Author Archives: Kokanai Digital

सावंतवाडी स्थानकावरील घंटानाद आंदोलन दिपक केसरकर यांच्या आश्वासनांअंती तात्पुरते स्थगित

   Follow us on        

सावंतवाडी-सावंतवाडी येथील अपूर्ण रेल्वेचे टर्मिनस मार्गी लागावे, येथे सुपरफास्ट गाड्यांना थांबा मिळण्याबरोबरच कोरोना काळात काढून घेण्यात आलेले थांबे पूर्ववत करावे, सावंतवाडी स्थानकाचे नामकरण करावे आदी मागण्यांसाठी आज  १५ ऑगस्ट रोजी कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी तर्फे पुकारण्यात आलेले घंटानाद आंदोलन शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार श्री दिपक भाई केसरकर यांचा आश्वासनांअंती तात्पुरते स्थगित करण्यात आले.

कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी तर्फे गेल्या २.५ वर्षात सावंतवाडी स्थानकातील अपूर्ण प्रवासी सुविधा आणि रेल्वेचे अपूर्ण असणारे टर्मिनस पूर्ण करण्यात यावे यासाठी विविध प्रयत्न करण्यात आले होते. २६ जानेवारी २०२४ ला प्रवासी संघटना सावंतवाडी ने आपल्या सलग्न संस्थांना सोबत घेऊन हजारो लोकांचा उपस्थितीत एकदिवसीय लाक्षणिक आंदोलन केले होते. तरी देखील शासन आणि प्रशासनाकडून कोणतीही दखल व हालचाल केली गेली नव्हती. परंतु पुन्हा संघटनेने आंदोलन पुकारल्यानंतर लगेच सावंतवाडी स्थानकातील PRS सुविधा ही १२ तास करण्यात आली.
आज झालेल्या या आंदोलनात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनीसावंतवाडी टर्मिनसला लागणारे पाणी हे तिलारी धरणातून जल जीवन मिशन अंतर्गत मिळेल त्यासाठी  ७ कोटी मंजूर आहेत तसेच येथील प्रस्तावित रेलोटेल लवकरच पूर्ण करण्यात येईल आणि टर्मिनस साठी लागणाऱ्या रस्त्याला जिल्हा नियोजन मधून ३ कोटी मंजूर झाले असल्याची माहिती दिली. तसेच येथील रेल्वे थांब्यासाठी पुढील आठवड्यात कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक श्री संतोष कुमार झा यांच्याशी आपल्या अध्यक्षतेखाली संघटनेच्या शिष्टमंडळाची बैठक लावू असे सांगितले.या वेळी त्यांचा सोबत शिवसेना जिल्हाप्रमुख श्री अशोक दळवी, गजानन नाटेकर, आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
त्यानंतर श्री राजन तेली तसेच रुपेश जी राऊळ, मायकल डिसोझा यांनी देखील आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन आंदोलनकर्त्यांची बाजू समजून आपण आपल्या परीने पाठपुरावा करू असे सांगितले.
याला प्रतिसाद म्हणून संघटनेचे अध्यक्ष ॲड संदीप निंबाळकर यांनी जर कोकण रेल्वे च्या अधिकाऱ्यांसोबत बैठक लावली नाही आणि आमच्या मागण्या केल्या नाहीत तर गणेशोत्सवाच्या तोंडावर सावंतवाडी स्थानकावर हजारोच्या संख्येने रेल्वे रुळावर बसून आंदोलन करू असा इशारा दिला. यावेळी संघटनेचे सल्लागार बबन साळगावकर, बाळासाहेब बोर्डेकर, सचिव मिहिर मठकर, ॲड नकुल पार्सेकर, नरेंद्र तारी, माजी पंचायत सदस्य शांताराम गावडे, गुणाजी गावडे, भूषण बांदिवडेकर, सागर तळवडेकर,सुधीर राऊळ,सागर नानोसकर,गणेश चमणकर, प्रथमेश पाडगावकर, विनोद नाईक, अभिषेक शिंदे आदी संघटनेचे सदस्य उपस्थित होते

