देवरुख: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कोकण प्रदेशाध्यक्ष रोहित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त देवरूख येथे गुरुवारी भव्य राज्यस्तरीय नांगरणी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
रोहित तांबे यांचा आज वाढदिवस साजरा करण्यात आला, यानिमित्ताने गोरगरीब विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात येणार आहेत. तसेच गुरुवार दिनांक 19 सप्टेंबर रोजी देवरुख बागवाडी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर आणि भव्य राजस्तरीय नांगरणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे .या स्पर्धेत लाखोंच्या बक्षिसांची लय लूट होणार आहे. यामध्ये घाटी व गावठी असे एकूण २० विजेत्यांना या स्पर्धेत सन्मानित करण्यात येणार आहे.
सदर स्पर्धेच्या आयोजनासाठी रोहित दादा विचार मंच , कोकण विकास संघर्ष समिती कार्यकर्ते प्रचंड मेहनत घेत आहेत .यामध्ये उद्योजक अक्षय जाधव सागर मोहिते ज्येष्ठ नेते संगम पवार मंगेश कदम भैया जाधव बाबू गोपाळ, प्रवीण सावंत शिवणे ऋतिक सावंत उजगांव, सोनू सावंत गमरे,आदी कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
मुंबई: नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भुज आणि अहमदाबादला जोडणाऱ्या देशातील पहिल्या ‘नमो भारत रॅपिड रेल्वे’ ला हिरवा कंदील दाखविला आहे. ही गाडी सर्वच बाबतीत मुंबईतील एसी लोकलच्या बाबतीत सरस आहे. मात्र प्रवास भाड्याचा विचार केला तर मुंबई एसी लोकलचे प्रवास भाडे ‘नमो भारत रॅपिड रेल्वे’ च्या जवळपास दुप्पट आहे.
नमो भारत रॅपिड रेल्वे अनेक सुविधांच्या बाबतीत मुंबई एसी लोकल च्या पुढे आहे. या गाडीचा वेळ प्रति तास १३० किमी आहे. तर गाडीत मोबाईल चार्जिंग, एलईडी प्रकाश व्यवस्था, सीसीटीव्हीची देखरेख, अद्ययावत अग्निशमन यंत्रणा आणि आरामदायक आसन व्यवस्थेत ही गाडी मुंबई एसी लोकलला मागे टाकत आहे. तर प्रवास भाड्याच्या बाबतीत मुंबई एसी लोकल पुढे आहे. उदाहरण द्यायचे झाले तर मुबईतील एसी लोकल चे चर्चगेट ते विरार सिंगल प्रवास भाडे ११५ रुपये आहे, आणि महिन्याच्या पासचे शुल्क २२०५ रुपये आहे. तेवढ्याच अंतरासाठी (५९ किलोमीटर) नमो भारत रॅपिड रेल्वेचे प्रवासभाडे अनुक्रमे ७० आणि १४१६ रुपये एवढे आहे.
याचा अर्थ मुंबईकरांना तुलनेने कमी सुविधा मिळणाऱ्या प्रवासासाठी जवळपास दुप्पट प्रवास भाडे भरावे लागत आहे. यामुळे मुंबईकर प्रवाशांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
नमो भारत रॅपिड रेल्वे ही छोट्या छोट्या शहरांना जोडणार असल्याने तिचे प्रवासभाडे तेथील प्रवाशांना परवडणारे असणे आवश्यक आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन हे भाडे ठरविण्यात आले आहे. मुंबईतील लोकल गाड्यांच्या प्रवास भाड्यात MUTP शुल्क आणि इतर शुल्कांचा समावेश असल्याने तिकीटदर तुलनात्मक दृष्टीने जास्त असतात असे रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
येत्या काही महिन्यांत मुंबई मध्ये वसई – दिवा, पनवेल – डहाणू/वसई, मुंबई – पुणे, मुंबई – नाशिक हे मार्ग नमो भारत रॅपिड रेल्वे साठी प्रस्तावित आहेत.
Vande Bharat Express:भारतीय रेल्वेकडे तयार असलेल्या 16 वंदे भारत ट्रेन धूळ खात यार्डात उभ्या असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. वंदे भारत सेवा सुरु करण्यासाठी तांत्रिक तसेच आर्थिक दृष्ट्या परवडेल अशा मार्गांची चाचपणी सुरु असून सध्या तरी असे मार्ग सापडले नसल्याने या वंदे भारत ट्रेन यार्डातच हिरव्या झेंड्याच्या प्रतिक्षेत धूळ खास उभ्या असल्याचं समजतं.
