Category Archives: सिंधुदुर्ग

६२५ नारळांच्या तोरणासह कोकण रेल्वे प्रवासी संघाच्या वतीने विविध मागण्या आई भराडी देवीच्या चरणी अर्पण

गेली १७ वर्षे कोकण रेल्वे प्रवाशांसाठी तसेच इतर कोकणातील प्रश्नांसाठी लढणार्‍या कोकण रेल्वे प्रवासी संघाचे श्री. राजू कांबळे आणि ईतर कार्यकर्त्यांनी काल आई भराडी देवीच्या जत्रेला हजेरी लावून ६२५ नारळांचे तोरण देवीस अर्पण करून कोकणवासियांनी प्रशासनाकडे केलेल्या मागण्या पूर्ण होवो असे साकडे घातले.
मागण्यांचे फलक चर्चेत 
कोकणातील प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी कोकण रेल्वे प्रवासी संघातर्फे विविध मागण्या रेल्वे प्रशासनाकडे ठेवण्यात आल्या आहेत. याच प्रमाणे मुंबई गोवा महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे या प्रकारच्या ईतर मागण्याही संघटना करत आहे. काल जत्रेसाठी आलेल्या कार्यकर्त्यांच्या हातात या मागणीचे फलक होते. हे फलक ईतर सर्व उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते.
कोणत्या मागण्या होत्या या फलकांवर? 
  • कोकणावरच नेहमी अन्याय का? कोकणवासियांना न्याय मिळणार का?
  • कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेतील विलीनीकरण करण्यात यावे.
  • “अमृत भारत योजनेत” कोकण रेल्वेवरील फायद्याचे आणि महत्त्वाचे स्थानकांत पनवेल, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकास समावेश करण्यात यावा.
  •  सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकास रेल्वे  टर्मिनल्स चा दर्जा मिळण्यात यावा तसेच कोकण रेल्वेचे शिल्पकार आदरणीय प्रा.  मधू दंडवते साहेबांचे, ‘प्रा. मधू दंडवते सावंतवाडी रोड रेल्वे टर्मिनल्स’ असे नामांतरण करण्यात यावे.
  • कोकणातील महत्त्वाच्या सर्व स्थानकात पत्रा शेड, दिवा, पंखा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, प्रतिक्षालय, फलाटांची उंची, आसनव्यवस्था यांची पुरेपूर सोय करणे.
  •  महत्वांच्या रेल्वे स्थानकात प्रवाश्याच्या गर्दीचे प्रमाण पाहता बहूतेक जलद, मेल/एक्सप्रेस गाड्यांस वेळेच्या सोयीने थांबे देण्यात यावेत. (जनशताब्दि, वंदेभारत, तेजस आदि)
  • कोकणातील सर्व स्थानकांत प्रवासी  आरक्षण तिकिटांचा कोटा काही अंशी वाढविण्यात याव्यात.शारीरिक व्यंग असलेल्या तसेच वय वर्षे ७५ आणि अधिक असणाऱ्या महीला/पुरुष वर्ग प्रवाशांस रेल्वे तिकिटावर सूट देण्यात यावी.
  • मुंबई – चिपळूण इंटरसिटी एक्सप्रेस दैनंदिन गाडी सुरू करावी.
  • मुंबई पोर्ट ट्रस्ट प्रकारचा प्रकल्प चिपळूण येथेही सुरू करण्यात यावा.
  • मुंबई  – गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण कामा मार्गस्थ करण्यात यावे.

Loading

Sawantwadi: रुग्णालयात टाक्यांसाठी लागणारा धागा नाही; रात्री २ वाजता नातेवाईकांची पळापळ. रुग्णालय प्रशासनाचा गलथान कारभार समोर

