अवघ्या ५/१० हजारासाठी आपली मते विकू नका. या वेळी मतदान करताना कोकणातील पुढील पिढीचा विचार करूनच मतदान करा. आतापर्यन्त तळकोकणात मोठ्या प्रमाणात घुसखोरी झाली असून येथे मोठया प्रमाणात जंगलतोड झाली आहे. हे असेच चालू राहिल्यास कोकण यापुढे कोकण राहणार नाही. तुमची गावे नष्ट होतील, वायनाड सारख्या दुर्घटना घडतील. हे सर्व टाळण्यासाठी यावेळी सुज्ञपणे मतदान करण्याचे आवाहन कोकणातील ‘रानमाणूस’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्रसाद गावडे याने व्हिडिओच्या माध्यमातून केले आहे.
राज्यात येऊ घातलेल्या विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शाश्वत कोकणच्या दृष्टीने काही धोरणात्मक बाबी सर्व राजकीय पक्ष व उमेदवारांनी आपल्या जाहीरनाम्यात समाविष्ट कराव्यात तसेच कोकणातील सुज्ञ मतदारांनी याची मागणी करावी आणि शाश्वत कोकण परिषदेच्या उद्धिष्टांस समर्थन देणाऱ्या उमेदवारांनाच कोकणातून प्रतिनिधित्व देऊन कोकणच्या उज्वल व शाश्वत भविष्याला दिशा द्यावी या हेतूने कोकण परिषदेने “कोकणी जनतेचा जाहीरनामा” प्रकाशित केला आहे. या जाहीरनाम्यात दिलेल्या मुद्द्यांचा समावेश जो उमेदवार आपल्या जाहीरनाम्यात करेल अशा उमेदवारांनाच मत द्या आणि कोकण वाचावा असे त्याने आवाहन केले आहे.
कोकणातील सर्व स्तरीय जनतेच्या मुंबई , वसई , सावंतवाडी , चिपळूण , चिंचणी(पालघर) व पेण येथील झालेल्या परिषदांच्या विचारमंथनातून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकणच्या निसर्ग व संस्कृती यांच्या शाश्वत अस्तित्त्वासाठी कुठली धोरणे अंमलात आणावी , कुठले प्रकल्प पाहिजेत – कुठले नको याची स्पष्ट दिशा दर्शविणारा जाहीरनामा आज प्रकाशित करण्यात आला आहे. या जाहीरनाम्यात प्रदूषणकारी प्रकल्प कोकणात प्रस्तावित न करणे , ग्रीनफिल्ड व शक्तीपीठ महामार्ग रद्द करणे , सिडको व एम एस आर डी सी यांना कोकण किनारपट्टी भागातून नियोजनाचा अधिकार देणारे अध्यादेश रद्द करणे , जंगलतोड बंदी , दोडामार्ग तालुक्याचे संरक्षण , जांभ्याच्या सड्यावरील जैव विविधतेचे संरक्षण, अवैध एल इ डी , परसिनेट मासेमारीवर कृती अशा मागण्यांना धोरणात्मक निर्णयात सामील करण्याचे म्हंटले आहे. प्रत्येक जिल्ह्यात रुग्णालय , विद्यापीठ , अंगणवाडी -आशा वर्कर्स यांना वाढीव अनुदान, कातळशिल्प संरक्षण, बोली भाषेचे जतन , स्वयं रोजगारावर भर , कृषी प्रक्रिया केंद्रे, कोकण रेल्वेचे थांबे वाढवणे आदी मागण्याही करण्यात आल्या आहेत. या जाहीरनाम्यात कोकणी जनतेने अजून भर घालावी अशी अपेक्षा आहेच तरीही हा जाहीरनामा राजकीय पक्ष , उमेदवार , कार्यकर्ते आणि कोकणातील सर्वच जनतेपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न सर्वांनी करावा असे आवाहन करण्यात येत आहे. शाश्वत कोकण परिषदचे समन्वयक सत्यजीत चव्हाण व शशी सोनावणे यांचेद्वारा प्रस्तुतचा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला आहे.