Category Archives: आरोग्य




Covid-19 Updates: एकेकाळी संपूर्ण जगात दहशतीचे वातावरण निर्माण करणारा कोरोना पुन्हा येत आहे की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. अलिकडच्या मीडिया रिपोर्ट्सनुसार गेल्या काही आठवड्यात सिंगापूर आणि हाँगकाँगमध्ये #COVID19 च्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे. मात्र उपलब्ध प्राथमिक माहितीनुसार, ही प्रकरणे बहुतेक सौम्य आहेत, असामान्य तीव्रता किंवा मृत्युदराशी संबंधित नाहीत.
या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, आरोग्य सेवा महासंचालक (DGHS) यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (NCDC), आपत्कालीन वैद्यकीय मदत (EMR) विभाग, आपत्ती व्यवस्थापन कक्ष, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) आणि केंद्र सरकारी रुग्णालयांमधील तज्ञांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत असा निष्कर्ष काढण्यात आला की भारतातील सध्याची कोविड-१९ परिस्थिती नियंत्रणात आहे. १९ मे २०२५ पर्यंत, भारतात सक्रिय कोविड-१९ प्रकरणांची संख्या २५७ आहे, जी देशाच्या मोठ्या लोकसंख्येचा विचार करता खूपच कमी आहे. यापैकी जवळजवळ सर्व प्रकरणे सौम्य आहेत, त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता नाही. एकात्मिक रोग देखरेख कार्यक्रम (IDSP) आणि ICMR द्वारे कोविड-१९ सह श्वसन विषाणूजन्य आजारांवर देखरेख ठेवण्यासाठी एक मजबूत प्रणाली देशात अस्तित्वात आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण करण्यासाठी सतर्क आणि सक्रिय आहे, सार्वजनिक आरोग्याचे रक्षण करण्यासाठी योग्य उपाययोजना केल्या जात आहेत याची खात्री करत आहे.




अनेक जुन्या गोष्टी आता कालबाह्य होत असून त्यांची जागा आता स्मार्ट इलेक्ट्रॉनिक वस्तू घेत आहेत. आपणही आपले आयुष्य आरामदायी आणि सुखकारक व्हावे यासाठी या वस्तू वापरतो. मात्र या वस्तूंचे जेवढे फायदे आहेत तेवढे दुष्परिणाम असल्याचे वारंवार सांगितले जाते. मात्र आपण वापरत असलेल्या एका इलेक्ट्रॉनिक वस्तूमुळे आपल्याला जीवघेणा आजार होऊ शकतो अस कोणी म्हंटले तर?
हो, असा दावा केला जात आहे अॅपल Apple कंपनीच्या स्मार्ट वॉचमुळे युझरला कॅन्सरचा धोका निर्माण होत असल्याचा दावा केला जात आहे. यावरून या कंपनीवर टीका केली जात आहे. या दाव्यावरून Apple कंपनीविरोधात एक खटला दाखल करण्यात आला असून, यावरून सोशल मीडियावर उलट-सुलट प्रतिक्रिया उमटत आहेत.
डेली मेल युके यांनी सादर केलेल्या एका अहवालात अॅपल वॉचमध्ये PFAS म्हणजेच पॉली फ्लोरोअल्किल पदार्थ आढळला आहे. हे एक हानिकारक रसायन म्हणून ओळखले जाते आणि यामुळे कॅन्सरसारख्या आजाराचा धोका असल्याचा दावा केला जात आहे. या दाव्यावरूनच कॅलिफोर्नियाच्या नॉर्दन डिस्ट्रिक्टमध्ये अॅपल कंपनीविरोधात नुकताच एक खटला दाखल करण्यात आला असून Apple ने जाणूनबुजून हे तथ्य ग्राहकांपासून लपविल्याचा दावा यामध्ये करण्यात आला आहे.
एवढेच नव्हे तर मार्केटमध्ये असलेल्या १५वॉच कंपनीच्या स्मार्ट वॉच मध्ये हे रसायन भेटले आहे. नोट्रे डेम विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या २२ ब्रँड च्या केलेल्या अभ्यासात एकूण १५ ब्रँडमध्ये ही रसायने असल्याचे आढळून आली आहेत.




Covishield Vaccine Side Effects:कोरोना महामारीपासून बचाव व्हावा यासाठी लोकांना लस देण्यात आली. दरम्यान यावेळी ऑक्सफर्ड-ॲस्ट्राझेनेका लस लोकांना देण्यात आली होती. आपल्या भारतात अदार पूनावाला यांच्या सीरम इन्स्टिट्यूटने ही लस तयार केली होती. देशभरातील अनेकांनी ही लस घेतली. साथीच्या आजारानंतर जवळपास 4 वर्षांनी AstraZeneca ने आता कबूल केलंय की, या लसीचे लोकांमध्ये दुर्मिळ दुष्परिणाम दिसून येऊ शकतात.