सावंतवाडी: तळकोकणात सरकारी आरोग्य यंत्रणेचे तीन तेरा वाजले असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. काल गरजेच्या वेळी उपजिल्हा रुग्णालयात टाके घालण्या साठी लागणारा धागा उपलब्ध नसल्यामुळे जखमी रुग्णास जवळपास सव्वा तास रखडवल्याचा प्रकार येथे घडला. एवढेच नव्हे तर कर्मचाऱ्यांनी हा धागा आणण्यासाठी नातेवाईकांना पळापळ करण्यास लावली.
सविस्तर वृत्त असे की सावंतवाडी शहरात काल रात्री पावणे एक वाजता एक व्यक्ती गाडी रस्त्यावर स्लिप होवून अपघात झाला होता. व अपघात झालेल्या व्यक्तीला हाताला,पायाला डोक्याला चांगल्याच जखमा झाल्या होत्या. त्या नंतर अपघातातील जखमी रुग्णाला सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णाला मोठ्या जखमा झाल्याने त्याला टाके पडले मात्र टाके घालण्या साठी लागणारा धागा रुग्णालयात उपलब्ध नाही तो बाहेरून घेवून या असे तेथील डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर तो धागा शोधण्यासाठी नातेवाईक वेलनेस मध्ये गेले तेथे देखील सापडला नाही त्या नंतर त्यांनी जे जे मेडीकल गाठले तेथे देखील धागा सापडला नाही. अश्या अनेक ठिकाणी धाग्या साठी हेलपाट्या मारल्या नंतर शेवटी सर्वोदय नगर मध्ये धागा सापडला. व त्यानंतर नातेवाईक रुग्णालयात आले व नंतर टाके घालण्यात आले. तोपर्यंत सव्वा तास रुग्ण रक्त बंबाळ परिस्थितीत तसाच रुग्णालयात होता. असा भयंकर अनुभव रुग्णाच्या नातेवाईकांना आला.
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या मतदार संघातील हा प्रकार आहे. एकीकडे येथे मल्टि स्पेशालिटी रुग्णालय सुरु करण्याच्या गोष्टी केल्या जात असताना असे प्रकार घडत असतील तर सामान्य नागरिकांनी शासनाकडून कोणती अपेक्षा करावी असा प्रश्न विचारण्यात येत आहे.

Loading

वाशी : सिंधुदुर्गातून हापूसची आवक वाढली; पेटीला मिळत आहे ‘एवढा’ दर

वाशी : नवी मुंबईतील वाशी येथील ए.पी.एम.सी. बाजारात साेमवारी काेकणातून पाच हजार  पेट्या विक्रीसाठी उपलब्ध झाल्या. यामध्ये सर्वाधिक (६० टक्के) हापूस पेट्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून तर ४० टक्के रत्नागिरी  व रायगड जिल्ह्यातील आहेत. बाजारात दाखल झालेल्या आंबा पेटीला सध्या दोन ते पाच हजार रुपये इतका भाव मिळत आहे.
 सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा मोठ्या प्रमाणावर बाजारात येत आहे. त्या तुलनेने रत्नागिरीचे प्रमाण अल्प आहे. सध्या रात्री गारठा व दिवसा उष्मा, असे तापमान असले तरी शेतकरी तयार आंबा काढून विक्रीला पाठवू लागले आहेत सध्या बाजारात कर्नाटक हापूस, बदामी, लालबाग, तोतापुरी आंबा विक्रीसाठी येत आहे. हापूस ८० ते १७५ रुपये किलो, बदामी ६० ते १२० रुपये किलो, लालबाग १०० ते १४० रुपये किलो, तोतापुरी ६० ते ७० रुपये किलो दराने विकला जात आहे गेल्या दोन आठवड्यांपासून हापूस विक्रीसाठी येत आहे. या आठवड्यापासून आवक वाढली आहे. त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हापूसचे प्रमाण ६० टक्के आहे. उर्वरित ४० टक्के आंबा रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातील आहे. आंब्याच्या वर्गवारी, दर्जानुसार दर आकारण्यात येत आहेत.