ट्रेन सुरु करण्यात अडचण काय?
रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय रेल्वे सध्या अशा मार्गांच्या शोधात आहे तिथे या वंदे भारत ट्रेन ताशी 130 ते 160 किलोमीटर वेगाने चालवता येतील. तसेच वंदे भारत ट्रेनसाठी आधुनिक सिग्नल यंत्रणेचीही गरज असल्याने या ट्रेन धूळ खात पडल्याची माहिती ‘मातृभूमी’ने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. परवडतील अशा मार्गांवर सर्वात प्रिमिअम ट्रेन्सपैकी असलेल्या वंदे भारत चालवण्याचा रेल्वेचा मानस असून आर्थिकदृष्ट्या परवडणाऱ्या मार्गांची चाचपणी सुरु आहे. इतर ट्रेनच्या वेळापत्रकामध्ये अडथळा निर्माण न करता चालवता येतील अशापद्धतीने या ट्रेनचा समावेश वेळापत्रकात करुन घेण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र असा टाइम स्लॉट अद्याप सापडलेला नाही. तसेच अनेक ट्रॅक हे हायस्पीड ट्रेनच्या वाहतुकीसाठी अद्यावत करण्यात आलेले नाही. त्यामुळेच कमी अंतरावरील अनेक मार्गांवर आवश्यकता असूनही या वंदे भारत ट्रेन सुरु करता येत नसल्याचे समजते.
सामान्यपणे 8 डब्ब्यांची एक वंदे भारत ट्रेन चालवण्यासाठी चार ते पाच ट्रेनच्या वेळापत्रकामध्ये बदल करावा लागतो. त्यामुळे एका ट्रेनचा परिमाण किमान 5 हजार प्रवाशांवर होतो. दुसरीकडे वंदे भारतमधून 500 प्रवासी प्रवास करतात. म्हणूनच वंदे भारतला स्लॉट देण्यासाठी केल्या जाणाऱ्या तडजोडीमुळे इतर प्रवाशांची नाराजी ओढावून घ्यावी लागते, असं रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. यामुळे जनतेत वंदे भारत सेवेबद्दल चुकीचा संदेश जाता कामा नये असा रेल्वेचा प्रयत्न आहे.
वंदे भारतसाठीच्या अटी
वंदे भारत चेअर कार ट्रेन एका वेळेस एका मार्गावर जास्तीत जास्त 8 तासांचा प्रवास करते. त्यामुळेच मागणी असलेल्या आणि 8 तासांमध्ये प्रवास पूर्ण होईल अशा मार्गांचा शोध सध्या सुरु आहे. तसेच वंदे भारत ट्रेन मध्य रात्री 12 पासून पहाटे 5 पर्यंत चालवल्या जात नाहीत.
कोकणात गणेश चतुर्थीस गावी जाण्यासाठी सर्वात सोयीचा आणि परवडणारा पर्याय म्हणून मुंबईचा चाकरमानी कोकण रेल्वेला प्राधान्य देतो. जायची आणि यायची कन्फर्म आरक्षित तिकिटे भेटली की तो निर्धास्त होतो. तीही न भेटल्यास दलालांकडून दुप्पट रक्कमेनेही ती विकत घेतो. मात्र गाडी पकडल्यावर याच कन्फर्म तिकिटांवर असलेला सीट नंबरच त्या डब्यातून गायब असल्यास?
हो, असे प्रकार रेल्वे प्रशासनाकडून घडत आहेत. खासकरून कोकण रेल्वे मार्गावर नियमित धावणाऱ्या जनशताब्दी एक्सप्रेसच्या प्रवाशांसोबत हे प्रकार घडत आहेत. कणकवली ते मुंबई १४ सप्टेंबर रोजी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसोबत हा प्रकार घडला आहे. या प्रवाशांकडे १२०५२ जनशताब्दी एक्सपेसची D5 या डब्याची कणकवली ते दादर सहा कन्फर्म तिकिटे होती. मात्र जेव्हा ते गाडीत चढले तेव्हा त्यांच्या सीटच उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले. त्यांच्याकडील तिकिटावर ११४,११५,११६,११७,११८ आणि ११९ असे सीट नंबर होते. मात्र या डब्यात शेवटचा सीट नंबर १०६ होता. पीएनआर चेक केले असता या तिकिट्स रद्द दाखवत होत्या. या प्रकारामुळे या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला आहे.
