Category Archives: कोकण

Konkan Railway: दोन्ही गाड्या दादर पर्यंत नेण्यासाठी शिवसेनेकडून रेल्वेला वाढीव अवधी; होळीआधी मागणी पूर्ण न झाल्यास ‘रेल रोको’ चा इशारा

   Follow us on        

मुंबई: दादरहून कोकणात जाणाऱ्या रत्नागिरी व सावंतवाडी पॅसेंजर ट्रेन अचानक बंद केल्यामुळे शिवसेनेने पुकारलेले (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शनिवारचे ‘रेल रोको’ आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आल्याची माहिती शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत यांनी दिली आहे.

कोकणी जनतेची गैरसोय करणाऱ्या मध्य रेल्वेला आठवडाभरापूर्वी शिवसेनेने उग्र आंदोलनाचा इशारा दिला होता. दादर-रत्नागिरी आणि दादर- सावंतवाडी पॅसेंजर होळीआधी सुरू करा, नाहीतर १ मार्चला दादर स्थानकात तीव्र ‘रेल रोको’ करू, दादरहून गोरखपूर व बरेलीला जाणाऱ्या ट्रेन सुटूच देणार नाही, असा निर्वाणीचा इशारा शिवसेनेच्या शिष्टमंडळाने दिला होता. शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत, शिवसेना नेते-माजी खासदार विनायक राऊत, शिवसेना उपनेते अरुण दुधवडकर, आमदार सुनील शिंदे, महेश सावंत, रेल कामगार सेनेचे सरचिटणीस बाबी देव, संजय जोशी, विभागप्रमुख संतोष शिंदे यांनी २० फेब्रुवारी रोजी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची भेट घेऊन त्यांना स्मरणपत्र दिले होते. त्याचवेळी दोन्ही पॅसेंजर दादरवरून कशा सोडता येईल, या ट्रेनचा इतर गाड्यांवर कोणताही परिणाम होणार नाही, याबाबत रेल्वे कामगार सेनेचे संजय जोशी, बाबी देव यांनी अभ्यासपूर्ण म्हणणे मांडले होते. मध्य रेल्वे प्रशासनाने आपण दादर ते दिवा मार्गाचा पाहणी करून ही गाडी पुन्हा दादर पर्यंत कशी नेता येईल याबाबत अभ्यास करू असे आश्वासन दिले होते. त्यामुळे शिवसेनेने रेल्वेला यासाठी अधिक वेळ देण्याचा निर्णय घेतला असून हे आंदोलन स्थगित केले असल्याचे सांगितले आहे.

होळीआधी ट्रेन सुरू झाली नाही तर ‘रेल रोको

दादर-रत्नागिरी आणि दादर-सावंतवाडी या दोन्ही पॅसेंजर पूर्वीच्या वेळापत्रकानुसार दादर स्थानकातून तातडीने सुरू करण्याबाबत रेल्वे विभागाकडून होळीआधी योग्य ती कार्यवाही न झाल्यास दादरवरून गोरखपूर आणि बरेलीला जाणाऱ्या ट्रेनसमोर कोणत्याही क्षणी ‘रेल रोको’ आंदोलन केले जाईल. दादर-गोरखपूर आणि दादर-बरेली या गाड्या दादरवरून सुटू देणार नाही, असा इशारा शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून दिला आहे.

पवनार-पत्रादेवी द्रुतगती महामार्गाला कोल्हापुरच्या पाच तालुक्यातील शेतकर्‍यांचा ‘सशर्त’ पाठींबा

   Follow us on        

Shaktipeeth Expressway Updates:राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणार्‍या पवनार पत्रादेवी (नागपूर – गोवा) महामार्गा संबधित एक महत्वाची बातमी समोर आली आहे. या महामार्गाला कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड, राधानगरी, आजरा, हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यातील शेतकर्‍यांनी सशर्त पाठिंबा दर्शविला आहे. येथील शेतकऱ्यांनी भूसंपादनाच्या 5 पट बाजारभाव मोबदल्याच्या बदल्यात पवनार पत्रादेवी शक्तीपीठ द्रुतगती महामार्गाला पाठिंबा दर्शवला आहे.

प्रत्यक्षात भुदरगड तालुक्यातील शेतकऱ्यांनी शक्तीपीठ द्रुतगती महामार्गासाठी यापूर्वीच अधिकाऱ्यांना पाठिंब्याचे पत्र दिले असून त्यांनी या तालुक्यासाठी आणि जिल्ह्यासाठी विशेष विकास पॅकेजची मागणी केली आहे.