Loading

Sindhudurg: आंबोली चौकुळ भागात ब्लॅक पॅन्थरचा वावर; फोटो कॅमेरात कैद

आंबोली दि.२५ फेब्रु; पश्चिम घाटात अजूनही  जैविविधता टिकून आहे. तळकोकणात आंबोली – चौकुळ ही गावे  जैवविविधतेतेसाठी प्रसिद्ध आहेत. या भागातील जंगलात अजूनही वन्यप्राण्यांच्या जाती अस्तित्वात आहेत आणि हे प्राणी कित्येकवेळा येथील ग्रामस्थांच्या आणि  पर्यटकांच्या नजरेस पडताना दिसतात. असेच काही पर्यटक येथे पर्यटनास आले असता  त्यांना येथे काळा बिबट्याचे Black Panther दर्शन झाले. यातील काही पर्यटकांनी धाडस करून या बिबट्याचे फोटोही काढलेत. फोटोस दुरून काढल्याने ते काहीसे अस्पष्ट आले आले तरी या भागात या काळ्या बिबट्याचा वावर असल्याचे अधोरेखित झाले आहे.
येथील जैवविविधतेला धोका
येथील ग्रामस्थांनी जरी येथील जैवविविधतेचे आणि निसर्गाचे रक्षण केले असले तरी बाहेरील लोकांकडून त्याला धोका निर्माण झाला असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. येथे येणारे काही पर्यटक शिकारीच्या हेतूने येत आहेत. गेल्याच आठवड्यात सावंतवाडी शहर आणि बांद्यातून काही युवकांनी येथे येऊन साळींदर ची शिकार केली होती. ग्रामस्थांनी जागरुकपणा दाखवून त्यांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. दुसरी गोष्ट म्हणजे येथे मोठ्या प्रमाणात जमिनी गैरमार्गाने विकत घेऊन तेथे बांधकामे केली जात आहेत. त्याचा परिमाण येथील निसर्गाला, जैवविविधतेला आणि ग्रामस्थांना भोगावा लागत आहे. याविरोधात येथील ग्रामस्थांनी आवाज उठवला असून आंदोलनाचा मार्ग अंगिकारला आहे.

Loading

खळबळजनक! सिंधुदुर्ग जिल्ह्यातून १० बांग्लादेशी नागरिकांना अटक; जिल्हावासीयांना सतर्क राहण्याचे पोलिसांचे आवाहन

सिंधुदुर्ग, दि. २५ फेब्रु. | सिंधुदुर्ग जिह्यातून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे.  जिल्ह्यात दोन ठिकाणी वास्तव्य करुन राहणाऱ्या 10 बांगलादेशी नागरीकांना ताब्यात घेत सिंधुदुर्ग पोलीसांनी मोठी कारवाई केली असल्याची ही माहिती आहे. सिमेवरील मुलखी अधिकाऱ्यांच्या लेखी परवानगी शिवाय घुसखोरीच्या मार्गाने भारतात प्रवेश करुन हे बांगलादेशी नागरिक येथे तळ ठोकून होते.
अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या परकिय तसेच बांगलादेशी नागरीकांचा शोध घेऊन त्यांच्या विरुध्द कायदेशीर कारवाई करण्याकरीता केंद्र शासन, राज्य शासन तसेच पोलीस महासंचालक कार्यालयाकडून वेळोवेळी सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्या अनुषंगाने सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी, दहशतवाद विरोधी शाखा व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांना अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या परकिय, तसेच बांगलादेशी नागरीकांबाबत गोपनियरित्या माहिती घेवून, शोध घेणेसाठी विशेष मोहिम राबवून परकीय नागरीक मिळून आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याबाबत सूचना दिलेल्या होत्या.
यानुसार (दि.23) प्रभारी अधिकारी, बांदा व सावंतवाडी पोलीस ठाणे यांना त्यांच्या हद्दीमध्ये अवैधरित्या बांगलादेशी नागरीक वास्तव्यास असल्याबाबत माहिती मिळाली. या माहितीच्या अनुषंगाने अधिक शोध-चौकशी करता बांदा पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात बळवंतनगर, बांदा येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये बांगलादेशी नागरीक वास्तव्यास असल्याबाबत माहिती मिळाली. त्यानुसार प्रभारी अधिकारी, बांदा पोलीस ठाणे यांनी त्यांच्या स्टाफसह जावून तेथे वास्तव्यास असलेल्या 6 नागरीकांना ताब्यात घेवून त्यांची चौकशी केली असता ते सर्व नागरीक बांगलादेशी असल्याचे, तसेच त्यांनी भारतात येण्यासाठी व वास्तव्यासाठीचे पारपत्र काढलेले नसून अनधिकृतपणे भारतात प्रवेश करुन बळवंतनगर, बांदा येथे रहात असल्याचे निष्पन्न झाले. सदर 6 बांगलादेशी नागरीक अवैधरित्या भारतात वास्तव्य करीत असल्याने त्यांना ताब्यात घेवून त्यांच्या विरुध्द बांदा पोलीस ठाण्यात विदेशी व्यक्ती अधिनियम 1946 चे कलम 14 (अ), 14(ब) व 14(क), पारपत्र (भारतात प्रवेश) अधिनियम 1920 चे कलम 3(अ) प्रमाणे गुन्हा दाखल केलेला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. तसेच प्रभारी अधिकारी, सावंतवाडी पोलीस ठाणे यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात आरोंदा, देऊळवाडी येथे सातेरी भद्रकाली मंदिराच्या पाठीमागे एका पत्र्याच्या शेडमध्ये बांगलादेशी नागरीक वास्तव्यास असल्याबाबत माहिती मिळाली, त्यानुसार प्रभारी अधिकारी, सावंतवाडी पोलीस ठाणे यांनी त्यांच्यां स्टाफसह जावून तेथे वास्तव्यास असलेल्या 4 नागरीकांना ताब्यात घेवून त्यांची चौकशी केली असता ते सर्व नागरीक बांगलादेशी असल्याचे, तसेच ते भारत-बांगलादेश सिमेवरील मुलखी अधिकाऱ्यांच्या लेखी परवानगी शिवाय घुसखोरीच्या मार्गाने भारतात अवैधरित्या प्रवेश करुन आरोंदा, देऊळवाडी येथे रहात असल्याचे निष्पन्न झाले. सदर 4 बांगलादेशी नागरीक अवैधरित्या भारतात वास्तव्य करीत असल्याने त्यांना ताब्यात घेवून त्यांचेविरुध्द सावंतवाडी पोलीस ठाण्यात ही विदेशी व्यक्ती अधिनियम 1946 चे कलम 14 व पारपत्र भारतात प्रवेश नियम 1950 चा नियम 3(अ), 6 (अ), परकिय नागरीक आदेश 1948 परि. 3(1), (अ) प्रमाणे गुन्हा दाखल केलेला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
जिल्हावासियांनी सतर्कता बाळगावी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरीकांना आवाहन करण्यात येते की, आपल्या आजू-बाजूस कोणी बांगलादेशी नागरीक अवैधरित्या वास्तव्यास असलेबाबत माहिती मिळाल्यास, सदरबाबत स्थानिक पोलीस ठाणे, तसेच पोलीस नियंत्रण कक्ष, सिंधुदुर्ग यांना माहिती द्यावी असे आव्हान जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी केले आहे.

