Category Archives: रत्नागिरी

गावागावात असणारी गटबाजी गावांच्या विकासाला बाधक -सुहास खंडागळे

देवरुख:ग्रामीण भागाच्या विकासासाठी आता सामान्य माणसाला, तरुणांना पुढाकार घ्यावा लागेल.ठेकेदार प्रवृत्तीचे लोकं ग्रामीण राजकारणात आहेत यामुळे विकासात अडथळे येत आहेत.परिणामी कोणीतरी पैसेवाला शेठ येईल आणि आपल्या गावांचा विकास करेल या मानसिकतेतून लोकांनी बाहेर पडावे असे आवाहन गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी गोताडवाडी येथे आयोजित सभेत बोलताना केले.

धनिन देवी सेवा मंडळाच्या वतीने शनिवारी शिमगोत्सव निमित्त सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना सुहास खंडागळे यांनी ग्रामीण विकासाबाबत भाष्य केले.ठेकेदार प्रवृत्तीचे लोक राजकारण असल्याने गावांचा सर्वांगीण विकास होण्यात अडथळे येत असल्याचे सुहास खंडागळे यावेळी म्हणाले.ग्रामपंचायत कारभारात तरुणांनी लक्ष घातले पाहिजे. ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद यांचे सदस्य दुर्दैवाने अनेक लोकांना माहीत नसतात अशी परिस्थिती आपल्या ग्रामीण भागात आहे याकडेही खंडागळे यांनी लक्ष वेधले.कोणीतरी पैसेवाला येईल आणि आपल्या ग्रामीण भागात एखादा रस्ता पाखाडी करून देईल, अशा पद्धतीची मानसिकता आपण बदलली पाहिजे आणि ग्रामीण भागातील नागरिकांनी स्वतः पुढाकार घेऊन आपल्या गावांच्या विकासाला चालना दिली पाहिजे असे मत खंडागळे यांनी यावेळी व्यक्त केले.गावागावात असणारी गटबाजी ज्या दिवशी मोडीत निघेल त्या दिवशी गावांच्या विकासाचा मार्ग खुला झालेला असेल,ही गटबाजी मोडीत काढण्यासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा असे खंडागळे म्हणाले. एका गावात तीन, चार राजकीय गट असल्यानेच गावाचा विकास होत नाही.याकडे त्यांनी लक्ष वेधले. तरुणांनी यासाठी पुढाकार घ्यायला हवा असेही ते यावेळी आवर्जून म्हणाले .मोर्डे करंबेळे ग्रामपंचायत चे सदस्य असणारे नितीन गोताड यांनी मागील दोन वर्षात नळपाणी योजना,रस्ते विकासातील अडचणी, नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य याबाबत खंडागळे यांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले.

यावेळी व्यासपीठावर गावचे गावकर राजेश तुकाराम गोताड, अध्यक्ष उदय गोताड, गावीसचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे, डॉ. मंगेश कांगणे तसेच गोताडवतील सांगली व मुंबई मधील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.

 

बेशिस्त आणि मुजोर रिक्षाचालकांपासून ‘चाकरमानी’ बचावला; शिमगोत्सव दरम्यान रत्नागिरी आरटीओ विभागाची कडक मोहीम….