कोविशील्ड लसीमुळे हार्ट अटॅकचा धोका
एका कायदेशीर प्रकरणात, AstraZeneca ने कबूल केलं आहे की, कोविशील्ड आणि वॅक्सजेव्हरिया या ब्रँड नावाने जगभरात विकल्या जाणाऱ्या कोरोना लसीमुळे ब्लड क्लॉट्स होण्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. याशिवाय यामुळे हृदयविकाराचा झटका, ब्रेन स्ट्रोक आणि प्लेटलेट्स कमी होऊ शकतात. कंपनीने असंही सांगितलंय की, हे केवळ अत्यंत दुर्मिळ प्रकरणांमध्ये होईल आणि सामान्य लोकांना घाबरण्याची गरज नाही.
ब्रिटनमध्ये जेमी स्कॉट नावाच्या व्यक्तीने AstraZeneca कंपनीविरोधात कोर्टात केस दाखल केली आहे. या व्यक्तीच्या म्हणण्यानुसार, ॲस्ट्राझेनेकाची लस दिल्यानंतर मेंदूला हानी पोहोचल्याचं दिसून आलं. इतर अनेक कुटुंबांनीही लसीच्या दुष्परिणामांबाबत न्यायालयात तक्रारी केल्या आहेत.
यूके उच्च न्यायालयात उत्तर देताना, कंपनीने मान्य केलंय की, अत्यंत दुर्मिळ प्रकरणांमध्ये त्यांच्या लसीमुळे थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोम (TTS) होऊ शकतो. यामुळे लोकांना हृदयविकाराचा झटका किंवा ब्रेन स्ट्रोक होऊ शकतो. ही कबुली देऊनही कंपनी लोकांच्या भरपाईच्या मागणीला विरोध करत आहे. कंपनीचे म्हणण्यानुसार, इतक्या मोठ्या प्रमाणावर लसीकरण केल्यानंतर ही समस्या काही लोकांमध्ये दिसण्याची शक्यता आहे.
AstraZeneca-Oxford ही लस सुरक्षिततेच्या कारणास्तव यूकेमध्ये दिली जात नाही. सध्या हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. न्यायालयाने याचिकाकर्त्यांचा दावा मान्य केल्यास कंपनीला मोठी रक्कम भरावी लागू शकते. त्यामुळे आता या प्रकरणात पुढे काय होणार हे पहावं लागणार आहे.
सिंधुदुर्ग, १५ एप्रिल :देहदान व अवयवदान यातील मूलभूत फरक समजून घेणं गरजेचं आहे. देहदान नैसर्गिक मृत्यू नंतर करता येते. त्यासाठी मृत्य व्यक्ती किंवा त्यांच्या नातेवाईकांची इच्छा असल्यास संपूर्ण देह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शरिरशास्त्र विभागाच्या ताब्यात स्वतः नातेवाईक यांनी दान करावा लागतो. त्यापुर्वी दोन्ही डोळ्यांचे नेत्रपटल म्हणजे डोळ्यावरची पारदर्शक काच व त्वचा दान करता येते. पण त्या साठी प्रशिक्षित तज्ञांची टीम घरी किंवा दवाखान्यात नेऊन नेत्र व त्वचादान स्विकारतात पण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सध्या तरी नेत्र व त्वचापेढी नसल्याचे आपल्या जिल्ह्यातील व्यक्ती यांना नेत्र व त्वचादाना साठी कोल्हापूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गाठावे लागले . पण वेळेअभावी या गोष्टी अशक्य आहेत. नेत्र व त्वचा शिवाय हाडं, अस्तिमज्जा, हृदयाची झडपा, मज्जा पेशी, रक्तवाहिन्या इतकेच नाही तर शरिराचे हात, पाय व डोक्यावरील केस पण दान करुन सुमारे पन्नास रुग्णांना एक मृत व्यक्ती व्याधी मुक्त करू शकतो.
सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात देहदान स्विकारण्याची सोय करण्यात आलेली असून मृत व्यक्ती किंवा त्यांच्या नातेवाईकांची ईच्छा असल्यास व्यक्तीच्या मृत्यूनंतर देह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शरिरशास्त्र विभागात स्विकारण्याची सोय केलेली आहे अशी माहिती जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य अवयव व देहदान महासंघचे सक्रिय कार्यकर्ते डॉ. संजीव लिंगवत यांनी कळविले आहे.