Loading

“शिकारी खुद यहाँ शिकार हो गया.” आंबोलीतील प्रकार

सावंतवाडी, दि. १८फेब्रु.: कोकणातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंबोली  येथे शिकार करण्यासाठी आलेल्या सहाजणांना काल आंबोली पोलिसांनी अटक केली. आश्चर्याची बाब म्हणजे ज्या ठिकाणी ग्रामस्थांचे बेकायदेशीर अतिक्रमण विरोधात उपोषण सुरू त्या स्थळापासून पोलिसांनी  १४९ नोटीस दिलेली असतानाही केवळ १०० मीटर वर शिकारीच्या उद्देशाने हा गोळीबार झाला. या ठिकाणी सहाय्यक उपनिरीक्षक जगदीश दुधवडकर हे स्वतः बंदोबस्तासाठी होते. गोळीबार नंतर आंबोली हिरण्यकेशी पर्यटन टोल नाक्यावर ग्रामस्थांनी गाडी अडवली आणि एकूण ६ जणांना पकडून त्यांना पोलीस व वन विभागाच्या ताब्यात दिले. यात सावंतवाडीतील एक वकील आणि अन्य पाच जणांचा समावेश  आहे. संबधितांच्या चारचाकी वाहनात बंदूक,काडतुसे,रक्त लागलेला सुरा सापडले असून ,सुरीला लागलेले ,रक्त व केसांचा पंचनामा पोलीस आणि वनविभाचे अधिकारी यांनी केला.या संशयितांना ताब्यात घेत पुढील कारवाई करण्यात आली. तपासाअंती त्यांनी साळींदर ची शिकार केल्याचे समोर आले.
मात्र उपोषण स्थळापासून केवळ शंभर मीटर वर गोळीबार झाल्याने ग्रामस्थ भयभीत झाले. काल इथे उपोषण असल्याने हा प्रकार उघडकीस आला.  सावंतवाडी ते आंबोली या मार्गावर दाणोली या ठिकाणी पोलिसांचा तपासणी नाका आहे. या तपासणी नाक्यावर योग्य प्रकारे तपासणी होत नाही आहे का? असा प्रश्न ग्रामस्थांकडून विचारण्यात येत आहे. अतिक्रमण आणि  शिकार यामुळे येथील अनेक प्राण्यांच्या जाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत त्यामुळे असे प्रकार थांबविण्यासाठी कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