पवनार – पत्रादेवी एक्स्प्रेस वे ८०२ किलोमीटर लांबीचा आहे. या द्रुतगती मार्गाला सहा लेन कॉरिडॉर आहेत. नागपूर आणि गोवा यांना जोडणारा नवीन द्रुतगती मार्ग हा, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) विकसित करीत आहे. या एक्स्प्रेसवेमुळे प्रवासाचा वेग वाढणार आहे. ज्यामुळे वेळेचीही बचत होणार आहे. नागपूर आणि गोवा यांना जोडणाऱ्या नवीन द्रुतगती मार्गामुळे प्रवासाचा वेळ, १८ ते २० तासांवरून केवळ ८ ते १० तासांवर येईल. त्यामुळे महाराष्ट्रातील पर्यटनालाही चालना मिळणार आहे.

Konkan Railway | होळी आणि उन्हाळी हंगामासाठी पाश्चिम रेल्वेच्या विशेष गाडीची घोषणा; एकूण ७० फेर्‍या

   Follow us on        
Konkan Railway News: या वर्षी होळीला आणि उन्हाळी सुट्टीत कोकणात आपल्या गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे. या वर्षी उन्हाळी हंगामात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी पाश्चिम रेल्वे प्रशासनाने कोकण रेल्वे मार्गावर एक विशेष द्वि-साप्ताहिक गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडीचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
गाडी क्रमांक ०९०५७/०९०५८ उधना जंक्शन. – मंगळुरू जं. – उधना जं. द्वि-साप्ताहिक विशेष
गाडी क्र. ०९०५७ उधना जं. – मंगळुरू जं. ही  द्वि-साप्ताहिक स्पेशल ही गाडी उधना जंक्शन येथून दिनांक  ०२/०३/२०२५  ते २९/०६/२०२५ पर्यंत दर बुधवारी आणि रविवारी रात्री ८ वाजता निघेल आणि मंगळुरू जंक्शनला दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ७.४५ वाजता पोहोचेल. या गाडीच्या एकूण ३५ फेर्‍या होणार आहेत.
गाडी क्र. ०९०५८ मंगळुरु जं. – उधना जं. द्वि-साप्ताहिक स्पेशल  ही गाडी मंगळुरु जंक्शन येथून दिनांक  ०३/०३/२०२५  ते ३०/०६/२०२५ पर्यंत गुरुवारी आणि सोमवारी रात्री १०.१० वाजता मंगळुरु जं. येथून निघून ती उधना जंक्शनला दुसऱ्या दिवशी २३:०५ वाजता पोहोचेल. या गाडीच्या एकूण ३५ फेर्‍या होणार आहेत.
ही गाडी वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी, मडगाव जं., कानाकोना, कारवार, अंकोला, गोकर्ण रोड, कुमता, मुर्डेश्वर, भटकळ, मुकांबिका रोड बयंदूर, कुंदापुरा, उडुपी, मुल्की आणि सुरतकल स्टेशन येथे थांबेल.
डब्यांची रचना : एकूण २२ आयसिएफ कोच = टू टियर एसी –  ०१ कोच, थ्री टियर एसी – ०५ कोच, स्लीपर – १२ कोच, जनरल – ०२ कोच,  एसएलआर – ०२.
प्रवाशांनी कृपया सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Konkan Railway: होळीसाठी कोकणरेल्वे मार्गावर अजून एका गाडीची घोषणा