आरक्षण करताना कन्फर्म असणारी तिकिटे चार्ट तयार होताना रद्द होत आहेत. त्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. जनशताब्दी एक्सपेस गाडीच्या सेकंड चेअर क्लासचे आरक्षण करतेवेळी डब्यांमधील १२० सीटप्रमाणे तिकिटे उपलब्ध करून दिली जातात. मात्र काही वेळा १२० सीटचा डबा उपलब्ध नसल्याने त्याजागी १०६ सीट असलेला डबा जोडला जातो आणि १४ तिकिटे रद्द केली जातात. त्यामुळे हे सीट नंबर आलेल्या प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
मुंबई :लालबागचा राजा गणेश मंडळ दर्शनादरम्यान व्हीआयपी आणि सामान्य भाविक यांच्यात भेदभाव करत असल्याचा आरोप करत, मुंबई उच्च न्यायालयाच्या दोन वकिलांनी मुंबई पोलिसांकडे औपचारिक तक्रार दाखल केली आहे. या प्रसिद्ध मंडळामध्ये बाप्पांचे दर्शन घेताना, सामान्य लोक आणि व्हीआयपींना परस्परविरोधी वागणूक दिली जात असल्याचे दर्शवणारे व्हिडिओ व्हायरल झाल्यावर ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.
व्हिडिओमध्ये, मंडळ कर्मचारी गणेशाचे दर्शन घेताना लगेचच भक्तांना जबरदस्तीने ओढून ढकलताना दिसत आहेत, तर दुसरीकडे व्हीआयपींचा एक वेगळा गट बाप्पांच्या समोर सेल्फी घेत आहे. या प्रकाराबद्दल आशिष राय आणि पंकज मिश्रा या वकिलांनी या असमान वागणुकीबद्दल संताप व्यक्त केला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून मंडळांच्या कर्मचाऱ्यांचा हा माजोरडेपणा सुरु आह्रे. या प्रकरणाची चौकशी करण्याची विनंती या दोन वकिलांनी मुंबई पोलीस आयुक्तांना केली असून, त्यांच्या तक्रारीच्या प्रती राज्य महिला आयोग, राज्य मानवाधिकार आयोग, राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, माननीय मुंबई उच्च न्यायालय आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांना पाठवल्या आहेत.
आशिष राय म्हणाले, हे मंडळ जगप्रसिद्ध आहे. इथे चांगला पोलीस बंदोबस्त आहे, तरीही ही सुरक्षा व्हीआयपींपुरती मर्यादित आहे. सामान्य भाविकांना असे संरक्षण मिळत नाही. मंडळाच्या आर्थिक स्त्रोतांचा विचार करून, या असुरक्षित गटांना प्राधान्य दिले पाहिजे. भक्तांना तक्रारी नोंदवण्यासाठी घटनास्थळी तक्रार पेटी बसवण्याची मागणीही त्यांनी केली आहे. राय यांच्या मते, मंडळामधील कर्मचारी अप्रशिक्षित आहेत आणि त्यांच्याकडे मूलभूत मानवी व्यवस्थापन कौशल्यांचा अभाव आहे. हा मुद्दा वर्षानुवर्षे कायम आहे, आणि व्हायरल व्हिडिओमुळेच समोर आला आहे. पुढच्या वर्षीच्या गणेशोत्सवात याबाबत सुधारणा न झाल्यास हे प्रकरण न्यायालयात नेले जाईल, असे त्यांनी सांगितले.
I see only solution to this demeaning treatment is to boycott by the common men and women and declare Lalbaug cha Raja as VIP only. pic.twitter.com/oRqmLTHyXR
Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटाला पर्याय असलेल्या दोन बोगद्यापैकी एका बोगद्याअंतर्गत अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी २० सप्टेंबरपासून बंद करण्यात येणार आहे.
