Category Archives: सिंधुदुर्ग

Malvan: ८३ फूट उंच, 23 फूट लांबीची तलवार! राजकोट येथील शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण

   Follow us on        
मालवणः जगभरातील शिवप्रेमींसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. मालवण-राजकोट येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अशा ८३ फूट उंच पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज (११ मे) करण्यात आले. तब्बल ८३ फूट उंच असलेल्या या पुतळ्याला तब्बल १०० वर्षांची गॅरंटी देण्यात आली आहे. यामुळे हा पुतळा भविष्यातील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरणार आहे.
या भव्य उद्घाटन सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यंत्री एकनाथ शिंदे राज्यातील अनेक मंत्री तसंच शिवभक्त उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उभारण्यात आलेल्या पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आले होते. मात्र, २६ ऑगस्ट २०२४ रोजी झालेल्या दुर्घटनेत वादळी वाऱ्यामुळे हा पुतळा कोसळला होता. या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्य सरकारने तातडीने समुद्रकिनाऱ्यावरील वातावरणाचा व वाऱ्याच्या वेगाचा अभ्यास करत नव्यानं पुतळा उभारला आहे.
नवीन पुतळा ८३ फूट उंच आहे. शिवरायांच्या हातातील तलवार २३ फूट लांब आहे. या पुतळ्याचे वजन ८५ टन असून, तलवारीचे वजन २.३ टन आहे. हवामानाचा अंदाज घेत हा पुतळा बनवण्यात आला आहे. या पुतळ्याला तब्बल १०० वर्षांची गॅरंटी देण्यात आली आहे. राज्यातील आणि विशेषतः कोकणातील शिवप्रेमींसाठी हा क्षण अभिमानाचा आणि ऐतिहासिक ठरणार आहे.

सावंतवाडी आगारातून बोरिवली, पुणे बस सुविधा सुरु

   Follow us on        
सावंतवाडी: उन्हाळी सुट्टीच्या हंगामात सिंधुदुर्गात येणारे चाकरमानी व प्रवाशांच्या सोयीसाठी सावंतवाडी आगार सज्ज झाले असून आगाराने ज्यादा एसटी बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे मुंबई, बोरिवली व पुणे या भागातून येणाऱ्या चाकरमान्यांसाठी सावंतवाडी आगारातून जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.
एसटी आगाराला अलीकडेच नवीन पाच बीएस-सिक्स बसेस मिळाल्या आहेत. या बसेस ४० सीट असलेल्या पूश बँक, आरामदायी आहेत. चार्जिंग पोर्ट अशा बसेस लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी सोडण्यात येतील, अशी माहिती आगार व्यवस्थापक नीलेश गावित व स्थानकप्रमुख राजाराम राऊळ यांनी दिली. प्रवाशांनी या बसचे आरक्षण करून लाभ घ्यावा, असे आवाहनही आगारातर्फे करण्यात आले आहे.
सावंतवाडी आगारातून सावंतवाडी-पुणे ही एसटी बस सकाळी सात वाजता सुटणार आहे. आगारातून बांदा-बोरिवली ही बस सोडण्यात येणार आहे. ही बस आगारातून दुपारी तीन वाजता बांदा येथे जाईल. तेथून चार वाजता ती सुटून पुन्हा सावंतवाडीत येणार आहे. त्यानंतर साडेचार वाजता बोरिवलीला मार्गस्थ होणार आहे. प्रवाशांनी या दोन्ही बसेसचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
येत्या आठ दिवसांत चाकरमान्यांची वाढती गर्दी व आरक्षण पाहता, आणखी ज्यादा गाड्या मुंबई-बोरिवली व पुणे या मार्गावर सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सावंतवाडी आगाराच्या ताफ्यात नव्याने पाच एसटी बसेस उपलब्ध झाल्याने बसेसची संख्या ८३ झाली आहे. या बसच्या माध्यमातून सर्व मार्गावर वेळापत्रकानुसार बसेस सोडण्यास मदत झाली आहे. प्रवासी उपलब्धतेनुसार ज्यादा बसेसही सोडण्यात येणार आहेत.. प्रवाशांची कोणतीही गैरसोय होऊ नये, याची दक्षता घेतली जाणार आहे. नव्याने मिळालेल्या नवीन पाच बसेस या विशेषतः लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी उपलब्ध केल्या जाणार आहेत. सोडण्यात येणाऱ्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे आरक्षण सुरू झाले आहे. या सुविधेचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

Vaibhavwadi Railway Station: चांगले उत्त्पन्न मिळत असून सुद्धा कोकण रेल्वेचे वैभववाडी स्थानकाकडे दुर्लक्ष

