Category Archives: महाराष्ट्र

अभिमानास्पद! युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळासाठी केंद्राकडून मराठ्यांच्या १२ किल्यांना मिळाले नामांकन; कोकणातील ‘या’ किल्ल्यांचा समावेश

जाने. ३० : युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या २०२४-२५ साठीच्या यादीसाठी केंद्र सरकारकडून मराठा शासन काळातील लष्करीदृष्टीने महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या १२ किल्ल्यांना नामांकन देण्यात आले आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने सोमवारी (दि. २९ जानेवारी) ही माहिती दिली. मराठा राजवटीत शत्रूशी झुंज देण्यासाठी ज्या १२ किल्ल्यांचा लष्करी तळासाठी वापर केला, त्या किल्ल्यांना आता युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये स्थान मिळण्यासाठी भारताकडून नामांकन मिळाले आहे. यामध्ये शिवनेरी, लोहगड, रायगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, साल्हेर, राजगड, खंडेरी, प्रतापगड आणि तमिळनाडूमधील जिंजी किल्ल्यांची निवड करण्यात आली आहे.
Suvarnadurg-Fort.jpg
प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने दिलेल्या माहितीनुसार, १७ व्या आणि १९ व्या शतकात मराठा शासन काळात या किल्ल्यांचा वापर करून राज्यकर्त्यांनी अतुलनीय पराक्रम गाजविला. सह्याद्री, कोकण किनारपट्टी आणि दख्खनच्या पठारावर असलेल्या या किल्ल्यांचे भौगोलिक, सांस्कृतिक असे महत्त्व आहे. महाराष्ट्रात एकूण ३९० छोटे-मोठे किल्ले आहेत. त्यापैकी युनेस्कोच्या यादीत समाविष्ट करण्यासाठी १२ किल्ल्यांची निवड करण्यात आली आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाकडून १२ पैकी आठ किल्ल्यांचे याआधीच संवर्धन करण्यात आलेले आहे.
Sindhudurg Fort
छत्रपती शिवाजी महाराज यांनी १७ व्या शतकात किल्ल्यांचा आधार घेत शत्रूला नामोहरण केले, त्यानंतर १८१८ पर्यंत पेशव्यांनी लष्करी कारवाया करण्यासाठी किल्ल्यांचा आधार घेतला.
Panhala Fort
युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचे नामांकन सांस्कृतिक आणि नैसर्गिक अशा दोन श्रेणीमध्ये होत असते. महाराष्ट्रातील किल्ल्यांचा समावेश सांस्कृतिक श्रेणीत करण्यात आला आहे. भारतातील ४२ ठिकाणांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समावेश करण्यात आलेला आहे. यापैकी सहा ठिकाणे एकट्या महाराष्ट्रातील आहेत.
Lohagadh fort
Vijaydurg Fort
Raigad Fort

Loading

“तुमच्या समोर कोणीही येऊ दे त्याच्याशी मराठीतच बोला..” – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आवाहन

नवी मुंबई :तुमच्या समोर कोणीही येऊ दे त्याच्याशी मराठीतच बोला. अशी विनंती आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्व मराठी जनतेला केले. आज नवी मुंबईत भरलेल्या विश्व मराठी संमेलनात ते बोलत होते. 

काय म्हणालेत राज ठाकरे? 

मराठी भाषा आणि मराठी माणूस ह्यासाठी मी आणि माझ्या पक्षाने अनेक आंदोलनं केली, मी जेलमध्ये गेलो, अंगावर केसेस घेतल्या. मी अत्यंत कडवट मराठी आहे आणि माझ्यावरचे संस्कार पण तसेच आहेत. महाराष्ट्र ही काय ताकद आहे हे जसं जसं मला समजत गेलं तसं तसं मी महाराष्ट्राच्या प्रेमात अधिक पडत गेलो. 

ह्या जूनमध्ये मला अमेरिकेतील बृहन्महाराष्ट्र मंडळाने त्यांच्या संमेलनाला आमंत्रित केलं आहे. ह्या संमेलनाचे अध्यक्ष मला भेटले. ते मला म्हणाले की अमेरिकेत आम्ही शंभरहून अधिक मराठी शाळा काढल्या आहेत. महाराष्ट्रातल्या मराठी शाळा बंद होत असताना, अमेरिकेत मराठी शाळा सुरु होणं हे काय कमी आहे का? 