अलीकडेच त्यांनी सिंधुदुर्ग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोज जोशी व शरिरशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका डॉ. प्राजक्ता थेटे यांच्याशी संपर्क साधून सविस्तर चर्चा केली. मृत्यू समयी एडस्,कोरोना, कर्करोग सारखा महाभयंकर रोग असल्यास किंवा मृत्यू आत्महत्या, विषप्राशन, गळफास घेऊन झाल्यास अश्या व्यक्तींना देहदान, नेत्रदान, त्वचा दान करता येतं नाही. ईश्वराने शरिराचा कोणताही भाग टाकाऊ बनविला नाही, फक्त आपल्या अज्ञानामुळे आपण शरिर जाळुन टाकतो किंवा मातीत मिसळतो, भारतीय समाज सामाजिक, धार्मिक अंधश्रद्धांच्या परंपरागत गैरसमजुतीं मध्ये अडकुन बसलेला असुन काळानुसार यात बदल घडवून आणणे आवश्यक आहे. कालानुरूप सती जाणं , स्त्री शिक्षण, बालविवाह सारख्या बाबतीत बदल झाले असून देहदान बाबतीत सुद्धा हे बदल हळूहळू होतील अशी आशाही डॉ. संजीव लिंगवत यांनी व्यक्त केली.
शहरात सर्वत्र सध्या उष्णतेची लाट पसरली आहे. महाराष्ट्रभूषण पुरस्कारासाठी उपस्थित ११ श्री सदस्यांचा उष्माघातामुळे मृत्यू होण्याची वेदनादायी घटना कालच घडली आहे. प्रखर उन्हामुळे होणाऱ्या उष्माघातापासून बचाव करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे.
उष्माघात होण्याची कारणे
- उन्हाळ्यामध्ये शेतावर अथवा इतर मजुरीची कामे फार वेळ करणे
- कारखान्याच्या बॉयलर रुममध्ये काम करणे, काच कारखान्यातील कामे करणे
- जास्त तापमानाच्या खोलीत काम करणे
- घट्ट कपड्याचा वापर करणे
- अशा प्रत्यक्ष उष्णतेशी अथवा तापमानातील वाढत्या परिस्थितीशी सतत संबंध येण्याने उष्माघात होतो.
लक्षणे
- थकवा येणे, ताप येणे, त्वचा कोरडी पडणे
- भूक न लागणे, चक्कर येणे, निरुत्साही होणे, डोके दुखणे
- रक्तदाब वाढणे, मानसिक बेचैन व अस्वस्थता, बेशुद्धावस्था इत्यादी
उपचार
- रुग्णास हवेशीर खोलीत ठेवावे, खोलीत पंखे, कुलर ठेवावेत, वातानुकुलित खोलीत ठेवावे
- रुग्णाचे तापमान खाली आणण्याच्यादृष्टीने प्रयत्न करावेत
- रुग्णास थंड पाण्याने आंघोळ घालावी
- रुग्णाच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात, आईसपॅक्ड लावावेत
- आवश्यकतेनुसार शीरेवाटे सलाईन देणे
काय करावे
- तहान लागलेली नसली तरीसुद्धा जास्तीत जास्त पाणी प्यावे
- हलकी, पातळ व सच्छिद्र सूती कपडे वापरावेत
- बाहेर जाताना गॉगल्स, छत्री/ टोपी, बुट व चपलांचा वापर करण्यात यावा
- प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत ठेवावी
- उन्हात काम करीत असलेल्या व्यक्तींनी डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करावा तसंच ओल्या कपड्यांनी डोके, मान व चेहरा झाकावा
- शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, घरी बनविण्यात आलेली लस्सी, लिंबू-पाणी, ताक इत्यादींचा नियमित वापर करावा
- अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम ही उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा
- गुरांना छावणीत ठेवावे तसेच त्यांना पिण्यासाठी पुरेसे पाणी द्यावे
- घरे थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर, व सनशेडचा वापर करावा, तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करावे
- कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी
- सूर्यप्रकाशाशी थेट संबंध टाळण्याचे कामगारांना सूचित करावे
- पहाटेच्यावेळी जास्तीत जास्त कामाचा निपटारा करावा
- बाहेर कामकाज करताना मध्ये मध्ये ब्रेक घेऊन नियमित आराम करावा
- गरोदर महिला कामगार व आजारी कामगारांची अधिक काळजी घ्यावी
- रस्त्याच्या कडेला उन्हापासून संरक्षणाकरिता शेड उभारावेत
- जागोजागी पाणपोईची सुविधा उभारावी
काय करु नये
- लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या किंवा पार्क केलेल्या वाहनात ठेऊ नये
- दुपारी १२.०० ते ३.३० कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे
- गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे
- बाहेर तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीत
- उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळावे, तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवावीत

Vision Abroad