”…. नाहीतर कोकणात येणारा एकही नवीन महामार्ग होऊ देणार नाही” जनआक्रोश समितीचा ईशारा

   Follow us on        

रायगड – १७ वर्षांपासून रखडलेला मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग आणि त्यातच पावसाळ्यात झालेली दुरावस्था याकडे सरकारचे लक्ष केंद्रित करण्याकरिता जनआक्रोश समितीने माणगाव येथे आमरण उपोषण आंदोलन सुरू केले असून आधी हा महामार्ग पूर्ण करा नाहीतर कोकणात येणारा एकही नवीन महामार्ग होऊ देणार नाही, असा इशाराच राज्य सरकारला कोकणवासियांनी दिला आहे.

माणगावमध्ये समितीच्या वतीने निषेध रॅली काढण्यात आली. यामध्ये माणगावसह कोकणातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर निघालेल्या रॅलीमध्ये सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करत महामार्ग रोखून धरण्यात आल्याने काही काळासाठी वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र पोलिसांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर महामार्गावरील आंदोलन स्थगित करत नियोजित जागेवरती आमरण उपोषण सुरू करण्यात आले.

हा महामार्ग केव्हा पूर्ण होईल याबाबत खुद्द मुख्यमंत्र्यांकडून लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. या महामार्गाच्या दुरावस्थेमुळे झालेल्या अपघातात जे मृत्यूमुखी पडले त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना कसलेही आर्थिक सहाय्य केले जात नाही, अपघातात जखमी झालेल्यांना सहाय्य केले जात नाही याबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. कोकणातील नागरिकांची उपजीविका पर्यटनावरती अवलंबून आहे मात्र रस्ता खराब असल्याने पर्यटकांनी कोकणाकडे पाठ फिरवली आहे त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर झाला असल्याने त्याची नुकसान भरपाई राज्य सरकारने करून द्यावी, यासह विविध चौदा मुख्य मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

संजय यादवराव, रुपेश दर्गे, अजय यादव, संजय जंगम,पराग लाड, सुरेंद्र पवार, प्रशिल लाड, आशिष बने, अनिल जोशी यांनी या आंदोलनाची हाक दिली असून त्यास मावळ प्रतिष्ठान, बजरंगदलसह अनेक सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला आहे. माणगावचे नगराध्यक्ष ज्ञानदेव पोवार, माजी नगराध्यक्ष आनंद यादव, रिक्षाचालक मालक संघटनेचे अध्यक्ष अण्णासाहेब साबळे, उद्योजक शेखर गोडबोले यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी आमरण उपोषणास उपस्थित राहून पाठींबा व्यक्त केला.

नवीन महामार्ग होऊ देणार नाही – यादवराव

गणेशोत्सव आणि शिमगा हे कोकणवासियांचे प्रमुख सण आहेत. या सणाला कोकणी माणूस यायला निघाला की सरकार सल्ला देते पुणे कोल्हापूर मार्गे कोकणात जा, अरे आम्ही आमच्या हक्काच्या रस्त्याने जायचे नाही तर किती वर्षे दुसर्‍यांच्या दारातून घरी जायचे हे यापुढे जमणार नाही, आधी आमचा रस्ता पूर्ण करा. जोपर्यंत मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग पूर्ण होत नाही तोपर्यंत कोकणासाठी घोषणा होत असलेल्यापैकी एकही नवीन महामार्ग होऊ देणार नाही, असा इशारा कोकण भूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय यादवराव यांनी दिला.

