रत्नागिरी – बारसू येथील रिफायनरीला होणारा विरोध काही कमी होण्याची चिन्हे दिसत नाही आहेत. हल्लीच येथे जमिनीचा सर्व्हे करताना विरोधकांचा खूप मोठा विरोध पाहावयास मिळाला. त्यानंतर आंदोलने, उपोषण मोर्चा या मार्गाने कमी अधिक प्रमाणात विरोध होत होता. मात्र आता विरोधकांनी विरोध करण्यासाठी एका वेगळ्याच प्रकारचा अवलंब केला आहे.
ज्याठिकाणी मातीपरीक्षण करण्यासाठी खोदले होते नेमक्या त्याच ठिकाणी ग्रामस्थांनी सरकारचे श्राद्ध मांडले होते. त्यासाठी ग्रामस्थांनी चक्क मुंडण करून सरकारच्या नावाने बोंब मारली आहे.
सरकारने येथे जी दडपशाही चालवली आहे त्याविरोधात आम्ही सरकारचे श्राद्ध मांडून पिंडदान केले आहे. सरकारची दडपशाही अशीच चालू राहिली तर एकेदिवशी सरकारचे खरे श्राद्ध घातल्याशिवाय येथील शेतकरी स्वस्थ बसणार नाही असा इशारा यावेळी ग्रामस्थांनी सरकारला दिला आहे.
राजापूर, ता. १५: रिफायनरी प्रकल्पासंदर्भातील काही आंदोलनकर्त्यांना रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रवेश करण्यास व संचार करण्यास मनाई आदेश रद्द केल्याची माहिती पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी दिली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी जारी केलेल्या मनाई आदेशान्वये रिफायनरी प्रकल्पासंदर्भातील काही आंदोलनकर्त्यांना रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रवेश करण्यास व संचार करण्यास मनाई आदेश जारी करण्यात आला होता.
बारसू परिसरात ग्रीन रिफायनरी प्रकल्पासाठी नमुने घेण्याचे काम हाती घेण्यात आले होते.जमीन सर्वेक्षण करण्याचे काम हाती घेतले होते त्याला विरोध होऊ लागला होता. प्रशासकीय कार्यवाहीत आंदोलनकर्त्यांकडून अडथळे आणले जात होते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (२) अन्वये मनाई आदेश काढले होते. त्यामध्ये काही व्यक्तींना जिल्ह्यात प्रवेश नाकारण्यात आला होता. बारसू परिसरातील पाणी नमुने घेण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यानुसार ज्या व्यक्तींना मनाई आदेश जारी करण्यात आले होते ते आता रद्द करण्यात आले आहेत. त्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व खासदार देवाप्पा अण्णा शेट्टी ऊर्फ राजू शेट्टी (रा. अर्जुनवाड रोड, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर), स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जनार्दन गुंडू पाटील (रा. परिते, ता. करवीर, जि. कोल्हापूर), अशोक केशव वालम (रा. नाणार, ता. राजापूर), जालिंदर गणपती पाटील (रा. राशिवडे बुद्रुक, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर), स्वप्नील सीताराम सोगम (रा. पन्हळेतर्फे राजापूर, ता. राजापूर), सत्यजित विश्वनाथ चव्हाण (रा. राम आंनदनगर, हाउसिंग सोसायटी, दहिसर पूर्व-मुंबई) यांचा समावेश आहे. या संबंधित रद्द आदेश निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी जारी केले आहेत.
रत्नागिरी – रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांची ताकद कमी असल्यामुळे बाहेरचे लोक हे वातावरण बिघडवण्याचे काम करीत आहेत. दिनांक 6 मे रोजी उद्धव ठाकरे रत्नागिरी येथील बारसू येथे येणार आहेत. येथे जमणाऱ्या गर्दीचा गैरफायदा घेऊन काही अनुचित प्रकार या बाहेरच्या लोकांकडून होण्याची शक्यता असल्याने योग्य ती काळजी पोलीस प्रशासनाने घ्यावी असे त्यांनी पोलिसांना आवाहन त्यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.
बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या ठिकाणी अनेक कामे सुरू असून या ठिकाणी मटेरियल सप्लायचे काम आहे सुरू झाले आहे. हीच संधी साधून जिलेटिन स्टिक सारख्या स्फोटकांचा साठा मोठ्या प्रमाणात झाला आहे. जिलेटिन सारख्या स्फोटकांचा साठा व त्यामागील गटाचा पोलीस व प्रशासनाने शोध घ्यावा याकडे लक्ष वेधण्यासाठी माजी खासदार भाजपचे प्रदेश सचिव निलेश राणे यांची सिंधुनगरी विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेतली होती.
यावेळी पुढे बोलताना निलेश राणे म्हणाले बारसू रिफायनरी परिसरात जवळपास 72 ठिकाणी बोरवेल मारण्याचे काम सुरू आहे. या ठिकाणी मटेरियल चे सप्लाय करणारे ठेकेदार बाहेरचे आहेत. व या मटेरियल सप्लाय च्या माध्यमातून व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा होण्यापूर्वी जिलेटिन स्टिक या स्फोटकांचा मोठा साठा या परप्रांतीय सप्लायरमार्फत सुरू झाला आहे. त्या ठिकाणी आंदोलकांची गर्दी होऊन काही अनुचित प्रकार घडू नये व आपल्या मतदार संघातील सर्वसामान्य नागरिकांना त्याचा त्रास होऊ नये, त्याची झळ बसू नये यासाठी ही माहिती आपण जाहीर करत आहोत, असे निलेश राणे यांनी यावेळी स्पष्ट केले. आपण तीन लोकसभा निवडणुका या मतदारसंघात लढल्या आहेत. या भागातील नागरिकांचा विरोध असला तरी त्याची तीव्रता कमी आहे या लोकांना भडकवण्याचे काम बाहेरची लोक करीत आहेत. विरोधासाठी गर्दी जमवून त्या ठिकाणी चेंगराचेंगरी किंवा अनुचित प्रकार घडविण्याचा कट सुरू झाल्याचा आपल्याला संशय आहे. याबाबतची काही माहिती काही सूत्राने माझ्यापर्यंत पोहचवली आहे. लवकरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन ही माहिती त्यांच्याकडे पोहोच करणार आहे. तसेच याबाबत पोलिसांनाही आवश्यकता भासल्यास माझ्याकडे असलेली माहिती देणार आहे. यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये व सर्वसामान्य नागरिकांना त्याची झळ बसू नये एवढी आपली प्रामाणिक अपेक्षा आहे असेही निलेश राणे यांनी स्पष्ट केले.