संग्रहित छायाचित्र
रत्नागिरी :गणेशोत्सव, होळी या सणांसाठी आणि हंगामात गावी येणाऱ्या चाकरमन्यांकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारून स्थानिक रिक्षाचालकांकडून त्यांची लूट केली जात आहे. रेल्वे स्थानकापासून गावापर्यंत सार्वजनिक वाहतुकीच्या अपुऱ्या व्यवस्थेचा ते गैरफायदा घेतात अशा तक्रारी कोकणात खासकरून रेल्वेस्थानकानजीकच्या रिक्षा चालकांविरोधात सर्रास ऐकायला मिळतात.
अशा तक्रारी वाढल्याने शिमगोत्सव दरम्यान रत्नागिरी आरटीओ विभागाने अशा रिक्षा चालकांविरोधात एक विशेष कडक मोहीम राबवली आहे. ह्या मोहिमे अंतर्गत ५० पेक्षा रिक्षाचालकाविरुद्ध विविध प्रकारात दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
स्थानक व परिसर येथे २४ तास विशेष तपासणी मोहीम राबवली जात आहे. प्रवाशांना नेमके भाडे कळावे यासाठी महत्वाच्या ठिकाणचे रिक्षा प्रवासाचे अधिकृत दरपत्रक आणि तक्रार करण्यासाठी आरटीओ विभागाचे दूरध्वनी क्रमांक रत्नागिरी स्थानक आणि इतर भागात लावण्यात आले आहेत. या दरांपेक्षा अतिरिक्त दर आकारणाऱ्या रिक्षा चालकांविरोधात तशी तक्रार आल्यानंतर कारवाई करण्यात आली. 
या मोहिमेत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रत्नागिरी जयंत चव्हाण व सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित ताम्हणकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालयातील सर्व मोटर वाहन निरीक्षक व सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक यांनी सहभाग नोंदवला. या मोहिमेबाबत प्रवासीवर्गाकडून समाधान व्यक्त होत आहे. तसेच  अशा प्रकारची मोहीम इतर रेल्वे स्थानिकांसाठी राबवावी अशी मागणी  होत आहे.  

१०५ वर्षाचे आजोबा आणि १०३ वर्षाच्या आजी..कोकणातील निसर्ग समृद्ध जीवनशैलीचा परिणाम. 

रत्नागिरी : प्रगतीमुळे विज्ञानामुळे माणसाचं आयुष्य वाढला. असं म्हणतात. पण यामुळे नद्या प्रदूषित झाल्या जंगला उध्वस्त झाले, कारखान्यांनी हवा प्रदूषित केली.

कोकणात असे गाव आहे जेथे स्वातंत्र्यानंतरही गेली 73 वर्ष रस्ता नव्हता. या गावात रुग्णाला डोलीतून खाली सात आठ किलोमीटर डोंगर उतरून दवाखान्यात आणावे लागत होते. अगदी दोन वर्षांपूर्वी या गावात पहिल्यांदा रस्ता आला.

अतिशय साधी मातीची घरे, तथाकथित कोणताही विकास नाही, निसर्ग पूरक जीवनशैली, हायब्रीड आणि केमिकल यांचा रोजच्या जगण्याशी काही संबंध नाही, कोणतेही प्रदूषण नाही, म्हटले तर अविकसीत पण जीवनशैलीच्या दृष्टीने अतिशय समृद्ध आणि प्रगत असे हे  रत्नागिरीतील लांजा या तालुक्यातील गाव म्हणजे माचाळ.

या गावात 105 वर्षाचे आजोबा आणि शंभर वर्षाच्या आजी हे दांपत्य राहते. या गावात अनेक वृद्ध माणसे 80/ 90 /95 वर्षाची आपल्याला भेटतील.

समृद्ध जीवनशैली प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी दोन दिवस आपण माचाळला येऊन राहिले पाहिजे. हे कोकणातील पहिले हिल स्टेशन येथील कार्यकर्त्यांनी इको हिल स्टेशन निसर्ग समृद्ध पर्यटन केंद्र म्हणून विकसित करायचं ठरवलं.

निसर्गावर प्रेम करणाऱ्या पर्यटकांनी येथे येऊन राहावं आणि या गावातील निसर्गाचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा यातून ग्रामीण अर्थव्यवस्था विकसित व्हावी अशा स्वरूपाचा हा उपक्रम आहे. याच साठी माचाळ महोत्सव 2023 आयोजित करत आहोत. अकरा व बारा मार्च हा विशेष महोत्सव आयोजित होत आहे

 येथील निसर्ग समृद्ध जीवनशैली लोककला उत्सव यांचा अनुभव निसर्गप्रेमी पर्यटकांनी सहपरिवार घ्यावा अशा स्वरूपाची संकल्पना आहे अर्थात मर्यादित पर्यटकांना या पर्यटन केंद्रावर प्रवेश दिला जाणार आहे. राजापूर लांजा तालुका नागरीक संघ, आणि स्थानिक कार्यकर्त्यांची टीम संपूर्ण नियोजन करत आहे.

