मुंबई : मुंबई गोवा महामार्गावरच्या उड्डाण पुलाचा भाग आज सकाळी तुटला आहे. या अपघातावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महामार्गाच्या कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. मुंबई – गोवा महामार्गाच्या कामाच्या गुणवत्तेबाबत सरकारने खुलासा करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. यासंदर्भात जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र देखील लिहिलं आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुंबई – गोवा महामार्गाचं काम अत्यंत वेगाने सुरू असल्याचा दावा सरकारकडून केला जात आहे. परंतु, काम जरी वेगात सुरू असलं तरी ते अत्यंत निकृष्ट पद्धतीने होत असल्याचा अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत. कामाचा वेग वाढवताना गुणवत्तेशी शासनाने तडजोड केली आहे का? असा प्रश्न सर्वसामान्याच्या मनात निर्माण होत आहे, असं जयंत पाटील यांनी एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
सदर उड्डाणपुलाच काम निकृष्ट असल्याचा आरोप अनेक वेळा येथील स्थानिक नागरिकांनी केला होता. परंतु प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले असल्याचे निदर्शनास येत आहे. वरील घटना नागरिकांच्या दाव्यात तथ्य असल्याचे दाखवून देत आहे.तरी सदरील प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेवून महामार्गाच्या कामाच्या दर्जाचे त्रयस्थ यंत्रणेमार्फत परीक्षण करण्यात यावे. तसेच, या घटनेची चौकशी करण्यात येऊन कंत्राटदार व अन्य दोषीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जयंत पाटील यांनी केली आहे.
या घटनेबाबत त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वर एक ट्विट पोस्ट सुद्धा केली. या पोस्ट मध्ये ते म्हणाले
“मुंबई गोवा महामार्गावर बांधकाम सुरु असलेल्या पुलाचा भाग कोसळल्याची घटना आज सकाळी घडली आहे. त्यामुळे बहुप्रतिक्षित असा या महामार्गाच्या गुणवत्तेबाबत देखील प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचं काम अत्यंत वेगाने सुरू असल्याचा दावा सरकारकडून केला जात आहे. वेग वाढवून कामाचा दर्जा घसरवला आहे का? सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र कामाच्या गुणवत्तेबाबत सरकारने खुलासा करावा. कोकणवासियांच्या डोळ्यात सरकारकडून केली जाणारी धूळफेक थांबवा.”
चिपळूण :मुंबई-गोवा महामार्गावर सुरू असेलेल्या उड्डाणपुलाच्या कामादरम्यान मोठा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूण येथील उड्डाणपुलाचा गर्डर तुटण्याचा प्रकार घडला आहे. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेला नाही. मात्र, महाकाय लाँचरचे काही भाग तुटल्यानं मुंबई गोवा महामार्गावरील वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला आहे.या दुर्घटनेचा थरारक व्हीडिओ देखील समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण येथे उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. यादरम्यान बांधकाम सुरू असताना अचानक मोठा आवाज होऊन पुलाचा काही भाग तुटल्याचा प्रकार घडला आहे. यादरम्यान पुलाच्या खाली नागरिकांची एकच पळापळ झाल्याचे पाहायला मिळाले. सकाळी आठ वाजण्याच्या सुमारस ही घटाना घडली. गेल्या अनेक महिन्यांपासून या फ्लायओव्हरचे काम सुरु आहे.
पुलाचा काही भाग कोसळतानाची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पूल कोसळला तेव्हा स्फोट झाल्यासारखा मोठा आवाज झाला अशी माहिती घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी दिली. घटनेनंतर स्थानीक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली.