पण सध्या आपण महाराष्ट्राकडे जास्त लक्ष देणं आवश्यक आहे. महाराष्ट्राबाहेर आणि देशाबाहेर असलेल्या मराठी लोकांनी मराठीची, महाराष्ट्राची श्रीमंती जरूर इतर लोकांपर्यंत पोहचवली पाहिजे. पण आपल्याच महाराष्ट्रातल्या शहरांमध्ये जेंव्हा मराठीची उपेक्षा होते, जेंव्हा तिकडे सर्रास हिंदी कानावर पडते तेंव्हा मात्र त्रास होतो. माझा भाषेला विरोध नाही. पण हिंदी ही राष्ट्रभाषा नाही. हिंदी ही देशातल्या इतर भाषांसारखीच एक भाषा आहे. ह्या देशात राष्ट्रभाषेचा निवाडा कधीच झाला नाही. केंद्र आणि राज्य सरकार ह्यांच्यातील व्यवहारासाठी हिंदी आणि इंग्रजी ह्या भाषा वापरल्या जातात इतकंच. बाकी हिंदी आपली राष्ट्रभाषा नाही. पण जेंव्हा मी हे १५,२० वर्षांपूर्वी बोललो तेंव्हा माझ्या अंगावर सगळे धावून गेले. जेंव्हा ते अंगावर आले तेंव्हा त्यांना मी गुजरात हायकोर्टाचा निर्णय दाखवला. 

मराठी लोकंच एकमेकांशी बोलताना हिंदी का वापरतात हे मला कळत नाहीये. आणि आपलीच मराठी भाषा जेंव्हा राजकीय दृष्ट्या दुय्यम लेखण्याचा प्रयत्न जेंव्हा होतो तेंव्हा माझ्या तळपायाची आग मस्तकात जाते. 

माझी श्री. दीपक केसरकारांना विनंती आहे की ह्या राज्यातील सगळ्या शाळांमध्ये मग त्या कुठल्याही असोत तिकडे पहिली ते दहावी मराठी भाषा सक्तीची करा. सध्या सीबीएएससी, आयसीएस्सी शाळांमध्ये ज्या राज्यात राहताय तिथली भाषा शिकवायची आणि शिकायची सोडून परदेशी भाषा का शिकवताय? परदेशी भाषा हव्या तितक्या शिका पण त्याच वेळेस मराठी पण शिकलीच पाहिजे, बोलता आलीच पाहिजे. 

ह्या देशाच्या पंतप्रधानांना जर त्यांच्या राज्याबद्दल, त्यांच्या भाषेबद्दल प्रेम वाटतं. गिफ्ट सिटी असो की हिऱ्यांचा व्यापार जर गुजरातमध्ये न्यावीशी वाटते किंवा स्टॅच्यू ऑफ युनिटी पेक्षा मोठा पुतळा गुजरातमध्ये उभारावासा वाटतो, थोडक्यात काय जर त्यांना त्यांच्या राज्याबद्दलचं आणि भाषेबद्दलचं प्रेम लपवता येत नसेल तर आपण का लवपतोय, का मागे राहतोय ?

जेंव्हा महाराष्ट्रात मराठी माणसाला जैन माणूस घर नाकारतो तेंव्हा काय करायचं? हे गुजरात, तामिळनाडू, आसाम, केरळ ह्या राज्यात करून दाखवा. पैसे असून सुद्धा मराठी माणसाला घर नाकारायची हिंमत होते कारण आमच्या सरकारांचं बोटचेपं धोरण. 

मराठी माणसाकडे पैसे असताना त्याला घर नाकारलं जात असेल तर ते हे खपवून घेतलं जाणार नाही. आणि मराठी माणसाकडे कुठे आहे पैसा असं म्हणणारे गल्लीच्या बाहेर पण गेलेले नाहीत. त्यांना काय माहिती की महाराष्ट्रभर मराठी लोकांनी किती अफाट कर्तृत्व दाखवून पैसा उभा केलाय. 

