Category Archives: सिंधुदुर्ग

मुंबई – गोवा महामार्गाचे काम अपुरे असताना NHAI ला टोल वसुलीची घाई

रत्नागिरी | विजय सावंत : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग बॉर्डरवरील हातिवले येथील टोलनाका आजपासून सुरू करण्यात आला आहे. सकाळ सकाळी सात वाजल्यापासून या ठिकाणी टोलवसुली सुरू झाली असून NHAI ने या टोलवसुलीला परवानगी दिली आहे.

या टप्प्यातील जवळपास 98.02 टक्के काम पूर्ण झाल्याने हा टोल नाका सुरू करण्याचा निर्णय घेतला गेला आहे असे NHAI म्हणने आहे. कोल्हापूर नॅशनल हायवे अथॉरिटी इंडिया या व्यवस्थापनाखाली राजापूर हातिवले येथील टोल नाका सुरू होणार आहे.या टोलनाक्यावर कारसाठी वन वे 90 रुपये भरावे लागतील. तर ट्रक बससाठी 295 रुपये आकारले जात आहेत.

याआधी पण येथील टोल नाका सुरू करून टोल वसुली चालू केली होती. मात्र स्थानिकांचा त्याला मोठा विरोध झाला. माजी खासदार नीलेश राणे यांनी या ठिकाणी आंदोलन केले होते. त्यामुळे येथील टोल वसुली बंद करण्यात आली होती.

महामार्गावर अनेक ठिकाणी कामे चालू आहेत. त्यामुळे वाहतूकीस अडथळे येत आहेत. या ठिकाणावरून गाड्या खूप कमी वेगाने आणि सांभाळून चालवाव्या लागत आहेत. काही ठिकाणी काम पूर्ण झाले असले तरी अनेक बाबीत कमतरता असल्याने अपघात होत आहेत. आमचा टोल वसुली करिता विरोध नाही पण महामार्गाचे काम अपूर्ण असताना आणि फक्त काही भागाचे काम पूर्ण झाले असा दावा करून टोल वसुली करणे पूर्णपणे चुकीचे आहे असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

एकीकडे या महामार्गाला 12 वर्ष रखडवून येथील जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहिला; त्यात भर म्हणुन या अपुऱ्या महामार्गावर टोल वसुली करून प्रशासन त्यांचा रोष ओढवून घेणार आहे. 

Loading

कोकणवासियांनो सावधान; गोव्यात जमिनींचा अपहार करणाऱ्या ‘दिल्ली लॉबी’ चा कोकणात शिरकाव

