Follow us on 

राजापूर : कोकण रेल्वे प्रशासनाकडून राजापूरकरांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. १६३४५/१६३४६ लोकमान्य टिळक (टर्मिनस) – तिरुवनंतपुरम सेंट्रल “नेत्रावती” एक्स्प्रेसया गाडीला आता राजापूर रोड स्थानकावर थांबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही सुविधा १५ ऑगस्ट २०२५ पासून लागू होणार आहे. सुरवातीला हा थांबा प्रायोगिक तत्वावर असणार आहे.
गाडी थांब्याची वेळ
गाडी क्रमांक १६३४५ : लोकमान्य टिळक टर्मिनस – तिरुवनंतपुरम सेंट्रल “नेत्रावती” एक्स्प्रेस रोज संध्याकाळी ७:४० ते ७:४२ राजापूर रोड येथे थांबेल.
गाडी क्रमांक १६३४६ : तिरुवनंतपुरम सेंट्रल – लोकमान्य टिळक टर्मिनस “नेत्रावती” एक्स्प्रेस रोज सकाळी ७:३८ ते ७:४० येथे थांबेल.
अलीकडेच सांगली जिल्ह्याचे आमदार सदाभाऊ खोत यांनी या स्थानकावर जनशताब्दी एक्स्प्रेस आणि नेत्रावती एक्स्प्रेस या गाड्यांना राजापूर स्थानकावर थांबा द्यावा अशी मागणी केली होती — या मागणीचा पाठपुरावा करत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना यावर्षीच्या मे महिन्यात पत्र लिहून कोकण रेल्वेवरील राजापूर रोड स्थानकावर महत्त्वाच्या गाड्यांना थांबा देण्याची विनंती केली होती.
राजापूर रोड स्थानक हे कोकण रेल्वेवरील एक महत्त्वाचे स्थानक असून, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील प्रवाशांसाठी ते मुख्य संपर्क केंद्र आहे. पूर्वी नेत्रावती एक्स्प्रेसला येथे थांबा नव्हता, त्यामुळे प्रवाशांना रत्नागिरी किंवा कणकवली स्थानकांचा वापर करावा लागत असे. स्थानिक नागरिक आणि प्रवासी संघटनांनी अनेक वर्षांपासून या गाडीला थांबा देण्याची मागणी केली होती.
नेत्रावती एक्स्प्रेस ही गाडी मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस आणि केरळची राजधानी तिरुवनंतपुरम यांना जोडणारी लांब पल्ल्याची महत्त्वाची सेवा आहे. दररोज धावणारी ही गाडी महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळ या चार राज्यांतून प्रवास करते. ‘नेत्रावती’ नदीवरून या गाडीला नाव देण्यात आले आहे.
या प्रायोगिक थांब्यामुळे कोकणातील विशेषतः राजापूर आणि आसपासच्या भागातील प्रवाशांना थेट मुंबई, गोवा, मंगळुरू आणि केरळकडे जाणे सुलभ होईल. तसेच मुंबईहून परतताना प्रवाशांना घरी पोहोचणे सोपे होईल.
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.