 

 

Konkan Railway: सौरऊर्जेपासून ३.१८ लाख युनिट वीजनिर्मिती करून कोकण रेल्वेने वाचवले ३८.५६ लाख रुपये

   Follow us on        
Konkan Railway: कोकण रेल्वेने स्पर्धात्मक निविदांद्वारे 1200 कोटी रुपयांहून अधिक किमतीचे नवीन प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण करून 2023-24 या वर्षात आतापर्यंतचा सर्वात जास्त म्हणजे 301 कोटी रुपयांचा नफा मिळवला असल्याचे कोकणरेल्वे तर्फे आज स्वातंत्र्यदिनाच्या औचित्य साधून जाहीर करण्यात आले आहे. याबरोबरच कोकण रेल्वेने केलेल्या इतर कामगिरींची यादीही जाहीर केली आहे
जानेवारी ते जुलै 2024 या कालावधीत सौर उर्जेपासून 3.18 लाख युनिट वीज निर्मिती केली आहे, ज्यामुळे ऊर्जा बिलांमध्ये 38.56 लाख रुपयांची बचत झाली करण्यात कोकण रेल्वेला यश आले आहे.
रेल्वे मंत्रालयाने गोव्यातील जुने गोवा आणि पेरनेम बोगद्याच्या बांधकामासाठी 1,486 कोटी रुपयांच्या भागीदारीस मान्यता दिली असून कर्नाटकातील ठोकूर आणि येथील गुड्स शेडचे काम पूर्ण झाले आहे. तर उडुपी (कर्नाटक), इंदापूर (महाराष्ट्र), वेर्णा (गोवा) येथील गुड्स शेडचे काम प्रगतीपथावर आहे.
कोकण रेल्वेने जानेवारी 2024 ते जुलै 2024 दरम्यान सुमारे 15,399 गाड्या चालवल्या असून त्यात 181 उन्हाळी विशेष गाड्यांसह 11,444 मेल/पॅसेंजर गाड्या 3,955 मालगाड्यांचा समावेश आहे.
एकूण 26 हरवलेल्या मुलांची रेल्वे आणि रेल्वे परिसरातून सुटका करण्यात आली आणि त्यांना सुरक्षितपणे त्यांच्या पालकांना आणि चाइल्ड हेल्पलाईनला सुपूर्द करण्यात आले. दिनांक 05 जुन 2024, जागतिक पर्यावरण दिनी कोकण रेल्वे मार्गावर आणि कोकण रेल्वे विहार येथे एकूण 6,548 रोपे लावण्यात आली.
कोकण रेल्वेतील 190 पदांसाठी भरती अधिसूचना लवकरच जारी करण्याचे नियोजन असल्याचे कोकण रेल्वे तर्फे जाहीर करण्यात आले. 2021-22 आणि 2022-23 या वर्षांसाठी कर्मचारी कल्याण निधीतून कोकण रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी 20.78 लाख रुपये रोख पुरस्कार आणि शिष्यवृत्ती म्हणून वितरित करण्यात असल्याची माहिती देण्यात आली आहे.
पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना देण्यासाठी 9 जुलै 2024 रोजी इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लिमिटेड (IIFCL) आणि कोकण रेल्वे यांच्यात महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला.
भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त, कोकण रेल्वेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक/कोकण रेल्वे, संतोष कुमार झा यांनी आज राष्ट्रीय ध्वज फडकावला आणि कोकण रेल्वे विहार, नेरुळ, नवी मुंबई येथे रेल्वे संरक्षण दल (RPF) तुकडीची पाहणी केली. मेळाव्याला संबोधित करताना झा यांनी कोकण रेल्वेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या अपवादात्मक टीमवर्क आणि समर्पणाची प्रशंसा केली. त्यांनी संस्थेच्या वाढीसाठी आणि यशासाठी त्यांचे परिश्रमपूर्वक प्रयत्न सुरू ठेवण्याचे आवाहन केले. याशिवाय, त्यांनी कोकण रेल्वेच्या उत्कृष्टतेची वचनबद्धता अधोरेखित करणाऱ्या अनेक महत्त्वाच्या कामगिरी आणि भविष्यातील उपक्रमांवर प्रकाश टाकला.

