Category Archives: कोकण
देवरुख: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून दिनांक 6 डिसेंबर 2024 रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि कोकण विकास संघर्ष समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आज आरोग्य शिबीर आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे नेतृत्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आदरणीय रोहित तांबे यांनी केले आहे.
कार्यक्रमाचे आयोजन 6 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या शेजारील सभापती निवास मध्ये, देवरुख पोलीस स्टेशनसमोर करण्यात आले असून दुपारी 3 वाजेपर्यंत चालणार आहे. या शिबिरामध्ये नागरिकांना मोफत आरोग्य तपासणीसह विविध वैद्यकीय सेवांचा लाभ घेता येणार आहे. जिल्ह्या रुग्णालयात रुग्णांना रक्ताचा तुटवता भासत असून रक्तदान शिबिराद्वारे समाजहितासाठी रक्तदानाची चळवळ पुढे नेण्याचा उद्देश ठेवण्यात आला आहे.
या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, अनेकांनी आरोग्य तपासणीसाठी आणि रक्तदानासाठी नोंदणी केली आहे. “समाजासाठी ही एक छोटी सेवा आहे जी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करणारी आहे,” असे रोहित तांबे यांनी सांगितले.
शिबिरात सहभागी होण्यासाठी आणि अधिक माहिती घेण्यासाठी नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. अशा उपक्रमांमुळे समाजातील आरोग्यविषयक जागरूकता आणि सामाजिक बांधिलकी वाढण्यास हातभार लागतो.
Konkan Railway : कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांना सध्या सोसाव्या लागत असलेल्या अनेक गैरसोयीवर उपाय असलेल्या कोकण रेल्वे विलिनीकरणच्या प्रश्नाला आता खासदार संसदेत मांडत असल्याचे सकारात्मक चित्र दिसून येत आहे. कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण करण्याबाबत खासदार धैर्यशील पाटील यांनी राज्यसभेत प्रश्न उपस्थित केला आहे. त्यावर चार राज्यांच्या हक्क सोडण्यावर कोकण रेल्वेचे विलीनीकरण अवलंबून असल्याने ते काहीसे किचकट आहे, असे उत्तर केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिले आहे.
कंपनी अॅक्टनुसार कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीची नोंदणी झाली आहे. यात भांडवली खर्चासाठी भारतीय रेल्वे, महाराष्ट्र सरकार, कर्नाटक सरकार, केरळ आणि गोवा सरकार यांनी गुंतवणूक केली आहे. 25 वर्षांपासून कोकण रेल्वेसाठी रेल्वे मंत्रालय भागीदार असून कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचा खर्च चार राज्ये करत आहेत. त्यामुळे कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण करणे हे चार राज्यांच्या हक्क सोडण्याच्या अटीवरच अवलंबून आहे. त्यामुळे हा प्रश्न केवळ केंद्र सरकारचा नसून चार राज्यांच्या अखत्यारितील ही आहे.
दरम्यान, गेल्या काही वर्षांत कोकण रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण, रोहा ते वीर सेक्शनचे दुपदरीकरण, अतिरिक्त थांबे यावर भर देतानाच प्रवाशांना सोयीसुविधा देण्यावरही भर दिला दिला गेला आहे असे उत्तर रेल्वेमंत्री वैष्णव यांनी दिले आहे. तसेच कोकण रेल्वे मार्गावर गेल्या पाच वर्षांत सात नवीन ट्रेन सुरू करण्यात आल्या आहेत त्यात दोन वंदे भारत ट्रेन चा समावेश आहे. प्रवासी तसेच स्थानिकांच्या सोयीसाठी ओव्हरब्रिज, सबवे, पाथवे, नवीन प्लॅटफॉर्म, प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण या सुविधादेखील उपलब्ध करून देण्यात येत आहेत असे ते म्हणाले.
कोकण रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी कोकण रेल्वे भारतीय रेल्वेत विलीन करावी अशी मागणी राज्यसभेत केल्याबद्दल रेल्वे प्रवासी संघटनांनी आमदार धैर्यशील पाटील यांचे आभार मानले आहेत.
”अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीची मागणी आणि कोकणातील रेल्वे मार्गाच्या विकासाकरिता महत्वाचा असलेला हा मुद्दा संपूर्ण देशासमोर मांडण्यासाठी संसदीय आयुधाचा वापर केल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. ज्याप्रमाणे कोकण रेल्वेच्या उभारणीसाठी स्वर्गीय मधू दंडवते आणि जॉर्ज फर्नांडिस यांचे स्मरण आजही केले जाते त्याचप्रमाणे कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण ही देखील ऐतिहासिक घटना असेल. त्यासाठी संसदेत पाठपुरावा केल्याबद्दल आपलेही नाव इतिहासात नोंदवले जाईल यात शंका नाही. लवकरच आपली भेट घेऊन आम्ही आमची भूमिका आणखी विस्तृतपणे मांडू. तूर्तास आपले खूप खूप आभार.” या शब्दात पत्र आणि ईमेल पाठवून अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती, महाराष्ट्र ने यासाठी त्यांचे आभार व्यक्त केले असल्याची माहिती संघटनेचे सचिव अक्षय महापदी यांनी दिली आहे.
