रत्नागिरी | मुंबई गोवा हायवे व रत्नागिरी नागपूर हायवे साठी अनेकांच्या जागा चौपदरी करण्यासाठी गेल्या त्यामुळे अनेकांना आपले मूळ घरे पाडावी लागली होती काहींनी हीं जुनी घर पाडून सुरक्षित अंतरावर आपली नवीन घरे उभी केली मात्र रत्नागिरी जिल्ह्यातील करंजारी येथील ठाकूर यांनी आपला बंगला नवीन तंत्रज्ञानाच्या साह्याने आहे त्या अवस्थेत मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
करंजारी येथील ठाकूर यांचा बंगला चौपदरीकरणात जात होता तो बंगला आता शंभर फूट मागे सरकविला जाणार आहे त्यासाठी चेन्नई येथील कंपनीला हे कंत्राट देण्यात आला असून या कंपनीने आपले काम सुरू केले आहे कंपनीने बंगल्याच्या खाली खाली खोदाई करून त्याखाली जॅक व लोखंडी अँगल लावून हा मूळ बंगला हळूहळू सरकवण्याचे काम सुरू केले आहे त्यामुळे कुठलीही मोडतोड न करता आहे त्या अवस्थेत बंगला मागे नेला जाणार आहे रत्नागिरी जिल्ह्यात अशा प्रकारे पहिल्यांदाच बंगला मागे नेण्याची घटना आहे त्यामुळे हे पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी करीत आहेत.
अशा शिफ्टिंग करिता अंदाजे किती खर्च येतो? इमारत शिफ्टिंग करणाऱ्या कंपन्या इमारत लिफ्टिंग आणि इमारत शिफ्टिंग तसेच इमारतीची दिशा बदलणे या मुख्य सेवा देतात. इमारत लिफ्टिंग म्हणजे घर काही फूट वर उचलणे. या मध्ये घर जास्तीत जास्त १० फुटांपर्यंत वर उचलेले जाते. साहजिकच घराचे बांधकाम कोणत्या पद्धतीचे आणि किती जुने आहे या गोष्टी लक्षात घेतल्या जातात. आमच्या प्रतिनिधेने दिल्लीतील एका कंपनीशी संपर्क साधला असता ३ फुटापर्यतच्या लिफ्टिंग करण्यासाठी साधारणपणे ४०० ते ५०० रुपये प्रति चौरस फूट खर्च येईल असे सांगण्यात आले. इमारत शिफ्टिंग बद्दल विचारले असता जर १००० चौरस फुटाचे घर १५ ते २० फूट सरकावायचे असेल तर साधारणपणे १० ते १५ लाख खर्च येतो. साहजिकच घराच्या बांधकामाच्या स्वरूपानुसार खर्च कमी जास्त येतो.
चिपळूण : येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या वस्तूसंग्रहालयात एक मोलाची भर पडली आहे. सुमारे चारशे वर्षांपूर्वीची श्रीलक्ष्मीनारायणची मूर्ती संग्रहालयासाठी मिळाली आहे. ही मूर्ती ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील सुभाष अनंत काळे यांच्या अनेक पिढया पूजेत होती. मनुष्यरूपी गरुडावर आरूढ असलेल्या चतुर्भुज भगवान श्रीविष्णू आणि वामांगी बसलेली लक्ष्मी अशा प्रतिमेला ‘लक्ष्मीनारायण’ अशी संज्ञा आहे
काळे यांनी ही मूर्ती वाचनालयाच्या वस्तूसंग्रहालयाला देण्याची इच्छा व्यक्त केली होती. लोटिस्माचे कार्याध्यक्ष धनंजय चितळे आणि मार्गदर्शक प्रकाश देशपांडे यांनी बदलापूरला जाऊन काळे कुटुंबीयाची भेट घेतली. धनंजय चितळे यांनी मूर्तीची पंचोपचारे उत्तरपूजा करून ही मूर्ती स्वीकारली. चारशे वर्षांपूर्वीची गंडकी शिळेतील ही मूर्ती ५५ सेंटीमीटर उंच आणि ३५ सेंटीमीटर रुंद आहे. गरूडावर बसलेल्या विष्णूच्या डाव्या बाजूला लक्ष्मी असून दोन्ही हात जोडलेल्या गरूडाच्या चेहऱ्यावर अत्यंत विनम्र भाव आहेत. गरुडाच्या जोडलेल्या हातात गदा व दंडाभोवती सर्पवेढा आहे. श्रीविष्णू व लक्ष्मी सालंकृत आहे. भगवान श्रीविष्णू सायुध सिद्ध आहे. मूर्तीच्या मागे प्रभावळ आहे.