Ganesh Chaturthi 2024: खुशखबर! गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना टोलमाफी जाहीर

   Follow us on        
मुंबई : गणेशभक्तांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खूशखबर दिली आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना टोलमाफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. त्यासंबधीचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे.
सह्याद्री अतिथीगृह येथे गणेशोत्सवानिमित्त कायदा व सुव्यवस्थेचा आढावा आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याबाबत बुधवारी बैठक झाली.  या बैठकीत गणेशभक्तांसाठी टोल माफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला होता. तसेच, गणपती आगमन आणि विसर्जन मार्गावरील खड्डे तातडीने बुजवण्याचे असे आदेश दिले आहेत. त्यामुळे गणेशभक्तांना दिलासा मिळाला आहे. राज्यात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा. गणेशोत्सवापूर्वी राज्यात सर्वत्र गणपती आगमन आणि विसर्जन मार्गावरील खड्डे तातडीने बुजवावेत. त्यासाठी रॅपीड क्वीक सेटिंग हार्डनर-एम सिक्टी या आधुनिक साहित्याचा वापर करावा. झाडांच्या फांद्याची छाटणी करावी. कृत्रिम तलावांची संख्या वाढवावी. मोठ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या ठिकाणी आरोग्य पथक, रुग्णवाहिका, अग्निशमन वाहन तैनात करावेत असे निर्देशही या सभेत  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या गणेश भक्तांना यंदाही टोल माफीचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला आहे.राज्यात गणेशोत्सवाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आवश्यक त्या तातडीच्या कामांना प्राधान्य दिले पाहिजे असे शिंदे यांनी या बैठकीत सांगितले. गेल्या वर्षी ज्या सार्वजनिक गणेश मंडळांना परवानगी दिली होती, ती यावर्षीही कायम राहील त्यासाठी शुल्क आकारणी करू नये. मंडळांना ज्या अन्य परवानग्या लागतात त्यासाठी एक खिडकी य़ोजना राबवावी. गणेश आगमन आणि विसर्जन मार्गावर मिरवणुकीदरम्यान अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्यांची छाटणी तातडीने करावी. खड्डे बुजवताना आधुनिक तंत्रज्ञनाच्या वापराणे बनविण्यात आलेले साहित्य वापरावे. खड्डे बुजविण्याकामी हयगय करणाऱ्या अधिकाऱ्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट निर्देश  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.राज्यातील सर्वच मोठ्या शहरांमध्ये गणपती आगमन आणि विसर्जन मार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी रॅपीड क्वीक सेटिंग हार्डनर-एम सिक्टी या आधुनिक साहित्याचा वापर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी यांना दिले. मोठ्या सार्वजनिक गणेश मंडळांच्या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी होते. अशा ठिकाणी आरोग्य पथक, रुग्णवाहिका, अग्नीशमन वाहन तैनात करावेत. महापालिकांनी गणेशोत्सव मंडळाच्या ठिकाणी तैनात केलेल्या अग्नीशमन वाहनासाठी कुठलेही शुल्क आकारणी करू नये, असेही निर्देश  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. याचबरोबर, सर्वंत्र पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी मंडळांनी देखील सहकार्य करावे. मूर्ती विसर्जनासाठी महापालिकांनी कृत्रिम तलावांची संख्या वाढवावी, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. पुणे येथील एका संस्थेने विसर्जित केलेल्या शाडू मातीच्या मुर्तीचा पुनर्वापराचा प्रयोग केला असून त्यांनी पुनरावर्तन हा उपक्रम सुरू केला आहे. राज्यात सर्वच महापालिकांनी हा उपक्रम राबवावा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचे पैसे खात्यांवर जमा होण्यास सुरुवात

   Follow us on        

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे, अशी माहिती भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील यांनी एक्स खात्यावरून दिली.

महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) अंमलात आणली आहे. १ जुलैपासून ही योजना कार्यान्वित झाली असून आतापर्यंक १ कोटी ३५ लाख अर्ज स्वीकारण्यात आले आहेत. तर, रक्षाबंधाच्या पार्श्वभूमीवर १७ ऑगस्ट रोजी हा निधी पात्र महिलांच्या खात्यात जमा होईल, अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे व उपमुख्यमंत्रीअजित पवार यांनी दिली होती. परंतु, त्या आधीच पात्र महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाल्याची माहिती भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील यांनी दिली. पैसे जमा झाल्याचा मेसेज आल्याचे काही स्क्रीनशॉटही त्यांनी शेअर केले आहेत.