भाषा मेली तर सगळंच संपलं हे विसरू नका. तुमची ओळखच तुम्ही कोणते भाषिक आहात ह्यातून होते. मराठी बोलणाऱ्यांची संख्या जर बघितली तर आपण जगात दहाव्या क्रमांकावर आहोत. थोडक्यात जगातील मोठी लोकसंख्या मराठी बोलणारी आहे. पण आम्ही आमच्याच राज्यात दुसऱ्या भाषेमध्ये गोट्यांसारखे घरंगळत का जातो. माझी आज तुम्हाला एकच विनंती आहे की तुमच्या समोर कोणीही येऊ दे त्याच्याशी मराठीतच बोला.

Loading

मोठी बातमी : मराठा आंदोलनाचा विजय, सर्व मागण्या मान्य, पहाटे अध्यादेश निघाला

नवी मुंबई, दि.27 जानेवारी 2024 | मराठा आंदोलनाचा मोठा विजय झाला आहे. राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. आज पहाटे त्याचे सर्व अध्यादेश काढण्यात आले आहेत. मराठा आंदोलनाच्या लढ्याला मोठं यश मिळालं आहे. यामुळे शनिवारी दि 27 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटलांच्या उपस्थित आपली विजयी सभा पार पडणार आहे.
सर्व मागण्या मान्य, अध्यादेश मिळाला
मागण्या मान्य झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी रात्री दोन वाजता पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी सर्व मागण्या मान्य झाल्या असून त्याचे अध्यादेश निघाल्याचे सांगितले. कुणबी प्रमाणपत्राच्या ज्या नोंदी सापडल्या आहेत, त्यांना प्रमाण पत्र द्यावे तसेच त्यांच्या कुटुंबाना सुद्धा प्रमाणपत्र द्यावे ही मागणी मान्य झाली आहे. तसेच सरकारने सगा सोयराबद्दल अध्यादेश काढले आहे. तो मला देण्यात आल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.
गुन्हे मागे घेतले जाणार
राज्यातील मराठी बांधव यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. वंशावळीसाठी तालुका पातळीवर समिती नेमली जाणार आहे. मराठवाड्यात कमी प्रमाण पत्र सापडले त्या बाबत आता शिंदे समिती गॅझेट काढून त्यावर काम करणार आहे. तसेच विधानसभेत यावर कायदा करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमचे आरक्षणचे काम केले आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.
एकनाथ शिंदे यांच्याशी विरोध संपला
समाज म्हणून आमचा आता एकनाथ शिंदे यांचा विरोध संपला आहे. उद्या सकाळी 8 वाजता वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मुख्यमंत्री पत्र घेऊन येणार आहेत. मी सगळ्यांना विचारून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बोलावले आहे. उद्या आम्ही येथे सभा घेणार आहे मुंबईत जाणार नाही.

Loading

महाराष्ट्राच्या चित्ररथाला जिंकवून देण्यासाठी आपले मत महत्वाचे; ‘असे’ देता येईल मत

मुंबई: कर्तव्यपथावरील संचलनात आज अनेक नेत्रदीपक चित्ररथ समाविष्ट झाले होते. या सर्व चित्ररथातील विजेता चित्ररथ निवडण्यासाठी जनतेकडून मते मागविण्यात आली आहेत. महाराष्ट्र राज्यातर्फे ‘छत्रपतीशिवाजीमहाराज : लोकशाहीचे जनक’ या विषयावर अतिशय चित्त वेधक आणि नितांत सुंदर असा चित्ररथ कर्तव्यपथावरील संचलनात सहभागी झाला. या चित्ररथाला जिंकून देण्याची संधी आता आपल्याला मिळाली आहे. त्यामुळे सर्वानी आपले मत नोंदवून या राज्याच्या चित्ररथाला जिंकवून द्यावे असे आवाहन महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचनालय तर्फे काण्यात आले आहे.
उद्या २७ जानेवारी सायं. ५.३० पर्यंत हे मतदान आपणास करता येणार आहे.
कसे नोंदवाल मत?
👇मार्ग पहिला :-
स्वत:च्या नोंदणीकृत भ्रमणध्वनी क्रमांकावरून MYGOVPOLL(स्पेस)344521(comma) 9 असा संदेश 7738299899 या क्रमांकावर पाठवावा.
म्हणजेच हा मेसेज खालील प्रमाणे होईल
MYGOVPOLL 344521,9 
👇मार्ग दुसरा :-
प्रथमत: https://mygov.in/group-poll/vote-your-favourite-tableau-republic-day-2024/ या लिंकवर क्लिक करुन लॉगिन करा. त्यानंतर महाराष्ट्राचा चित्ररथ निवडून मत नोंदवा.