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन विकासासाठी आशादायक असलेल्या पाणबुडी प्रकल्पासाठी ४३ कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकारने मंजूर केला आहे, त्यामुळे गेले काही वर्ष रखडलेला वेंगुर्ले निवती समुद्रातील प्रस्ताविक पाणबुडी प्रकल्प मार्गी लागेल अशी अपेक्षा करण्यात येत आहे. सन २०१८-१९ च्या राज्य अर्थसंकल्पात सिंधुदुर्गासाठी पहिल्या पाणबुडी प्रकल्पाची घोषणा करण्यात आलेली होती. त्यासाठी ६५ कोटी रुपयांचा निधी मिळणार होता. सिंधुदुर्गाच्या वेंगुर्ले निवती रॉक जवळ समुद्रात पाणबुडी प्रकल्प होणार होता.
या प्रकल्पाच्या माध्यमातून पर्यटकांना खोल समुद्राच्या पाण्यातील अंतरंग अनुभवता आला असता, समुद्रातील अंतरंगात असलेला खजिना यामुळे न्याहाळत सफर झाली असती. आता केंद्र सरकारने निधी दिला असल्याने पर्यटन प्रेमींच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. साधारण वीस ते पंचवीस व्यक्ती पाणबुडीमध्ये बसून समुद्राखाली जाऊन समुद्राखालील अंतरंग बसून न्याहाळू शकतात. कोकणात सर्वात जास्त कोरल्स, रंगबिरंगी मासे आणि समुद्राच्या आतील अंतरंग दिसणारे अनोखे विश्व हे फक्त वेंगुर्ल्यातील निवती रॉक या ठिकाणी असून हे अनेक सर्वेक्षणातून समोर आले आहे. त्यामुळे हा प्रकल्प निवती समुद्रात होणार आहेमहाराष्ट्रातील पर्यटनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारकडून विशेष तरतूद करण्यात आली आहे. केंद्र सरकारने कोकणातील या प्रकल्पाला ४३ कोटी रुपये मंजूर केले आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्र सरकारने तशी घोषणाही केली. परंतु पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यासाठी सरकारने पावले उचलली नाहीत. समुद्र किनारी पर्यटन स्थळे विकसित झाली तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक येऊ शकतात, म्हणून पाणबुडी प्रकल्पाला महत्त्व आले आहे.
Road Accident : मुंबई गोवा महामार्गावरील खेड परशुराम घाटात आज पाच वाहनांचा अपघात घडल्याने 15 ते 20 प्रवासी जखमी झाले. तर या अपघातामुळे सुमारे दोन तास वाहतूक बंद ठेवण्यात आली. पाच वाहने एकमेकांवर आदळून हा अपघात झाला. गोव्याकडे जाणाऱ्या कंटेनरने घरडा बसला धडक दिली. हा अपघात मंगळवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडला.
परशुराम घाटात ज्या ठिकाणी संरक्षणभिंत कोसळल्या ठिकाणी एकेरी वाहतूक सुरु आहे. मात्र आज दुपारी दोन वाजता चिपळूण शहरातून घरडा कंपनीचे कर्मचारी घेऊन बस कंपनीकडे निघाली होती. परशुराम घाटात ही बस एकेरी मार्गावर आली असताना समोरून गोव्याकडे जाणारा कंटेनर वेगाने येऊन बसवर आदळला. कंटेनरच्या धडकेने बस लावलेल्या गर्डरवर जाऊन आदळली. तर कंटेनरच्या मागे असणाऱ्या आयशर टेम्पोवर कंटेनर पलटी झाला. घरडा कंपनीच्या बसच्या मागे एक कार आणि त्या मागे एक ट्रक होता. बसच्या मागे असणाऱ्या गाड्या एकमेकांवर आढळल्या.
घरडा कंपनीच्या गाडीत असणारे घरडाचे कर्मचारी या अपघातामध्ये जखमी झाले आहेत. किमान पंधरा ते वीस कर्मचारी या अपघातात किरकोळ जखमी झाले आहेत. त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत. खाजगी बस आणि कंटेनर यांच्यातील अपघातानंतर या मार्गावरची वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती. चिपळूण पोलीस महामार्ग यांच्या प्रयत्नातून सुमारे दोन ते अडीच तासाने या मार्गावरची वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली. परशुराम घाटात या ठिकाणी अपघात होण्याची ही दुसरी घटना आहे.
