कर्तव्य पथावर महाराष्ट्राचा डंका! गणेशोत्सवाच्या चित्ररथाला देशात प्रथम क्रमांक

   Follow us on        

नवी दिल्ली: यंदाच्या प्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाने बाजी मारली असून, राज्याला राज्यांच्या श्रेणीमध्ये प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. ‘गणेशोत्सव आणि आत्मनिर्भरता’ या विषयावर आधारित महाराष्ट्राच्या चित्ररथाने उपस्थितांची मने जिंकली. या चित्ररथावर पारंपरिक लेझीम नृत्य सादर करणाऱ्या महिला पथकाने महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवले. राज्यांच्या या स्पर्धेत जम्मू-काश्मीरने दुसरे, तर केरळने तिसरे स्थान पटकावले आहे.

​लष्करी दलांमध्ये भारतीय नौदलाला सर्वोत्तम संचलन तुकडीचा बहुमान मिळाला आहे. तर निमलष्करी दलांमध्ये दिल्ली पोलीस ही सर्वोत्तम तुकडी ठरली आहे. केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांच्या चित्ररथांमध्ये सांस्कृतिक मंत्रालयाच्या ‘वंदे मातरम’ संकल्पनेवरील चित्ररथाला पहिले पारितोषिक देण्यात आले. या चित्ररथातून वंदे मातरम गीताचा १५० वर्षांचा वारसा आणि बंकिमचंद्र चॅटर्जी यांचे योगदान अतिशय देखण्या पद्धतीने मांडण्यात आले होते.

​लोकपसंती (Popular Choice) श्रेणीमध्ये मात्र निकाल काहीसे वेगळे राहिले. यामध्ये नागरिकांनी आसाम रेजिमेंटला सर्वोत्तम लष्करी तुकडी आणि गुजरातच्या चित्ररथाला राज्यांच्या श्रेणीमध्ये पहिले स्थान दिले आहे. गुजरातच्या चित्ररथाची संकल्पना ‘स्वदेशीचा मंत्र’ यावर आधारित होती. लोकपसंती श्रेणीत उत्तर प्रदेश दुसऱ्या आणि राजस्थान तिसऱ्या क्रमांकावर राहिले. या सर्व विजेत्यांना ३० जानेवारी रोजी एका विशेष सोहळ्यात सन्मानित करण्यात येणार आहे.

Facebook Comments Box

मोठी बातमी! उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनामुळे जिल्हापरिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकींच्या वेळापत्रकात बदल

   Follow us on        

मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असल्यामुळे १२ जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्यात आला असून ५ फेब्रुवारी २०२६ ऐवजी आता ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान; तर मतमोजणी ७ फेब्रुवारी २०२६ ऐवजी ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी होईल.

यानुसार संबंधित जिल्हाधिकारी सुधारित #निवडणूक कार्यक्रमाची सूचना ३१ जानेवारी २०२६ रोजी प्रसिद्ध करतील. आता ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल. त्यामुळे जाहीर प्रचाराची समाप्ती ५ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री १० वाजता होईल. संबंधित ठिकाणी ९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता मतमोजणी सुरु होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर संबंधित ठिकाणची आचारसंहिता संपुष्टात येईल. निवडून आलेल्या सदस्यांची नावे शासन राजपत्रात ११ फेब्रुवारी २०२६ पर्यंत प्रसिद्ध केली जातील.

Facebook Comments Box

मुंबई लोकलच्या मोटर कॅबिनसमोर CCTV कॅमेरे; रेल्वे अपघातांच्या तपासात येणार पारदर्शकता

   Follow us on        

Mumbai: मुंबई उपनगरीय रेल्वेतील अपघातांचे नेमके कारण शोधण्यासाठी आणि तपासात पारदर्शकता आणण्यासाठी मध्य रेल्वेने लोकल गाड्यांच्या मोटर कॅबिनबाहेर हाय-क्वालिटी CCTV कॅमेरे बसवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. रेल्वे माहिती अधिकार कार्यकर्ते समीर झवेरी यांनी माहिती अधिकारांतर्गत (RTI) विचारलेल्या प्रश्नानंतर ही बाब समोर आली आहे.