   Follow us on        
Vaibhavwadi Railway Station:  कोकण रेल्वे मार्गावरील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी रोड रेल्वे स्थानकाला लागलेले समस्यांचे ग्रहण सुटायला तयार नाही. या स्थानकापासून रेल्वे प्रशासनाला चांगले उत्त्पन्न भेटत असताना सुद्धा या स्थानकावरील मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत होत असल्याचा आरोप येथील प्रवाशांकडून होत आहे.
गेल्यावर्षी म्हणजेच २०२४-२५ ला या स्थानकावरून कोकण रेल्वेला ७ कोटी २२ लाख इतके उत्पन्न भेटले असल्याचे माहिती रेल्वे अभ्यासक श्री ओंकार लाड यांनी माहिती अधिकारातून प्राप्त केली आहे. २०२३-२४ या वर्षाच्या उत्पन्नाशी तुलना करता गेल्या वर्षीच्या उत्पन्नात जवळपास ९.५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. उत्पन्नाच्या बाबतीत हे स्थानक  कोकण रेल्वेच्या पहिल्या १५ स्थानकामध्ये मोडत आहे. असे असून देखील या स्थानकांवर मूलभूत सुविधांची मारामारी असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
या स्थानकावर प्लॅटफॉर्मवर बसायला नीट जागा नाही. ऊन्ह आणि पावसासाठी छप्पर नाही. ५ वर्षे होत आली; तरी आरक्षण खिडकी उघडायला तयार नाही, एकाही जलद गाडीला थांबा नाही. अशा अनेक समस्यांनी वैभववाडी रेल्वे स्थानकाला ग्रासलेले आहे. परंतु, या समस्या सोडविण्यासाठी लागणारी राजकीय इच्छाशक्ती काहीशी कोमेजून गेलेली दिसते. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या सीमेवर मध्यवर्ती रेल्वे स्थानक वैभववाडी आहे. त्यामुळे रत्नागिरीतून थेट कुडाळ सावंतवाडीत थांबणाऱ्या काही सुपरफास्ट रेल्वे गाड्यांना वैभववाडीत थांबा मिळावा ही रेल्वे प्रवाशांची खूप वर्षांपासूनची मागणी आहे. परंतु, या मागणीला राजकीय पाठबळ देण्यासाठी कोणीही पुढाकार घेत नाही. वैभववाडी तालुक्यासह कणकवली तालुक्यातील नांदगाव, तळेरे खारेपाटण पट्टा तसेच देवगड तालुक्यातील शिरगाव पासून विजयदुर्ग पर्यंतच्या आणि घाटमाथ्यावरील गगनबावडा तालुक्यालाही वैभववाडी रोड रेल्वे स्थानकाचा मोठा आधार आहे. या स्थानकातून दररोज हजारो प्रवाशाची ये-जा सुरु आहे. तरीही येथे दिवा, मांडवी, तुतारी आणि कोकणकन्या या चारच रेल्वेगाड्यांना थांबा आहे. यामध्ये मागील १५ नियमित गाडीच्या थांब्याची वाढ होऊ शकलेली नाही. यांचे मूळ राजकीय उदासीनता हेच आहे.

Kudal: साळगाव शाळा क्र.१ च्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवानिमित्त मोफत महा आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

   Follow us on        

कुडाळ: पुढील वर्षी 1 जून 2026 रोजी शाळा साळगाव क्र. 1 या शाळेला 150 वर्षे पूर्ण होत आहेत. 2025-26 हे वर्ष शतकोत्तर सुवर्णमहोत्सव वर्ष साजरे होत आहे. त्यानिमित्ताने साळगाव मित्रमंडळ व शतकोत्तर सुवर्णमहोत्सव समिती यांनी आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केले आहे. रविवार 27 एप्रिल 2025 रोजी सकाळी 8 ते 11वा. पर्यंत जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा साळगाव क्र.1 (ग्रामपंचायत कार्यालय नजीक, साळगाव, ता. कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग ) येथे हे महा आरोग्य शिबीर आहे.

