Category Archives: महाराष्ट्र

मुंबई गोवा महामार्गाचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करणार; नितीन गडकरी यांची ग्वाही

   Follow us on        

नवी दिल्ली : मुंबई-गोवा महामार्गवरील परिस्थितीमुळे मला रोज प्रवाशांची नाराजी सहन करावी लागते. ही नाराजी वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून समजते. यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी या महामार्गचे काम पूर्ण करू, अशी ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

याशिवाय दिल्ली- मुंबई या महत्त्वाकांक्षी महामार्गचे काम या वर्षात पूर्ण होईल, असेही गडकरी यांनी सांगितले.

केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशाच्या वाहतूक मंत्र्याची ४२ वी बैठक भारत मंडपम येथे पार पडली. यावेळी पत्रकारांशी बोलताना गडकरी यांनी अपघातांत मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या वाढत्या संख्येवर खंत व्यक्त केली. सरकारने कॅशलेस उपचारांची व्यवस्था केली गेली आहे. अपघातात जखमी व्यक्तीचा ७ दिवस उपचार किंवा १.५ लाखांचा खर्च मंत्रालय करणार आहे, असे त्यांनी सांगितले.

बेळगाव-चंदगड-सावंतवाडी रेल्वेसाठी प्रयत्न करणार: खा. धनंजय महाडिक

   Follow us on        

कोल्हापूर: बेळगाव-चंदगड सावंतवाडी रेल्वे लवकरात लवकर सुरू करण्यासाठी मी स्वतः जातीने लक्ष घालीन. रेल्वे मंत्र्यांना लवकरच भेटून निधी आणण्यासाठी प्रयत्न करीन, असे आश्वासन खा. धनंजय महाडिक यांनी बेळगाव, चंदगड, सावंतवाडी रेल्वे संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाला दिले.

बेळगाव-चंदगड, सावंतवाडी रेल्वे हा रेल्वे मार्ग ११४.६ कि.मी.चा असून जवळपास १८०५ करोडचा खर्च अपेक्षित आहे. या रेल्वे मार्गाचा सर्व्हे रेल्वे मंत्रालयाकडून करण्यात आला असून या रेल्वे मार्गामुळे चंदगड, आजरा व गडहिंग्लज या तालुक्याचा विकास अपेक्षित आहे. त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्याचा दक्षिण विभाग रेल्वे मार्गाने देशाशी जोडला जाईल. या संदर्भात कोल्हापूर, बेळगावचे खासदार यांना प्रत्यक्ष भेटून संघर्ष समितीने निवेदने दिली आहेत.

खा. महाडिक यांना नेसरी येथे बेळगाव, चंदगड, सावंतवाडी रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश दळवी यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे सुरू करण्यासंदर्भात चर्चा करून निवेदन देण्यात आले. यावेळी कार्याध्यक्ष विजयकुमार दळवी, भाजप नेते संग्रामसिंह कुपेकर, चंदगड पंचायत समितीचे माजी सभापती बबनराव देसाई, संघर्ष समितीचे सरचिटणीस रवी नाईक, एकनाथ वाके आदी उपस्थित होते.

Konkan Coastal Highway: रेवस ते रेड्डी महामार्गाच्या ‘वाटेत’ पहिला अडथळा

   Follow us on        

अलिबाग: प्रस्तावित रेवस ते रेड्डी या मुंबईला थेट कोकणाशी जोडणाऱ्या या महत्त्वाकांक्षी करंजा (उरण) ते रेवस (अलिबाग) या बहुप्रतीक्षित सागरी पुलाच्या जोड मार्गिकेला करंजा ग्रामस्थांनी आक्षेप नोंदविला आहे.  एमएसआरडी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर ग्रामस्थांनी आपल्या हरकती नोंदविल्या आहेत. यावेळी ग्रामस्थांनी तत्कालीन मुख्यमंत्री अ. र. अंतुले यांच्या १९८० च्या आराखड्यानुसार मार्गिका द्यावी अशी मागणी केली आहे. यासाठी प्रशासनाला निवेदनही देण्यात आले आहे.