Konkan Railway: कर्नाटक येथील खासदार श्रीनिवास पुजारी यांनी लोकसभेत कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करावे हा मुद्दा उचलून धरला असतानाच महाराष्ट्रातील खासदारांनी देखील हा मुद्दा प्रतिष्ठेचा केला आहे. राज्यसभा खासदार श्री धैर्यशील पाटील यांनी २९ नोव्हेंबर रोजी हा मुद्दा पुन्हा राज्यसभेत उपस्थित केला होता.
गेले काही महिने अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती,महाराष्ट्र या कोकणातील २५ प्रवासी संघटनेच्या शिखर समितीने कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण व्हावे आणि रोहा ते सावंतवाडी पर्यंतचा भाग हा मध्य रेल्वेला हस्तांतरित करण्यात यावा यासाठी जोरदार प्रयत्न केले होते, त्यासंदर्भात समितीने संबंधित लोकप्रतिनिधींना प्रत्यक्ष आणि इमेल मोहीमेद्वारे लक्ष वेधले होते, त्याला अनुसरून समितीने दिलेल्या निवेदनात मांडलेले मुद्दे खासदार श्री धैर्यशील पाटील यांनी राज्यसभेत प्रश्न उपस्थित करून रेल्वे मंत्र्यांकडून लेखी उत्तर प्राप्त केले आहे. प्रवासी समितीचा तसेच कोकणवासीयांचा जिव्हाळ्याचा विषय आणि कोकणातील रेल्वे मार्गाच्या विकासाकरिता महत्वाचा असलेला हा मुद्दा संपूर्ण देशासमोर मांडण्यासाठी संसदीय आयुधाचा वापर केल्याबद्दल कोकणवासीयांतर्फे प्रवासी समितीने खासदार पाटील यांचे आभार मानले.
खासदार पाटील यांचा प्रश्नाला उत्तर देताना रेल्वे मंत्री श्री. अश्विनी वैष्णव यांनी कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करण्यापूर्वी त्याचे १००% समभाग केंद्र शासनाच्या हाती येणे आवश्यक आहे. आजच्या घडीला केवळ गोवा शासनाने कोकण रेल्वे महामंडळातील त्यांचे समभाग केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या स्वाधीन करण्यास संमती दिल्याचे सांगितले.
आदरणीय पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील रेल्वे विकास, अमृत भारत स्थानक योजना, एक स्थानक एक उत्पादन योजना, रेल्वे मार्गाची क्षमतावृद्धी आणि आधुनिकीकरण, फलाट व इतर यंत्रणांचा कायापालट याकरिता कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण होणे आवश्यक आहे. तसेच राज्याच्या राजधानी मुंबईशी सुलभ संपर्कासाठी ज्या रेल्वे विभागाअंतर्गत मुंबई त्याच रेल्वे विभागात संपूर्ण रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हेही यावेत ही समितीची भूमिका आहे असे समितीचे सचिव श्री अक्षय महापदी यांनी स्पष्ट केले.
कोकण रेल्वेवरील बरीच विकासकामे निधीअभावी रखडली आहेत, त्यात प्रामुख्याने सावंतवाडी टर्मिनस हा विषय बरीच वर्षे रखडला आहे. आजच्या घडीला महामंडळ या मार्गाचे दुपदरीकरण करण्यास असमर्थ आहे त्यातच विविध राज्यांच्या हिस्सेदारीमुळे रेल्वे मंत्रालय किंवा संबंधित राज्य शासन निधी देण्यास हात आखडता घेत आहेत. त्यामुळे केवळ राज्यशासनांनी समभाग हस्तांतरित केल्यावर विलीनीकरण करण्याची भूमिका केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने न घेता ही प्रक्रिया लवकरात लवकर होण्यासाठी राज्य शासनाचे समभाग केंद्र शासनाकडे हस्तांतरित करताना राज्य शासनांनी गुंतवलेला निधी त्यांना परत कोण आणि कसा देणार किंवा देणार नाही याबाबत निर्णय होणे आवश्यक आहे. यात केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने सर्व राज्य शासनांचे समभाग विकत घेणे हा सोयीस्कर पर्याय आहे. तरी, याबाबत पुढील निर्णय जलदगतीने होण्यासाठी आपले असेच सहकार्य अपेक्षित आहे, असे समितीकडून दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात नमूद केले आहे.