   Follow us on        
Konkan  Railway: होळीसाठी कोकणात जाणाऱ्या  प्रवाशांसाठी खुशखबर आहे. होळी सण २०२५ दरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने मध्य रेल्वेच्या समन्वयाने अजून एक विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडीचा तपशील खालीलप्रमाणे आहे,
गाडी क्र. ०१०६३/०१०६४ लोकमान्य टिळक (टी) – तिरुवनंतपुरम उत्तर लोकमान्य टिळक (टी) साप्ताहिक विशेष: 
गाडी क्र. ०१०६३ लोकमान्य टिळक (टी) – तिरुअनंतपुरम उत्तर वीकली विशेष ही विशेष गाडी लोकमान्य टिळक (टी) येथून गुरुवार दिनांक  ०६/०३/२०२५ आणि १३/०३/२०२५ रोजी १६;०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी २२:४५ वाजता तिरुअनंतपुरम उत्तरला पोहोचेल.
गाडी क्र. ०१०६४ तिरुवनंतपुरम उत्तर – लोकमान्य टिळक (टी) साप्ताहिक विशेष ही विशेष गाडी  तिरुअनंतपुरम उत्तर येथून शनिवार, दिनांक ०८/०३/२०२५ आणि १५/०३/२०२५ रोजी १६:२० वाजता सुटेल आणि  लोकमान्य टिळक (टी) येथे तिसऱ्या दिवशी ००:४५  वाजता पोहोचेल.
ही गाडी ठाणे, पनवेल, पेण, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी , थिविम, करमाळी, मडगाव, कारवार, गोकर्ण रोड, कुमठा, मुर्डेश्वर, भटकळ, मुकांबिका, सुरेंद्र रोड, सुरेंद्र रोड, उंबरनाथ रोड मंगळुरू जं, कासरगोड, कन्नूर, कालिकत, तिरूर, शोरानूर जं., त्रिसूर, एर्नाकुलम टाउन, कोट्टायम, तिरुवल्ला, चेंगन्नूर, मावेलीकारा, कायनकुलम आणि कोल्लम जं. या स्थानकावर थांबणार आहे.
डब्यांची रचना: एकूण 22 एलएचबी कोच: टू टायर एसी –  ०१ कोच, थ्री टायर एसी – ०६ कोच, स्लीपर – ०९  कोच, जनरल – ०४ कोच, जनरेटर कार – ०१, एसएलआर – ०१
प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.




Traffic block at CSMT: कोकण रेल्वेमार्गावर धावणार्‍या १० गाड्यांवर परिणाम होणार

   Follow us on        

Megablock on Central Railway: मुंबई सीएसएमटी येथील फलाट क्रमांक १२ आणि १३ च्या कामासाठी मध्यरेल्वे या स्थानकावर या आठवड्यात एक ब्लॉक घेणार आहे. त्यामुळे या स्थानकावरून सुटणार्‍या काही गाड्यांच्या आरंभ आणि अंतिम स्थानकांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात बदल करण्यात आला आहे. यामध्ये कोकण रेल्वे मार्गावर धावणार्‍या गाड्यांचा समावेश असून याबाबतचा तपशील खालीलप्रमाणे.

आरंभ स्थानकांमध्ये बदल करण्यात आलेल्या गाड्या

दिनांक ०१ मार्च रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक २०१११ सीएसएमटी-मडगाव कोकणकन्या एक्सप्रेस ही गाडी आपला प्रवास पनवेल या स्थानकावरून या स्थानकावरील नियोजित वेळेत सुरु जाणार आहे.

दिनांक ०२ मार्च रोजी सुटणारी गाडी क्रमांक १२०५१ मुंबई मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस, गाडी क्रमांक २२२२९ मुंबई मडगाव वंदे भारत एक्सप्रेस, गाडी क्रमांक २२११९ मुंबई मडगाव तेजस एक्सप्रेस या गाड्या दादरवरून या स्थानकावरील नियोजित वेळेत आपला प्रवास सुरु करणार आहेत. तर गाडी क्रमांक १०१०३ सीएसएमटी-मडगाव मांडवी एक्सप्रेस ही गाडी आपला प्रवास पनवेल स्थानकावरून पनवेल स्थानकावरील नियोजित वेळेत सुरु करणार आहे.

 

अंतिम स्थानकांत बदल करण्यात आलेल्या गाड्या

गाडी क्रमांक २२१२० मडगाव मुंबई तेजस एक्सप्रेस, गाडी क्रमांक १२०५२ मुंबई मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस या गाड्यांचा प्रवास दिनांक २६ फेब्रुवारी ते ०१ मार्च दरम्यान दादरला तर  गाडी क्रमांक १२१३४ मंगलोर मुंबई एक्सप्रेस या गाडीचा प्रवास ठाण्याला संपविण्यात येणार आहे.

दिनांक ०१ मार्च रोजी गाडी क्रमांक २०११२ मडगाव -सीएसएमटी कोकणकन्या एक्सप्रेस, गाडी क्रमांक १०१०४ मडगाव -सीएसएमटी मांडवी एक्सप्रेस-या गाड्यांचा प्रवास पनवेल स्थानकावर संपविण्यात येणार आहे.