 

सध्या रेल्वे रुळांवरील अपघात, आत्महत्या किंवा तांत्रिक बिघाड यांसारख्या घटनांच्या तपासासाठी केवळ मोटरमनचे विधान किंवा प्रत्यक्षदर्शींच्या साक्षीवर अवलंबून राहावे लागते, ज्यात अनेकदा विसंगती आढळतात. आता या कॅमेऱ्यांमुळे रेल्वे प्रशासनाकडे ठोस पुरावे उपलब्ध होणार असून, अपघातासाठी मोटरमन जबाबदार आहे की बाह्य घटक, हे स्पष्ट होण्यास मदत होईल. यामुळे मोटरमनवर होणारे खोटे आरोपही थांबतील. मध्य रेल्वेच्या ताफ्यातील १६४ लोकल गाड्यांपैकी १६१ मोटर कॅबिनवर हे कॅमेरे आधीच कार्यान्वित झाले असून, उर्वरित कॅमेरे बसवण्याचे काम वेगाने सुरू आहे. या निर्णयामुळे भविष्यातील रेल्वे अपघात तपास अधिक अचूक आणि पारदर्शक होणार आहे.

Facebook Comments Box

Konkan Railway: ४७ प्रवाशांचा हरवलेला मुद्देमाल परत, ४२ मुलांची सुटका: RPF ची उल्लेखनीय कामगिरी.

   Follow us on        

Konkan Railway: कोकण रेल्वेवरील प्रवाशांची सुरक्षितता, संरक्षण आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी रेल्वे संरक्षण दल (RPF) सातत्याने सतर्क, कार्यक्षम आणि संवेदनशील भूमिका बजावत आहे. प्रवासी सुरक्षेच्या दृष्टीने राबविण्यात येणाऱ्या विविध विशेष मोहिमा, तत्काळ कारवाई आणि लोकाभिमुख उपक्रमांमुळे RPF ने उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

ऑपरेशन अमानत अंतर्गत RPF ने रेल्वे परिसरात प्रवाशांकडून चुकून राहिलेल्या वस्तू शोधून काढून तब्बल 47 प्रवाशांना ₹27.93 लाख किमतीचे मौल्यवान साहित्य सुरक्षितपणे परत केले. या कार्यामुळे रेल्वे सुरक्षेवरील प्रवाशांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.

बालसुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत ऑपरेशन नन्हे फरिश्ते अंतर्गत RPF ने 42 अल्पवयीन मुलांची सुटका केली. या मुलांना पुढील काळजी, संरक्षण व पुनर्वसनासाठी चाइल्ड हेल्पलाईनकडे सुपूर्द करण्यात आले असून, संभाव्य शोषणापासून त्यांचे संरक्षण करण्यात आले आहे.

रेल्वे परिसरातील बेकायदेशीर हालचालींवर आळा घालण्यासाठी राबविण्यात आलेल्या ऑपरेशन सतर्क मोहिमेत RPF ने ₹5.31 लाख किमतीच्या 3,146 बेकायदेशीर दारूच्या बाटल्या जप्त केल्या. यासोबतच 38 दारू तस्करांना अटक करून त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात आली, ज्यामुळे रेल्वे परिसरातील अवैध व्यापाराला मोठा आळा बसला आहे.

कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी RPF ने ACP प्रकारातील 142 प्रकरणे उघडकीस आणून, संबंधित गुन्हेगारांवर रेल्वे कायदा कलम 141 अंतर्गत अटक व खटले दाखल केले. तसेच, जीवन रक्षा उपक्रम अंतर्गत RPF कर्मचाऱ्यांनी तीन प्रवाशांचे प्राण वाचवून आपली कर्तव्यनिष्ठा अधोरेखित केली.

प्रवाशांच्या सामान चोरीच्या घटनांवर कठोर कारवाई करत RPF ने नऊ गुन्हेगारांना अटक केली असून, त्यांच्याकडून ₹67.88 लाख किमतीचे चोरीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. या कारवाईमुळे प्रवाशांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक बळकट झाली आहे.

ही सर्व कामगिरी RPF च्या सतर्कता, समर्पण आणि प्रवासीहितैषी दृष्टिकोनाचे उत्तम उदाहरण आहे. कोकण रेल्वेवर सुरक्षित, संरक्षित आणि प्रवासीस्नेही प्रवास अनुभव देण्यासाठी RPF चे योगदान अत्यंत मोलाचे ठरत आहे.