संजय यादवराव 

कोकण क्लब /कोकण बिझनेस फोरम

नादच खुळा; रत्नागिरीत प्रस्तावित हायवेच्या मध्ये येणारे पूर्ण घरच सरकवले जातेय..

रत्नागिरी | मुंबई गोवा हायवे व रत्नागिरी नागपूर हायवे साठी अनेकांच्या जागा चौपदरी करण्यासाठी गेल्या त्यामुळे अनेकांना आपले मूळ घरे पाडावी लागली होती काहींनी हीं जुनी घर पाडून सुरक्षित अंतरावर आपली नवीन घरे उभी केली मात्र रत्नागिरी जिल्ह्यातील करंजारी येथील ठाकूर यांनी आपला बंगला नवीन तंत्रज्ञानाच्या साह्याने आहे त्या अवस्थेत मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
करंजारी येथील ठाकूर यांचा बंगला चौपदरीकरणात जात होता तो बंगला आता शंभर फूट मागे सरकविला जाणार आहे त्यासाठी चेन्नई येथील कंपनीला हे कंत्राट देण्यात आला असून या कंपनीने आपले काम सुरू केले आहे कंपनीने बंगल्याच्या खाली खाली खोदाई करून त्याखाली जॅक व लोखंडी अँगल लावून हा मूळ बंगला हळूहळू सरकवण्याचे काम सुरू केले आहे त्यामुळे कुठलीही मोडतोड न करता आहे त्या अवस्थेत बंगला मागे नेला जाणार आहे रत्नागिरी जिल्ह्यात अशा प्रकारे पहिल्यांदाच बंगला मागे नेण्याची घटना आहे त्यामुळे हे पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी करीत आहेत.
अशा शिफ्टिंग करिता अंदाजे किती खर्च येतो?
इमारत शिफ्टिंग करणाऱ्या कंपन्या इमारत लिफ्टिंग आणि इमारत शिफ्टिंग तसेच इमारतीची दिशा बदलणे या मुख्य सेवा देतात. इमारत लिफ्टिंग म्हणजे घर काही फूट वर उचलणे. या मध्ये घर जास्तीत जास्त १० फुटांपर्यंत वर उचलेले जाते. साहजिकच घराचे बांधकाम कोणत्या पद्धतीचे आणि किती जुने आहे या गोष्टी लक्षात घेतल्या जातात. आमच्या प्रतिनिधेने दिल्लीतील एका कंपनीशी संपर्क साधला असता ३ फुटापर्यतच्या लिफ्टिंग करण्यासाठी साधारणपणे ४०० ते ५०० रुपये प्रति चौरस फूट खर्च येईल असे सांगण्यात आले. इमारत शिफ्टिंग बद्दल विचारले असता जर १००० चौरस फुटाचे घर १५ ते २० फूट सरकावायचे असेल तर साधारणपणे १० ते १५ लाख खर्च येतो. साहजिकच घराच्या बांधकामाच्या स्वरूपानुसार खर्च कमी जास्त येतो.