या महामार्गावरील एक बोगदा या आधीच एका वर्षांपूर्वी पूर्णपणे वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. एक वर्षानंतर अपूर्ण असलेला दुसरा बोगदाही गणेशोत्सवाच्या तोंडावर मुंबईहून कोकणात जाणाऱ्या वाहनांसाठी सुरू करण्यात आला. त्यामुळे चाकरमान्यांचा प्रवास सुरळीत झाला तरीही माणगाव, इंदापूर, कोलाड या दरम्यान महामार्गावरील अपूर्ण असलेल्या कामामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात दाखल होणाऱ्या गणेशभक्तांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागला होता. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग व स्थानिक वाहतूक कर्मचाऱ्यांच्या मदतीने ही वाहतूककोंडी, मोकळी केली होती. पाच दिवसांचे गौरी-गणपती विसर्जन आणि अनंत चतुर्दशा झाल्यानंतर परतीचा प्रवास सुखाचा व्हावा या दृष्टीने राष्ट्रीय बाधकाम विभाग आणि स्थानिक वाहतूक पोलिस यांनी योग्य नियोजन केले होते.
त्यामुळे या परिसरात कुठेही वाहतूककोंडी झालेली नाही. गौरी- गणपती विसर्जन आटपून परतणाऱ्या चाकरमान्यांना वाहतूककोंडींचा फारसा फटका बसला नाही. कशेडी घाटाला पर्याय असलेल्या दोन्ही बोगद्यातील खवरदारीचा उपाय म्हणून बांधकाम खात्याने विशेष काळजी घेतली. दोन्ही बोगद्यातून प्रवास करताना वाहनांचा वेग कमी ठेवण्यात आला होता. दोन्ही बोगद्यांच्या प्रवेशद्वारावर सुरक्षा कर्मचारी नेमण्यात आले होते. त्यामुळे कशेडी घाटातून येण्याचा चाकरमान्यांचा वेळ वाचला आहे.
कशेडी येथील दुसऱ्या बोगद्यातील कामे अपूर्ण आहेत. ती पूर्ण २० सप्टेंबरपासून कार्यवाही करण्यात येणार आहे कामे पूर्ण करण्यासाठी पुढील एक ते दीड महिन्यासाठी बंद ठेवण्यात येईल अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अभियंता पंकज गोसावी यांनी दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय रेल्वेच्या पहिल्या ‘वंदे मेट्रो ट्रेन’ सेवेला हिरवा झेंडा दाखवला. मेट्रो ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यापूर्वी रेल्वे मंत्रालयाने अधिकृतपणे वंदे मेट्रोचे नाव बदलून ‘नमो भारत रॅपिड रेल्वे’ असे केले. भारतीय रेल्वेची पहिली वंदे मेट्रो ही गुजरातमधील अहमदाबाद आणि भुज दरम्यान धावणार आहे. ही गाडी पूर्णपणे अनारक्षित स्वरूपाची असणार असून वातानुकूलित असणार आहे. या गाडीचे प्रवासभाडे सामान्य जनतेला परवडणारे आहे.
‘नमो भारत रॅपिड रेल्वे’ ही अहमदाबाद-भुज दरम्यान धावणार असून ती ९ स्थानकांवर थांबणार आहे, ताशी १३० किलोमीटर असा वेग असणार आहे. अहमदाबाद-भुज दरम्यानचे ३६० किलोमीटरचे अंतर ५.४५ तासात कवर करेल. आठवड्यातून सहा दिवस ही ट्रेन धावणार आहे. अहमदाबाद-भुज या वंदे मेट्रोचा क्रमांक-९४८०१ असून, शनिवारी ही धावणार नाही. तर भुज-अहमदाबाद वंदे मेट्रोचा क्रमांक- ९४८०२ असून, ही रविवारी धावणार नाही. १७ सप्टेंबरपासून अहमदाबादहून सुटणाऱ्या ट्रेनसह प्रवाशांना नियमित सेवेचा लाभ घेता येणार आहे. संपूर्ण ट्रिपचे भाडे ४५५ रुपये असेल.
कोकणात आई-वडिलाच्या घरातच गणपती बसतो. आई वडीलाच्या पश्चात थोरल्या मुलाच्या घरी किंवा जो आई वडिलाच्या घरात राहतो, फक्त त्यालाच गणपती बसवण्याचा अधिकार असतो, हा तेथील कडक सामाजिक नियम आहे.
नोकरीच्या निमित्ताने चार भावांची शहरात किंवा गावात चार घरे असली तरी, मुळ घरातच गणपती एकच बसवतात व सर्व भाऊ व त्यांची बायका, मुले तिथे एकाच चुलीवर, दहा दिवस जेवण बनवून त्या घरात राहतात. भावा भावात कितीही भांडणे असले तरी, या दहा दिवसात एकत्र राहणे, एकत्रच स्वयंपाक करून जेवणे व तिथेच झोपणे हा तिथला कडक नियम आहे.