सिंधुदुर्ग-कोकणात पर्यटन वृद्धीस मोठा वाव आहे; त्याचबरोबर काही मोठ्या प्रकल्पाच्या घोषणा केल्या गेल्या आहेत. त्यामुळे येत्या काळात येथील गुंतवणूक कित्येक पटीने परतावा देणारी असल्याचे लक्षात आल्याने अनेक परप्रांतीय येथे मोठ्या प्रमाणात जमिनी खरेदी करताना दिसत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे अनेकदा बळजबरीने, गैरमार्गाने जमिनी बळकावण्याचे प्रकारसुद्धा घडताना दिसत आहेत.
गोव्यात हल्लीच उघडकीस आलेल्या जमीन घोटाळ्याच्या भूमाफियांनी सिंधदुर्ग जिल्ह्यात सुद्धा आपले पाय पसरवण्यास सुरवात आहे.  त्यांनी या जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात शिरकाव केला असून कायद्यातील पळवाटा, आर्थिक ताकद याचा वापर करत यंत्रणेला हाताशी धरून सोन्याच्या किमतीच्या जमिनी कवडीमोल दाम देवून आपल्या विळख्यात आणायला सुरूवात केली आहे. गोव्यात या भूमाफियांना ‘दिल्ली लॉबी’ असे बोलले जात आहे. मुळात दिल्ली लॉबी म्हणजे दिल्ली प्रांतातून येणारे गुंतवणूकदार आहेत.
या दिल्ली लॉबीने गोव्यात नक्की काय केले ? 
ही लॉबी अवैध मार्गांचा वापर करून पैशाच्या जोरावर मालमत्ता मिळवते. स्थानिकांना सुरूवातीला आमिषे आणि नंतर बळाचा वापर करून बेदखल करतात; मात्र ते कधीच प्रत्यक्ष पडद्यावर येत नाहीत. गोव्यात आयएएस, आयपीएस, आयएफएस हे वरिष्ठ अधिकारी प्रामुख्याने दिल्लीतील असतात. त्यांच्याशी ओळख काढून त्यांचा वापर करत या मालमत्ता मिळवल्या जातात. हे दिल्लीकर मोठमोठ्या हस्तींकडून गुंतवणुकीसाठी पैसे मिळवतात. स्थानिकांना आमिष दाखवून त्यांनाच पुढे करून अवैध मार्गाद्वारे मालमत्ता बळकावल्या जातात. मग त्याची दामदुप्पट व्यावसायिक किमतीत विक्री होते. यात करोडो रूपयांचा घोटाळा केला जातो.जमिनी मिळवण्यासाठी खोटे कागदपत्र, मृत व्यक्तींच्या बोगस स्वाक्षरी, बोगस वारस आदी सगळे मार्ग अवलंबले जातात. गोव्यात गेल्या काही वर्षांत या लॉबीने आर्थिक दहशत निर्माण केली आहे.
गोव्यात असलेली पोर्तुगीजकालीन बंद घरे या लोकांच्या दृष्टीस पडली. ही घरे प्रामुख्याने वर्षानुवर्षे बंद असल्याने पडझड झालेल्या स्थितीत असायची. त्याचे वारसदार परदेशात स्थायिक असायचे. या लोकांनी सरकारी यंत्रणेला हाताशी धरून त्याचे वारसदार शोधले. मुळ दिल्लीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या ओळखीमुळे त्यांना हे सहज शक्य झाले. या वारसदारांकडून कवडीमोल किंमतीने मालमत्ता घेतल्या.त्या घरांची दुरूस्ती करून तीन चार पट दराने याची विक्री केली गेली.
त्यानंतर या लॉबीची नजर गोव्यातील हजारो एकर पडीक जमिनीवर पडली. येथे वारस परदेशात असलेल्या, वारसांना मालमत्तांबाबत माहिती नसलेल्या हजारो एकर जमिन होत्या. अधिकाऱ्यांशी साटेलोटे ठेवून असलेल्या या लॉबीने गोव्याच्या पुराभिलेख खात्यामधून अवैध मार्गाने कागदपत्र मिळवत अशा जमिनींचे वारस शोधले. काहीवेळा अशा वारसांना पैसे देवून कवडीमोल किंमतीने जमिनी खरेदी केल्या. या पुढचे पाऊल टाकत वारसांचा पत्ता नसलेल्या जमिनींचे बोगस वारस उभे केले. निधन झालेल्या किंवा ज्ञान नसलेल्या लोकांच्या नावेही बोगस मालक दाखवून खरेदी व्यवहार करण्यत आले. यासाठी पुराभिलेख, महसूल आणि उपनिबंधक कार्यालयाच्या लोकांना लाच देवून बनावट खरेदीखते करण्यात आली. ग्रामिण भागात हजारो एकर जमिनी यातून खरेदी करून त्याची विक्रीही केली. 
परदेशातून परत आलेल्या काही नागरिकांनी आपली जमिनीची परस्पर विक्री झाल्याबद्दल ची तक्रार दिल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यात आली आणि हा मोठा घोटाळा बाहेर पडला.
सिंधुदुर्गात प्रवेश.
मोपा विमानतळामुळे दोडामार्गमध्ये मालमत्तांना दर येणार याची आधीच कुणकुण असलेल्या या लॉबीने तालुक्यात वैध अवैध मार्गांचा वापर करून मोठ्याप्रमाणात जमिनी घेतल्या आहेत. खरेदीदार कागदावर वेगळे असले तरी यामागे मुळ हीच लॉबी असून बळाचा वापर तेच करत असल्याचे चित्र आहे.
आताही हैदराबाद-पणजी असा मोठा महामार्ग भविष्यात होणार असल्याचे व तो दोडामार्ग तालुक्यातील वझरे गावातून जाणार असल्याची कुणकुण या लॉबीला आहे. याची राज्यस्तरावरच्या प्रशासनाला अधिकृतरित्या कोणतीच माहिती नाही; मात्र ही लॉबी त्या मार्गावरील जमिनी कवडीमोल किंमतीने खरेदी करत आहे. यासाठी यंत्रणेचा वापर आणि स्थानिकांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेतला जात आहे.
दोडामार्ग तालुक्यातील एका गावात या लॉबीची छुपी गुंतवणूक काही वर्षांपूर्वीपासून आहे. या ठिकाणी स्थानिकांना कवडीमोल किंमत देवून व इतर मार्गाने जमिनी घेण्यात आल्या. त्या ठिकाणी आलीशान घरे, सदनिका तयार करण्यात आल्या. त्या आता विक्रीसाठी सज्ज असून त्यासाठीचे ग्राहकही करोडो रूपये मोजणारे शोधले जात आहेत.
गोव्यात घोटाळा उघडकीस आला तरी या लॉबीचे व्यवहार सिंधुदुर्गात चालूच आहेत. कारण सध्या हा भाग अविकसित असला तरी येथे येणारे भविष्यातील प्रकल्पांमुळे येथे विकासाला मोठा वाव आहे. भविष्यात ही लॉबी राजापूर-रत्नागिरीसुद्धा शिरकाव करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कोणती खबरदारी घ्याल?
कोकणातील अनेक लोक नोकरीधंद्याच्या निमित्ताने शहरात वास्तव्यास असतात. त्यांच्या जमिनीवर या भूमाफियांचा डोळा असतो. अशा जमिनी सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी घेऊन परस्पर विकल्या जाऊ शकतात. आपल्या गावात-वाडीत जमिनी बद्दल जेवढे फेरफार होतात त्याबद्दल हरकती नोंदविण्यास https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/aaplichawdi या  शासकीय संकेतस्थळावर सूचना प्रसिद्ध केली जाते. या चावडी वर आपण नजर ठेवणे गरजेचे आहे. तसेच आपला सातबारा वारंवार तपासून त्यामध्ये काही फेरफार झाले आहेत का ते पाहणे महत्वाचे आहे.  