चिपळूणच्या वस्तूसंग्रहालयात दाखल झाली शिवपूर्वकालिन पुरातन मूर्ती…

चिपळूण : येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या वस्तूसंग्रहालयात एक मोलाची भर पडली आहे. सुमारे चारशे वर्षांपूर्वीची श्रीलक्ष्मीनारायणची मूर्ती संग्रहालयासाठी मिळाली आहे. ही मूर्ती ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील सुभाष अनंत काळे यांच्या अनेक पिढया पूजेत होती. मनुष्यरूपी गरुडावर आरूढ असलेल्या चतुर्भुज भगवान श्रीविष्णू आणि वामांगी बसलेली लक्ष्मी अशा प्रतिमेला ‘लक्ष्मीनारायण’ अशी संज्ञा आहे

काळे यांनी ही मूर्ती वाचनालयाच्या वस्तूसंग्रहालयाला देण्याची इच्छा व्यक्त केली होती. लोटिस्माचे कार्याध्यक्ष धनंजय चितळे आणि मार्गदर्शक प्रकाश देशपांडे यांनी बदलापूरला जाऊन काळे कुटुंबीयाची भेट घेतली. धनंजय चितळे यांनी मूर्तीची पंचोपचारे उत्तरपूजा करून ही मूर्ती स्वीकारली. चारशे वर्षांपूर्वीची गंडकी शिळेतील ही मूर्ती ५५ सेंटीमीटर उंच आणि ३५ सेंटीमीटर रुंद आहे. गरूडावर बसलेल्या विष्णूच्या डाव्या बाजूला लक्ष्मी असून दोन्ही हात जोडलेल्या गरूडाच्या चेहऱ्यावर अत्यंत विनम्र भाव आहेत. गरुडाच्या जोडलेल्या हातात गदा व दंडाभोवती सर्पवेढा आहे. श्रीविष्णू व लक्ष्मी सालंकृत आहे. भगवान श्रीविष्णू सायुध सिद्ध आहे. मूर्तीच्या मागे प्रभावळ आहे.

 या श्रीलक्ष्मीनारायण मूर्तीमुळे संग्रहालयात आलेल्या समृध्दी वाढली असल्याच्या भावना संस्थेचे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव, कार्याध्यक्ष धनंजय चितळे यांनी व्यक्त केल्या आहेत.

 

आता कोकणातही बॅकवॉटर आणि हाऊसबोट चा अनुभव घेता येईल; कोकणातील तरुणाचे पर्यटन व्यवसायात एक पाऊल पुढे…

रत्नागिरी : कोकणात येणाऱ्या पर्यटकांसाठी एक खुशखबर आहे. आता तुम्हाला केरळ राज्याप्रमाणे  प्रमाणे कोकणात सुद्धा हाऊसबोट आणि बॅकवॉटर टुरिझम चा अनुभव घेता येणार आहे.
कोकणातील दाभोळ येथील एक तरुण सत्यवान दरदेकर हा तरूण कोकणात खऱ्या अर्थाने बॅकवॉटर टुरिझम ची सुरुवात करत आहे. कोकणातील तरुणांने बनवलेली पहिली हाऊसबोट गुहागर पराचुरी येथील निदानसुंदर बॅकवॉटर मध्ये सुरू होत आहे. दोन खोल्यांची ही अतिशय सुंदर हाऊसबोर्ड सत्यवानने बनवली आहे. थोड्याच दिवसात दाभोळच्या बॅकवॉटर मध्ये परचुरी गावात आपल्याला बॅकवॉटरमध्ये जाऊन प्रत्यक्ष राहता येईल. 
आजोळ हे अतिशय देखणे ग्रामीण व निसर्ग पर्यटनाचा केंद्र सत्यवान चालवतो. तो त्याची पत्नी त्याची आई सर्वजण मिळून कोकणात खऱ्या अर्थाने सांस्कृतिक आणि ग्रामीण पर्यटनाचा समृद्ध अनुभव आणि आनंद देतात.  बॅकवॉटर टुरिझम ची ही त्याची एक नवी सुरवात आहे, नक्कीच हा उपक्रम प्रचंड यशस्वी होईल अशी त्याला आशा आहे.
बुकिंग साठी
>सत्यवान दरदेकर.
9881383228
9209705194