Loading

कोल्हापूर ते कोकण प्रवास एका तासात शक्य; आंबोली घाटाला छेदून येणार ‘हा’ महामार्ग

मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) नागपूर – गोवा शक्तीपीठ महामार्गाचे संरेखन अखेर निश्चित केले आहे. कोल्हापूर ते सावंतवाडी दरम्यान लागणाऱ्या आंबोली घाटाखालून हा महामार्ग येणार आहे. आंबोली घाटातून मोठा बोगदा खोदला जाऊन तेथून हा महामार्ग जाणार असल्याने कोल्हापूर ते कोकण अंतर १ तासात गाठणे शक्य होणार आहे. 
सध्या आंबोली घाटातून वाहतूक खूप धीम्या गतीने होते. पावसाळ्यात अनेकदा वाहतूक धोक्याची होते. दरी कोसळल्याने वाहतूक कित्येकदा बंद होते. मात्र शक्तीपीठ महामार्ग झाल्यास पश्चिम महाराष्ट्र आणि तळकोकण जवळ येणार आहे. 
समृद्धी महामार्गापेक्षाही मोठा नागपूर – गोवा ‘शक्तिपीठ’ महामार्ग बांधण्यात येणार आहे. समृद्धी महामार्गाप्रमाणे विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात जोडणारा महामार्ग असावा, यातून एमएसआरडीसीने समृद्धी महामार्गाची संकल्पना पुढे आणली. त्यातही विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातील धार्मिक स्थळांना, देवस्थानांना जोडणारा आणि तेथील पर्यटनासह सर्वांगीण विकासाला चालना देणारा महामार्ग असावा. यातून ‘शक्तिपीठ’ महामार्ग एमएसआरडीसीने हाती घेतला आहे. या महामार्गाचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्याचे काम सध्या सल्लागार कंपनीच्या माध्यमातून सुरू आहे. येत्या सहा महिन्यात हा आराखडा तयार होण्याची शक्यता आहे. 

Loading

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी; परीक्षेसाठी दहा मिनिटे जादाचा वेळ मिळणार

पुणे: दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी आता विद्यार्थ्यांना १० मिनिट वाढीव वेळ मिळणार आहे. परीक्षेची प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी ही वाढीव वेळ मिळणार आहे. महाराष्ट्र बोर्डाने परिपत्रक काढून याबाबतची माहिती दिली आहे.
राज्य मंडळातर्फे दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेत प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी परीक्षेच्या वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिकांचे वाटप विद्यार्थ्यांना यापूर्वी करण्यात येत होते. दरम्यान, दहावी-बारावीची बोर्डाची परीक्षा विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण टप्पा असल्यामुळे पालकांसह आणि समाज घटकांचेही या परीक्षांकडे बारकाईने लक्ष असते. परंतु प्रश्नपत्रिका मोबाईलवर तसेच अन्य सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झाल्याच्या अफवा, यांसारख्या घटना काही अंशी घडत असल्याचे निदर्शनास आले.
अशा प्रकारच्या घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी आणि परीक्षा निकोप, भयमुक्त आणि कॉपीमुक्त वातावरणात सुरळीत पार पडाव्यात, यासाठी परीक्षेच्या दिलेल्या वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका वितरित करण्याची सुविधा फेब्रुवारी-मार्च २०२३ च्या परीक्षेपासून रद्द करण्यात आली होती. परंतु विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन आणि पालक-विद्यार्थी यांच्या मागणीचा विचार करून फेब्रुवारी-मार्च २०२४ च्या परीक्षांसाठी दहा मिनिटे वेळ वाढवून देण्यात आला आहे. परीक्षेच्या वेळेनंतरची दहा मिनिटे वाढवून दिली आहेत, अशी माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली.
परीक्षेपूर्वी ३० मिनिटे अगोदर विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर हजर राहावे
फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये सकाळच्या सत्रात ११ वाजता, तर दुपारच्या सत्रात तीन वाजता परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकांचे वितरण करण्यात येईल आणि लेखनास प्रारंभ होईल. विद्यार्थ्यांनी सकाळच्या सत्रात साडे दहा वाजता, तसेच दुपारच्या सत्रात अडीच वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे, असे राज्य मंडळाने स्पष्ट केले आहे.