या शिबिरासाठी जिल्ह्यातील नामांकित डॉक्टर डॉ. जी. टी.राणे (प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ), डॉ. अनिकेत वजराटकर (शस्त्रक्रिया तज्ञ), डॉ. मोनालिसा वजराटकर (शस्त्रक्रिया – स्त्रीरोग तज्ञ), डॉ. नेहा पावसकर -कोल्हे (नेत्ररोग – शस्त्रक्रिया तज्ञ ), डॉ. सौरभ पाटील (अस्थिरोग – शस्त्रक्रिया तज्ञ), डॉ. प्रियांका कासार _ पाटील (स्त्रीरोग – शस्त्रक्रिया तज्ञ), डॉ. नितेश साळगावकर (बालरोग तज्ञ ), डॉ. स्वप्नाली साळगावकर (आयुर्वेद आणि पंचकर्म), डॉ. चेतन परब (आयुर्वेद आणि पंचकर्म), डॉ. दत्तात्रय मडवळ (होमिओपॅथी उपचार), डॉ. राहुल गव्हाणकर (MD आयुर्वेद )हे डॉक्टर तपासणी साठी उपलब्ध असणार आहेत तसेच काही विशिष्ट आजारा बाबतीत मार्गदर्शन पण करण्यात येईल.

शिबिरात करण्यात येणाऱ्या चाचण्या – ई.सी.जी, रक्तातील साखरेची तपासणी ( डायबेटिस), रक्तदाब तपासणी, नेत्रविकार तपासणी (मोतीबिंदू व तत्सम डोळ्याचे आजार), मूळव्याध -भगेंदर अश्या दुर्धर आजाराची तपासणी, स्त्रियांच्या आजाराची तपासणी (गर्भपिशवी / मासिक पाळी / स्तनाचे आजार अशा संबंधित तपासणी), संधिवात/ आमवात किंवा हाडाच्या कुठल्याही आजार संबंधित तपासणी, लहान मुलांच्या आजार संबंधित तपासणी, इत्यादी तपासण्या करण्यात येणार आहेत. तरी साळगाव पारिसरातील ग्रामस्थानी या भव्य मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन साळगाव मित्रमंडळ व शतकोत्तर सुवर्णमहोत्सव समितीतर्फे करण्यात आले आहे.

मालवण – राजकोट किल्ला येथे उभारण्यात येत असलेल्या शिवपुतळ्याचे लोकार्पण १ मे रोजी?

   Follow us on        
मालवण :राजकोट किल्ला येथे नव्याने उभारण्यात येत असलेल्या शिवपुतळ्याचे लोकार्पण १ मे रोजी महाराष्ट्र दिनी करण्यात येणार असल्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
प्रसिद्ध मूर्तिकार राम सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली उभारण्यात येत असलेल्या शिवपुतळ्याचे काम २५ एप्रिलपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता असल्याने १ मे रोजी पुतळ्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शिवपुतळा जमिनीपासून ९३ फूट उंचीचा असणार आहे. चबुतरा १० मीटर उंचीचा बनविण्यात आला आहे. त्यावर ६० फूट उंचीचा शिवपुतळा आणि शिवपुतळ्याच्या हातातील तलवार तब्बल २३ फूट उंचीची असणार आहे.

चिपी विमानतळ संबंधित महत्वाचे निर्णय; विमानसेवेला पुनर्जीवित करण्यासाठी नितेश राणे यांचे प्रयत्न

   Follow us on        

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चीपी विमानतळा बाबत एक महत्वाची बातमी समोर आली आहे. कोकणातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या चिपी विमानतळाच्या विकासास आता गती मिळण्याची शक्यता आहे. पुढील चार महिन्यांत चिपी विमानतळावर नाइट लँडिंगसाठी परवानगी मिळणार असून, या विमानतळावरून मुंबई सेवाही अखंडित सुरू ठेवण्याचे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले आहेत.

नुकतीच मंत्रालयात चिपी विमानतळासंदर्भात झालेल्या आढावा बैठकीत, विमानतळ विकासासाठी आवश्यक उपाययोजना आणि सुविधांच्या उभारणीबाबत सखोल चर्चा करण्यात आली. विमानतळाच्या सुशोभीकरणासाठी DPDC (District Planning and Development Council) मार्फत निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले की, “मुंबई ते चिपी दरम्यानची सेवा कुठल्याही परिस्थितीत खंडित होता कामा नये. विमानतळाच्या सर्व सुविधा तातडीने पूर्ण कराव्यात. खास करून रात्री लँडिंगला अनुमती मिळवण्यासाठी आवश्यक प्रक्रिया वेगाने राबवावी”

चिपी विमानतळासंदर्भात लवकरच विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेणार

तसेच, विमानसेवा अधिक सुलभ आणि नियमित करण्यासाठी नवीन मार्ग आणि कंपन्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्नही लवकरच होणार आहे. या अनुषंगाने विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांची लवकरच भेट घेण्यात येणार असल्याची माहितीही राणे यांनी यावेळी दिली.