 

 

प्रशासनाला जागे करण्यासाठी सावंतवाडीत उद्या मोठा ‘घंटानाद’ होणार

   Follow us on        

सावंतवाडी: कोकण रेल्वे संदर्भात प्रलंबित प्रश्नांची नेहमी वाचा फोडणारी संघटना म्हणजेच कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी. या संघटनेने गेल्या वर्ष भरात अनेक प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडली त्यात सावंतवाडी रेल्वे टर्मिनस हे मुख्य..!

सावंतवाडी टर्मिनसचे भूमिपूजन होऊन ९ वर्षा पेक्षा अधिक काळ लोटला येथे प्रस्तावित रेलो-टेल देखील रखडले, त्यातच सावंतवाडी स्थानकातून कोरोना काळात तब्बल तीन रेल्वे गाड्यांचे थांबे हे रद्द करण्यात आले. या मुळे प्रवाशांची परवड होऊ लागली. या प्रवाशांचा आवाज प्रशासन आणि शासन या दोघांकडे पोहोचवण्यासाठी माजी आमदार कै. जयानंद मठकर यांचा नातू मिहिर मठकर आणि त्याचे साथीदार व असंख्य टर्मिनस प्रेमी पुढे आले. सुरुवात झाली ती निवेदनाद्वारे, त्यानंतर माहितीचे अधिकार, त्यानंतर रेल्वे अधिकारी भेट, मंत्र्यांचा भेटी आदी घेण्यात आल्या. तरी यश मिळत नव्हतं.

२६ जानेवारी २०२४ रोजी संघटनेने सलग्न संघटनांचा सोबत मिळून हजारो लोकांचा उपस्थितीत लाक्षणिक उपोषण देखील केले होते. तरी देखील प्रशासनाला जाग आली नाही.म्हणून प्रशासनाला जागे करण्यासाठी येत्या स्वातंत्र्य दिनी मोठ्ठा घंटानाद करण्यात येणार आहे. उद्या दिनांक १५ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता सावंतवाडी रेल्वे स्थानकावर होणाऱ्या घंटानाद आंदोलनाला सर्व रेल्वे प्रवासी,टर्मिनस प्रेमी आणि कोकणवासियांनी उपस्थितीत राहण्याचे आवाहन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Brain Test: हा पासवर्ड तुम्ही शोधू शकता का?

   Follow us on        

Puzzle Time: आपल्या मेंदूसाठी व्यायाम. तुम्हाला फक्त हा तीन आकडी पासवर्ड शोधायचा आहे. तुमच्या मदतीला हींट देण्यात आल्या आहेत.

 

1) 6 8 2 – यातील एक नंबर बरोबर आहे आणि योग्य जागेवर आहे.

 

2) 6 1 4 – यातील एक नंबर बरोबर आहे मात्र चुकीच्या जागेवर आहे.

 

3) 2 0 6 – यातील दोन नंबर बरोबर आहेत मात्र चुकीच्या जागेवर आहेत.

 

4) 7 3 8 – यातील एकही नंबर बरोबर नाही आहे.

 

5) 7 8 0 यातील एक नंबर बरोबर आहे मात्र तो चुकीच्या ठिकाणी आहे.

 

चला मग, लावा डोके…. आणि हो आपले उत्तर कमेन्ट बॉक्स मध्ये नक्की पोस्ट करा..

Ganesh Chaturthi 2024: कोकणात जाणार्‍या गणेशभक्तांसाठी ‘अटलसेतू’ टोलमुक्त होणार?

   Follow us on        

Ganesh Chaturthi 2024:  गणेशभक्तांसाठी ‘अटलसेतू’ टोलमुक्त करावा अशी मागणी होत आहे.