रामायणातील पौराणिक काळापासून द्रोणागिरी पर्वत सर्वांनाच माहीत आहे. अनेक आयुर्वेदिक वनस्पती, औषधी संजीवनी याच डोंगराच्या कडेकपारीमध्ये आहेत. या परिसरात डोंगरदेवी म्हणून प्रसिद्ध पावलेल्या करंजा ग्रामस्थांचे आराध्यदैवत असलेल्या द्रोणागिरी मातेवर भाविकांची श्रद्धा आहे. मात्र या पौराणिक काळातील द्रोणागिरी पर्वताला पोखरून करंजा-रेवस सागरी सेतूची निर्मिती करण्याचा प्रयत्न शासनाकडून सुरू आहे. त्यामुळे उरणकर, भाविक तसेच गडप्रेमींमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ(एमएसआरडीसी) च्या माध्यमातून नव्याने हा मार्ग उभारण्यात येत आहे. प्रस्तावित रेवस ते रेड्डी या मुंबईला थेट कोकणाशी जोडणाऱ्या या महत्त्वाकांक्षी सागरी महामार्गाच्या जोड मार्गिकेला करंजा ग्रामस्थांनी आक्षेप नोंदविला आहे. याची दखल घेत एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळाला भेट देऊन शेतकरी आणि ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेतले. उरणच्या करंजा ते अलिबाग येथील रेवस दरम्यानच्या दोन किलोमीटर लांबीच्या पुलाचे भूमिपूजन १४ ऑक्टोबरला तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले आहे. २ हजार ४७८ कोटी रुपयांची निविदा या पुलाच्या उभारणीसाठी मागविण्यात आली आहे. या पुलाची एकूण लांबी ही १०.२०९ किलोमीटर आहे. मुंबईतील सागरी अटल सेतू मार्गे द्रोणागिरी नोड येथून या पुलावरून कोकणात हा प्रवास करता येणार आहे. नियोजित रेड्डी ते रेवस मार्गापूर्वी महाराष्ट्र शासनाच्या वतीने १९८० साली महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री अ.र अंतुले यांनी करंजा ते रेवस मार्गाची घोषणा केली होती. यावेळी भूसंपादनाची प्रकिया राबवून प्रत्यक्षात कामाला सुरुवात सुद्धा करण्यात आली होती. परंतु काही कारणास्तव सत्ताबदल होऊन अंतुले यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागल्याने या पुलाचे काम बंद झाले होते.

प्रवाशाचा जीव वाचवण्यासाठी मोटरमनने गाडी दीड किलोमीटर मागे घेतली

   Follow us on        

मनमाड : मुंबई वरून नांदेड कडे जाणारी तपोवन एक्सप्रेस मनमाड यार्डात (हद्दीत) आली असतांना एक प्रवाशी पडला असल्याचे समजले आणि काय मग रेल्वे ड्रायव्हर आणि गार्डने थेट एक ते दिड किलोमीटर मागे घेतली व इतर प्रवाशांच्या मदतीने जखमी असलेल्या सहप्रवाशाला गाडीत टाकून मनमाड रेल्वे स्थानकावर आणले व उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

याबाबत सविस्तर वृत्त असे की मुंबई नांदेड तपोवन एक्सप्रेस मुंबईवरून नांदेड कडे जात असताना मनमाड नजीक अर्थात मनमाड आल्यानंतर या गाडीतून एक प्रवासी पडल्याची घटना घडली गाडी पुढे गेली असता शेवटच्या बोगीत असलेल्या गार्डच्या लक्षात हा प्रकार आला गार्डने तात्काळ इंजिन ड्रायव्हरसोबत संपर्क साधला व सर्व कल्पना दिली ड्रायव्हरला सर्व माहिती मिळेपर्यंत गाडी दीड ते दोन किलोमीटर पुढे निघून आली होती. ड्रायव्हरने तात्काळ गाडी थांबवली व दोन किलोमीटर गाडी मागे घेतली सहप्रवाशांना घेऊन गाडीच्या गार्डने जखमी प्रवाशाला गाडीत टाकले.

रेल्वे स्थानकावर तात्काळ रुग्णवाहिका ही उपलब्ध करून देण्यात आली. जखमी प्रवाशाला उपजिल्हा रुग्णालयात घेऊन जाताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. रेल्वे ड्रायव्हर गार्ड व इतर प्रवाशांचे अथक प्रयत्न करूनही तो प्रवासी वाचू शकला नाही. तो प्रवासी कोण होता कुठला होता याबाबत कोणत्याही प्रकारची माहिती मिळू शकली नाही. याबाबत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

मुंब्रा माफीनामा प्रकरणी दोन्ही बाजूने गुन्हे दाखल

   Follow us on        

ठाणे: मराठीची मागणी केली म्हणून तेथील जमावाने मराठी मुलाला माफी मागायला लावली आणि हा माफीचा विडिओ सोशल माध्यमांवर व्हायरल केला होता. या प्रकरणाची मुंब्रा पोलिसांनी दखल घेतली असून या प्रकरणी दोषींवर विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची मुंब्रा पोलीस ठाण्याला भेट 

मुंब्रा येथे घडलेल्या प्रकरणी मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली असून त्यांनी काल शुक्रवारी मुंब्रा पोलीस ठाण्याला भेट देवून त्या जमावातील दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली.