राजापूर : राजापूर पोस्ट ऑफिस येथे ग्राहकांसाठी रेल्वे आरक्षण सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेचा लाभ रेल्वे प्रवाशांनी घ्यावा, असे आवाहन डाकघर अधीक्षक एन. टी. कुरळपकर यांनी केले आहे. राष्ट्रीय टपाल सप्ताहाचे औचित्य साधून रेल्वे तिकीट आरक्षण सुविधेचे उद्घाटन करण्यात आले. राजापूर तालुक्यातील व इतर जवळच्या भागातील रेल्वे प्रवाशांसाठी आरक्षण सुविधा राजापूर पोस्ट ऑफिस येथे सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यात रत्नागिरी हेड ऑफिस, लांजा, संगमेश्वर या पोस्ट ऑफिसमध्ये भारतीय रेल्वे व भारतीय डाक विभाग यांच्या संयुक्त सहकार्याने ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. रेल्वे तिकीट आरक्षण सुविधा राजापूर पोस्ट ऑफिसमार्फत मिळावी, अशी मागणी स्थानिक रहिवासी, विद्यार्थी, नोकरदार व लोकप्रतिनिधी यांच्याकडून होत होती. ही सेवा पोस्ट विभागाच्या पुढाकाराने सुरू झाल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
Rain Alert :आज दिनांक 30 सप्टेंबर आणि उद्या दिनांक 01 ऑक्टोबर रोजी कोकणात जोरदार पावसाचा, तर उर्वरित राज्यात जोरदार वारे विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.मॉन्सूनची परतीची सीमा कायम असून, दोन ते तीन दिवसांत वायव्य भारताच्या आणखी काही भागातून मॉन्सून माघारी फिरण्याची शक्यता आहे. कर्नाटक किनारपट्टीच्या भागात वाऱ्यांचे पूर्व-पश्चिम जोडक्षेत्र कायम आहे. तामिळनाडूच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती टिकून आहे. बंगालचा उपसागरासह अरबी समुद्रात ढगांची दाटी झाली आहे.राज्यात जोरदार वारे, विजा, मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस कोसळत आहे.
आज आणि उद्यासाठी कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग,कोल्हापूर या भागात अतिवृष्टीचा ऑरेंज अलर्ट तर सातारा, रायगड या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
रत्नागिरी: जिल्ह्यात गुहागर तालुक्यामध्ये गणेश विसर्जन मिरवणूकीत एक मोठी दुर्घटना घडली आहे. ब्रेक फेल झाल्याने एक टेम्पो गणेश विसर्जन मिरवणूक शिरल्याने झालेल्या दुर्घटनेमध्ये दोघांचा मृत्यू झाला असून १५ जण जखमी झाले असल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे गणेश मूर्ती विसर्जनाच्या मिरवणुकीला गालबोट लागले आहे.
कोमल नारायण भुवड (वय १७) आणि दीपक लक्ष्मण भुवड (वय ४८) अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावं आहेत. अपघातात मृत्यू झालेले हे दोघेजण व जखमी झालेले गणेशभक्त हे सगळे पाचेरी आगर येथील भुवडवाडी येथे राहणारे आहेत.गुहागर तालुक्यात पाचेरी आगर येथे अनंत चतुर्दशीनिमित्त गणपती विसर्जन मिरवणूक सुरू होती. दुर्दैवाने विसर्जन मिरवणूक सुरू असताना टेम्पोचे ब्रेक फेल झाले आणि टेम्पो उताराच्या दिशेने पुढे जाऊ लागला. हा प्रकार टेम्पो ड्रा यव्हरच्या लक्षात येताच त्यांनी टेम्पो मधून उडी मारून टेम्पो थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी त्या ड्रायव्हरच्या अंगावरून टेम्पो गेला. तसेच समोर नाचत असलेल्या भाविकांना या टेम्पोची जोरदार धडक बसली. या दुर्दैवी घटनेत टेम्पोमध्ये बसलेल्या १७ वर्षीय मुलीच्याही डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला आहे. यामधील जखमी झालेला चालक दीपक याला जवळच्या आबलोली ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अधिक उपचाराकरिता त्याला डेरवण येथे नेण्यातयेत होते. मात्र वाटेतच त्याची प्राणज्योत मालवली.
खेड : खेड शहरातील जगबुडी नदीमध्ये अनेक मगरींचा वावर असल्याने दीड दिवसाचे गणपती विसर्जन करताना येथील विसर्जन कट्टा मंडळाच्या सदस्यांना आपला जीव मुठीत धरून गणरायाचे विसर्जन करावे लागत होते. या मगरींना पळवून लावण्यासाठी नदीमध्ये फटाक्यांचे बॉम्ब फोडून त्यांना पळवून लावावे लागले.