मुंबई – गोवा महामार्गचे काम चालू असल्यामुळे गोरी – गणपती सणास आपल्या गावी जाणाऱ्या गणेशभक्त प्रवाशांचा प्रवास त्रासदायक होऊ नये म्हणून गेली काही वर्षे मुंबई – (पूणा ) बेंगलोर महामार्ग गौरी – गणपती सणात टोल मुक्त केला जातो. तसाच “अटल सेतू” टोल मुक्त करण्यासाठी प्रयत्न करावा अशी मागणी गणेशभक्त कोकवासीय प्रवासी संघाने रायगड रत्नागिरी पालकमंत्री मान. उदय सामंत यांचकडे करण्यात आली.

गौरी – गणपती सणास कोकणात आपल्या गावी जाणाऱ्या गणेशभक्त प्रवाशांच्या सोयीसाठी एस. टी. महामंडळाच्या सहकार्याने गणेशभक्त कोकणवासीय प्रवासी संघाने १२०० पेक्षा जास्त एस. टी. गाड्यांचे नियोजन केले आहे. इतर काही संस्था, राजकीय कार्यकर्ते, आणि एस. टी. महामंडळही जादा गाड्यांचे नियोजन करतात. एस. टी. महामंडळाने ३००० पेक्षा जास्त गाड्यांचे नियोजन केल्याचे समजते. तसेच छोटया गाड्यांचेही प्रमाण जास्त असते, मुंबईत अनेक ठिकाणी रस्ता, पूल, मेट्रो अशी कामे सुरु आहेत.त्याच कालावधीत श्री गणेश आगमनाच्या मिरवणूकाही निघतात. वाहतूकीची कोंडी होते, जर अटल सेतू मार्ग टोल मुक्त केल्यास मुंबईतून निघणाऱ्या एस. टी. गाड्या, व इतरही गाड्या अटलसेतू मार्गे जातील. त्यामुळे वाहतूकीची कोंडी होणार नाही, प्रवाश्यांचा वेळही वाचेल, हे मान. मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिले. माजी आमदार मान. तुकाराम काते यांनी मंत्री महोदयांची भेट घडवून आणली. गणेशभक्त कोकवासीय प्रवासी संघांचे अध्यक्ष रविंद्र मुकनाक, कार्याध्यक्ष -दीपक मा. चव्हाण, कोषाध्यक्ष- विश्वनाथ मांजरेकर, प्रमुख संघटक- अनिल काडगे, अशोक नाचरे, अजित दौडे, संतोष कासार, शंकर नाचरे आदी उपस्थित होते. प्रवासी संघाच्या वतीने कार्याध्यक्ष- दीपक चव्हाण यांनी आपल्या मागणीचे सविस्तर विश्लेषण केले. सकारात्मक चर्चा झाली. दिनांक १८/०८/२०२४ रोजी होणाऱ्या स्नेह संमेलास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचे निमंत्रणही प्रवासीसंघाच्या वतीने देण्यात आले.

सावंतवाडी रेल्वे स्थानकावर आता १२ तास रेल्वे आरक्षण सुविधा मिळणार; प्रवासी संघटनेच्या प्रयत्नांना यश

   Follow us on        
सावंतवाडी:  सावंतवाडी स्थानकावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे. सावंतवाडी रेल्वे स्थानकावर प्रवासी तिकीट आरक्षण खिडकी आता सकाळी ८ ते संध्याकाळी ८ अशी १२ तास खुली राहणार आहे. या आधी ती सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत खुली असायची. आता ती १२ तास खुली राहणार असल्याने प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.
प्रवासी संघटनेच्या प्रयत्नांना यश 
खरेतर सावंतवाडी रेल्वे स्थानकावरून आंबोली-चौकुळ, कलंबिस्त-शिरशिंगे, शिरोडा, रेडी , दोडामार्ग आणि वेंगुर्ल्यातील गावे अशा मोठ्या पट्ट्यातील प्रवासी प्रवास करतात. अर्धवेळ तिकीट आरक्षण खिडकीमुळे दुरून येणाऱ्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत असे. त्यामुळे या स्थानकावरील आरक्षण खिडकी पूर्णवेळ चालू करावी अशी मागणी येथील कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी तर्फे करण्यात येत होती. दिनांक ९ ऑगस्ट रोजी सुशोभीकरणाच्या कार्यक्रमात खासदार नारायण राणे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी हजेरी लावली होती. यावेळी संघटनेच्या विविध मागण्याचे निवेदन सादर करून त्या लवकरात लवकर पूर्ण कराव्या अशी विनंती केली गेली होती. या निवेदनात स्थानकावरील आरक्षण खिडकी पूर्णवेळ सुरु करावी या मागणीचा समावेश होता. त्यांच्या विनंतीला मान देऊन खासदार नारायण राणे यांनी रेल्वे प्रशासनाला तशा सूचना दिल्या होत्या. त्यामुळे प्रवासी संघटनेने त्यांचे आभार मानले आहेत.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता कधी येणार? – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली महत्त्वाची माहिती