राज्यसभा खासदार श्री धैर्यशील पाटील यांचे आभार व्यक्त करताना कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण होणे काळाची गरज आहे ते लवकरात लवकर होणे हे सर्वांच्या हिताचे आहे. ज्याप्रमाणे कोकण रेल्वेच्या उभारणीसाठी स्वर्गीय मधू दंडवते आणि जॉर्ज फर्नांडिस यांचे स्मरण आजही केले जाते त्याचप्रमाणे कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण ही देखील ऐतिहासिक घटना असेल असे मत समितीला संलग्न असलेली कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडीचे उपाध्यक्ष सागर तळवडेकर यांनी व्यक्त केले.
“तिमिरातुनी तेजाकडे” या संस्थेच्या वतीने राज्यपाल नियुक्त नामनिर्देशित सदस्यपदी, उर्वरित ५ जागांपैकी एका जागेवर, श्री. सत्यवान यशवंत रेडकर यांच्या नावाचे नामनिर्देशन व शिक्कामोर्तब करण्यासाठी ६७३ पानांचा प्रस्ताव सादर.
Follow us onमुंबई: कोकण व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भूमिपूत्र, प्रशासकीय स्वराज्य घडविण्यासाठी व शासकीय कर्मचाऱ्यांचे गाव निर्माण व्हावे यासाठी शैक्षणिक चळवळ राबवून अविरतपणे ज्ञानदान करणारे, प्रसिद्ध स्पर्धा परीक्षा व्याख्याते, उच्चविद्याविभूषित, मा. श्री. सत्यवान यशवंत रेडकर यांची *समाजसेवा, कला व शिक्षण या क्षेत्रात* उर्वरित ५ जागांपैकी एका जागेवर राज्यपाल नियुक्त नामनिर्देशित सदस्यपदी वर्णी लागावी यासाठी *“तिमिरातुनी तेजाकडे” या संस्थेच्या वतीने, श्री. सचिन यशवंत रेडकर, अध्यक्ष, तिमिरातुनी तेजाकडे यांनी राज्यपाल कार्यालयास दिनांक १९/११/२०२४ रोजी निवेदनासोबत शोधप्रबंध स्वरूपातील दस्तावेजांप्रमाणे भाग I, II, III, IV स्वरूपात ६७३ पानांचा प्रस्ताव सादर केला.* या प्रस्तावासोबत महाराष्ट्र व कोकणातील सर्वच घटकातील इच्छुक सामाजिक संस्था/मंडळांनी राज्यपालांना संबोधित केलेले शिफारस सह पाठिंबा पत्र सुद्धा संलग्न केले आहेत अशी माहिती त्यांच्यामार्फत देण्यात आली आहे.
भारतीय राज्यघटनेतील कलम 171 (5) खंड (3) च्या उपखंड (ई) अंतर्गत राज्यपालांनी नामनिर्देशित केले जाणारे सदस्य खालीलप्रमाणे अशा बाबींच्या संदर्भात विशेष ज्ञान किंवा व्यावहारिक अनुभव असलेल्या व्यक्तींचा समावेश असेल, म्हणजे: साहित्य, विज्ञान, कला, सहकार चळवळ आणि समाजसेवा असे नमूद आहे. कार्यकारी प्रमुख या नात्याने माननीय राज्यपाल आपल्या स्वविवेकाधीन (डिस्क्रेशनरी) अधिकारांचा वापर करून, सदर प्रस्तावातील संलग्न दस्तावेजांचे अवलोकन करून याबाबतीत योग्य निर्णय घेऊन, कोकण भूमिपुत्र, मा. श्री. सत्यवान यशवंत रेडकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करतील. त्याचप्रमाणे या विधानसभा निवडणुकीनंतर सत्तेत येणाऱ्या सरकारमधील इच्छुक पक्ष सुद्धा आपल्या माध्यमातून, राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या, उच्चशिक्षित व्यक्तिच्या ज्ञानाचा तसेच अनुभवाचा समाजाला फायदा व्हावा व विधानपरिषदेत सदस्यपदी वर्णी लागावी यासाठी नवीन मंत्रिमंडळात नक्कीच चर्चेद्वारे शिफारस करून नामनिर्देशन यादीत नाव समाविष्ट करतील असा आम्हाला व समस्त कोकणवासियांना, हितचिंतकांना एक मतदार व सुजाण नागरिक स्वरूपात आत्मविश्वास आहे, उच्चशिक्षित तरूण व्यक्तींनी विधानपरिषदेत येणे व सत्ताधारी पक्षांनी अशा व्यक्तींना संधी देणे ही लोकशाही च्या अनुषंगाने काळाची गरज आहे, तरच समाजात आमुलाग्र बदल घडू शकतील असे मत “तिमिरातुनी तेजाकडे” या संस्थेचे अध्यक्ष, श्री. सचिन यशवंत रेडकर यांनी व्यक्त केले.