Konkan Railway: दिवा स्थानकावरून कोकणरेल्वेच्या गाड्या सोडणे नियमबाह्य़ आणि गैरसोयीचे

   Follow us on        
Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या ५०१०३/५०१०४ रत्नागिरी फास्ट पॅसेंजर आणि १०१०५/१०१०६ दिवा सावंतवाडी दिवा एक्सप्रेस या दोन गाड्या दिवा स्थानकावरून सोडण्यात येतात. मात्र कोकण रेल्वे मार्गावर चालविण्यात येणाऱ्या या दोन गाड्यांसाठी सुरवातीचे स्थानक म्हणुन दिवा स्थानक गैरसोयीचे असून नियमबाह्य़ही आहे. या गाड्या दादर किंवा मुंबई सीएसएमटी या स्थानकांवरून सोडण्यात याव्यात अशी मागणी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीचे सेक्रेटरी अक्षय महापदी यांनी केली आहे.

रेल्वे बोर्डाच्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन

दिवा स्थानकावर सध्या गाड्यांमध्ये पाणी भरण्याची सोय नाही आहे. रेल्वे बोर्डाने दिनांक १६.०४.२०१० रोजी जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार पुढील प्रवासात गैरसोय टाळण्यासाठी गाडयांना सुरवातीच्याच स्थानकावर पाणी भरणे बंधनकारक केले आहे. असे असताना येथून सुटणाऱ्या या दोन गाड्यामध्ये पाणी पुढील स्थानकावर म्हणजे पनवेल स्थानकावर भरण्यात येते. यावरून विभागीय रेल्वे प्रशासन रेल्वे बोर्डाच्या सुचना पाळत नसल्याचे स्पष्ट होत आहे. या गाड्यांना पनवेल स्थानकावर पाणी भरावे लागत असल्याने पनवेल स्थानकावर नियमित थांब्याच्या कालावधीपेक्षा अधिक कालावधीपर्यंत गाडी थांबवून ठेवावी लागत असल्याने प्रवाशांच्या वेळेचा अपव्यव होतो.
फक्त दोन गाड्यांसाठी दिवा स्थानकावर पाणी भरण्याची व्यवस्था करणे अव्यवहार्य आहे. दिवा परिसरात पाण्याची कमतरता पाहता अशी सोय केली तरी गाड्यांसाठी पाण्याची टंचाई भासू शकते. त्यापेक्षा या गाड्या पुढे दादर, सीएसएमटी नेल्यास त्यांच्यासाठी लागणारे पाणी आणि देखभालीचा प्रश्न राहणार नाही.

प्रवाशांसाठी गैरसोयीचे

मांडवी, जनशताब्दी, वंदे भारत, तेजस, नेत्रावती, मत्स्यगंधा, कोकणकन्या, मडगाव वांद्रे, लोकमान्य टिळक टर्मिनस मडगाव या गाड्या कोकणातील बहुतांश स्थानकांवर थांबत नाहीत. त्या स्थानकांवर केवळ सावंतवाडी एक्सप्रेस आणि रत्नागिरी पॅसेंजर या किंवा यांपैकी कोणतीतरी एकच गाडी थांबते. त्यामुळे या ठिकाणी प्रवास करणार्‍या प्रवाशांना इतर पर्यायच नाही. हे प्रवासी ठाणे, भांडुप, घाटकोपर, मुंबई, बोरिवली, मीरा-भायंदर, वसई  विरार येथील आहेत. या गाड्या दिवा स्थानकापर्यंत मर्यादित असल्याने या गाड्यांचा लाभ घेताना त्यांना खासकरून आबालवृद्धांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागतो त्यामुळे या गाड्या दादर किंवा मुंबई सीएसएमटी पर्यत विस्तारित केल्यास त्यांचा त्रास बर्‍यापैकी वाचेल.

फलाटाची कमी लांबी

दिवा स्थानकावरील फलाटांची लांबी पुरेशी नसल्याने या गाडयांना अधिक डबे जोडण्यावर मर्यादा येत आहेत. १०१०५/१०१०६ दिवा सावंतवाडी दिवा ही गाडी एलएचबी स्वरूपात चालविण्यात येत असून सध्या ती १६ डब्यांच्या चालविण्यात येत आहे. कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांची गर्दी पाहता ही गाडी २२ डब्यांची करणे आवश्यक आहे. दिवा स्थानकांवरील कमी लांबीच्या प्लॅटफॉर्ममुळे ते शक्य होणार नाही.