मुंब्रा पोलिसांनी जाहीर केलेली प्रेसनोट

मुंब्रा पोलीस स्टेशनच्या हद्दीत दि.०२/०१/२०२५ रोजी रोजी १५:३० वा.सु कौसा आयडियल मार्केट, अंबाजी मेडिकल समोर कौसा, मुंब्रा, ता. जि. ठाणे येथे एक मराठी युवक फळ विक्रेताकडुन फळे विकत घेताना फळविक्रेता यास मराठीत बोलण्याची विनंती केली असता फळविकत्याने मराठी युवकासोबत हुज्जत घातली होती. सदरवेळी फळ विक्रेता याने एस.डी.पी.आय. पक्षाचे पदाधिकाऱ्यांना बोलावुन गर्दी जमा केली तसेब सदर जमलेल्या गर्दीतील लोकांनी मराठी युवकास घेराव करून त्यास कान पकडुन माफी मागण्यास सांगीतली व सदरवेळी त्याचा हिडीओ बनवुन तो सोशल मिडीयावर प्रसारीत केला होता.

सदरचा हिडीओ सोशल मिडीयावर प्रसारीत झाल्याने तसेच विविध न्युज चॅनेलवर प्रसारीत झाल्याने मराठी व हिंदी भाषीक यांच्यात तेढ निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली होती. सदरचा व्हिडीओ मुंब्रा पोलीस स्टेशनला प्राप्त होताच त्यांनी नमुद प्रकरणाची तात्काळ गंभीर दखल घेवुन सदर फळ विक्रेता शोएब मोहम्मद नसीम कुरेशी, व्हिडीओमधील एस.डी.पी.आय. पक्षाचे पदाधिकारी अब्दुल रहेमान दिलशाद अन्सारी, उजेर जाफर आलम शेख तसेब २० ते २५ अनोळखी इसम यांचे विरुध्द मुंब्रा पोलीस स्टेशन येथे सरकारतर्फे गु.र.नं.१२/२०२५ म.पो.का. कलम ३७ (३)१३५ प्रमाणे तसेच फिर्यादी मारूती गवळी यांचा जबाब नोंद करून भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १९६, १३५, ३५३(२), ३५१ (२) (३), ३५२, १२७ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच सदर गुन्हयातील आरोपीत यांची ओळख पटवुन त्यांचा शोध घेवुन त्यांचे विरुध्द सदर गुन्हयावे अनुषंगाने पुढील कार्यवाही करण्यावी तजविज ठेवण्यात आली आहे.

नमुद गुन्हयाच्या तपास मा. पोलीस आयुक्त श्री आशुतोष डुंबरे, सह पोलीस आयुक्त श्री ज्ञानेश्वर वव्हाण, अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) श्री विनायक देशमुख, पोलीस उप आयुक्त श्री सुभाष बुरसे, सहा. पोलीस आयुक्त श्री उत्तम कोळेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अनिल शिंदे, यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी सपोनि / लोंढे हे करीत आहेत.

MSRTC: आपली एसटी बस वेळेवर येणार की उशिरा? आता समजेल फक्त एका क्लिकवर..

   Follow us on        

पुणे: प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी आता अपग्रेड होत आहे. आता राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमध्ये ‘व्हेइकल ट्रॅकिंग सिस्टिम’ (व्हीटीएस) ही यंत्रणा विकसित करण्यात आली असून, प्रणालीची यशस्वी चाचणीही नुकतीच करण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच ही सुविधा सुरू होणार आहे. या सुविधेमुळे ‘एसटी’चा ठावठिकाणा प्रवाशांना आता एका क्लिकवर पाहता येणार आहे

‘एसटी’महामंडळातर्फे प्रवाशांच्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाच्या धर्तीवर बसची माहिती सहज समजण्यासाठी समजण्यासाठी ऑनलाईन ‘व्हीटीएस’ यंत्रणा विकसित करण्यात आली आहे. सद्यास्थितीला एसटी महामंडळातील १६ हजारांहून अधिक नव्या-जुन्या बसमध्ये ‘व्हीटीएस’ ही आधुनिक यंत्रणा बसविण्यात आली आहे. या यंत्रणेची विविध पातळ्यांवर चाचण्या करण्यात आल्या. यातून समोर आलेल्या तांत्रिक त्रुटी दूर करण्यात आल्या असून, प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात आलेली चाचणीदेखील यशस्वी झाली आहे. अॅप विकसित करण्याचेही काम सुरू आहे

जशी रेल्वे प्रवाशांना नियोजित गाडी सध्या कुठे आहे, हे तातडीने कळते. त्याचप्रमाणे आता आरक्षण केलेल्या किंवा अपेक्षित बसची माहिती कोठे आहे, किती अंतरावर आहे, बस बिघडली आहे किंवा नाही, किती विलंब होणार आहे, याची माहिती एका क्लिकवर समजणार आहे.