याची दखल वनविभागाने (Forest Department) घेऊन पाच दिवसाच्या गणपती विसर्जनामध्ये (Konkan Ganeshotsav) कोणती अडचण येऊ नये, यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. खेड शहरातून वाहणाऱ्या जगबुडी नदीत अनेक छोट्या मोठ्या मगरी पावसाच्या पाण्यामुळे आल्या आहेत. त्या येथील प्रवाहात मुक्त फिरताना दिसत असल्याने अनेकांनी जगबुडी नदीत उतरणे बंद केले आहे.
रत्नागिरी : कोकणच्या पर्यटनासंबंधी एक चांगली बातमी समोर आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात कशेळी गावच्या सडय़ावर असलेल्या कातळशिल्पाला ‘राज्य संरक्षित स्मारक’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. या शिवाय आणखी ८ कातळशिल्पांना हा दर्जा देण्याची प्रक्रिया सुरु आहे.
रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कातळशिल्पांना संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार २०१८ साली रत्नागिरी जिल्हा पुरातत्व कार्यालयाने १८ कातळशिल्पांचे प्रस्ताव राज्य पुरातत्व विभागाला पाठवले होते. त्यातील १० कातळशिल्पांना संरक्षित स्मारक म्हणुन घोषित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. यापैकी कशेळीच्या कातळशिल्पाला संरक्षित स्मारकाचा मान सर्वप्रथम मिळाला आहे. अन्य ८ कातळशिल्पांबाबत अधिसूचना काढण्यात आल्या असून त्यावरील हरकती तपासल्यानंतर त्यांनाही लवकरच हा दर्जा मिळू शकेल. मार्च २०२२ मध्ये ‘युनेस्को’ने रत्नागिरीतील ७ व सिंधुदुर्गातील एका कातळशिल्पास जागतिक वारसा स्थळाच्या संभाव्य यादीत स्थान दिले आहे. उक्षी, जांभरुण, कशेळी, रूंढेतळी, देवीहसोळ, बारसू, देवाचे गोठणे आणि फणसमाळ येथील या कातळशिल्पांचा जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समावेश होण्यासाठी संरक्षणाची जबाबदारी घेणे आवश्यक आहे. मात्र आता राज्य सरकारने यादीतून बारसूचे नाव वगळले आहे.
यादीतून बारसूचे नाव वगळले?
बारसू गावच्या सडय़ावर अनेक कातळशिल्पे आहेत. मात्र येथे तेलशुद्धीकरण प्रकल्प प्रस्तावित आहे. संरक्षित स्मारक झाल्यास बांधकाम, खाणकाम करता येणार नाही. संरक्षक कठडे बांधावे लागेल व देखरेखीची जबाबदारी राज्य पुरातत्व विभागाकडे जाईल. बारसू तेल शुद्धीकरण प्रकल्पाचा विकास ‘एमआयडीसी’ करत आहे. भूसंपादनात कातळशिल्पे वगळय़ात येणार असून त्यांचे जतन सीएसआर फंडातून (सामाजिक उत्तरदारयीत्व निधी) करण्यात येईल, अशी माहिती उद्योग विभागातील सूत्रांनी दिली. त्यामुळेच पुरातत्व खात्याने प्रस्ताव पाठवूनही बारसूच्या कातळशिल्पांचे नाव मंत्रालय स्तरावर वगळण्यात आल्याची सांगितले जाते.
रत्नागिरी : मुंबई गोवा महामार्गाने गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक चांगली बातमी आहे. मुंबई – गोवा महामार्गावरील कशेडी घाटात तयार करण्यात आलेल्या बोगद्यातील एक मार्गिका आज सोमवार पासून हलक्या वाहनांसाठी सुरू करण्यात आली आहे.
कशेडी घाटातील अवघड वळणाचा त्रास कमी करण्यासाठी बोगदा तयार करण्यात आला आहे. या बोगद्याची लांबी १.७१ किलोमीटर इतकी आहे. गेली तीन वर्षे या बोगद्याचे काम सुरू आहे. गणेशोत्सवापूर्वी या बोगद्यातील एक मार्गिका सुरू करण्याचे आश्वासन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिला होते. त्यानुसार सोमवारपासून एक मार्गिका हलक्या वाहनांसाठी खुली करण्यात आली आहे. या मार्गिकेमुळे वेळेतही बचत होणार आहे.