Loading

महत्वाची बातमी : २२ जानेवारीला महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर

मुंबई : अयोध्येतील राम मंदिराचे २२ जानेवारी रोजी लोकार्पण करण्यात येणार आहे. यादिवशी राम मंदिरात राम लल्लाची प्राण प्रतिष्ठापना केली जाणार आहे.हा सोहळा देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. या सोहळ्यानिमित्त केंद्र सरकारने अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केल्यानंतर आता महाराष्ट्रातही २२ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्रापूर्वी अनेक राज्यात या दिवशी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
२२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन करण्यात येणार असून या कार्यक्रमासाठी देश-विदेशातील ६ हजाराहून अधिक व्हिआयपी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यात राजकीय नेते, अभिनेते,उद्योगपती तसेच क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांचा समावेश आहे. दरम्यान, प्रभू राम मंदिराच्या उद्घाटनासाठी अनेक राज्यांमध्ये सुटी जाहीर करण्यात आली आहे. केंद्र सरकारने २२ जानेवारी रोजी केंद्रीय संस्था आणि इतर केंद्रीय औद्योगिक आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांना अर्धा दिवस सुट्टी देण्याची घोषणा केली आहे. त्या दिवशी दुपारी अडीच वाजता कार्यालयीन कामकाज सुरू होईल.
आता महाराष्ट्रातही सार्वजनिक सुट्टी जाहीर झाली आहे. तसेच उत्तरप्रदेश, हरियाणा, मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, गोवा, आसाम व ओडिशा या राज्यांनी २२ जानेवारीला सुट्टी जाहीर केली आहे.

Loading

नागपूर – पत्रादेवी ‘शक्तिपीठ’ महामार्ग ‘समृध्दी’ पेक्षाही मोठा; ८०५ किमी लांबीचा हा महामार्ग ठरणार राज्यातील सर्वात लांबीचा महामार्ग.

मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) नागपूर – गोवा शक्तीपीठ महामार्गाचे संरेखन अखेर निश्चित केले आहे. या संरेखनानुसार ‘शक्तिपीठ’ मार्ग आता ७६० किमीऐवजी ८०५ किमी लांबीचा असणार आहे. एमएसआरडीसीने संरेखन अंतिम करण्यासाठीचा प्रस्ताव नुकताच राज्य सरकारला पाठवला आहे. तर दुसरीकडे या प्रकल्पाचा सविस्तर आराखडा तयार करण्याचे काम वेगात सुरू आहे. संरेखन आणि आराखडा शक्य तितक्या लवकर मंजूर करून घेण्याचा एमएसआरडीसीचा प्रयत्न आहे.
समृद्धी महामार्ग हा राज्यातील सर्वात मोठा, ७०१ किमी लांबीचा महामार्ग आहे. पण आता समृद्धी महामार्गापेक्षाही मोठा नागपूर – गोवा ‘शक्तिपीठ’ महामार्ग बांधण्यात येणार आहे. समृद्धी महामार्गाप्रमाणे विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात जोडणारा महामार्ग असावा, यातून एमएसआरडीसीने समृद्धी महामार्गाची संकल्पना पुढे आणली. त्यातही विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातील धार्मिक स्थळांना, देवस्थानांना जोडणारा आणि तेथील पर्यटनासह सर्वांगीण विकासाला चालना देणारा महामार्ग असावा. यातून ‘शक्तिपीठ’ महामार्ग एमएसआरडीसीने हाती घेतला आहे. या महामार्गाचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्याचे काम सध्या सल्लागार कंपनीच्या माध्यमातून सुरू आहे. येत्या सहा महिन्यात हा आराखडा तयार होण्याची शक्यता आहे. हा मार्ग  यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, बीड, उस्मानाबाद, सोलापूर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, पत्रादेवी (उत्तर गोवा) या जिल्ह्यातून जाणार आहे. 