या श्रीलक्ष्मीनारायण मूर्तीमुळे संग्रहालयात आलेल्या समृध्दी वाढली असल्याच्या भावना संस्थेचे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव, कार्याध्यक्ष धनंजय चितळे यांनी व्यक्त केल्या आहेत.
रत्नागिरी : कोकणात येणाऱ्या पर्यटकांसाठी एक खुशखबर आहे. आता तुम्हाला केरळ राज्याप्रमाणे प्रमाणे कोकणात सुद्धा हाऊसबोट आणि बॅकवॉटर टुरिझम चा अनुभव घेता येणार आहे.
कोकणातील दाभोळ येथील एक तरुण सत्यवान दरदेकर हा तरूण कोकणात खऱ्या अर्थाने बॅकवॉटर टुरिझम ची सुरुवात करत आहे. कोकणातील तरुणांने बनवलेली पहिली हाऊसबोट गुहागर पराचुरी येथील निदानसुंदर बॅकवॉटर मध्ये सुरू होत आहे. दोन खोल्यांची ही अतिशय सुंदर हाऊसबोर्ड सत्यवानने बनवली आहे. थोड्याच दिवसात दाभोळच्या बॅकवॉटर मध्ये परचुरी गावात आपल्याला बॅकवॉटरमध्ये जाऊन प्रत्यक्ष राहता येईल.
आजोळ हे अतिशय देखणे ग्रामीण व निसर्ग पर्यटनाचा केंद्र सत्यवान चालवतो. तो त्याची पत्नी त्याची आई सर्वजण मिळून कोकणात खऱ्या अर्थाने सांस्कृतिक आणि ग्रामीण पर्यटनाचा समृद्ध अनुभव आणि आनंद देतात. बॅकवॉटर टुरिझम ची ही त्याची एक नवी सुरवात आहे, नक्कीच हा उपक्रम प्रचंड यशस्वी होईल अशी त्याला आशा आहे.
रत्नागिरी : झरेवाडी नजीक टेम्पो पलटी होऊन अपघात झाला. अज्ञात वाहनाने हुल दिल्याने हा अपघात झाला. या अपघातात कुणीही जखमी झालेले नाही.रत्नागिरी येथून बारामती कडे जाणाऱ्या मच्छी वाहतुकीचा बोलेरो टेम्पो मोठ्या वाहनाने हूल दिल्याने अवघड वळणावर सकाळी साडे सहाच्या सुमारास कठड्यावर आदळला. मात्र यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही.
पुणे येथून रत्नागिरी येथे मच्छी घेऊन आलेला बोलेरो टेम्पो कंपनीमध्ये मच्छी उतरवून परतीच्या प्रवासात असताना हा अपघात झाला. यावेळी स्थानिकांनी मदत करत बोलेरो गाडीला बाहेर काढण्यात मदत केली.
रत्नागिरी: जिल्ह्याच्या गुहागर किनाऱ्यावर बुधवारी दोन ऑलिव्ह रिडले कासवांना उपग्रह टॅगिंग करण्यात आले. राज्याचा कांदळवन कक्ष आणि डेहरादून येथील भारतीय वन्यजीव संस्थेच्या सहकार्याने हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. ऑलिव्ह रिडले कासवांना उपग्रह टॅगिंग करून त्या माध्यमातून समुद्रातील त्यांचा भ्रमणमार्ग शोधण्यासाठी प्रकल्प हाती घेतला आहे.
‘बागेश्री’ आणि ‘गुहा’ नामकरण
टॅगिंग केलेल्या कासवांपैकी एक-मादी बाग या भागात सापडल्याने तिचे नाव ‘बागेश्री’ ठेवण्यात आले, तर गुहागर या नावावरून दुसरीचे नाव ‘गुहा’ असे ठेवण्यात आल्याची माहिती आंजर्ले येथील कासव-मित्र तृशांत भाटकर यांनी दिली आहे.
