Category Archives: सिंधुदुर्ग




कुडाळ: पुढील वर्षी 1 जून 2026 रोजी शाळा साळगाव क्र. 1 या शाळेला 150 वर्षे पूर्ण होत आहेत. 2025-26 हे वर्ष शतकोत्तर सुवर्णमहोत्सव वर्ष साजरे होत आहे. त्यानिमित्ताने साळगाव मित्रमंडळ व शतकोत्तर सुवर्णमहोत्सव समिती यांनी आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केले आहे. रविवार 27 एप्रिल 2025 रोजी सकाळी 8 ते 11वा. पर्यंत जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा साळगाव क्र.1 (ग्रामपंचायत कार्यालय नजीक, साळगाव, ता. कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग ) येथे हे महा आरोग्य शिबीर आहे.
या शिबिरासाठी जिल्ह्यातील नामांकित डॉक्टर डॉ. जी. टी.राणे (प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ), डॉ. अनिकेत वजराटकर (शस्त्रक्रिया तज्ञ), डॉ. मोनालिसा वजराटकर (शस्त्रक्रिया – स्त्रीरोग तज्ञ), डॉ. नेहा पावसकर -कोल्हे (नेत्ररोग – शस्त्रक्रिया तज्ञ ), डॉ. सौरभ पाटील (अस्थिरोग – शस्त्रक्रिया तज्ञ), डॉ. प्रियांका कासार _ पाटील (स्त्रीरोग – शस्त्रक्रिया तज्ञ), डॉ. नितेश साळगावकर (बालरोग तज्ञ ), डॉ. स्वप्नाली साळगावकर (आयुर्वेद आणि पंचकर्म), डॉ. चेतन परब (आयुर्वेद आणि पंचकर्म), डॉ. दत्तात्रय मडवळ (होमिओपॅथी उपचार), डॉ. राहुल गव्हाणकर (MD आयुर्वेद )हे डॉक्टर तपासणी साठी उपलब्ध असणार आहेत तसेच काही विशिष्ट आजारा बाबतीत मार्गदर्शन पण करण्यात येईल.
शिबिरात करण्यात येणाऱ्या चाचण्या – ई.सी.जी, रक्तातील साखरेची तपासणी ( डायबेटिस), रक्तदाब तपासणी, नेत्रविकार तपासणी (मोतीबिंदू व तत्सम डोळ्याचे आजार), मूळव्याध -भगेंदर अश्या दुर्धर आजाराची तपासणी, स्त्रियांच्या आजाराची तपासणी (गर्भपिशवी / मासिक पाळी / स्तनाचे आजार अशा संबंधित तपासणी), संधिवात/ आमवात किंवा हाडाच्या कुठल्याही आजार संबंधित तपासणी, लहान मुलांच्या आजार संबंधित तपासणी, इत्यादी तपासण्या करण्यात येणार आहेत. तरी साळगाव पारिसरातील ग्रामस्थानी या भव्य मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन साळगाव मित्रमंडळ व शतकोत्तर सुवर्णमहोत्सव समितीतर्फे करण्यात आले आहे.




सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चीपी विमानतळा बाबत एक महत्वाची बातमी समोर आली आहे. कोकणातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या चिपी विमानतळाच्या विकासास आता गती मिळण्याची शक्यता आहे. पुढील चार महिन्यांत चिपी विमानतळावर नाइट लँडिंगसाठी परवानगी मिळणार असून, या विमानतळावरून मुंबई सेवाही अखंडित सुरू ठेवण्याचे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले आहेत.
नुकतीच मंत्रालयात चिपी विमानतळासंदर्भात झालेल्या आढावा बैठकीत, विमानतळ विकासासाठी आवश्यक उपाययोजना आणि सुविधांच्या उभारणीबाबत सखोल चर्चा करण्यात आली. विमानतळाच्या सुशोभीकरणासाठी DPDC (District Planning and Development Council) मार्फत निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले की, “मुंबई ते चिपी दरम्यानची सेवा कुठल्याही परिस्थितीत खंडित होता कामा नये. विमानतळाच्या सर्व सुविधा तातडीने पूर्ण कराव्यात. खास करून रात्री लँडिंगला अनुमती मिळवण्यासाठी आवश्यक प्रक्रिया वेगाने राबवावी”
चिपी विमानतळासंदर्भात लवकरच विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेणार
तसेच, विमानसेवा अधिक सुलभ आणि नियमित करण्यासाठी नवीन मार्ग आणि कंपन्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्नही लवकरच होणार आहे. या अनुषंगाने विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांची लवकरच भेट घेण्यात येणार असल्याची माहितीही राणे यांनी यावेळी दिली.