 

….तोपर्यंत आमचा शक्तीपीठ महामार्गाला विरोधच! आंबोली ग्रामस्थांचा निर्धार

   Follow us on        
आंबोली: आंबोली येथील कबुलायतदार प्रश्न सुटत नाही तोपर्यंत येथून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्याचा निर्धार येथील ग्रामस्थांनी केला आहे. शक्तीपीठ महामार्ग ला विरोध करण्यासंदर्भात बैठक आज असून जमिनींचा 7/12 तयार झाल्याशिवाय आणि  ग्रामस्थांना जमीन वाटप होईपर्यंत या महामार्गाला विरोध असल्याचे ग्रामस्थांचे एकमत आहे.
फणसवडे येथून घाटात बोगदा मारून पारपोली हद्दीतून आंबोली तांबुळगे खुळ्याची ढोल,मलई,नारायण गड,सतीची वाडी वरचा डोंगर,कावळेसाद तेथून कितवडे मार्गे कोल्हापूर असा रस्ता जात आहे.हा शक्तीपीठ महामार्ग नागपूर ते गोवा असा सहा पदरी रस्ता जात आहे. आंबोली गेळे येथील कबुलायतदार प्रश्न गेली २५ वर्षे महाराष्ट्र शासन भूमिपुत्रांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे.इथे भूमिपुत्र उपरे ठरत असून अतिक्रमन शासनाच्या आशीर्वादानेच होत आहे.वन खात्याचा प्रश्न सांगून हिरण्यकेशी चा रस्ता देखील होत नाही.तर दुसरीकडे बिल्डर लॉबी ला सगळं रान मोकळ आहे. त्यामुळे इथले स्थानिक हे वर्षानुवर्षे भूमी पासून वंचित राहिले.त्यात एक पिढी जमिनीची प्रतीक्षा करता करता संपली.पुढे भविष्यात देखील कठीन परिस्थिती आहे.
वन  खात्याच्या जमिनी शक्तीपीठ हायवे साठी घेण्यात येतील मात्र आंबोलीतील वन खात्याच्या स्थानिकांच्या जमिनी बाबत निर्णय कधी? शासन आणि लोकप्रतिनिधी ग्रामस्थांना फक्त आश्वासनावर ठेवता २५ वर्षे संपली. त्यामुळे आता शासनाने आंबोली जमिनीबाबत निर्णय घ्यावा.अन्यथा शक्तीपीठ महामार्ग ला ग्रामस्थांचा विरोध करण्याचा एकमुखी ठराव आंबोली ग्रामस्थांनी केला आहे.शक्तीपीठ महामार्ग संघर्ष समितीने याची दखल घ्यावी आणि येथील प्रश्नाबाबत शासनाचे डोळे उघडावे असे आवाहन ही करण्यात आले आहे.२५ वर्षे इथला जमीन प्रश्न शासन सोडवत नसल्यामुळे भूमिपुत्र वंचित राहिले आहेत.त्या मुळे आता ठोस निर्णयाची आवश्यकता असल्याचे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

दोडामार्ग: झाड तोडताना वुड कटरने मांडीची शीर कापली गेल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

   Follow us on        

दोडामार्ग: झाड तोडण्यासाठी चढलेल्या युवकाच्या पायाला वुड कटर लागून अति रक्तस्त्रावाने त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना साटेली-भेडशी येथे मंगळवारी दुपारी घडली. नागेश लाडू मयेकर (वय 40, रा. साटेली-भेडशी) असे या युवकाचे नाव आहे.

नागेश मयेकर हा साटेली-भेडशी शेजारील घोटगे गावात सहकार्‍यांसोबत झाड तोडण्यासाठी गेला होता. प्रथम झाडाच्या फांद्या तोडण्यासाठी तो वुड कटर घेऊन झाडावर चढला. दरम्यान फांद्या तोडण्याचे काम सुरू असताना अचानक कटर त्याचा पायाला लागला. यात त्याच्या मांडीची रक्तवाहिनी कापली गेल्याने मोठा रक्तस्त्राव झाला. त्याच परिस्थितीत त्याला साटेली-भेडशी प्राथ. रुग्णालयात आणण्यात आले. मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळताच प्राथमिक आरोग्य केंद्रात स्थानिक ग्रामस्थांसह परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली.

प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांच्याशी माहिती घेतली असता नागेश याचा अतिप्रमाणात रक्तस्राव झाल्याने मृत्यू झाला असे सांगितले. शवविच्छेदन केल्यानंतर त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. नागेश याच्या पश्चात पत्नी, मुलगा, भाऊ, भावजय, विवाहित बहीण असा परिवार आहे.