पूर्वी भारताच्या पूर्व किनाऱ्यावर या कासवांचे टॅगिंग झाले होते. पश्चिम किनाऱ्यावर गेल्या वर्षी (२५ जानेवारी २०२२) पहिल्यांदाच उपग्रह टॅगिंग करण्यात आले होते. सुरुवातीला मंडणगड (वेळास), आंजर्ले (दापोली) या किनाऱ्यावरील प्रत्येकी एका कासवाला ट्रान्समीटर लावले होते. त्यानंतर आणखी तीन कासवांना ट्रान्सलेटर बसवून तेही गुहागरमधून सोडले होतो. ते मादी कासव श्वास घेण्यासाठी समुद्राच्या पृष्ठभागावर आल्यानंतर हे ट्रान्सलेटर त्यांच्या ठिकाणाचे संकेत उपग्रहाला पाठवल्यानंतर त्यांच्या अधिवासाची माहिती अभ्यासकांना मिळत होती. सहा-सात महिन्यांनंतर अचानक माहिती येणे बंद झाले होते. यंदाच्या वर्षी कासवांना पुन्हा ट्रान्समीटर बसवण्याचा निर्णय भारतीय वन्यजीव संस्थान (डब्ल्यूआयआय), कांदळवण कक्ष, वन विभागाने घेतला.
टॅगिंग का केली जात आहे?
हा प्रकल्प यशस्वी झाल्यास या कासवांबद्दल काही गूढ गोष्टी समजण्यास मदत होईल. त्यात या कासवांच्या स्थलांतराचा पॅटर्न कोणता? ती कुठून येतात? कोणत्या ठिकाणी जास्त वेळ राहतात? याशिवाय आपणास माहित नसलेल्या अनेक गोष्टी समजू शकतील.
कशी केली जाते टॅगिंग
टॅगिंग करण्यासाठी किनारपट्ट्यावर आलेले योग्य वजनाचे ऑलिव्ह रिडले जातीचे मादीकासव निवडले जाते. टॅगिंग उपकरणाचे वजन या कासवांच्या प्रवासास त्रासदायक ठरू नये यासाठी एक नियम ठरविण्यात आलेला आहे. उपकरणाचे वजन कासवांच्या वजनाच्या ३% पेक्षा जास्त असू नये. निवडलेल्या मादीचे कवच साफ करून एका विशिष्ट गमाने उपकरण चिटकवले जाते आणि त्यावर निळा रंग देण्यात येतो. सुमारे ७ ते ८ तासांनी हा गम सुकल्यावर त्या मादीस समुद्रात सोडण्यात येते.
या उपकरणाला एक बटण असते. जेव्हा कासव श्वास घेण्यास समुद्राच्या पृष्ठभागावर येते तेव्हा या बटनावरचा दाब कमी होऊन बॅटरी कार्यन्वित होते आणि हे उपकरण सेटेलाईटला सिग्नल पाठवते. त्यामुळे या कासवाचे स्थान (Live Location) माहिती होण्यास मदत होते.
रत्नागिरी: ग्रामीण भागातील बस फेऱ्या कमी भारमानामुळे बंद होताना दिसत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातसुद्धा ग्रामीण भागात एसटीला कमी भारमान मिळत असल्याने अनेक फेऱ्या बंद करण्याची वेळ एसटी विभागावर आली आहे त्यातून महामंडळाने पर्याय काढण्याचे ठरवले असून आता ग्रामीण भागात मोठ्या बसेस ऐवजी मिनी बसेस चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यासाठी रत्नागिरीच्या एसटी विभागाला नवीन पन्नास मिनी बसेस देण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
सुरुवातीला या 50 मिनी बसेस कंत्राटी पद्धतीने एसटी विभागाला पुरवण्यात येणार आहेत त्यानंतर प्रवाशांचा मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन या बसेस मध्ये आणखी वाढ करण्याचा विचार महामंडळाकडून करण्यात येणार आहे.
मिनी बस चा प्रयोग आता शहरात यशस्वी होताना दिसत आहे. मोठ्या बसशी तुलना केल्यास या बसचा प्रवास जलद आणि कमी खर्चिक होतो. या बसेस ताफ्यात आल्यास व्यवस्थापनाच्या दृष्टीने लवचिकता पण येईल. कमी भारमान असलेल्या गावी मिनी बस सोडल्यास एसटीला तोटाही होणार नाही.