Loading

घर ते शाळा यांमधील अंतरामुळे शाळा सोडाव्या लागणाऱ्या गरजू मुलींना मोफत सायकल देणार – आ. नितेश राणे

सिंधुदुर्ग : घर ते शाळा यांमधील जास्त अंतर, वाहतुकीची सोय नाही या कारणामुळे अनेकदा पालक मुलींना शाळेत पाठवणे टाळतात. अशा मुलींसाठी आमदार नितेश राणे यांनी आपल्या मतदारसंघात एक स्तुत्स्य उपक्रम हाती घेतला आहे. आपल्या कणकवली देवगड वैभववाडी मतदारसंघातील  प्राथमिक आणि माध्यमिक शाळेमध्ये शिकणाऱ्या गरजू मुलींना मोफत सायकल प्रदान करणार असल्याची घोषणा आमदार नितेश राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे. 
पहिल्या टप्यात शाळेतील एकूण ३७९ मोफत सायकल वाटप करण्यात येणार आहे. केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त १० एप्रिल रोजी ११० मुलींना मोफत सायकल देऊन शुभारंभ करण्यात येणार आहे. हा उपक्रम मर्यादित कालावधीसाठी नसून कायम चालू राहणार आहे असे नितेश राणे म्हणाले आहेत. 
कणकवली देवगड आणि वैभववाडी या तालुक्यांमध्ये जेव्हा मुली शाळेकडे जातात.त्यांना शाळेत पोहचण्याची अडचण होते.काही शाळा दूर असल्याने पालक मुलींना लीं पाठवत नाहीत किंवा संध्याकाळी उशिरा होत असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने याकडे गांभीर्याने पाहून मुलींना शाळेत पाठवले जात नाही .माझ्या मतदार संघातील शिक्षणापासून एकही मुलगी वंचित राहू नये, यासाठीच कणकवली विधानसभा क्षेत्रातील शालेय मुलींनी असे नितेश राणे एका पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत. 
प्राथमिक आणि माध्यमिक शाळांकडून अशा गरजू मुलींची यादी मागवली जाणार आहे. यादीप्रमाणे गरजू मुलींसाठी त्या शाळेला सायकल दिली जाणार आहे. शिक्षण पूर्ण झाल्यावर मुलींना ही सायकल शाळेकडे पुन्हा द्यावी लागणार आहे. ती सायकल कंडिशन तपासून त्याच शाळेतील इतर गरजू मुलींना दिली जाईल. 

Loading

हत्ती परत आलेत; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

दोडामार्ग | सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात हत्तींनी परत येवून  धुडगूस घालणे चालू केल्याने येथील नागरिकांमध्ये चिंतेचे अणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील काही दिवस केर आणि मोर्ले या गावांतील बागायतींमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान करून त्यांनी आपला मोर्चा वायंगणतड या गावी वळवला आहे.