   Follow us on        

ठाणे : “मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण” योजना कायमस्वरूपी राबविली जाणार असून या योजनेचा पहिला हप्ता दि.17 ऑगस्ट रोजी जमा होणार असून राज्यातील १ कोटीपेक्षा जास्त महिलांना यांचा लाभ मिळणार आहे, असे विधान महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले.

महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने शहापूर येथे महिला संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी मंत्री आदिती तटकरे बोलत होत्या. यावेळी आमदार दौलत दरोडा, माजी खासदार आनंद परांजपे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बाल विकास) संजय बागूल, महिला आर्थिक व विकास महामंडळाच्या जिल्हा समन्वय अधिकारी अस्मिता मोहिते, कायापालट लोकसंचलित केंद्राच्या पदाधिकारी, महिला बचतगट व अंगणवाडीच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मंत्री तटकरे म्हणाल्या की, “मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण” योजनेंतर्गत जुलै व ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे पैसे दि. १७ ऑगस्ट रोजी संबंधित लाभार्थी महिलेच्या खात्यावर थेट जमा होणार आहेत. “मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण” योजना तयार करताना डोळ्यासमोर एकच हेतू होता, गरजू महिलांना हक्काचे पैसे मिळावेत. कुटुंबाच्या गरजा भागवताना महिलांच्या अनेक इच्छा अपूर्ण राहतात. त्या इच्छा “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजनेतून पूर्ण होणार आहेत. या पैशावर फक्त महिलांचाच अधिकार असावा म्हणून महिलांचे स्वतंत्र बॅक खाते ही अट ठेवली आहे. ज्या महिलांनी बॅक खाते काढले नसेल त्यांनी तात्काळ बॅक खाते काढून ३१ ऑगस्टपूर्वी “मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण” योजनेचा अर्ज भरावा.

कोविड काळात अंगणवाडी सेविकांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आपण ग्रॅज्युएटी देणार आहोत. तसेच केंद्र शासनाकडे मानधन वाढीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. १ लाख १४ हजार महिला स्मार्टफोन देण्यात आले आहे. ४ लाखापेक्षा जास्त शालेय गणवेश शिवण्याचे काम महिला बचतगटांना देण्यात आले आहे. त्यातून प्रत्येक गणवेश शिवण्यामागे प्रत्येक महिलेला ११० रुपये मिळत आहे. यातून महिलांना रोजगार मिळत आहे. अंगणवाडी सेवकांना “मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण” योजनेचे प्राप्त अर्ज भरल्यास प्रत्येक अर्जासाठी ५० रुपये देण्यात येत आहेत, असेही यावेळी मंत्री तटकरे यांनी सांगितले.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार दौलत दरोडा यांनी कायापालट लोकसंचलित केंद्र चांगले काम करीत असून यातून अनेक महिलांना रोजगार मिळाला आहे. हे केंद्र करीत असलेल्या कामकाजासाठी शासनाकडून प्रशासकीय खर्चाची तरतूद करण्यात यावी, अशी विनंती त्यांनी मंत्री महोदयांकडे केली.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना माजी खासदार आनंद परांजपे म्हणाले की, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ३१ ऑगस्टपर्यंत सर्व पात्र महिलांनी अर्ज भरून घ्या. अफवांवर विश्वास ठेवू नका. ही योजना कायमस्वरूपी सुरु राहणार आहे.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विजया गवारी यांनी केले.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search