Loading

‘भाई आता खरंच पुरे झालं, थांबा आता’; दीपक केसरकर यांच्या विरोधात लावलेले बॅनर चर्चेत

सिंधुदुर्ग, दि. १८ फेब्रु.:शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या सावंतवाडी मतदारसंघात वेंगुर्लेमधील पाट परुळे भागात लावण्यात आलेले बॅनर जिल्ह्याच्या राजकारणात सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. ‘भाई आता खरंच पुरे झालं, थांबा आता’, अशा आशयाचे बॅनर दिपक केसरकर यांच्या विरोधात गावकऱ्यांनी लावले आहेत.दीपक केसरकर यांच्याबद्दल गावकऱ्यांनी न केलेल्या कामांचा या बॅनरवर पाढाच वाचला आहे. सध्या हे बॅनर सोशल मीडियावर देखील व्हायरल होत आहे.

मालवणी बोलीभाषेतून या बॅनरवरील सर्व मजकूर लिहिण्यात आला आहे. लावण्यात आलेले हे बॅनर सध्या चर्चेचा विषय बनले आहे. मात्र हे बॅनर खरंच गावकऱ्यांनी लावले की विरोधकांनी असा प्रश्नही निर्माण झाला आहे. कारण बॅनवर फक्त केसरकरांनी न केलेल्या कामांचाच पाढा वाचण्यात आला आहे.

बॅनरमधील मजकूर काय आहे ?

“प्रिय दिपकभाई,

म्हापण, पाट-परुळे, भोगवे, चिपी ही गावांची नावा आठवतत काय ओ? कशी आठावतीत? 5 वर्षा सरली तुमका हय येवन. इसारल्या असताल्यात. आमीय इसारललो तुमी आमचे 15 वर्षा आमदार आसास ते.

मागच्या निवडणुकीत इल्लास तेव्हा आमच्या दोन एक हजार बेरोजगार पोरा-पोरींचे बायोडाटा घेवचो मोठो कार्यक्रम केल्लास. तेंका चिपीच्या ईमानतळार नोकरे लायतलास म्हणुन सांगलास. 5 वर्षात एकाकय नोकरी काय गावाक नाय पण असले येकयेक गजाली सांगुन आमची मता मात्र घेतलास.

तेच्या आधी पर्यटनमंत्री म्हणान हाऊसबोटी, वॉटरस्पोर्टसब, स्थानिकांका हॉटेला घालुक अनुदान, पर्यटनांतसुन रोजगार असले गजाल्यो मारल्यात. आम्ही खुष झाल्लो, मता घातली. पण तुमचे हाऊसबोटी काय आमच्या दर्यात पोचाक नाय.

आमच्या शेजारचा मालवण मात्र ह्याच गोष्टीनी विकसित झाला, पर्यटनात जगाच्या नकाशार लागला. आमी मात्र सगळा आसान थयच रवलो. तुमचे गजाली आयकत. आणि आजुनय तुमका संधी व्हयी म्हणतास??

भाई, 5 वर्षात जसा आमका तोंड दाखयक येवक नाय तशे हेच्या पुढेय येव नकात. आता कोपरापासुन हात जोडुन सांगतव तुमका… भाई, आता खराच पुरे झाला,थांबा आता, असा मजकूर मालवणी भाषेतून यावर लिहिण्यात आला आहे.”

Loading

आमदार वैभव नाईक शिवसेना (शिंदे) गटाच्या वाटेवर? रवींद्र चव्हाणांसोबत घेतलेल्या गुप्त भेटीनंतर चर्चांना उधाण

सिंधुदुर्ग :भाजपचे नेते तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांची गुप्त भेट झाली असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

शिवसेनेचे (उबाठा) आमदार वैभव नाईक यांनी  सार्वजनिक बांधकाम मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली. कणकवली शासकीय विश्राम गृहावर एका खोलीत अचानक ही गुपचूप भेट घेतली. वैभवनाईक यांनी भेट घेतल्याचे मान्य केले आहे. या भेटीचे नेमके कारण समजले नाही. मात्र या भेटीबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.वैभव नाईक हे शिवसेना शिंदे गटात जाणार असल्याच्या अफवा याआधी येत होत्या. मात्र या भेटीने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार असल्याची चर्चा चालू झाली आहे.