अचानक शेतात हत्तीं आल्याने वायंगणतड ग्रामस्थांनी शेतात घाव घेवून त्यांना हिसकावून लावण्याच्या प्रयत्न केला. मात्र हत्तींना त्यांच्या प्रयत्नांना दाद दिली नाही. त्यानंतर खबर मिळाल्यावर वन विभागाचे कर्मचारी हजर झाले. ग्रामस्थांनी आणि या कर्मचाऱ्यांनी कसेबसे त्यांना हिसकावून लावले. मात्र हत्तीं पुन्हा आल्याने ग्रामस्थांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हत्तींकडून शेताची, बागायतीची मोठ्या प्रमाणात नासधूस होत असल्याने हाता तोंडाशी आलेले शेती उत्पादन शेतकर्‍यांना गमावण्याची वेळ आली आहे.

महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा या तिन्ही राज्यांच्या सीमेवर वसलेलं तळकोकणातील दोडामार्ग मधील तिलारीच्या खोऱ्यात गेली वीस वर्ष हत्तीचं वास्तव्य असून शेती आणि बागायतींचं नुकसान करत आहेत. पावसाळा सुरु झाला की हे हत्ती घाटमाथ्यावर जातात आणि पुन्हा पावसाळा संपल्यानंतर परत येतात. पाच ते सहा हत्तींचा कळप तिलारीच्या खोऱ्यात गेली वीस वर्षे वावरत आहे. त्यामुळे या ठिकाणचे ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांची हत्तींचा बंदोबस्त करण्याची मागणी पुन्हा जोर धरु लागली आहे. उन्हाळी शेती, काजू, नारळ, सुपारी केळी या बागायतीचे हत्तीने मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आहे. 

 

Loading

दोन ते तीन महिन्यांमध्ये नारायण राणे यांचं मंत्रीपद जाणार- आ. वैभव नाईक

सिंधुदुर्ग -ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याबद्दल एक भाकीत केले आहे. .दोन ते तीन महिन्यांमध्ये नारायण राणे यांचं मंत्रीपद जाणार असल्याचं भाकीतच नाईक यांनी वर्तवलं आहे. हे भाकीत नसून वस्तुस्थिती आहे. असं देखील वैभव नाईक म्हणाले आहेत. नारायण राणे यांचं शिवसेनेवर टीका करण्याचं काम होतं. ते काम आता संपलेलं आहे त्यामुळे त्यांचं मंत्रीपद पुढील काही महिन्यांमध्ये जाणार आहे. असा दावा त्यांनी केला.तर पुढं म्हणाले की, नारायण राणेंना माझ्या विरोधात माझ्या मतदारसंघातून त्यांच्या मुलाला उभं करायचं आहे. मात्र जनतेचा कौल हा उद्धव ठाकरेंसोबत आहे त्यामुळे माझ्याबद्दल संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न ते करत आहेत.
तर शिंदेंच्या शिवसेनेतील आमदारांवर बोलताना म्हणाले, जे आमदार आमच्यातून शिंदे गटात गेले आहेत ते आमदार आमच्यात पुन्हा येण्याचा प्रयत्न करत आहेत. उद्धव ठाकरे यांनी आदेश दिला तर अनेक आमदार परत येण्यास तयार आहेत. आमच्यातून गेलेल्या आमदारांना आता त्यांची खरी परिस्थिती कळालेली आहे. असा दावा देखील त्यांनी केला आहे.

Loading

‘एप्रिल फुल आमदार गुल’; मंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात त्यांच्याच मतदारसंघात अनोखे आंदोलन…

सावंतवाडी – शिवसेना ठाकरे गटाने काल दिनांक 1 एप्रिल रोजी मंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात अनोखे आंदोलन केले. मंत्री केसरकर म्हणजे एप्रिल फुल आमदार गुल अशा घोषणा देत ढोल बडवून केसरकर यांचा निषेध नोंदवला.शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ याच्या नेतृत्वाखाली येथील एसटी बसस्थानकात आंदोलन करण्यात आले. 

सावंतवाडीतील जगन्नाथ उद्यानात मोनोरेल सुरू, बसस्थानक, आंबोली-गेळे कबुलायतदार प्रश्न, मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, पंचायत समिती इमारत नवीन जागेत स्थलांतर, एक लाख सेट टॉप बॉक्स आदिची घोषणा केल्या पण प्रत्यक्षात काहीच नाही. मंत्री केसरकर हे पंधरा वर्षे लोकांच्या डोळ्यात धुळ फेकण्याचे काम केले आहे, असा आरोप करुन यापुढे ते आमदार म्हणून निवडून येणार नाही. यासाठी आम्ही ठाकरे गट म्हणून प्रयत्न करणार असे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी सांगितले.

