Category Archives: गुन्हा

राज्यभर प्रतिबंधित गुटखा-पानमसाला विक्रेत्यांवर १९५ धाडी; १९२ जणांना अटक

   Follow us on        

मुंबई, दि. ७ : राज्यात अन्न व औषध प्रशासन विभागाची प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व तत्सम अन्नपदार्थांविरुद्धची विशेष मोहीम प्रभावीपणे सुरू आहे. 1 ते 5 जून 2026 या कालावधीत करण्यात आलेल्या कारवाईत तब्बल १९२ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. या पाच दिवसांच्या कालावधीत राज्यभर १९५ धाडी टाकण्यात आल्या असून या कारवाईत 1 कोटी 99 लाख 18 हजार 475 रुपयांचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला असल्याचे अन्न व औषध प्रशासनाने कळविले आहे.

अवैध उत्पादन, साठवणूक, वाहतूक व विक्रीस आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून कठोर कारवाई करण्यात येत आहे. भारतीय न्याय संहिताचे कलम १२३, २२३, २७४, २७५ तसेच अन्न सुरक्षा मानके कायद्याचे कलम २६, २७, ३०(२) (a) आणि कलम ५९ अंतर्गत गुन्हे दाखल करून आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार प्रतिबंधित अन्नपदार्थांविरुद्ध व्यापक मोहीम राबविण्यात येत आहे. मोहिमेत 3 जून 2026 रोजी सोनगीर, जि. धुळे येथे टाकण्यात आलेल्या धाडीत 23 लाख 50 हजार रुपये किंमतीचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला आहे.

4 जून 2026 रोजी समृद्धी महामार्गावर सावंगी टोल नाका येथे करण्यात आलेल्या कारवाईत 60 लाख 50 हजार रुपये किंमतीचा प्रतिबंधित साठा व वाहन तर नांदेड येथे करण्यात आलेल्या धडक कारवाईत 17 लाख 52 हजार 450 रुपये किंमतीचा प्रतिबंधित साठा व वाहन जप्त करण्यात आले. तसेच मोशी, पिंपरी-चिंचवड येथे करण्यात आलेल्या कारवाईत 6 लाख 19 हजार 982 रुपये किंमतीचा प्रतिबंधित साठा जप्त करून सहा व्यक्तींविरुद्ध चिखली, पिंपरी-चिंचवड या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

5 जून 2026 रोजी प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा असल्याच्या संशयावरून करण्यात आलेल्या कारवाईत 1 कोटी 2 लाख 67 हजार 263 रुपये किंमतीचा साठा परांडा, ता. परांडा, जि. धाराशिव येथे जप्त करण्यात आला असून दोन जणांना अटक करण्यात आली आहे. बृहन्मुंबई क्षेत्रात 30 धाडीमध्ये 3 लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करत 30 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. पुणे क्षेत्रात 79 धाडीमध्ये 8 लाख 19 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 78 व्यक्तींना अटक केली आहे, असे सह आयुक्त (अन्न) महेश ना. चौधरी यांनी कळविले आहे.

Crime News: तब्बल १.६५ कोटींचा गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त

   Follow us on        

ठाणे: ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू तस्करी विरोधात एक मोठी कारवाई केली आहे. एका कंटेनरमधून छुप्या पद्धतीने नेला जाणारा तब्बल १ कोटी ६५ लाख रुपये किमतीचा गोवा बनावटीचा मद्यसाठा पोलिसांनी जप्त केला आहे. विशेष म्हणजे, हा मद्यसाठा नेण्यासाठी तस्करांनी बनावट औषध वाहतुकीचे चलन (Bill) तयार केले होते, जेणेकरून प्रशासनाची दिशाभूल करता येईल. मात्र, उत्पादन शुल्क विभागाने सापळा रचून हा कंटेनर पकडला आणि त्यातील साठा ताब्यात घेतला.

​या कारवाईबाबत अधिक माहिती देताना ठाणे अधीक्षक प्रवीण तांबे यांनी सांगितले की, हा मद्यसाठा नेमका कुठून आला आणि तो कोणाला वितरित केला जाणार होता, याचा तपास सध्या सुरू आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जात आहे. गेल्या दीड वर्षात ठाणे उत्पादन शुल्क विभागाने उल्लेखनीय कामगिरी करत आतापर्यंत १५ कोटी रुपयांहून अधिक किमतीची अवैध दारू जप्त केली आहे. राज्यात सध्या एकीकडे इंधनाचा तुटवडा आणि अवैध सिलिंडरवर कारवाया सुरू असतानाच, दारू तस्करीचा हा मोठा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

धक्कादायक: सरपंच होता यावे यासाठी स्वतःच्या मुलीचा जीव घेतला!

   Follow us on        

नांदेड जिल्ह्यातील केरूर गावात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. २८ वर्षीय पांडुरंग कोंडमंगले याने आपल्या ६ वर्षांच्या जुळ्या मुलींपैकी एका मुलीला – प्राचीला – ठार मारल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हे सर्व केवळ ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदासाठी उभे राहण्यासाठी!

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमात दोन मुलांपेक्षा जास्त मुल असलेल्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उमेदवारी करता येत नाही. पांडुरंगकडे एक मुलगा आणि जुळ्या दोन मुली अशी तीन मुले असल्याने तो सरपंचपदासाठी अपात्र ठरत होता. जून २०२६ मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी तो सरपंच होण्यास आतुर होता.त्याने गावातील सरपंच गणेश शिंदे यांच्याशी सल्लामसलत केली. दोघे मित्र असल्याने त्यांनी कट रचला आणि जुळ्या मुलींपैकी मोठी मुलगी प्राचीला काढून टाकण्याचा निर्णय घेतला.

२९ जानेवारी २०२६ रोजी पांडुरंगने प्राचीला मोटारसायकलवर बसवून शेजारील तेलंगणातील निजामाबाद जिल्ह्यातील निजामसागर कालव्याजवळ नेले. तिथे त्याने मुलीला कालव्यात ढकलून दिले आणि पळ काढला.कालव्यातील शेतकरी आणि स्थानिकांनी पाण्यात पडण्याचा आवाज ऐकून धाव घेतली, पण मुलगी पोहता येत नसल्याने तिचा मृत्यू झाला. नंतर शव ओळख पटली आणि तपास सुरू झाला. पांडुरंगने गुन्हा कबूल केला. त्याच्यासोबत सरपंच गणेश शिंदे यालाही अटक करण्यात आली आहे.पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, जन्म नोंदी बदलणे किंवा दत्तक देण्याचा प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर हा अत्यंत क्रूर मार्ग निवडण्यात आला.

या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून, मुलीच्या जीवितासाठी राजकीय स्वार्थ इतका खोलवर जाऊ शकतो याचे हे दुःखद उदाहरण ठरले आहे.

 

 

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search