Loading

कोकणच्या पर्यटनाला चालना देणारा पाणबुडी पर्यटन प्रकल्प गुजरातला जाणार

सिंधुदुर्ग: कोकणच्या पर्यटनाला चालना देणारा एक महत्त्वाचा प्रकल्प गुजरातला पळवला आहे. सिंधुदुर्ग जिह्यातील वेंगुर्ले येथील निवती रॉक येथे पाणबुडी पर्यटन प्रकल्प होणार होता; मात्र आता हा प्रकल्प द्वारका येथे होणार असून, पुढील महिन्यात होणाऱया ‘व्हायब्रंट गुजरात समिट’मध्ये याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. यामुळे कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात केंद्र सरकारविरुद्ध संतप्त भावना आहे.
गुजरात सरकारने माझगाव डॉकसोबत यासाठी करार केला आहे. यानुसार 35 टन वजनाची आणि 24 प्रवासी वाहून नेण्याची क्षमता असणारी पाणबुडी विकसित केली जाणार आहे. या पाणबुडीमध्ये 24 प्रवासी दोन रांगेत बसतील. प्रत्येक सीटला काचेची विंडो असेल. त्यामुळे समुद्रातील 300 फूट खाली असलेले नैसर्गिक सौंदर्य पर्यटकांना अनुभवता येईल. दरम्यान, माझगाव डॉकचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजीव सिंघल यांनी सामंजस्य करार केल्याचे सांगितले.
कोकणच्या पर्यटनाला चालना देणारा हा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता. त्यासाठी 2018च्या अर्थसंकल्पात तरतूदही केली होती. सिंधुदुर्गातील वेंगुर्ले तालुक्यातील निवती रॉक येथे समुद्र विश्व पाहण्यासाठी हा प्रकल्प राबविण्यात येणार होता.
केंद्राने अलीकडेच मालवणमध्ये ‘नौदल दिन’ साजरा केला. त्यातून सिंधुदुर्गातील पर्यटनाला चालना देण्याचे स्वप्न दाखवले. मात्र काही दिवसांतच या आनंदावर पाणी फेरले. पहिल्या वर्षी 5 हजार प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती तसेच 100 ते 150 कोटींची उलाढाल करण्याची क्षमता असलेला महत्त्वाकांक्षी पाणबुडी प्रकल्प हिसकावण्यात आला.
कोकणात रिफायनरी सारखे निसर्गाला हानिकारक प्रकल्प लादले जात आहेत असे प्रकल्पाला विरोधकांचे म्हणणे आहे. कोकणाला  विध्वंसकारी प्रकल्प न देता पर्यटनाला चालना देतील असे प्रकल्प देण्यात यावेत अशी मागणी होत आहे. मात्र प्रकल्प दुसऱ्या राज्यात नेण्यात येत असल्याने कोकणवासीय नाराज झाले आहेत.

Loading

Accident: ताम्हिणी घाटात खाजगी बसला मोठा अपघात, २ महिलांचा मृत्यू; ५५ प्रवासी जखमी

रायगड: पुणे येथील खासगी कंपनीची बस कोकणात येत असताना रायगड जिल्ह्यात माणगाव हद्दीत ताम्हिणी घाटात कोंडेथर वळणाजवळ या बसला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ५५ जण जखमी झाले आहेत, तर दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. माणगाव तालुक्यात ताम्हिणी घाटात शनिवारी सकाळी अपघात झाला आहे.
माणगांव पोलिस ठाणे हद्दीत सकाळी आठ वाजण्याच्या सुमारस ट्रॅव्हल्स क्रमांक एमएच ०४ एफके ६२९९ ही बस पुण्यावरुन माणगावकडे येत असताना रस्त्याखली उतरल्याने पलटी होऊन अपघात झाला आहे. घटनास्थळी माणगाव पोलिसांनी धाव घेतली आहे. माणगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील हे घटनास्थळी दाखल झाले आहेत. जखमींना उपजिल्हा रुग्णालय माणगाव, येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search