दोडामार्ग: झाड तोडण्यासाठी चढलेल्या युवकाच्या पायाला वुड कटर लागून अति रक्तस्त्रावाने त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना साटेली-भेडशी येथे मंगळवारी दुपारी घडली. नागेश लाडू मयेकर (वय 40, रा. साटेली-भेडशी) असे या युवकाचे नाव आहे.
नागेश मयेकर हा साटेली-भेडशी शेजारील घोटगे गावात सहकार्यांसोबत झाड तोडण्यासाठी गेला होता. प्रथम झाडाच्या फांद्या तोडण्यासाठी तो वुड कटर घेऊन झाडावर चढला. दरम्यान फांद्या तोडण्याचे काम सुरू असताना अचानक कटर त्याचा पायाला लागला. यात त्याच्या मांडीची रक्तवाहिनी कापली गेल्याने मोठा रक्तस्त्राव झाला. त्याच परिस्थितीत त्याला साटेली-भेडशी प्राथ. रुग्णालयात आणण्यात आले. मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्यांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळताच प्राथमिक आरोग्य केंद्रात स्थानिक ग्रामस्थांसह परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली.
प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांच्याशी माहिती घेतली असता नागेश याचा अतिप्रमाणात रक्तस्राव झाल्याने मृत्यू झाला असे सांगितले. शवविच्छेदन केल्यानंतर त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. नागेश याच्या पश्चात पत्नी, मुलगा, भाऊ, भावजय, विवाहित बहीण असा परिवार आहे.




सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग वासियांसाठी एक खुशखबर आहे. मुंबई सिंधुदुर्ग विमानसेवा लवकरच चालू होणार आहे. परुळे चीपी येथील सिंधुदुर्ग विमानतळावर येत्या १८ एप्रील पासून एअर अलायन्सची मुंबई -सिंधुदुर्ग- मुंबई सेवा देणारी विमाने उतरणार आहेत. एअर अलायन्स बरोबरच इंडीगो विमान कंपनीची सेवा सुरू करण्याबाबत युध्द पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. अशी माहीती खा. नारायण राणे यांनी दिली. अलीकडेच नागरी विमान वाहतूक मंत्री के. राम मोहन नायडू यांनी याबाबत विशेष योजना अंमलात आणण्यात येईल असे माजी केंद्रीय मंत्री, खा. नारायण राणे यांना आश्वासीत केले होते. गेल्याच आठवड्यापासून सिंधुदुर्ग- पुणे विमान वाहतुक सुरुही झाली आहे.
गेले काही महिने चिपी ते मुंबई ही नियमित सुरु असलेली सेवा बंद झाली होती. ही सेवा पुनः मुंबई-सिंधुदुर्ग-मुंबई अशी सेवा सुरु करण्यासाठी उड्डाण संचालनालयाने विशेष धोरण अंमलात आणावे यासाठी खा. नारायण राणे आग्रही होते. त्यांनी नागरी विमान वाहतूक मंत्री के. राम मोहन नायडू तसेच नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेत सिंधुदुर्ग विमानतळावरील सेवा किती महत्वाची आहे, तसेच विमानतळावरील अन्य सेवा, सुविधा, समस्या यांकडे लक्ष वेधले होते. यानंतर वेगाने कार्यवाही होत सिंधुदुर्ग विमानतळावरील अनेक सेवा सुविधा अपडेट करण्यात येत आहेत. यामुळे येत्या १८ एप्रील पासून मुंबई-चिपी- मुंबई ही एअर अलायन्सची विमान सेवा दर शुक्रवारी सुरु होणार आहे. याबरोबरच इंडिगो या कंपनीची विमान सेवा मार्ग लवकरच जाहीर केला जाणार आहे.
काही त्रांत्रीक त्रूटी दुर केल्यानंतर त्याची माहीती जाहीर होईल. असे खा. नारायण राणे म्हणाले.
अलायन्स एअरने मुंबई-सिंधुदुर्गा-मुंबई दरम्यान उड्डाणे सुरू केली होती. मात्र आरसीएस चा कालावधी ऑक्टोबर २०२४ मध्ये संपला आणि ही सेवा थांबली. उड्डाण सेवा थांबवल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन आणि अर्थव्यवस्थेवर तसेच एअरलाइन वापरकर्त्यांवर वाईट परिणाम झाला आहे. पर्यटक, स्थानिक प्रवासी आणि जिल्ह्यातील अर्थव्यवस्थेला मिळणारी उभारी लक्षात घेता सिंधुदुर्गासाठी आरसीएस आणखी पाच वर्षांसाठी वाढवावी, सिंधुदुर्गासाठी अलायन्स एअर सेवा पुन्हा सुरू करावी. अशी भुमिका खा. राणे यांनी स्पष्ट केली आहे.




सावंतवाडी : सांगेली खालचीवाडी येथे १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सोमवारी दुपारी पावणे एकच्या सुमारास ही घटना निदर्शनास आली. या मुलाचे नाव निशांत धोंडिबा नार्वेकर असून त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून सावंतवाडी पोलीस अधिक तपास करत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, निशांत नार्वेकर हा आपल्या आई-वडिलांसोबत सांगेली खालचीवाडी येथे राहत होता. तो स्थानिक हायस्कूलमध्ये इयत्ता अकरावीत शिकत होता.सोमवारी त्याच्या घरी आई-वडील नसल्याने तो एकटाच होता. याच संधीचा गैरफायदा घेत त्याने आपल्या राहत्या घरातील खोलीचा दरवाजा बंद करून वाशाला दोरीने गळफास घेतला. ही घटना निशांतचा मामे भाऊ दर्श पोतदार याला समजताच त्याने तातडीने पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस हवालदार मनोज राऊत आणि पोलीस शिपाई संतोष गलोले यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.