या आंदोलनात मायकल डिसोजा, बाळा गावडे, गुणाजी गावडे, चंद्रकांत कासार, डॉ. जयेंद्र परुळेकर, शब्बीर मणियार, शैलेश गवंडळकर, आबा सावंत, भारती कासार, श्रृतिका दळवी, श्रेया कासार, अर्चना बोंद्रे आदीसह शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Loading

काजूच्या दरात घसरण; काजू बागायतदार हैराण..

रत्नागिरी | रत्नागिरी आणि  सिंधुदुर्ग जिल्ह्यात काजूचा (Raw Cashew nuts) दर दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. दोन्ही जिल्ह्यात काजूचा दर किलोला ११० ते ११५  रुपये प्रति किलोवर आला आहे. सुरवातीला १३५ रुपये प्रति किलो असेलेला दर असा पडत असल्यामुळे त्यामुळे काजू बागायतदार वर्ग हैराण झाला आहे.
कोरोनापूर्वी हा दर प्रतिकिलो १५० वर होता; परंतु कोरोना काळात तो ९० रुपयांवर आला. त्यानंतरच्या काळात हा दर १३०/१३५ रुपयापर्यंत आला. यंदाही हा दर १३५ रुपयापर्यंत गेला होता; परंतु आता तो १२० रुपये प्रति किलोपेक्षाही खाली गेला आहे. या मध्ये लक्ष न घातल्यास त्यापेक्षाही हा दर कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गावठी काजू कोणी व्यापारी घेत नाही, घेतल्यास बाजारात चाललेल्या बाजारभावापेक्षा कमी भावात घेतल्या जातात. त्यामुळे कलमी काजू आणि गावठी काजुंसाठी दोन वेगवेगळे दर काही बाजारात चालू आहेत. 
प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, काजू बागायतदारांना दिलासा देण्यासाठी काजूला हमीभाव द्यावा तसेच केंद्राने काजूवरील कमी केलेले आयात शुल्क पूर्ववत करावेअशी मागणी जिल्हा शेतकरी संघटना आणि जिल्हा बागायतदार संघटनेने संयुक्तपणे केली आहे. 

Block "aadhar-pan" not found

 







मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Loading

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३ महिलांच्या हाती येणार ‘अबोली’ रिक्षांचे स्टिअरिंग….

संग्रहित छायाचित्र
सिंधुदुर्ग | जिल्ह्यातील महिलांना स्वयंरोजगाराचा पर्याय निर्माण करून देऊन त्याचे आर्थिक सबलीकरण करण्यासाठी सिंधुदुर्ग बँकेने ‘अबोली ऑटो रिक्षा’ ही महत्वाकांक्षी योजना हाती घेतली आहे. या योजनेबाबत मागील महिन्यात इच्छुक महिलांना पुढे येण्यासाठी आवाहन केले होते. या योजनेचा शुभारंभ उद्या शनिवार दिनांक १८ मार्च २०२३ रोजी दुपारी ३ वाजता सौ. निलमताई राणे यांच्या हस्ते होणार आहे. 
हा समारंभ जिल्हा बँकेचे प्रधान कार्यालय ओरोस येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पार पडला जाणार असून तेथे सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक नितेश राणे उपस्थित राहणार आहेत. या प्रसंगी ३ महिलांना अबोली रिक्षाचे वितरण करण्यात येणार आहे.
या योजनेच्या द्वारे महिला जिल्ह्यात पिंक ऑटो रिक्षा चालवताना दिसणार आहेत व त्यासाठी पुढाकार घेणाऱ्या महिलांना सवलतीच्या व्याजदरात जिल्हा बँक अर्थसहाय्य करणार असून प्रशिक्षणासह, बॅच रिशा परमिटचा खर्च आमदार नितेश राणे स्वतः करणार आहेत जिल्हा बँकेने या योजनेसाठी ९% सवलतीच्या जाहीर केला असून किमतीच्या८५% कर्ज पुरवठा जिल्हा बँक करणार आहे उर्वरित १५ टक्के कर्ज पुरवठा हा पहिल्या येणाऱ्या पाच महिलांसाठी स्वतः आमदार नितेश राणे करणार आहेत. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील बॅच, परमिट यासाठी लागणारा खर्च पहिल्या पाच महिलांसाठी आमदार नितेश राणे हे करणार आहेत.  
जनमताचा कौल  – सरकारने राज्यसरकारी कर्मचाऱ्यांसाठी जुनी निवृत्तीयोजना पुन्हा लागू करावी का?