दिवा स्थानकासाठी ५ डबे राखीव असावेत

सध्या या गाड्यादिवा स्थानकावरून सोडण्यात येत असल्याने कल्याण डोंबिवली आणि  दिवा भागातील प्रवाशांना ही गाडी सोयीची आहे. ही गाडी दादर किंवा मुंबई  सीएसएमटी स्थानकापर्यंत विस्तारित झाल्यास येथील प्रवाशांच्या सोयीसाठी किमान ५ जनरल डबे दिवा स्थानकाला राखीव ठेवावे, जेणेकरून या प्रवाशांना प्रवास करणे सोयीचे होईल.
या मुद्द्यांवर श्री.अक्षय महापदी यांनी रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधले असून या गाड्या दादर किंवा मुंबई सीएसएमटी स्थानकापर्यंत विस्तारित कराव्यात अशी इमेलद्वारे मागणी केली आहे.

विशेष गाडीतून महाकुंभमेळ्यासाठी जाणारे गोव्यातील १०० प्रवासी रत्नागिरीहून माघारी फिरले; कारण काय?

   Follow us on        

रत्नागिरी: गोवा सरकारने महाकुंभ मेळ्यासाठी चालविलेल्या विशेष गाडीला तुफान प्रतिसाद मिळाला असून गाडीच्या एकूण क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी झाल्याने या गाडीला मोठी गर्दी झाली होती. या गर्दीमुळे अनेक प्रवाशांना नाईलाजाने आपला प्रवास अर्धवट सोडून परत माघारी फिरावे लागले असल्याची बातमी समोर आली आहे.

गोवा सरकारने गोव्यातील भाविकांनी महाकुंभ मेळ्यासाठी प्रयागराज येथे जाणे सुलभ व्हावे यासाठी विशेष सवलत देवून या मार्गावर गाड्या चालविल्या आहेत. प्रवाशांसाठी प्रवासादरम्यान मोफत जेवण आणि इतर सवलती देण्यात आल्या आहेत. या प्रवासाकरिता सरकारने पास वितरित केले होते. मात्र पासधारकां व्यतिरिक्त किमान ४०० अतिरिक्त प्रवासी या गाडीतून प्रवास करत होते. या अतिरिक्त प्रवाशांमुळे गोवा सरकारने देवू केलेल्या सवलतींवर म्हणजे जेवण आणि इतर गोष्टींवर परिणाम झाला. कारण या गोष्टी फक्त पास धारकांपुरत्या उपलब्ध करण्यात आल्या होत्या. त्यामुळे प्रशासनावर ताण आला.

दुसरी गोष्ट म्हणजे पास धारक आणि बिनापासधारक प्रवाशांमध्ये जागेसाठी खटके उडू लागले. रेल्वे खचाखच भरल्याने पाय ठेवण्यासही जागा नव्हती. पास असलेल्यांची चांगली सोय झाली. रात्रीच्या जेवणाची त्यांची सोय झाली. मात्र पास नसलेल्यांना हातपाय पसरू देण्यास इतर प्रवाशांनी नकार देणे सुरू केले. प्रवास हा ६-७ तासांचा नव्हे, तर तब्बल ३६ तासांचा असल्याने प्रत्येकाला व्यवस्थितपणे, सुखकर पद्धतीने प्रवास करायचा होता. त्यांना हे आगंतुक प्रवासी नकोसे झाले होते. त्यामुळे काहींचे खटके उडणे गोवा ते रत्नागिरी प्रवासादरम्यानच सुरू झाले. कंटाळून काही प्रवाशांनी रेल्वे पाण्यासाठी आणि चालक, कर्मचारी बदलासाठी रत्नागिरी येथे थांबवली गेली, तेव्हा तेथे शंभरेक जणांनी उतरून गोव्यात परतीचा मार्ग पत्करणे सोयीस्कर मानले, असे अनेकजण आज सकाळी प्रयागराजऐवजी ते घरी परतले.

 

 

शिरसोली येथे २६ फेब्रुवारी २०२५ रोजी महाशिवरात्र उत्सव सोहळ्याचे आयोजन

सन २००४ मध्ये महाराष्ट्र शासनाने शिरसोली येथील नदीच्या किनारी असलेल्या स्वयंभू शंभो महादेवाच्या मंदिर क्षेत्राला तीर्थक्षेत्र म्हणून घोषित केले आहे. 