असे गणपतीमुळे एकत्र आल्याने, कधी कधी जुने भावांतील वाद एकत्र आल्याने मिटले जातात. नाही मिटवायचे तरी दहा दिवस कोणीही घरात वाईट बोलणे, भांडण करणे मनाई असते, नाहीतर देवाचा कोप होईल या श्रध्देने सर्वजण मोठी माणसे एकत्र आनंदाने राहतात. मुले तर लगेच एकमेकांत मिसळून जातात.
कोकणात या गणपती सणाच्या निमित्ताने आपलं घर, संपूर्ण गावं भरून जातं. आपुलकीला उधाण येतं. माणसं एकत्र येतात, भेटतात, भजने, दशावतार, शक्ती तुरा नाच, नमन भारुड,कथा इत्यादी रात्री कार्यक्रम उत्साहात करतात. आणि पुन्हा आपापल्या शहरात पोटं भरण्यासाठी गणपती सणानंतर निघून जातात.
गणपतीत झालेली माणसांची गर्दी आणि दारासमोर झालेली पादत्राणांची, पाऊलांची दाटी, दहा दिवस सर्व कुटुंब एका छताखाली येणं, गुण्या गोविंदाने रहाणं आणि सुख-दुःखाच्या गप्पा गोष्टी करणं. पोरांनी आई म्हणून मारलेली प्रेमळ हाक, दिरानी वहिनींकडे हक्काने मागीतलेला कपभर चहा, तुम्ही राहू द्या, मी करते असा एका जावेने, दुसऱ्या जावेला केलेला प्रेमळ हट्ट हे कोकणात गावा गावात, घरा-घरात पहायला मिळते. योग्य वेळी, योग्य वागणं आणि घर नावाच्या मंदिराच्या भिंतीला तडे न जाऊ देणं, हे सर्व कोकणाच्या बाहेर प्रेम, माया संपत चालली आहे.
एक भाऊ कारमधून फिरतोय आणि एकाकडे सायकल पण नाही. एका आई वडिलाची मुले पण द्वेष, मत्सर वाढत चाललाय. त्यांने मोटारसायकल घेतली की, लगेच दुसरा भाऊ कर्ज काढून कार घेतोय, ही कोकण बाहेरील परिस्थिती आहे. दुसऱ्या भावाला मदत करायची नाही या ईर्षेने एक एक भाऊ पेटलेला आहे. आपल्याच आई वडिलाचा विसर पडलेला आहे तर मग गावटगे बसलेत तुमच्या काडी लावायला व सर्रास भाऊ याला बळी पडतात.
संपत्तीवरून बहीणीत वाद आहेत तर तिच्याकडे बघत पण नाहीत. काय मागते ते द्या ना. बहीण, भावापुढे कसला स्वार्थ धरता रे? एकाच आईच्या उदरातून येवून माता ऐवजी मातीसाठी, जमीनीसाठी भांडता, हे केवढे कुटुंबाचे दुर्दैव आहे. सुधरा, नाहीतर नरक आहे का नाही माहिती नाही पण तिथे सुद्धा जागा मिळणार नाही.
कोकणासारखे वागून बघावे, कोकणात एकाही शेतकऱ्यांने आजपर्यंत आत्महत्या केली नाही. तिकडे चार एकर म्हणजे मोठा शेतकरी. कोकण बाहेर दहा एकरवाला आत्महत्या करतोय त्याला कारण मोठेपणा व विभक्त कुटुंब पद्धतीमुळे विचाराची देवाणघेवाण होत नाही व रात्री मुड बनला की, घेतला फास.
साधेपण जपावा, कुटुंबाने वर्षातून दहा दिवस अशा सणाला एकत्र येवून घरी दरवर्षी कोकणा प्रमाणे दहा दिवसाचा सण साजरा करावा. गौराई बसवतात तसे दोन दिवस बहीणीला घरी बोलवून मातीच्या गौराईवर प्रेम करतात, तसे आपल्याच बहिणीला वडे आदी सागोती नाही जमले तर, कमीत कमी पुरणपोळी घासाचा तिला पाहुणचार केला पाहीजे,
जीवंत आई-बापानी हे पाहिले तर ते गदगद् होतील व नसतील तर त्यांचा आत्मा सर्वास एकत्र पाहून आनंदीत होईल,
ही भोळी अपेक्षा जरी असले तरी, प्रेम कुटुंबाचे एकत्रित येण्यामुळे द्विगुणित होईल व पुढील वर्षासाठी भावांचे बहिणींचे, भावा भावांचे एकमेकाला चांगले आर्शिवाद मिळतील, यात तिळमात्र शंका नाही.