संगमेश्वर : तालुक्यातील मुरडव येथे बारावीची परीक्षा सुरू असतानाच एका मुलीने टोकाचं पाऊल उचलत आपल जीवन संपवलं आहे. रिया रमेश नावले (वय १७, मुरडव-नावलेवाडी) अस या मुलीचं नाव आहे. मुरडव नावलेवाडी येथील रिया रमेश नावले ही बारावीची विद्यार्थिनी आहे. नुकताच तिने इंग्रजीचा पेपर दिलेला होता. तिचे वडील रमेश हे कामानिमित्त मुंबईला आहेत. आई, आजी कामावर गेल्यानंतर घरामध्ये कोणीही नसताना तिने ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली. रियाने आत्महत्या का केली, या मागील कारण अद्यापही स्पष्ट झाले नसून संगमेश्वर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
रत्नागिरी: रत्नागिरी शहरापासून १५ किलोमिटर अंतरावर असलेल्या हातखंबा तारवे वाडी येथे काजू बागायातीला लागलेल्या भीषण वणव्यात एका शेतकऱ्याचा आगीत होरपळल्याने मृत्यू झाला आहे. गोविंद विश्राम घवाळी (वय ६५) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. मंगळवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
हातखंबा येथील काजूच्या बागेत आचानक वणवा पसरला. त्यामुळे बाग वाचविण्यासाठी शेतकरी गोविंद घवाळी यांनी धाव घेतली. मात्र एवढी आग भीषण होती की त्या आगीत ते होरपळले गेले आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील, सरपंच आणि ग्रामस्थांनी या घटनास्थळी धाव घेतली.
रत्नागिरी: रत्नागिरी, राजापूर तालुक्यातील ८ कातळशिल्प राज्य संरक्षित करण्याचा अंतिम प्रस्ताव पुरातत्व विभागाने शासनाकडे पाठविला आहे. विशेष म्हणजे अंतिम अधिसूचनेसाठीचा हा प्रस्ताव आहे. अंतिम अधिसूचना काढल्यानंतर आठह कातळ शिल्पे राज्य संरक्षित होणार आहे.
खाली नमूद केलेली कातळशिल्पे संरक्षित करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आलेला आहे.
भगवतीनगर,
चवे,
देवीहसोळ,
कापडगाव,
उक्षी,
कशेळी,
वाढारूणदे,
बारसू या रत्नागिरी राजापूर तालुक्यातील आठ गावांचा समावेश आहे.
ही शिल्प एका विशिष्ठ जागेत न आढळता समुद्र किनार्यालगत सुमारे ३०० कि.मी. अंतरावर विविध ठिकाणी आढळून येतात. कोकणातील या कातळशिल्पावर अश्मयुगी संस्कृती रूजली होती, असा अनुभव कातळशिल्पांचा शोध घेणार्या सुधीर रिसबूड, धनंजय मराठे यांना आला. जिल्ह्यात आजवर ५२ गावसड्यावर १ हजार २०० पेक्षा अधिक कातळशिल्पांचा शोध लागला आहे. काही शिल्पांच्या भोवती गूढकथा परंपरा दिसतात. या कातळशिल्पांना पर्यटनाची जोड दिल्यास संरक्षण आणि जतन होवू शकते. म्हणून सुधीर रिसबूड, त्यांच्या सहकार्यांनी अनेक प्रयत्न केले आहेत. त्याला काही प्रमाणात यश आले आहे.
संगमेश्वर: मूचरी ता.संगमेश्वर येथे मुचरी ते घोटलवाडी या रस्त्याच्या बाजूस मादी बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला असून २ ते ३ वर्षे अंदाजे वय असलेल्या या बिबट्याचा मृत्यू ४ दिवसांपूर्वी झाला असावा, असा अंदाज आहे. याप्रकरणी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास परिक्षेत्र वनअधिकारी रत्नागिरी श्री.प्रकाश सुतार करत आहेत. वाहनाच्या धडकेत या बिबट्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे
मूचरी ता.संगमेश्वर येथे मुचरी ते घोटलवाडी या रस्त्याच्या बाजूस बिबट्या मृत अवस्थेत पडला असल्याचे स्थानिक ग्रामस्थ श्री.सुर्वे व पोलिस पाटील यांनी कळविल्या नंतर परिक्षेत्र वन अधिकारी यांनी त्यांचे अधिनस्त कर्मचारी यांच्यासमवेत घटनास्थळी समक्ष पाहणी केली. त्यावेळी सदर बिबट्या मृत अवस्थेत पडला असल्याचे दिसून आले व ती मादी आहे.
या बिबट्याचा मृत्यू ४ दिवसा पूर्वी झाला असावा. बिबट्याचा मृत्यू अज्ञात वाहनाच्या धडकेत झाला असावा असा अंदाज आहे