   Follow us on        

दापोली: दापोली तालुक्यातील शिरसोली या गावी सालाबाद प्रमाणे महाशिवरात्र उत्सव सोहळा बुधवार दिनांक. २६.२.२०२५ रोजी संप्पन्न होत असून भाविकांनी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहून स्वयंभू शंभू महादेवांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा. या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

कोकणातील निसर्गरम्य परीसरात शिरसोली येथे नदीच्या किनारी हे स्वयंभू शंभो महादेवांचे मंदिर आहे. येथे १९७४ मध्ये सतत ३ वर्ष महादेवांच्या दर्शनासाठी गंगामाता अवतरली होती. त्या वेळी दूर दूर वरून भाविक या पवित्र स्थानाला भेट देत असत.

गेली २४ वर्ष अविरत शिवपार्वती दिंडी मंडळामार्फत अनेक शिवभक्त मुंबई ते शिरसोली पायीवारी करतात. यावर्षी दिनांक २२-०२-२५ पासून शिवपार्वती दिंडी मंडळाने मुंबई ते शिरसोली पायी वारीचे आयोजन केले आहे.

महाशिवरात्रीच्या दिवशी शंभूच्या दर्शनासाठी भाविकांचा सकाळपासूनच ओघ सुरू असतो. मुंबईवरून निघालेल्या दिंडीवारीचे सकाळी १०.३० वाजता स्वागत करून देऊळवाडी येथील ग्रामदेवतेची गादी असलेल्या घरातून देवाच्या वारीची सुरुवात केली जाते. ही देववारी आणि मुंबईतून आलेली वारी एकत्रीतरित्या मोठ्या भक्तीभावाने ग्राम दैवत आसलेल्या भैरी भवानीच्या मंदिरात जाते व तिथून गावच्या मध्यभागातून भक्तीमय वातावरणात शिवशंभूच्या मंदिरात पोहोचते. शिवमंदिरात पोहचताच *हर हर महादेव* या जयघोषाने संपूर्ण परिसर दणाणून जातो. दिंडी सोबत आलेल्या भाविकांसह सर्व भाविक शिवशंभुचे दर्शन घेतात. शिवशंभूचा आशीर्वाद मिळाल्याने प्रसन्न मुद्रेने सर्व भाविक आनंदाने मंदिराबाहेर पडतात .

मंदिराच्या बाहेर प्रवेशद्वाराजवळच शिवशंभूचा तीर्थप्रसाद सर्वांना दिला जातो. तसेच आलेल्या सर्व भाविकांना मंडळामार्फत फराळी चिवडा व कोकम सरबत दिले जाते.

दिनांक २६/२/२५ रोजी महाशिवरात्रीच्या दिवशी स्वयंभू शंभू महादेवांच्या मूर्तीवर सकाळच्या नित्य पूजेनंतर मंत्रोच्चारात अभिषेक करण्यात येतो.

महादेवाचा अभिषेक संपन्न झाल्यानंतर साधारणता १२.३० च्या दरम्यान मंदिरासमोरील टेकडीवर गोसावी मठामध्ये गोसावी देवांचे पूजन केले जाते तेथेही सर्व भाविक गोसावी देवांचे दर्शन घेतात.

गोसावी मठातून पूजन करून आल्यानंतर साधारण १.३०च्या दरम्यान शंभो महादेवांची महाआरती करण्यात येते. त्यानंतर दिवसभर मंदिराच्या सभामंडपात स्थानिक भजन मंडळ देवाचे नामस्मरण करत असतात. दिवसभर महादेवांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांचा ओघ सुरूच असतो.

रात्रौ ८ नंतर मंदिरात रात्रभर वारकरी संप्रदायाच्या नामांकित दिंड्या येऊन हरिनाम करत महाशिवरात्रीचा जागर सुरू होतो. कोकणातील विशेष वाद्य आसलेल्या खालु बाज्याने प्रत्येक दिंडीचे स्वागत करुन हरिनामाला सुरुवात केली जाते.

या उत्सवाच्या दिवशी मंदिराच्या परिसरात एक दिवसाची बाजारपेठ स्थापून विविध दुकानदार आपल्या मालाची विक्री करुन आपला उदरनिर्वाह करीत उत्सवाची शोभा वाढवतात.

दिनांक २७/२/२५ रोजीच्या पहाटे होणाऱ्या काकड आरती मध्ये सर्व महिला पुरुष, वारकरी बेभान होऊन वारकरी ठेक्यावर तल्लीन होतात.