Facebook Comments Box

Konkan Railway: योग नगरी ऋषिकेश आणि एर्नाकुलम दरम्यान धावणार ‘स्पेशल एक्सप्रेस’

   Follow us on        

एर्नाकुलम: उत्तर भारत आणि दक्षिण भारताला जोडणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने योग नगरी ऋषिकेश – एर्नाकुलम जंक्शन – योग नगरी ऋषिकेश दरम्यान  स्पेशल एक्सप्रेस गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्यांमुळे उत्तराखंड, दिल्ली, महाराष्ट्र, गोवा आणि केरळ या राज्यांमधील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

​गाड्यांचे वेळापत्रक आणि मार्ग

​१. ट्रेन क्र. ०४३६० (योग नगरी ऋषिकेश ते एर्नाकुलम जंक्शन): ही गाडी शुक्रवारी, ३० जानेवारी २०२६ रोजी सकाळी ०७:०० वाजता योग नगरी ऋषिकेश येथून सुटेल आणि तिसऱ्या दिवशी रात्री २३:३० वाजता एर्नाकुलम जंक्शनला पोहोचेल.

​२. ट्रेन क्र. ०४३५९ (एर्नाकुलम जंक्शन ते योग नगरी ऋषिकेश): परतीच्या प्रवासात ही गाडी मंगळवारी, ०३ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री २३:०० वाजता एर्नाकुलम येथून सुटेल आणि चौथ्या दिवशी दुपारी १६:१५ वाजता योग नगरी ऋषिकेशला पोहोचेल.

योग नगरी ऋषिकेश आणि एर्नाकुलम जंक्शन दरम्यान धावणारी ही विशेष एक्सप्रेस एकूण ३३ स्थानकांवर थांबणार असून, तिचा मार्ग हरिद्वार, मेरठ सिटी, हजरत निजामुद्दीन, मथुरा, कोटा, नागदा, रतलाम, वडोदरा, सुरत, वसई रोड, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, थिविम, मडगाव, कारवार, कुमटा, भटकळ, उडुपी, मंगळूर, कासारगोड, कन्नूर, कोझिकोड, तिरुर, कुट्टिपुरम, शोरानूर, थ्रिसूर आणि अलुआ असा आहे.

​कोचची रचना (Coach Composition) या गाडीत प्रवाशांच्या सोयीसाठी विविध श्रेणींचे एकूण १८ डबे असतील:

​१ डबा: प्रथम श्रेणी सह एसी टू टायर (1st Class Cum AC 2 Tier)

​१ डबा: एसी टू टायर (AC 2 Tier)

​३ डबे: एसी थ्री टायर (AC 3 Tier)

​७ डबे: स्लीपर क्लास (Sleeper Class)

​४ डबे: जनरल सेकंड क्लास (General Second Class)

​२ डबे: लगेज कम ब्रेक व्हॅन

​आरक्षणाबाबत माहिती या विशेष गाड्यांचे आगाऊ आरक्षण (Advance Reservation) २८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ०८:०० वाजेपासून दक्षिण रेल्वेच्या (Southern Railway) केंद्रांवरून आणि आयआरसीटीसीच्या (IRCTC) संकेतस्थळावर सुरू झाले आहे.

​प्रवाशांनी या विशेष सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Facebook Comments Box

सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकावरील तिकीट आरक्षण खिडकीचे अस्तित्व धोक्यात; रेल्वेकडून एक महिन्याची ‘डेडलाईन’

   Follow us on        

सीबीडी बेलापूर: कोंकण रेल्वे कॉर्पोरेशनच्या मुख्य कार्यालयात २७ जानेवारी रोजी महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघ आणि रेल्वे अधिकारी यांच्यात एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत सिंधुदुर्ग (ओरस) रेल्वे स्थानकावरील आरक्षण प्रणाली (PRS) केंद्राबाबत रेल्वे प्रशासनाने चिंतेची बाब मांडली आहे. प्रवाशांच्या मागणीखातर सुरू करण्यात आलेल्या या आरक्षण खिडकीला सध्या अत्यंत अल्प प्रतिसाद मिळत असून, दिवसाला सरासरी केवळ ७ तिकिटांचे आरक्षण होत आहे. रेल्वेच्या नियमांनुसार, एखादे आरक्षण केंद्र सुरू ठेवण्यासाठी तिथून दिवसाला किमान २५ तिकिटांची विक्री होणे आवश्यक असते.