Loading

Konkan | स्वतंत्र आंबा बोर्डासाठी 200 कोटींची तरतूद

रत्नागिरी : कोकणातील आंबा व्यावसायिकांसाठी एक दिलासा देणारी  बातमी आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गसाठी स्वतंत्र आंबा बोर्डासाठी २०० कोटीं रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. आठ दिवसांत त्याबाबत अध्यादेश काढण्यात येणार असल्याची घोषणा शासनाने केली आहे.
आंबा बागायतदारांसाठी रत्नागिरी (Ratnagiri), सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी स्वतंत्र आंबा बोर्डाची स्थापना करण्याची प्रक्रिया प्राथमिक टप्प्यात आहे. त्यासाठी २०० कोटींची आर्थिक तरतूद केली आहे. बोर्डाच्या समितीवर शासकीय अधिकाऱ्यांबरोबर अशासकीय सदस्य म्हणून बागायतदारांच्या संघटनेतील दोन सदस्यांना घेण्यात येणार आहे. शेतीमालामध्ये आंबा पिकाचा समावेश व्हावा, यासाठी आयोगाकडे जाऊन मागणी केली आहे. त्यामुळे आंब्याचा लवकरच शेतमालात समावेश होईल.
आंब्यावर फळमाशी पडून मोठे नुकसान होते. त्याबाबत नुकसान भरपाई दिली जाईल. माकडापासून होणाऱ्‍या नुकसानीवरही कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येणार आहे. आंबाफळाच्या सुरुवातीपासून ते निर्यातीपर्यंत संरक्षण देण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. आंबा मंडळाच्या प्राथमिक प्रक्रियेत हे मुद्दे बोर्डाच्या अजेंड्यावर राहणार आहेत.

Loading

“सावधान! येथे अपघाताची शक्यता” | सावंतवाडी रेल्वे स्थानकासमोरील रस्त्यावर गतिरोधकांची नितांत गरज

सावंतवाडी, दि. १२ फेब्रु.: कोणताही अपघात झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येते. त्यानंतर  त्या रस्त्यांवर गतिरोधक बसविले जातात. मात्र अपघात होऊ नये यासाठी आधीच काळजी घेतली तर जीव वाचू शकतात. सुसाट वाहनांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी बाजारपेठेत, गाव वस्तीत, शाळेच्या परिसरातून जाणाऱ्या रस्त्यांवर गतिरोधक बसवून वाहनांच्या वेगावर मर्यादा घालून अपघात टाळले जातात. अशाच तजवीजची गरज  सावंतवाडी स्थानकाच्या प्रवेशद्वारासमोर असेलेला रस्त्यावर करण्याची आवश्यक्यता निर्माण झाली आहे.
सावंतवाडी रेल्वे स्थानकाच्या प्रवेशदारासमोर हा रस्ता असून सावंतवाडी या रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहनचालक वाहने सुसाट चालवीत असतात. या रस्त्याच्या पलीकडे उपहारगृहे, एटीएम आणि इतर दुकाने आहेत. त्याचप्रमाणे स्थानकावरून बाहेर पडून सावंतवाडी साठी एसटी बस पकडायची असेल तर हा रस्ता ओलांडावा लागतो. कित्येकवेळा बस उभी असताना प्रवासी बस चुकू नये म्हणून घाईघाईने रास्ता ओलांडताना दिसतात. अशा वेळी अपघात होण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे. कित्येकवेळा अपघात होता होता वाचला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने येथे दोन ठिकाणी झेब्रा क्रोसिंग मार्किंग पट्टे आखले असले तरीही अपघात टाळण्यासाठी ते अपुरे आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने येथे मोठा अपघात होण्याआधीच दोन्ही बाजूने गतिरोधक बसवावे अशी मागणी होत आहे. 
शास्त्रीय पद्धतीने गतिरोधक बसवावेत
गतिरोधक उंच असल्यास त्याठिकाणी दुचाकी वाहनचालक घसरुन पडण्याची शक्यता असते.  तेंव्हा हे गतिरोधक शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करून बसवावेत, अशी मागणी जनतेतून होत आहे.

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search