रत्नागिरी येथे बोलेरो टेम्पो पलटी होऊन अपघात

रत्नागिरी : झरेवाडी नजीक टेम्पो पलटी होऊन अपघात झाला. अज्ञात वाहनाने हुल दिल्याने हा अपघात झाला. या अपघातात कुणीही जखमी झालेले नाही.रत्नागिरी येथून बारामती कडे जाणाऱ्या मच्छी वाहतुकीचा बोलेरो टेम्पो मोठ्या वाहनाने हूल दिल्याने अवघड वळणावर सकाळी साडे सहाच्या सुमारास कठड्यावर आदळला. मात्र यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. 
पुणे येथून रत्नागिरी येथे मच्छी घेऊन आलेला बोलेरो टेम्पो कंपनीमध्ये मच्छी उतरवून परतीच्या प्रवासात असताना हा अपघात झाला. यावेळी स्थानिकांनी मदत करत बोलेरो गाडीला बाहेर काढण्यात मदत केली.

उपग्रह टॅगिंग – ऑलिव्ह रिडले कासवांचे गूढ उलगडणार ?

रत्नागिरी: जिल्ह्याच्या गुहागर किनाऱ्यावर बुधवारी दोन ऑलिव्ह रिडले कासवांना  उपग्रह टॅगिंग करण्यात आले. राज्याचा कांदळवन कक्ष आणि डेहरादून येथील भारतीय वन्यजीव संस्थेच्या सहकार्याने हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. ऑलिव्ह रिडले कासवांना उपग्रह टॅगिंग करून त्या माध्यमातून समुद्रातील त्यांचा भ्रमणमार्ग शोधण्यासाठी प्रकल्प हाती घेतला आहे. 
‘बागेश्री’ आणि ‘गुहा’ नामकरण 
 टॅगिंग केलेल्या कासवांपैकी  एक-मादी बाग या भागात सापडल्याने तिचे नाव ‘बागेश्री’ ठेवण्यात आले, तर गुहागर या नावावरून दुसरीचे नाव ‘गुहा’ असे ठेवण्यात आल्याची माहिती आंजर्ले येथील कासव-मित्र तृशांत भाटकर यांनी  दिली आहे.
टॅगिंग चा इतिहास 
पूर्वी भारताच्या पूर्व किनाऱ्यावर या कासवांचे टॅगिंग झाले होते. पश्चिम किनाऱ्यावर गेल्या वर्षी (२५ जानेवारी २०२२) पहिल्यांदाच उपग्रह टॅगिंग करण्यात आले होते. सुरुवातीला मंडणगड (वेळास), आंजर्ले (दापोली) या किनाऱ्यावरील प्रत्येकी एका कासवाला ट्रान्समीटर लावले होते. त्यानंतर आणखी तीन कासवांना ट्रान्सलेटर बसवून तेही गुहागरमधून सोडले होतो. ते मादी कासव श्वास घेण्यासाठी समुद्राच्या पृष्ठभागावर आल्यानंतर हे ट्रान्सलेटर त्यांच्या ठिकाणाचे संकेत उपग्रहाला पाठवल्यानंतर त्यांच्या अधिवासाची माहिती अभ्यासकांना मिळत होती. सहा-सात महिन्यांनंतर अचानक माहिती येणे बंद झाले होते. यंदाच्या वर्षी कासवांना पुन्हा ट्रान्समीटर बसवण्याचा निर्णय भारतीय वन्यजीव संस्थान (डब्ल्यूआयआय), कांदळवण कक्ष, वन विभागाने घेतला.
टॅगिंग का केली जात आहे?
हा प्रकल्प यशस्वी झाल्यास या कासवांबद्दल काही गूढ गोष्टी समजण्यास मदत होईल. त्यात या कासवांच्या स्थलांतराचा पॅटर्न कोणता? ती कुठून येतात? कोणत्या ठिकाणी जास्त वेळ राहतात? याशिवाय आपणास  माहित नसलेल्या अनेक गोष्टी समजू शकतील.
कशी केली जाते टॅगिंग
टॅगिंग करण्यासाठी किनारपट्ट्यावर आलेले योग्य वजनाचे ऑलिव्ह रिडले जातीचे मादीकासव निवडले जाते. टॅगिंग उपकरणाचे वजन या कासवांच्या प्रवासास त्रासदायक ठरू नये यासाठी एक नियम ठरविण्यात आलेला आहे. उपकरणाचे वजन कासवांच्या वजनाच्या ३% पेक्षा जास्त असू नये. निवडलेल्या मादीचे कवच साफ करून एका विशिष्ट गमाने उपकरण चिटकवले जाते आणि त्यावर निळा रंग देण्यात येतो. सुमारे ७ ते ८ तासांनी  हा गम सुकल्यावर त्या मादीस समुद्रात सोडण्यात येते.
या उपकरणाला एक बटण असते. जेव्हा कासव श्वास घेण्यास समुद्राच्या पृष्ठभागावर येते तेव्हा या बटनावरचा दाब कमी होऊन बॅटरी कार्यन्वित होते आणि हे उपकरण सेटेलाईटला सिग्नल पाठवते. त्यामुळे या कासवाचे स्थान (Live Location)  माहिती होण्यास मदत होते.   