अक्षय महापदी | मुंबई मडगाव वंदे भारत एक्सप्रेसमधील एसी चेअर कारचा रत्नागिरीपासूनचा आरक्षण कोटा दुपटीने वाढवून आधीच्या २२ ऐवजी ४४ केला आहे.
रेल्वे मंत्रालयाने दि. २८ जून, २०२३ पासून मुंबई आणि मडगाव दरम्यान वंदे भारत एक्सप्रेसची सेवा सुरु केली. या गाडीला दादर, ठाणे, पनवेल, खेड, रत्नागिरी, कणकवली आणि थिवी येथे थांबे दिले गेले. कोकण रेल्वेने २२२३० मडगाव मुंबई वंदे भारत एक्सप्रेसला मडगाव, थिवी आणि कणकवलीसाठी एसी चेअर कार साधारण ३५० व एक्सिक्युटीव्ह क्लास ३० अशा एकूण ३८० जागा तर रत्नागिरी आणि खेडसाठी एसी चेअर कार २२ व एक्सिक्युटीव्ह क्लास ४ अशा केवळ २६ जागांचा आरक्षण कोटा निश्चित केला केला होता. यामुळे रत्नागिरी व खेड या दोन्ही स्थानकातून वंदे भारतला अपेक्षित उत्पन्न मिळण्यास अडथळा निर्माण झाला होता.
ही तफावत लक्षात घेता कोंकण विकास समितीने पहिल्या दिवसापासून मुंबईकडे येणाऱ्या २२२३० मडगाव मुंबई वंदे भारत एक्सप्रेसमधील एसी चेअर कारचा रत्नागिरीपासूनचा आरक्षण कोटा वाढवण्याची मागणी लावून धरली होती. ऑगस्ट महिन्यात यासाठी पुन्हा पाठपुरावा केला होता.
याचीच दखल घेऊन कोकण रेल्वेने १२० दिवसांच्या आगाऊ आरक्षण कालावधीपासून आरक्षण कोटा वाढवलेला आहे. त्यानुसार, दि. ३ जानेवारी, २०२४ पासून २२२३० मुंबई वंदे भारत एक्सप्रेसमधील एसी चेअर कारचा रत्नागिरीपासूनचा आरक्षण कोटा दुपटीने वाढवून आधीच्या २२ ऐवजी ४४ केला आहे. त्यामुळे जानेवारीपासून रत्नागिरी व खेडसाठी एसी चेअर कार ४४ व एक्सिक्युटीव्ह क्लास ४ अशा एकूण ४८ जागांचा आरक्षण कोटा उपलब्ध असेल. रत्नागिरी व खेडमधील प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा कोंकण असे आवाहन विकास समितीने केले आहे.
रत्नागिरी: हंगामात खाजगी बस वाहतूकदारनकडून प्रवाशांची होणारी लूट थांबविण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या RTO राज्य परिवहन प्राधिकरणने पाउले उचलली आहेत. मुंबई-पुण्यासाठीच्या खाजगी बसेसचे दरपत्रक ठरवून देण्यात आले असुन बस वाहतूकदारांना या दरांच्या ५०% जास्त भाडे आकारण्यास परवानगी दिली आहे. या दरांपेक्षा जर कोणी बस व्यावसायिक अतिरिक्त दर आकारत असेल तर त्याची तक्रार करण्यासाठी एक हेल्पलाइन नंबर सुद्धा जाहीर करण्यात आला आहे.
सणासुदीच्या काळात प्रवाशांच्या मजबुरीचा फायदा घेऊन कमी अंतराला अव्वाच्या सव्वा भाडे आकारण्याचे प्रकार हमखास घडत असतात. हे प्रकार रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या राज्य परिवहन प्राधिकरणने मुंबई,ठाणे आणि पुण्यासाठीच्या बसेसच्या भाड्याचे दरपत्रक ठरवून जाहीर केले आहे. या दरापेक्षा अधिक दर एखादा वाहतूकदार आकारत असल्यास त्याच्या विरोधात तक्रार 02352 – 225444 या व्हॉटस् ॲप क्रमांकावर नोंदविण्यात यावी असे आवाहन प्राधिकरणाने केले आहे. तक्रार नोंदविताना वाहनाचा नोंदणी क्रमांक व भाडे आकारणी तिकीट यांच्या फोटोसह तक्रार नोंदवावी, असे आवाहन सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित ताम्हणकर यांनी केले आहे.