​प्रवासी महासंघाच्या विनंतीचा मान राखून रेल्वे अधिकाऱ्यांनी हे केंद्र सुरू ठेवण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ दिली आहे. जर या काळात प्रतिसादात सुधारणा झाली नाही, तर हे केंद्र कायमचे बंद केले जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघाचे प्रसिद्धी प्रमुख अभिजित धुरत यांनी ओरस, कुडाळ आणि परिसरातील नागरिकांना कळकळीचे आवाहन केले आहे की, त्यांनी मोबाईल ॲपऐवजी प्रत्यक्ष रेल्वे खिडकीवर जाऊन आरक्षण करावे. अपेक्षित २५ किंवा त्याहून अधिक आरक्षणे नोंदवून हे केंद्र वाचवण्यासाठी सहकार्य करावे, अन्यथा हे केंद्र बंद झाल्यास महासंघ जबाबदार राहणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Facebook Comments Box

mAadhaar App: आता घरबसल्या आधार कार्डवरील नाव आणि पत्ता बदलणे शक्य

   Follow us on        

नवी दिल्ली: भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) आधार कार्ड धारकांच्या सोयीसाठी एक नवीन आणि प्रगत मोबाईल अ‍ॅप लाँच केले आहे. या अ‍ॅपमुळे नागरिकांना आता आधारशी संबंधित कामांसाठी आधार सेवा केंद्रांवर जाण्याची गरज उरणार नाही. या नवीन प्लॅटफॉर्मवरून युजर्स आपले नाव, पत्ता आणि मोबाईल नंबर यांसारखी वैयक्तिक माहिती अत्यंत सोप्या पद्धतीने स्वतः अपडेट करू शकतील. याशिवाय, आधारची सुरक्षितता वाढवण्यासाठी यामध्ये ‘ऑफलाईन व्हेरिफिकेशन’ आणि ‘सिलेक्टिव्ह शेअरिंग’ यांसारखी प्रगत फीचर्स देण्यात आली आहेत, ज्याद्वारे युजर्स आपली माहिती सुरक्षितपणे शेअर करू शकतील.

​महत्त्वाची बाब म्हणजे, या अ‍ॅपमध्ये एकाच वेळी अनेक प्रोफाईल्स आणि कॉन्टॅक्ट कार्ड्स व्यवस्थापित करण्याची सुविधा देण्यात आली आहे, ज्यामुळे कुटुंबातील सदस्यांचे आधार सांभाळणे अधिक सोपे होणार आहे. डिजिटल इंडियाच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात असून, यामुळे आधार केंद्रांवरील गर्दी कमी होण्यास मदत होईल. नागरिकांनी हे अधिकृत अ‍ॅप डाउनलोड करून या सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Facebook Comments Box

दुःखद बातमी: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन; राज्यात तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर

   Follow us on        

मुंबई: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित अनंतराव पवार यांचे आज, २८ जानेवारी २०२६ रोजी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळावर शोककळा पसरली असून, राज्य सरकारने अधिकृतपणे दुखवटा जाहीर केला आहे.

​सामान्य प्रशासन विभागाने (प्रोटोकॉल विभाग) जारी केलेल्या परिपत्रकानुसार खालील महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत:

​तीन दिवसांचा राज्य दुखवटा: दिवंगत नेत्याला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात २८ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६ या कालावधीत तीन दिवसांचा शासकीय दुखवटा पाळला जाईल.

​राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरणार: या तीन दिवसांच्या काळात ज्या शासकीय इमारतींवर नियमितपणे राष्ट्रध्वज फडकवला जातो, तिथे तो अर्ध्यावर उतरवण्यात (Half Mast) येईल.

​आज शासकीय सुट्टी: उपमुख्यमंत्र्यांच्या निधनाबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी आज, बुधवार २८ जानेवारी २०२६ रोजी राज्यातील सर्व शासकीय कार्यालये बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

​अधिकृत कार्यक्रम रद्द: दुखवटा कालावधीत कोणताही अधिकृत शासकीय करमणुकीचा कार्यक्रम आयोजित केला जाणार नाही.

​शासनाच्या वतीने अंडर सेक्रेटरी एच. पी. बाविस्कर यांनी हे आदेश जारी केले असून, सर्व जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि विभागीय आयुक्तांना याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.