एसटी बसेसच्या कमी भारमानावर उपाय; रत्नागिरीत आता धावणार मिनी बसेस..

संग्रहित फोटो

रत्नागिरी: ग्रामीण भागातील बस फेऱ्या कमी भारमानामुळे बंद होताना दिसत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातसुद्धा ग्रामीण भागात एसटीला कमी भारमान मिळत असल्याने अनेक फेऱ्या बंद करण्याची वेळ एसटी विभागावर आली आहे त्यातून महामंडळाने पर्याय काढण्याचे ठरवले असून आता ग्रामीण भागात मोठ्या बसेस ऐवजी मिनी बसेस चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यासाठी रत्नागिरीच्या एसटी विभागाला नवीन पन्नास मिनी बसेस देण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. 

हेही वाचा >एका रात्रीत ३ मंदिरात चोरी; चोरट्यांसाठी कोकणातील मंदिरे बनत आहेत ‘ईझी टार्गेट’

सुरुवातीला या 50 मिनी बसेस कंत्राटी पद्धतीने एसटी विभागाला पुरवण्यात येणार आहेत त्यानंतर प्रवाशांचा मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन या बसेस मध्ये आणखी वाढ करण्याचा विचार महामंडळाकडून करण्यात येणार आहे. 

मिनी बस चा प्रयोग आता शहरात यशस्वी होताना दिसत आहे. मोठ्या बसशी तुलना केल्यास या बसचा प्रवास जलद आणि कमी खर्चिक होतो. या बसेस ताफ्यात आल्यास व्यवस्थापनाच्या दृष्टीने लवचिकता पण येईल. कमी भारमान असलेल्या गावी मिनी बस सोडल्यास एसटीला तोटाही होणार नाही. 

संगमेश्वर येथे १२ वी इयत्तेत शिकणाऱ्या मुलीची आत्महत्या

संगमेश्वर : तालुक्यातील मुरडव येथे  बारावीची परीक्षा सुरू असतानाच एका मुलीने टोकाचं पाऊल उचलत आपल जीवन संपवलं आहे. रिया रमेश नावले (वय १७, मुरडव-नावलेवाडी) अस या मुलीचं नाव आहे. मुरडव नावलेवाडी येथील रिया रमेश नावले ही बारावीची विद्यार्थिनी आहे. नुकताच तिने इंग्रजीचा पेपर दिलेला होता. तिचे वडील रमेश हे कामानिमित्त मुंबईला आहेत. आई, आजी कामावर गेल्यानंतर घरामध्ये कोणीही नसताना तिने ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली. रियाने आत्महत्या का केली, या मागील कारण अद्यापही स्पष्ट झाले नसून संगमेश्वर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search