Loading

एका रात्रीत ३ मंदिरात चोरी; चोरट्यांसाठी कोकणातील मंदिरे बनत आहेत ‘ईझी टार्गेट’

बांदा : काल रात्री सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यातील एक नव्हे तर तीन मंदिरात चोरटयांनी चोरीचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे मंदिरांच्या सुरक्षेविषयी प्रश्न निर्माण झाला आहे.  मडुरा, रोणापाल व इन्सुली येथील ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात काल मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. सर्वप्रथम चोरट्यांनी मडुरा माऊली मंदिराचा मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून फंडपेटी फोडून रोकड लंपास केली. त्यानंतर रोणापाल माऊली मंदिरात चोरीचा अयशस्वी प्रयत्न केला. त्यानंतर पहाटेच्या सुमारास इन्सुली माऊली मंदिर फोडले. त्यात चोरट्यांच्या हाती फारसे काही लागले नाही.
इन्सुली व रोणापाल मंदिरात चोरी करताना दोघे चोरटे सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाले आहेत. सीसीटीव्ही फुटेजमध्ये अंदाजे विशीतील दोघे युवक दिसत आहेत. बांदा पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरु आहे. बांदा पोलीसांसमोर चोरट्याने पकडण्याचे आव्हान आहे.
कोकणातील मंदिरे बनत आहेत ‘ईझी टार्गेट’
तळकोकणतील मंदिरे काही अपवाद वगळता गाववस्तीपासून दूर असतात. रात्री मंदिरपरिसर निर्मनुष्य असतो. चोरट्यांना ती ईझी टार्गेट वाटायला लागली आहेत त्यामुळे या ठिकाणी  चोरीचे प्रयत्न होताना दिसत आहेत. चोरीचे प्रकार वाढल्याने अनेक मंदिरात सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. पण सुरक्षेच्या या उपाययोजना पण कमी पडताना दिसत आहेत.  

Loading

जुगाराच्या पैशाच्या देवाण-घेवाणीतून कणकवलीत रिक्षा जाळण्याचा प्रकार

कणकवली | जुगाराच्या पैशाची आर्थिक देवाण-घेवाणीतुन झालेल्या भांडणातून गुरुवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास घरासमोर लावलेली रिक्षा जाळून टाकल्याची खळबळ जनक घटना कलमठ मठकर कॉम्प्लेक्स या ठिकाणी घडली. या संदर्भात सुरज जाधव (कणकवली – कलमठ मठकर कॉम्प्लेक्स) यांनी कणकवली पोलिसात फिर्याद दिली असून या फिर्यादीनुसार ठाकरे गटाचे कार्यकर्ते रमेश  चव्हाण यांच्यासह आप्पा शिर्के याच्या विरोधात कणकवली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिक्षा जाळण्याच्या या प्रकाराने मात्र तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. 
याबाबत सुरज जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सुरज जाधव यांचे जुगाराच्या पैशाच्या देवान घेवाणीवरून वरून काल बुधवारी आप्पा शिर्के यांच्यासोबत भांडण झाले होते. त्यावेळी रिमेश चव्हाण, सुनील काणेकर व चेतन पाटील यांनी शिवीगाळ करत धमकी दिली. तसेच रिक्षाच्या मडगळ वर दगड मारून नुकसान केले. याप्रकरणी सुरज जाधव यांनी कणकवली पोलिसात बुधवारी रात्री चौघां विरोधात तक्रार दाखल केली होती. सुरज जाधव हे घरी जात असताना रिमेश चव्हाण यांनी तू रिक्षा घेऊन घरी जा तुझी वाटत लावतो अशी धमकी दिल्याचे या फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर फिर्यादी हे घरी गेले. व रात्री झोपत असताना त्यांना घराच्या खिडकीतून बाहेर ज्वाळा दिसू लागल्या. त्यावेळी त्यांनी घराबाहेर येऊन पाहिले असता रीमेश चव्हाण व आप्पा शिर्के हे पळताना दिसून आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर पाणी मारून रिक्षाला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत आगीत रिक्षा जळून बेचिराख झाली होती. तर या रिक्षाच्या बाजूला संकेत फोंडेकर यांच्या असलेल्या दोन दुचाकी ना देखील आगीची झळ बसली. या आगीत रीक्षेचे सुमारे 2 लाखाचे नुकसान झाले आहे. या संदर्भात कणकवली पोलिसात संशयित आरोपींच्या विरोधात 435 व 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search