कुर्ला या भागांत रेल्वे कनेक्टिव्हिटी शक्य आहे का, याचाही अभ्यास केला जाणार असल्याची माहिती एमआरव्हीसीचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक विलास वाडेकर यांनी दिली.
दुसऱ्या बाजूला, पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गावरील लोकल ट्रेनची प्रवासी क्षमता वाढवण्यासाठी १५ डब्यांच्या लोकल फेऱ्यांची संख्या वाढवली जाणार आहे. त्यासाठी अत्यंत प्रगत समजली जाणारी ‘ट्रेन कंट्रोल अँड मॉनिटरिंग सिस्टम’ (TCMS) लागू करण्यात येत असून, विविध स्थानकांवर प्लॅटफॉर्मच्या विस्तारीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. यामुळे प्रवाशांना गर्दीतून मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. तसेच प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायी करण्यासाठी रेल्वेकडून लवकरच २३८ नवीन डिझाईनच्या एसी लोकल दाखल केल्या जाणार आहेत. यासाठीच्या निविदा जून महिन्यापर्यंत अंतिम केल्या जातील आणि टप्प्याटप्प्याने सध्याच्या नॉन-एसी लोकलचे एसी लोकलमध्ये रूपांतर केले जाईल.
प्रवाशांच्या सोयी-सुविधांसोबतच त्यांच्या सुरक्षिततेलाही सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे. उपनगरीय रेल्वे मार्गावरील अपघाती मृत्यूंचे सत्र थांबवण्यासाठी ‘मिशन झीरो डेथ’ अंतर्गत रेल्वे स्थानकांचा कायापालट केला जात आहे. पहिल्या टप्प्यात निवडलेल्या १७ स्थानकांपैकी ५ स्थानकांचे काम पूर्ण झाले असून, उर्वरित स्थानकांच्या कामाला गती दिली जात आहे. यामध्ये दादर, घाटकोपर, वसई आणि भांडुप यांसारख्या प्रमुख आणि गर्दीच्या स्थानकांचा समावेश आहे. एकूणच, येत्या काळात मुंबईकरांना अधिक आधुनिक, वेगवान आणि सुरक्षित रेल्वे सेवा अनुभवता येणार आहे.