मुंबई गोवा महामार्गावर मोठा अपघात; तिघांचा मृत्यू

अलिबाग : मुंबई-गोवा महामार्गावर महाड येथील वीर स्थानकाजवळ मध्यरात्री भीषण अपघात झाला. यात तिघांचा मृत्यू झाला असून तीनजण गंभीर जखमी आहेत. त्यांना महाड येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.गाडीतील डिझेल संपल्याने स्कॉर्पिओ जीप वीर स्थानकाजवळ बंद पडली होती. त्यामुळे गाडी रस्त्याच्या कडेला लावून प्रवासी गाडी शेजारी उभे होते. यावेळी मागून आलेल्या भरधाव टोईंग व्हॅनने बंद पडलेल्या स्कॉर्पिओला जोरदार धडक दिली. यात गाडी शेजारी असलेले सहा जण गंभीर जखमी झाले.

टोईंग व्हँनची धडक इतकी जोरात होती, की स्कॉर्पिओ गाडी पन्नास फूट लांब जाऊन सर्व्हिस रोडच्या पलीकडे असलेल्या खड्ड्यात जाऊन पडली. या दुर्घटनेत सूर्यकांत मोरे, साहिल शेलार (वय वर्ष २५) आणि प्रसाद नातेकर (वय वर्ष२५) सर्व रहाणार कुंभार आळी, महाड यांचा मृत्यू झाला. तर समिप मिंडे (वय वर्ष ३५) रहाणार दासगाव, सुरज नलावडे (वय वर्ष ३४) रहाणार चांभार खिंड आणि शुभम माटल (वय वर्ष २६) शिरगाव हे जखमी झाले आहेत.

घटनेची माहिती मिळताच पोलीस, तसेच स्थानिक बचाव यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी जखमींना महाड येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यापुर्वी तिघांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी टोईंग व्हॅन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे.

समृद्धी महामार्गावर एकाच वेळी २० हून अधिक वाहने पंक्चर; कारण काय?

   Follow us on        

मुंबई : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावरील वाशिम येथे रविवारी २० हून अधिक वाहने टायर पंक्चर झाल्याने बंद पडली. काही समाजकंटक समृद्धी महामार्गावर खिळे टाकून वाहने पंक्चर करीत असल्याचा आरोप यानिमित्ताने होत होता. मात्र, हा आरोप महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) फेटाळून लावला आहे. समृद्धी महामार्गावर कोणीही खिळे टाकलेले नाही. समृद्धी महामार्गावर वाशिम येथे रविवारी रात्री एक अतिशय वजनदार पत्रा पडला होता. या लोखंडी पत्र्यावरून वाहने गेल्यामुळे टायर पंक्चर झाल्याचे उघडकीस आले आहे.

समृद्धी महामार्गामुळे नागपूर-इगतपुरी प्रवास अतिवेगवान झाला आहे. मात्र, त्याच वेळी वाढत्या अपघातांमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. वाशिम येथे समृद्धी महामार्गावर रविवारी रात्री वाहने बंद पडण्यास सुरुवात झाली. काही मिनिटांतच २० हून अधिक वाहनांचे टायर पंक्चर झाल्याचे निदर्शनास आले. ही सर्व वाहने महामार्गाच्या एका बाजूला लावण्यात आली. यासंबंधीची माहिती मिळताच संंबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. वाशिममधील पॅकेज ५ मधील साखळी क्रमांक २२२/५२० येथे ही घटना घडली. येथून जाणाऱ्या एका ट्रकमधील वजनदार लोखंडी पत्रा येथे पडला होता. त्यावरून गेलेली वाहने पंक्चर झाल्याचे निष्षन्न झाले. दरम्यान, अधिकाऱ्यांनी तत्काळ रस्तारोधक उभारून घटनास्थळाचा भाग वाहतुकीसाठी बंद केला. त्यानंतर मालेगाव पथकर नाक्यावरून क्रेन मागवून पत्रा हटविण्यात आल्याची माहिती एमएसआरडीसीकडून देण्यात आली. टायर पंक्चर झालेल्या वाहनांचे वाहनचालक आणि प्रवाशांसाठी खाण्यापिण्याची सोय करून त्यांना सुरक्षित ठिकाणी रस्त्याच्या एका बाजूला बसविण्यात आले. तसेच, वाहनांची योग्य ती दुरुस्ती करून देण्यात आली.