Mumbai Goa Highway: मुंबई गोवा महामार्गावरून येणार्या-जाणार्या वाहनांची नोंद झाली असून मागील ९ दिवसांत सुमारे ७ लाख या मार्गावरून गेल्या आहेत.
महामार्गावरुन गणेशोत्सवाकरिता कोकणात जाणार्या व येणार्या चाकरमान्यांचा प्रवास निर्विघ्नपणे होण्याकरिता खारपाडा येथे कोकणात जाणार्या सर्व प्रकारच्या वाहनांची नोंद रायगड पोलीसांच्या विशेष यंत्रणेच्या माध्यमातून घेतली गेली होती. या नोंदी नुसार आज पर्यंत नऊ दिवसात अंदाजे सात लाख गाड्या महामार्गावरून धावल्या आहेत. बाप्पाच्या विसर्जनानंतर रविवार दुपारी ३ वाजल्या पासून पुन्हा मुंबई, गुजरातच्या दिशेने येणार्या या वाहन संख्येमध्ये वाढ होत असून मोठ्या प्रमाणात वाहने परतीचा प्रवास करत आहेत.
दिवस रात्रभर सुरू असणारा सदरचा प्रवास पहाटे पर्यंत सुरूच होता. परतीच्या प्रवासासाठी सुद्धा मुंबई-गोवा महामार्गावर ठिकठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. मुंबई- गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरु असून माणगाव जवळ बायपासचे काम अपूर्ण असल्याने माणगाव- कोलाड बाजारपेठेत वाहतुकीचा ताण पडत आहे.
महामार्गावरील चाकरमान्यांचा प्रवास निर्विघ्न, सुखकर आणि वाहतूक कोंडी विना व्हावा याकरिता महामार्गाच्या खारपाडा ते कशेडी या रायगड जिल्ह्याच्या हद्दीत रायगड जिल्हा पोलीस दलातील १६३ पोलीस अधिकारी आणि १ हजार ७०० पोलीस जवान २४ तास तैनात करण्यात आले आहेत. तर अवजड वाहनांची बंदी आदेश मोडणार्या अंदाजे ५० हुन अधिक अवजड वाहनांवर रायगड पोलीसांनी कारवाई केली आहे.
KRCL Recruitment: कोकण रेल्वेने KRCL विविध स्तरावरील पदांसाठी भरती जाहीर केली आहे. कोकण रेल्वे प्रशासनाने विविध पदांसाठी आणि एकूण १९० जागांसाठी नोकर भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीत या पदांसाठी स्थानिकांना प्रथम प्राधान्य देणार असल्याचेही जाहीर करण्यात आले आहे. जाहीर केलेल्या पदांसाठी दिनांक १६ सप्टेंबर २०२४ ते ०६ ओक्टोम्बर २०२४ अशी अर्ज करण्याची मुदत असणार आहे.
लेवल १ ते ७ पदांसाठी ही भरती असणार असून वेतन श्रेणी १८००० ते ४४९०० प्रति महिना असणार आहे. तर वयोमर्यादा १८ ते ३६ अशी आहे. विविध प्रवर्गातील उमेदवारांसाठी जागा राखीव ठेवण्यात आल्या असून वयाच्या अटी नियमाप्रमाणे शिथिल केल्या आहेत.
कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांसाठी तसेच स्थानिकांसाठी प्राधान्य
या भरतीत प्राधान्यक्रम ठरवून दिला आहे. पहिले प्राधान्य महाराष्ट्र,गोवा आणि कर्नाटक या राज्यातील कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांसाठी देण्यात येईल. त्यानंतर कोकण रेल्वे मार्ग या तिन्ही राज्यातून ज्या भागातून गेला त्या त्या जिल्ह्यातील उमेदवारांना देण्यात येईल. तिसरे प्राधान्य महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तिन्ही राज्यातील उमेदवारांना तर त्यानंतर सध्या कोकण रेल्वेच्या सेवेत असलेल्या उमेदवारांना देण्यात येणार आहे