पुणे: पुणे ते रायगड जिल्ह्यातील दिघी बंदर या दरम्यानचा प्रवास आता अधिक वेगवान आणि सुरक्षित होण्याची चिन्हे आहेत. सध्याच्या ताम्हिणी घाट मार्गाला दोन नवीन सक्षम पर्याय प्रस्तावित करण्यात आले असून, यामुळे प्रवासाचे अंतर ३० ते ५० किलोमीटरने कमी होणार आहे. या नवीन मार्गांमुळे प्रवासाचा वेळ दीड ते दोन तासांनी वाचणार असून इंधनाची मोठी बचत होणार आहे.
पहिला प्रस्तावित पर्याय मुळशी-ताम्हिणी बोगदा आणि पूल प्रकल्पाचा आहे. या अंतर्गत मुळशी धरण परिसरातील वाघेवाडी ते ताम्हिणी दरम्यान नवीन पूल उभारणे आणि डोंगरवाडी ते ताम्हिणी दरम्यान बोगदा खणण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पामुळे पुणे-दिघी अंतर ३० किलोमीटरने कमी होईल आणि घाटातील अवघड वळणे टाळता येतील. दुसरा आणि अधिक महत्त्वाकांक्षी मार्ग म्हणजे माणगाव-कुंभे-पानशेत मार्ग. या मार्गावर कुंभे धरणाचे काम प्रगतीपथावर असून, माणगाव ते कुंभेपर्यंत रस्ता व बोगदा तयार आहे. केवळ कुंभ्याची वाडी ते घोळ दरम्यानचा ७ किलोमीटरचा रस्ता पूर्ण झाल्यास पुण्याला जोडणारा हा मार्ग ५० किलोमीटरचे अंतर कमी करेल.
ताम्हिणी घाटातील वाढते अपघात आणि वाहतूककोंडी पाहता हे पर्यायी मार्ग अत्यंत गरजेचे बनले आहेत. २०२३ ते २०२५ या काळात या घाटात ९५ अपघात झाले असून ३९ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यातच, अदानी समूहाच्या भागीदारीतून दिघी बंदराचा विस्तार होत असल्याने भविष्यात या मार्गावर अवजड वाहनांची आणि कंटेनरची संख्या तिप्पट होण्याची शक्यता आहे.
सध्या पुणे-पौड रस्ता विस्तारीकरणासाठी ४५० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असला तरी, पुणे आणि रायगड जिल्हा प्रशासनातील समन्वयाच्या अभावामुळे पुढील कामे रखडली आहेत. हे मार्ग पूर्ण झाल्यास व्यापारी वाहतुकीसह पर्यटनालाही मोठी चालना मिळणार आहे. त्यामुळे सरकारने या प्रकल्पांबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी नागरिक आणि व्यावसायिकांकडून केली जात आहे.