मुंबई आणि ठाण्यात लवकरच दिसणार केबल टॅक्सी

   Follow us on        

मुंबई: रस्त्यावरची ट्रॅफीक हवेत नेण्यासाठी परिवहन परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी जबरदस्त प्लान बनवत आहेत. मुंबई आणि ठाण्यात केबल टॅक्सी सुरु केली जाणार आहे. मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यात रस्ते वाहतुकीवर येणारा ताण कमी करण्यासाठी एमएमआर क्षेत्रात भविष्यात केबल टॅक्सी सुरू करण्यात येणार आहे. केबल टॅक्सी प्रकल्प हा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. सध्या युरोपियन देशांमध्ये केबल टॅक्सी सेवा सुरू आहे. बंगळुरूतील रोप वे वाहतुकीचा अभ्यास करुन अहवाल तयार केला जाणार आहे. याच्या मदतीनेच मुंबई आणि ठाण्यात केबल टॅक्सी सुरु केली जाणार आहे. सध्या महाराष्ट्रात कुठेही केबल टॅक्सी कुठेच सुरु नाही. केबल बोर्न टॅक्सी ही रोप वे प्रमाणे काम करेल. यामध्ये एका वेळी 15-20 प्रवाशांची वाहतूक करता येईल. हा प्रकल्प मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटी (एमएमआरडीए) च्या अंतर्गत नसून राज्य सरकारच्या परिवहन विभागाच्या अंतर्गत असेल असे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. आपण मेट्रो चालवू शकलो तर केबल टॅक्सी चालवायला काहीच हरकत नाही, कारण रोप वे बांधण्यासाठी आपल्याला जास्त जमीन लागणार नाही असेही असे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक म्हणाले.

सरनाईक यांच्या आधी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनीही केबल टॅक्सी हे वाहतुकीचे उत्तम साधन असल्याचे सांगितले होते. केबल टॅक्सी पॉड टॅक्सी म्हणूनही ओळखली जाते. केबल टॅक्सी वीज आणि सोलर एनर्जीवर चालते. हे वाहतुकीचे अतिशय पर्यावरणपूरक साधन आहे.

 

 

 

Per Capita Income: राज्यात कोकणच ‘श्रीमंत’

   Follow us on        
Per Capita Income: दरडोई उत्पन्नात कोकण विभागाने नेहमीप्रमाणे आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. २०२३-२४ वर्षाच्या आर्थिक सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे.
कोकण प्रदेशात सर्वाधिक दरडोई उत्पन्न ३,६४,६६८ रुपये एवढे आहे, जे इतर प्रदेशांच्या तुलनेत लक्षणीयरित्या जास्त आहे. मुंबई आणि ठाणे यासारख्या शहरांच्या समावेशामुळे या भागात दरडोई उत्त्पन्न जास्त आहे.
तर पुणे २,७७,४५३ रुपये दरडोई उत्पनासह दुसऱ्या क्रमांकावर आहे, त्यानंतर नागपूर विभाग २,२५,७५५ रुपये दरडोई उत्पन्नासह तिसऱ्या क्रमांकावर आहे. ही दोन्ही महाराष्ट्रातील प्रमुख नागरी आणि औद्योगिक केंद्रे आहेत.
महाराष्ट्रातील प्रदेशांमध्ये लक्षणीय आर्थिक असमानता आहे. पश्चिमी प्रदेश (कोकण, पुणे) साधारणपणे जास्त उत्पन्न दाखवतात नाशिकचे  दरडोई उत्पन्न १,९७,२२७ रुपये ईतके आहे तर अमरावती विभागातील दरडोई उत्पन्न  तुलनेने कमी म्हणजे १,४५,९१७ रुपये आहे. संभाजीनगर १,७३,५३३ रुपये उत्पन्नासह मध्यम श्रेणीत आहे.

कोकण विभागात जास्त दरडोई उत्पन्न दाखवत असले तरी येथेही जिल्ह्या जिल्ह्यांत मोठी असमानता आहे. मुंबई आणि मुंबईला चिटकून असलेले जिल्ह्यांचा विकास मोठ्या प्रमाणात झाला आहे. मात्र जस जसे तळकोकणच्या दिशेने जायला लागलो तर हा विकास कमी कमी होत झालेला लक्षात येतो.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search