Facebook Comments Box

धक्कादायक! बारामतीत लँडिंगदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमानाचा अपघात

   Follow us on        

बारामती: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या विमानाला आज सकाळी बारामतीमध्ये लँडिंगदरम्यान भीषण अपघात झाला. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार आज सकाळी मुंबईहून बारामतीला चार जाहीर सभांना संबोधित करण्यासाठी निघाले होते. मात्र, बारामती विमानतळावर उतरत असताना त्यांचे विमान धावपट्टीवरून घसरले आणि बाजूला जाऊन कोसळले. या विमानात अजित पवार यांच्यासह त्यांचे सुरक्षा कर्मचारीही उपस्थित होते.

​बारामती विमानतळाचे व्यवस्थापक शिवाजी तावरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘Lear Jet 45’ (VT SSK) या भाड्याने घेतलेल्या विमानाने लँडिंगचा प्रयत्न केला असता, ते धावपट्टीच्या कडेला जाऊन आदळले आणि त्यानंतर विमानाचा स्फोट झाला. या भीषण अपघातानंतर उपमुख्यमंत्री आणि त्यांच्यासोबत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या प्रकृतीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. प्रशासनाकडून सध्या बचावकार्य सुरू असून संपूर्ण महाराष्ट्र या घटनेमुळे हादरला आहे. या प्रकरणाचे अधिक तपशील येणे अद्याप बाकी आहे.

Facebook Comments Box

शक्तीपीठ महामार्गाचा नवा आराखडा तयार; आता १३ जिल्ह्यांतील ३९५ गावांतून जाणार महामार्ग, लांबीही वाढली

   Follow us on        

मुंबई: महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या सुधारित संरेखनाचा (Revised Alignment) प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. या नवीन आराखड्यानुसार महामार्गाची लांबी वाढली असून, आता हा मार्ग १२ ऐवजी १३ जिल्ह्यांमधून जाणार आहे.

​मुख्य बदल आणि वैशिष्ट्ये:

​१. लांबीत वाढ: सुरुवातीला हा महामार्ग ८०३ किमीचा प्रस्तावित होता. मात्र, स्थानिक विरोध आणि भौगोलिक बदलांमुळे आता तो ८५६ किमी लांबीचा असेल.

२. सातारा जिल्ह्याचा समावेश: यापूर्वी हा मार्ग १२ जिल्ह्यांमधून जाणार होता. आता यात सातारा जिल्ह्याचा नव्याने समावेश करण्यात आला आहे.

३. बाधित जिल्हे: वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, बीड, धाराशिव, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या १३ जिल्ह्यांतून हा महामार्ग जाणार आहे.

४. गावांची संख्या: महामार्ग आता एकूण ३९५ गावांतून जाणार आहे. यापूर्वी ही संख्या ३५० च्या आसपास होती.

​विरोधामुळे आराखड्यात बदल:

​कोल्हापूर, सांगली आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या महामार्गाला आणि भूसंपादनाला तीव्र विरोध दर्शवला होता. आंदोलने आणि जनआक्रोश लक्षात घेऊन राज्य सरकारने एमएसआरडीसीला जिथे विरोध आहे, तिथे पर्यायी मार्ग शोधण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, ज्या ठिकाणी जास्त विरोध होता, तिथून महामार्गाला ‘वळसा’ देण्यात आला आहे. या बदलामुळे काही महत्त्वाची शक्तीपीठे महामार्गापासून काहीशी दूर गेली असली, तरी प्रकल्प मार्गी लावण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

​या सुधारित आराखड्यामुळे भूसंपादनाच्या क्षेत्रातही वाढ झाली असून, आता एकूण ८,५०० हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे. जिथे शेतकऱ्यांचा विरोध जास्त होता, तिथे महामार्गाला वळसा देण्यात आला आहे, ज्यामुळे काही धार्मिक स्थळे किंवा शक्तीपीठे महामार्गापासून काही अंतरावर गेली आहेत. दरम्यान, ज्या ठिकाणी विरोध नाही अशा १४६ गावांमध्ये जमिनीची मोजणी आधीच पूर्ण झाली असून, उर्वरित गावांमध्ये सरकारची मंजुरी मिळताच कामाला सुरुवात केली जाईल. समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर बांधण्यात येणारा हा प्रकल्प दक्षिण महाराष्ट्र आणि कोकणच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search