खुशखबर! मुंबई – सिंधुदुर्ग विमानसेवा पुन्हा सुरू होणार

   Follow us on        

सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग वासियांसाठी एक खुशखबर आहे. मुंबई सिंधुदुर्ग विमानसेवा लवकरच चालू होणार आहे. परुळे चीपी येथील सिंधुदुर्ग विमानतळावर येत्या १८ एप्रील पासून एअर अलायन्सची मुंबई -सिंधुदुर्ग- मुंबई सेवा देणारी विमाने उतरणार आहेत. एअर अलायन्स बरोबरच इंडीगो विमान कंपनीची सेवा सुरू करण्याबाबत युध्द पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. अशी माहीती खा. नारायण राणे यांनी दिली. अलीकडेच नागरी विमान वाहतूक मंत्री के. राम मोहन नायडू यांनी याबाबत विशेष योजना अंमलात आणण्यात येईल असे माजी केंद्रीय मंत्री, खा. नारायण राणे यांना आश्वासीत केले होते. गेल्याच आठवड्यापासून सिंधुदुर्ग- पुणे विमान वाहतुक सुरुही झाली आहे.

गेले काही महिने चिपी ते मुंबई ही नियमित सुरु असलेली सेवा बंद झाली होती. ही सेवा पुनः मुंबई-सिंधुदुर्ग-मुंबई अशी सेवा सुरु करण्यासाठी उड्डाण संचालनालयाने विशेष धोरण अंमलात आणावे यासाठी खा. नारायण राणे आग्रही होते. त्यांनी नागरी विमान वाहतूक मंत्री के. राम मोहन नायडू तसेच नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेत सिंधुदुर्ग विमानतळावरील सेवा किती महत्वाची आहे, तसेच विमानतळावरील अन्य सेवा, सुविधा, समस्या यांकडे लक्ष वेधले होते. यानंतर वेगाने कार्यवाही होत सिंधुदुर्ग विमानतळावरील अनेक सेवा सुविधा अपडेट करण्यात येत आहेत. यामुळे येत्या १८ एप्रील पासून मुंबई-चिपी- मुंबई ही एअर अलायन्सची विमान सेवा दर शुक्रवारी सुरु होणार आहे. याबरोबरच इंडिगो या कंपनीची विमान सेवा मार्ग लवकरच जाहीर केला जाणार आहे.
काही त्रांत्रीक त्रूटी दुर केल्यानंतर त्याची माहीती जाहीर होईल. असे खा. नारायण राणे म्हणाले.

अलायन्स एअरने मुंबई-सिंधुदुर्गा-मुंबई दरम्यान उड्डाणे सुरू केली होती. मात्र आरसीएस चा कालावधी ऑक्टोबर २०२४ मध्ये संपला आणि ही सेवा थांबली. उड्डाण सेवा थांबवल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन आणि अर्थव्यवस्थेवर तसेच एअरलाइन वापरकर्त्यांवर वाईट परिणाम झाला आहे. पर्यटक, स्थानिक प्रवासी आणि जिल्ह्यातील अर्थव्यवस्थेला मिळणारी उभारी लक्षात घेता सिंधुदुर्गासाठी आरसीएस आणखी पाच वर्षांसाठी वाढवावी, सिंधुदुर्गासाठी अलायन्स एअर सेवा पुन्हा सुरू करावी. अशी भुमिका खा. राणे यांनी स्पष्ट केली आहे.

सावंतवाडी – सांगेली येथे अल्पवयीन मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

   Follow us on        

सावंतवाडी  : सांगेली खालचीवाडी येथे १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सोमवारी दुपारी पावणे एकच्या सुमारास ही घटना निदर्शनास आली. या मुलाचे नाव निशांत धोंडिबा नार्वेकर असून त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून सावंतवाडी पोलीस अधिक तपास करत आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, निशांत नार्वेकर हा आपल्या आई-वडिलांसोबत सांगेली खालचीवाडी येथे राहत होता. तो स्थानिक हायस्कूलमध्ये इयत्ता अकरावीत शिकत होता.सोमवारी त्याच्या घरी आई-वडील नसल्याने तो एकटाच होता. याच संधीचा गैरफायदा घेत त्याने आपल्या राहत्या घरातील खोलीचा दरवाजा बंद करून वाशाला दोरीने गळफास घेतला. ही घटना निशांतचा मामे भाऊ दर्श पोतदार याला समजताच त्याने तातडीने पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस हवालदार मनोज राऊत आणि पोलीस शिपाई संतोष गलोले यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search