दुसऱ्या दिवशी म्हणजेच दिनांक २७/२/२५ सकाळी येणाऱ्या सर्व भाविकांना मंदिराच्या सभामंडपात महाप्रसाद वाढून या भव्य दिव्य सोहळ्याची सांगता होते.

दापोली तालुक्यातीलच नाही तर आजूबाजूच्या तालुक्यांतील हजारो भाविक या उत्सवास येतात. तालुक्यातील एक मोठा शिस्तबद्ध, नियोजित उत्सव म्हणून या महाशिवरात्र उत्सवाकडे पहिले जाते. हा उत्सव जास्तीतजास्त कसा उत्तम होईल यासाठी शिवशंभोचे भक्त, मंडळाचे पदाधिकारी, सदस्य, भक्त गण हे सर्व जवळ जवळ 2 महिन्यापासून तयारीत असतात. अतिशय उत्साहात, जल्लोषात, भक्तिमय वातावरणात महाशिवरात्र उत्सव साजरा होतो. हजारो भक्तगण या उत्सवाला प्रचंड गर्दी करताना दिसून येतात. सर्व भक्तांच उत्तम सहकार्य व महाप्रसादासाठी अर्थिक मदत या उत्सवाला मिळते, सर्व भक्तगणांनी यावर्षीही महाशिवरात्र उत्सवाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी विनंती महाशिवरात्र उत्सव मंडळ शिरसोली (मुंबई/स्थानिक) यांच्यातर्फे करण्यात आली आहे.

 

Konkan Railway | होळी विशेष गाड्यांचे चुकीचे नियोजन; प्रवासी संघटनांकडून नाराजीचे सूर

   Follow us on        

Konkan Railway:होळीला होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वे प्रशासनाने मध्य रेल्वेच्या समन्वयाने कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या जाहीर केल्या आहेत. मात्र या गाड्यांच्या चुकीच्या नियोजनामुळे होळीला कोकणात गावाला जाणार्‍या कोकणकरांसाठी या गाड्यांचा खूप कमी फायदा होणार असल्याने प्रवासी संघटनांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

 

या विशेष गाड्या पैकी गाडी क्रमांक ०११५१ मुंबई सीएसएमटी – मडगाव ही गाडी दिनांक ६ आणि १३ (मध्यरात्री) आणि गाडी क्रमांक ०११२९ एलटीटी – मडगाव ही गाडी दिनांक १३ आणि २० या तारखांना रात्री सोडण्यात येणार आहे. १३ मार्च या दिवशी होळी असताना त्याच दिवशी रात्री सोडण्यात येणार्‍या गाड्यांचा उपयोग काय? ६ ते २५ मार्च सर्व गाड्यांचे आरक्षण फुल्ल असताना ह्या आठवडी विशेष गाड्या त्याही रात्रीचा प्रवास असणाऱ्या, गोव्यात जाणाऱ्या गाड्यांचा महाराष्ट्राला काय लाभ असा प्रश्न अखंड कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने विचारला आहे. तसेच होळी दरम्यान मुंबई चिपळूण, मुंबई रत्नागिरी दिवसा आणि मुंबई सावंतवाडी रात्री अशा किमान तीन दैनिक गाड्यांची आवश्यकता असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.

या गाड्यांना सेकंड स्लीपर या श्रेणीच्या डब्यांपेक्षा एसी श्रेणीचे डबे जोडले आहेत. गाडी क्रमांक ०११५१ /०११५२ मुंबई सीएसएमटी – मडगाव या गाडीला तब्बल १० थ्री टायर एसी श्रेणीचे आणि मात्र ४ स्लीपर श्रेणीचे डबे जोडले आहेत. त्यामुळे या गाड्या कोकणातील प्रवाशांसाठी न चालविता गोव्यासाठी चालविण्यात आल्याचा आरोप प्रवासी संघटनांनी केला आहे.

चौकट

मुंबई – सावंतवाडी,मुंबई -रत्नागिरी,मुंबई -चिपळूण ह्या गाड्या होळी दरम्यान चालवणे सोयीचे आहे.त्यामुळे कोकण रेल्वेला विनंती आहे की कोकणवासियांचा सोयीनुसार गाड्या सोडण्यात याव्यात,किंवा गणेशोत्सवादरम्यान वापरण्यात येणारा फॉर्म्युला होळी दरम्यान चालवावा ही विनंती. – कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी 

होळी १३ तारखेला…. आणि गाड्या सोडल्या आहेत ६ आणि १३ तारखेला होळीदिवशीच….९,१०,११,१२ तारखेला होळीसाठी गाड्यांना वेटींग आहे तेव्हा एकही स्पेशल गाडी नाही सोडली…रेल्वेचे अजब लाॅजीकश्री गणेश चामणकर

 होळी स्पेशल आणखी काही रेल्वे गाड्यांची प्रवासी संघटनांची मागणी आहे. कोकण रेल्वे मार्गावर मार्च ते जून दरम्यान वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता ह्या जादा रेल्वेना १० जून पर्यंत मुदतवाढ मिळावी.वसई सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटना 

पश्चिम रेल्वेवरून कोकणात होळीसाठी जाणाऱ्या चाकरमन्यांची संख्या जास्त आहे त्यासाठी ०९०५७/५८ ही उधना मेंगलोर एक्सप्रेस पुन्हा सुरू करावी. – श्री यशवंत जडयार,

 

कोकणात ११ पर्यटन स्थळी रोप-वे उभारण्यास मंत्रीमंडळाची मान्यता

   Follow us on        
मुंबई : राज्यातील अनेक पर्यटन ठिकाणांना दुर्गम भौगोलिक परिस्थितीमुळे आबालवृद्धांना भेट देणे कठीण होते. यावर उपाय म्हणून राज्यसरकारने या ठिकाणांवर केंद्र सरकारच्या साथीने राज्यात ४५ रोप-वे उभारण्यास मान्यता दिली आहे. या रोपवे मधील कोकण विभागात ११, तर पुणे विभागात १९ रोप-वे उभारण्यात येतील. राष्ट्रीय राजमार्ग लॉजिस्टिक व्यवस्थापन लि. यांच्याबरोबरीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडूनही या रोप-वेची उभारणी करण्यात येणार आहे.
केंद्राच्या राष्ट्रीय राजमार्ग लॉजिस्टिक व्यवस्थापन लि. (एनएचएलएमएल) आणि राज्य सरकारकडून पर्वतमाला परियोजनेअंतर्गत एकूण ४५ रोप-वेची कामे हाती घेण्यात आली आहेत. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत त्याला मान्यताही देण्यात आली. राज्य सरकारकडून १६, तर ‘एनएचएलएमएल’कडून २९ रोप-वेची उभारणी करण्यात येणार आहे. यातील कोकण विभागात ११, तर पुणे विभागात १९ रोप-वे असतील.
रोप-वेची उभारणी करताना विविध पर्यायांचा वापर करण्यात येणार असून, त्यात ‘एनएचएलएमएल’ला राज्य सरकारने जागा उपलब्ध करून देणे, ‘एनएचएलएमएल’ला जागा उपलब्ध करून त्यात समभाग घेऊन महसूल मिळवणे, राज्य सरकारकडून खासगी-सार्वजनिक प्रकल्पाच्या आधारावर उभारणी करणे आणि बांधा-वापरा-हस्तांतरित करा या मार्गांचा अवलंब करण्यात येणार आहे.

प्रगतीपथावरील प्रकल्प

■ हाजीमलंग, कल्याण फनिक्युलर ट्रॉली सार्वजनिक बांधकाम विभाग (पीपीपी)
■ रेणुकामाता मंदिर, माहुरगड, नांदेड सा. बां. विभाग (सीआरआयएफ) प्रगतिपथावर
■ सिंहगड रोप-वे खासगी विकासक
■ जेजुरी रोप-वे – खासगी विकासक

प्रस्तावित प्रकल्प कोकण विभाग

■ रायगड किल्ला सा. बां. विभाग –
■ माथेरान एमएमआरडीए
■ कणकेश्वर, अलिबाग जिल्हा परिषद, रायगड
■ बाणकोट किल्ला, मंडणगड एनएचएलएमएल
■केशवराज (विष्णू) मंदिर, दापोली एनएचएलएमएल
■ महादेवगड पॉइंट, सावंतवाडी एनएचएलएमएल
■ माहुली गड, शहापूर- एनएचएलएमएल
■ सनसेट पॉइंट, जव्हार – एनएचएलएमएल
■ गोवा किल्ला, दापोली – एनएचएलएमएल
■ अलिबाग चौपाटी ते किल्ला नगर परिषद,
■ अलिबाग घारापुरी, एलिफंटा लेणी जिल्हा परिषद रायगड

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search